हाय जॅक

विमानात एकजण अचानक उठून उभा राहिला आणि ओरडला, ''हाय जॅक!''

... तत्क्षणी हवाई संुदरीच्या हातातला ट्रे खाली पडला आणि ती थरथरू लागली, पर्सरसह निम्म्याहून अधिक प्रवाशांनी हात वर केले आणि उरलेले भयव्याकुळ होऊन रडू लागले...

... तेवढ्यात समोरून एक प्रवासी उठून उभा राहिला आणि पहिल्या प्रवाशाला पाहून ओरडला, ''हाय टॉम!!!!!''

मरून पडलेला पांडुरंग

वक्तशीर मुलगा
पाठीवर दप्तर घेऊन
शाळेत वेळेवर पोहोचतो
तसा येऊन पोहोचला पाऊस,
एखादं आदिम तत्त्वज्ञान रूजवावं
तसं शेतकऱ्यानं बी पेरून दिलं
जमिनीच्या पोटात

मग भुरभुर वारा सुटला...
छोट्या स्टेशनवर न थांबता
एक्सप्रेस गाडी
धाड धाड निघून गेल्याप्रमाणे
काळे ढग नुस्तेच तरंगत गेले,
वाटचुकल्या भ्रमिष्ट माणसासारखा
अचानक पाऊस बेपत्ता झाला

बियाच्या पोपटी अंकुरानं
जमिनीला धडका मारून
वर येण्यासाठी रचलेले मनसुभे
दिवसागणिक वाळून गेले,
जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप
दवाखान्यातल्या व्हरांड्यात
विमनस्क फेऱ्या मारतो
तसा शेतकरी धुऱ्यावर उभा

लांबवर टाळ मृदंगाच्या गजरात
पंढरपुराकडे निघालेली दिंडी
आणि इथं काळ्या शेतात
मरून पडलेला हिरवा पांडुरंग!

कवी - दासू वैद्य
कवितासंग्रह - तूर्तास

किती देऊ किती घेऊ

किती देऊ किती घेऊ
गेले आभाळ संपून
चंद्र ओंजळीत आला
डोळे हळुच मिटून

धुके कातर बोटांचे
फिरे पापण्यांवरून
झुले काजव्यांची रात्र
ओथंबल्या केसातून

श्वास तेव्हा शब्द होते
अर्थ मिटलेले डोळे
होय मातीचे आभाळ
रक्त जुई जुई झाले

वीज नग्न क्षणांत त्या
बुडे दिशांचेही माप
सर्वस्वाची गाढ कळ
बुडे पुण्य बुडे पाप

किती देऊ किती घेऊ
गेले आभाळ संपून
रात्र ओसरली तरी
चंद्र उरला अजून

कवी - मंगेश पाडगावकर
संग्रह - ओंजळीत स्वर तुझेच

पृथ्वीचे प्रेमगीत

युगामागुनी चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना

नव्हाळीतले ना उमाळे उसासे, न ती आग अंगात आता उरे
विझुनी अता यौवनाच्या मशाली, उरी राहिले काजळी कोपरे

परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न नेणे कुठे चालले मी, कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी शिरी टाकती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तिवाचून देवा, मला वाटले विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात वेचुनिया दिव्य तेज:कण
मला मोहवाया बघे हा सुधांशु, तपाचार स्वीकारुनि दारूण

पिसारा प्रभेचा उभारून दारी पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी याचना प्रीतीची लाजुनि लाल होऊनिया लाजरा मंगळ

निराशेत संन्यस्त होऊनी बैसे ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव
पिसाटापरी केस पिंजारुनि हा, करी धूमकेतू कधी आर्जव

परी भव्य ते तेज पाहुन पूजुन घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्याहुनि साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तुझ्या स्मृतीने उले अन् सले अंतर

गमे की तुझ्या रूद्र रूपात जावे, मिळोनी गळा घालोनिया गळा
तुझ्या लाल ओठांतली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन् मला ज्ञात मी एक धूलिकण
अलंकारण्या परी पाय तुझे धुळीचेच आहे मला भूषण


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

कोलंबसाचे गर्वगीत

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती

सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?

कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

पसायदान

आता विश्वात्मके देवे| येणे वाग्यज्ञे तोषावें|
तोषोनी मज द्यावे| पसायदान हे।|

जे खळांची व्यंकटी सांडो| तयां सत्कर्मी रती वाढो|
भूतां परस्परे जडों| मैत्र जीवांचे।|

दुरितांचे तिमीर जाओ| विश्वस्वधर्मसूर्ये पाहो|
जो जे वांछिल तो ते लाहो| प्राणिजात।|

वर्षत सकळ्मंगळी| ईश्वरनिष्ठांची मांदियाळी|
अनवरत भूमंडळी| भेटतु भूतां।|

चला कल्पतरूंचे आरव| चेतना चिंतामणीचे गाव|
बोलते जे अर्णव| पीयुषाचे।|

चंद्रमे जे अलांछन| मार्तंड जे तापहीन|
ते सर्वांही सदा सज्जन| सोयरे होतु।|

किंबहुना सर्व सुखी| पूर्ण होवोनी तिन्ही लोकी|
भजि जो आदिपुरुषी| अखंडित।|

आणि ग्रंथोपजीविये| विशेषीं लोकी इये|
दृष्टादृष्टविजयें| होआवें जी।|

येथ म्हणे श्री ज्ञानेश्वराओ| आ होईल दान पसाओ|
येणे वरें ज्ञानदेओ| सुखिया जाला।|

कणा

ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतींत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली

भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले

कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!