रामराज्य मागे कधी झाले नाही

रामराज्य मागे कधी झाले नाही

होणार पुढेही नाही कधी

केवळ ते होते गोड मनोराज्य

कल्पनेचे काव्य वाल्मीकिचे

कधीच नव्हती रावणाची लंका

अपकीर्ति-डंका व्यर्थ त्याचा !

दोन्ही अधिराज्ये होती मानवांची

नव्हती देवांची -दानवांची

भाविकांनो, झाली होती दिशाभूल

सोडूनी द्या खूळ आता तरी !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आई मानवते

आई मानवते, आता तुझी काही

बघवत नाही विटंबना

आक्रोश तुझा गे ऐकवत नाही

बघवत नाही अश्रु तुझे

उन्मत्त जाहले शंभर कौरव

जाहले पांडव हतबुद्ध

द्रौपदीस छळी दुष्ट दुःशासन

मिळे त्या शासन प्राणांतिक

कोण कृष्ण तुझी राखावया लाज

अवतार आज घेणार गे !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

मानवाचा आला पहिला नंबर

पशूंचे एकदा भरे सम्मेलन

होते आमंत्रण मानवाला

"दुबळा, भेकड, क्षुद्र कोण प्राणी !"

करी हेटाळणी जो तो त्याची

"ऐका हो," बोलला अध्यक्ष केसरि

"जाहीर मी करी बक्षीस हे

क्रूर हिंसा-कर्मी उच्चाङक गाठील

पात्र तो होईल बक्षिसाला"

मानवाचा आला पहिला नंबर

लाजले इतर पशु हिंस्त्र !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

जातीवर गेला मानव आपुल्या

अणुस्फोटकाचा नका मानू रोष

सारा आहे दोष मानवाचा

मानव म्हणजे एक पशुवंश

मुख्य तो विध्वंस-कर्म जाणे

अणुरेणूमध्ये वसे परब्रह्म

गेला वेदधर्म विसरुनी

मर्कटाच्या हाती दिधले कोलीत

सुटले लावीत आग जगा

जातीवर गेला मानव आपुल्या व्हायचा होऊ द्या नाश आता !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

अभागिनी आई

का गे रडतेस आता धायधाय !

आणि हाय हाय म्हणतेस !

शेफारले पोर तुझे खोडकर

झाले अनावर आता तुला

नको म्हणताही कोठाराची किल्ली

त्याचे हाती दिली भोळेपणे

गुप्त तिथे होती संदूक ठेविली

अखेर लागली त्याचे हाती

अभागिनी आई, पुरा झाला घात

तुझ्या नशिबात दुःख आता !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

गोसाई

तठे बसला गोसाई

धुनी पेटयी शेतांत

करे 'बं बं भोलानाथ'

चिम्‌टा घीसन हातांत

मोठा गोसाइ यवगी

त्याच्या पाशीं रे इलम

राहे रानांत एकटा

बसे ओढत चिलम

अरे, गोसायाच्यापाशीं

जड्याबुट्या व्हत्या फार

देये लोकाले औसद

रोग पयी जाये पार

अशा औसदाच्यासाठीं

येती लोकाच्या झुंबडी

पन कोन्हाबी पासून

कधीं घेयेना कवडी

चार झाडाले बांधल्या

व्हत्या त्याच्या चार गाई

पेये गाईचज दूध

पोटामधीं दूज नहीं

एक व्हती रे ढवयी

एक व्हती रे कपीली

एक व्हती रे काबरी

आन एक व्हती लाली

सर्व्या गायीमधीं व्हती

गाय कपीली लाडकी

मोठ गुनी जनावर

देवगायीच्या सारकी

व्हती चरत बांदाले

खात गवत चालली

रोप कशाचं दिसलं

त्याले खायासाठीं गेली

रोप वडाचं दिसलं

भूत बोले त्याच्यांतून

'नींघ वढाय कुठली !

व्हय चालती आठून'

आला राग कपीलाले

मालकाच्याकडे गेली

शिंग हालवत पाहे

माटी उखरूं लागली

तिचा मालक गोसाई

सम्दं कांहीं उमजला

'कोन आज कपीलाले

टोचीसनी रे बोलला?'

तसा गेला बांधावर

रोप हाललं हाललं

त्याच्यातून तेच भूत

जसं बोललं बोललं

टाके गोसाई मंतर

भूत पयीसनी गेलं

तसं वडाच्या रोपाचं

तठी जैर्‍ही रोप झालं

आरे जहरी बोल्याची

अशी लागे त्याले आंच

रोप वाढलं वाढल

झाड झालं जहराचं

मोठ्ठ झाड जहाराचं

गोसायाच्या शेतामधीं

ढोरढाकर त्याखाले

फिरकती ना रे कधीं

काय झाडाचं या नांव ?

नहीं मालूम कोन्हाले

आरे कशाचं हे झाड

पुसा गोसाई बोवाले !


कवयित्री – बहिणाबाई चौधरी

आरंभ उद्यान, शेवट स्मशान

आरंभ उद्यान, शेवट स्मशान

आमुचे जीवन असे आहे !

सुंदर, आनंदी निसर्ग स्वतंत्र

त्याला आम्ही यंत्र केले आहे

एकाच आईची बाळे आम्ही सारी

परी हाडवैरी झालो आहो

जे जे अकृत्रिम, करावे कृत्रिम-

आमुचे अंतिम ध्येय आहे

आदमईव्हाच्या वारसाकडून

अपेक्षा याहून दुजी काय !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या