मन वाचनिं आज ना रमे; स्मृति होते तव एकसारखी;

हुरहूर भरून ये हृदीं; भर संध्या करि त्यांत आणखी.

बसलों म्हणुनीच येउनी — जग-कोलाहल लांब मागुती —

दगडावर त्याच, ज्यावरी गतकालीं तव स्निग्ध संगती.


पसरे लहरींत वायुच्या मधु छायार्णव सांध्य भोवती;

निमिषांत नभावरी निळ्या किति नानाविध रंग फाकती.

अति संथ समीर-गारवा सुटुनी वाटसरास सांगतो,

“जरि वाट कितीहि चाललां, नच आता तरि अध्व-खेद तो.”

विहरून नभांत स्वैरसें घरटयाला निज शेवटीं त्वरें,

चिंवचींवित सांज-माधुरी बघ हीं जात सुखांत पाखरें.

मिटणार फुलाफुलांतुनी, प्रतिपानावर कंप पावुनी,

लहरीलहरींतुनी जलीं, प्रतिमेघावर गोड रंगुनी,

श्रुतिशांत दिनांत-गीत ये श्रवणीं, “श्रांत जिवा विसाव घे !”

मज हाय कुठे न आसरा; करिती पारध हे विचार गे.

हळुवार सुहास, रात्र ही मखमाली पसरीत हात ये;

अपघात घडून देह हा पडला एक रुळावर इथे,

बघुनी क्षण शांति मन्मनीं न कळे कां परि खास वाटली,

कुठुनी तरि शक्ति ;…………………

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा