🙏🌹🙏🌹🙏


*काट्याच्या अणीवर वसले तीन गाव*


🕉🕉🕉🕉🕉🕉


काट्याच्या अणीवर वसले तीन गाव ।

दोन ओसाड एक वसेचिना ॥१॥


वसेचिना तिथे आले तीन कुंभार ।

दोन थोटे एका घडेचिना ॥२॥


घडेचिना त्याने घडली तीन मडकी ।

दोन कच्ची एक भाजेचिना ॥३॥


भाजेचिना त्यांत रांधले तीन मुग ।

दोन हिरवे एक शिजेचिना ॥४॥


शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे ।

दोन रुसले एक जेवेचिना ॥५॥


जेवेचिना त्याला मारल्या तीन बुक्क्या।

दोन हुकल्या एक लागेचिना ॥६॥


ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।

सद्‌गुरूवाचुनि कळेचिना ॥७॥


ज्ञानदेवांचे हे भारुढ [बहुरुढ] आध्यात्मिक छटा असलेले आहे.


काळ नावाच्या काट्यावर स्थूल , सूक्ष्म व लिंगदेह ही तीन गावे वसवली. 

स्थूल व सूक्ष्म हे देह नाशवंत म्हणून ओसाड.

लिंगदेह हा अदृष्य 

अनाकलनीय म्हणून वसेचिना..


तीन कुंभार म्हणजे 

*ब्रह्मा विष्णू महेश्वर*

पण... विष्णू आणि महेश्वर हे निर्मिती बाबत तटस्थ. 


एक कुंभार ब्रह्मा याचे कडे निर्मिती,  पण तो वसवतो ते आत्मतत्व.  याच आधारावर जो त्याचाच आधार आहे .


त्याने घडवलेली तीन मडकी. म्हणजे स्थूल सूक्ष्म देह नाश पावणारी कच्ची मडकी.


या लिंगदेहात अविनाशी आत्मतत्व.  यावर अग्नीचा परिणाम नाही म्हणून भाजण्याचा प्रश्नच नाही.

 

त्यात सत्व रज तम हे तीन मूग रांधण्याचा प्रयत्न.  


रज तम हे हिरवे कधीच पक्व न होणारे. पण सत्व मात्र रांधण्याचा प्रश्नच नव्हता.


तीन काळ हे तेथील पाहुणे. 


भूतकाळ रुसून बाजूला झाला. वर्तमान प्रत्येक क्षणाला रुसून मागे जात आहे. भविष्य अजून नंबर न लागल्यामूळे जेवत नाही म्हणून कर्म अद्याप उदित व्हायचे आहे.


न जेवणारा भविष्य काळ याला क्रियमाण , संचित, व प्रारब्ध या तीन म्हशी.  या पैकी संचित व प्रारब्ध यांचा नवनिर्मितीचा काळ संपलेला व क्रियमाणाचा  कर्म झाल्या शिवाय कसा फळणार.


गुरुकृपा झाली व भक्ती पक्व झाली तर काय घडते ?


संत म्हणतात : 

प्रारब्ध, संचित क्रियमाण l

भक्तालागी नाहीत जाण I


या संचित क्रियमाणाला गुरु हे  'प्रत्येकी एक' म्हणजे 'तीन बुक्या' मारतात. पण ते आधीच नष्ट झाल्यामुळे हुकणे न लागणे हे घडणारच. 


हा अनुभव गुरु वाचून येणार नाही याचा अर्थ गुरुकृपेशिवाय देहभावनेतून देवभावनेत जाता येणार नाही व त्या शिवाय त्रिगुणातीत होता येणार नाही. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा