जा जाई आता, परतुनि कां हाससी ?

कां उगाच वळवुनि मागे

आपुली नजर, भारिसी ?


स्थितधी नजरी मी, मानी तरि मानिनी,

नच अवाक्षरही एका,

काढीन कधी भाषणीं.


ये वीणारव मधु, मंजुळ पवनांतुनी,

डबडबती ऐकुनि डोळे

कारुण्य-सुधा-सिंचनीं.


परि एकहि भोळा अश्रू जो तेथुनी

पडणार, तोंच घेईल

हृदयाग्नि तया शोषुनी.


धगधगित निखारा हृदयीं हा कोंदुनी,

मत्प्रसन्नवदनीं छाया

वरि शीतल चंद्राहुनी.


ही पाझरते तव शांत शरच्चन्द्रिका !

निशिगंध दरवळे भोती,

पुलकिता मार्ग-वालुका.


अदृश्य अप्सरा अवनीवर येउनी,

घुमविती निशा-संगीत

या मिटल्या पुष्पांतुनी.


मी मानव ! – दुर्बळ ! – दिव्य, धवल माधुरी !

व्याकळून हृदयीं येतां

स्मृति होइल तव अंतरिं .


हृतकंप ! – तरल भावना ! गोड ती स्मृति !

परि निष्ठुर जबरेने मी

गाडीन गाढ मी विस्मृतीं.


बंबाळ जखम आतली दाबतों अशी,

बेहिम्मत आर्तरवाने

रडतील रडो दीनशीं.


निष्प्रेम-निराशा-दुःसह जीवन तरी,

याचना न केविलवाणी

मम वदेल कधी वैखरी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा