प्रभु-प्रार्थना!

करुणाघन अघशमन मंगला जनार्दना श्रीहरी
मुकुंदा मनोहरा श्रीहरी
कृपाकटाक्षा क्षण तरि फेकी, देवा! दीनांवरी
हतबल विकल, प्रभो! जाहलो निराधार केवळ
खरोखर निराधार केवळ
पदारविंदा तुझ्या मुकुंदा पूजितसो दे बळ
पसरला निबिड अंधार
दे कर हितकर तू तार
होऊ दे अस्मदुद्धार
शिर वर करुनी जगी वावरु भाग्यश्रीला वरु
वैभवा संपत्तीला वरू
प्रपंच सुंदर करुनी देवा परमार्थाही करु।।

संकटांबुधीवरुनी येती पवन परम भीषण
भयंकर पवन परम भीषण
आशेचा ते दीप टाकिती झणी, प्रभो विझवुन
पुन:पुन्हा परि पाजळीतसो आशादीपाप्रती
उज्वला आशादीपाप्रती
धैर्याने पाउले टाकितो पुढती रे सत्पथी
त्वत्कृपा अम्हांवर असो
त्वदध्यान मानसी वसो
भयभीति न चित्ती असो
सद्धर्माचा सत्कर्माचा विजयध्वज उभवुन
सुमंगल विजयध्वज उभवुन
भूमातेच्या सशे मंगले उजळू हे त्रिभुवन।।

प्रगतिपथावर पराक्रमानं, गोविंदा, शोभवू
भारता या अमुच्या शोभवू
तदभाग्येंदूवरी सृष्टिची दृष्टि सदा लोभवू
अद्वैताचा आनंदाचा शांतीचा सुंदर
शुभंकर शांतीचा सुंदर
संदेश जगा वितरिल भारत सकलकलहसंहर
ही पवित्र मंगल क-ती
करण्यास अम्हां दे धृती
कर निर्मळ अस्मन्मती
जय जगदीशा! जय परमेशा! जयजय हे श्रीहरी
मुरारे जयजय हे श्रीहरी
धीबल वितरी, प्रेरणा करी, दे स्फूर्ती अंतरी।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२८

राष्ट्राचे उद्यान

राष्ट्रीय जीवन
ओसाड मैदान
या रे निर्मू तेथे
या रे सारे जण
स्वार्थाचे पाषाण
करु त्यांचे चूर्ण
भीषण भुजंग
मारा आधी साचे
ठायी ठायी त्यांची
टाका विध्वंसून
अज्ञान-दलदली
होवो शुद्ध हवा
रुढींचे हे दुष्ट
कराच विध्वंस
दुष्ट आचारांची
जाळावी ही सारी

दिव्य स्वार्थत्याग
पसरु ती हाती
ऐक्याचे भरपूर
बाग सुशोभित
प्रयत्न अनंत
उद्यान समस्त
सद्विचार-वृक्ष
भेसूर भयाण
भगभगीत
रमणीय उद्यान
श्रमावया
भेदांचे पाषाण
चला आधी
क्रोध मात्सर्याचे
प्राणघेणे
वारुळे भयाण
आधी आधी
सा-या या आटवा
आरोग्याची
मारोतच डास
त्यांचा आधी
जाळी ही काटेरी
माजलेली

अमोलीक माती
आधी आधी
घालू या रे खत
तरि होई
हाच सद्वसंत
शोभवील
सदवृत्तीचे वेल
पवन वाहेल
मंदार सुंदर
बकुळ भाग्याचे
सच्छील पुष्पांचा
प्रेम अलिकुल
सत्कर्म ताटवे
उद्यान पवित्र
सदगुण-विहंग
विश्वजनमना
खरी समानता
यांच्या कल्पकता
आशेचे अखंड
स्फूर्तीचे तळपोत
नाचोत कारंजी
ख-या श्रीमंतीची
श्रद्धेची बाळके
खेळोत गोमटी
अशा राष्ट्रोद्यानी
मांडील स्वासन
सुखाचा सोहळा
पाहेल जो डोळां
पावित्र्याचा
शुभ मांगल्याचे
फुलावेत
गोड परिमल
गुंगू गुंगो
फुलोत सर्वत्र
भरारो हे
करोत कूजना
वेडावोत
दिव्य स्वतंत्रता
फोफावोत
हौद ते वाहोत
दिव्य मीन
ख-या उत्साहाची
अंतरीच्या
सच्चिद्वापीतटी
कौतुकाने
तो जगन्मोहन
शुभंकर
भाग्या चढे कळा
तोची धन्य



कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२९

राष्ट्रपताका

करु वंदना प्रभाती। करु कीर्तना प्रभाती
राष्ट्रप्रभा पताका। वंदून पूजु हाती
स्वातंत्र्यमंत्रपूते। स्वातंत्र्यगीतगीते
ज्योतिर्मय अखंडे। स्वातंत्र्यसद्विभूते
हे उज्वले पताके। तेजस्वि हे पताके
तुज पाहुनी सदैव। कळिकाळ पोटी धाके
खुलतात तीन रंग। किति गोड गोड गोड
हे तीन रंग म्हणजे। शम शौर्य धर्म जोड
शांतीस दावि हरित। सत्त्वास दावि धवल
शौर्यास केशरी तो। दावीत अर्थ विमल
चकरा वरी विराजे। श्रमगौरवास दावी
समता स्वतंत्र्यचे। हे चिन्ह सुप्रभावी
रमवील उद्यमांत। सर्वांस नित्य झेंडा
देईल सर्व लोकां। साधा स्वतंत्र्य धंदा
जाळील दास्य सारे। नमवील मत्त लोक
वितरील सौख्य सर्वां। दडवील दीन-शोक
हे निर्मळे पताके। तू मोक्षमार्गदीप
न दिसेल दैन्य दास। जरि तू सदा समीप
तू मूर्त राष्ट्रवृत्ति। तू मूर्त राष्ट्रकीर्ती
तू त्याग मूर्तिमंत। तू मूर्त राष्ट्रदीप्ती
तू शौर्य धैर्य वीर्य। तू स्वाभिनामसूर्य
जे स्तव्य सेव्य भव्य। ते सर्व तू अपूर्व
राष्ट्रास तूच आस। राष्ट्रा तुझीच कास
आधार तू जनांचा। विश्वास तू अम्हास
तू ना तरी न काही। ना राष्ट्रानाम राही
ना वित्त अब्रु जीव। स्वातंत्र्यलाभ नाही
करा गर्जना धीर उर्जस्वला ती। जिला ऐकुनी कापती ते अराती
उठावे अता एकदाची समस्ती। चला झाडुनी जीवनातील सुस्ती।।
आम्हां थोर वीरां जगी कोण वारी। अम्हां दिव्य वीरां जगी कोण मारी।।
करु मुक्त आम्ही प्रिया भारताते। प्रतिज्ञा अशी ऐकवीतो जगाते।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, ऑक्टोबर १९३०

झेंडागीत

ऊठा बंधुनो! प्रभात झाली झेंडावंदन करु चला
प्रतापशाली गगनी फडके अमरध्वज तो पाहु चला।।

जेवि चराचरि वायु वाहुनी जीवनरस तो ओतितसे
प्रभातकाळी तेवी ध्वज हा अस्मन्मानस फुलवितसे।।

प्रभातकाळी दिनकर कोमल सुमगण जेवी हसवितसे
सुंदर हसरा ध्वज हो विजयी तेवि मनाला खुलवितसे।।

हसवी चित्ता, आशा निर्मी, स्फूर्ति अंतरी संचरवी
तेजोदायक तिमिरविदारक तळपे ध्वज हा जसा रवी।।

पहा स्वकीया करा हलवुनी आपणास तो बोलवितो
माझ्याखाली गोळा व्हा रे तमाम सारे तो वदतो।।

झेंड्याखाली तमाम सारे जमाव करु या मोदाने
अंतरंग रंगवू चला रे शौर्ये धैर्ये वीर्याने।।

राष्ट्राचा हा प्राण अमोलिक राष्ट्राचे हे जीवन हो
सर्वस्व असे अपुले जे जे ते ते झेंडा दावित हो।।

ज्या राष्ट्राते झेंडा नाही त्याते नाही जगी मान
मान तयाची वरी न होई करिती त्याचा अपमान।।

विद्या वैभव कला कीर्तिचे अब्रूचे अभिमानाचे
संरक्षण होतसे जरि वरी गगनी झेंडा हा नाचे।।

झेंडा म्हणजे जीवन अपुले झेंडा म्हणजे स्वप्राण
झेंडा म्हणजे राष्ट्र अपुले झेंडा दैवत ना आन।।

स्वातंत्र्याचे चिन्ह सुमंगल म्हणजे झेंडा हा आहे
झेंडा फडके झळके जोवरि तोवरि वैभवयश राहे।।

झेंडा चमके जोवरि अपुला विश्वी विजयी विक्रांत
राहू तोवरि आपण तेजे निर्भय निर्मळ निभ्र भर्रां
झेंडयाला या वित्ताहून प्राणांहुनहि जपा सदा
झेंडा अपुला जीव धर्मही झेंडा अपुला देव वदा।।

ऐक्याच्या वातावरणाचा झेंडा असतो निर्माता
स्वातंत्र्याच्या संगीताचा झेंडा असतो उदगाता।।

झेंड्यासाठी नाना देशी नाना विरी निजरक्त
दिले, प्राणही फेकुन दिधले, झेंड्याचे व्हा तुम्ही भक्त।।

लाखो करिती बलिदान मुदे एका या झेंड्यासाठी
झेंड्याचा महिमा न वर्णवे कधी कुणाही या ओठी।।

सर्वस्वाचे सर्वैक्याचे राष्ट्रत्वाचे हे चिन्ह
एकचित्त समूर्त जाहले धरा अंतरी ही खूण।।

एका अत्तर थेंबामध्ये लाखो कोटी सुमनांचे
ओतिले असे सर्वस्व तसे झेंड्यामध्ये राष्ट्राचे।।

झेंडा दावी परंपरेला झेंडा संस्कृति गात असे
झेंडा तुमच्या पूर्ववैभवे सदगुणवृंदे चमकतसे।।

मधमाशा त्या पोळ्यासाठी निशिदिन जेवी जपताती
झेंड्याला या राखू आपण करू प्रतिज्ञा प्राणांती।।

जे आताचे जे पूर्वीचे भविष्य काळातीलहि जे
अपुले मंगल सुंदर उज्वल ते या झेंड्यामधे सजे।।

झेंडा सुंदर थोर तिरंगी ललामभूत त्रिजगाते
त्रैलोक्य उभे अभिराम अशा या झेंड्याला नत नमते।।

प्रात:स्मरणीया रमणीया वरणीया झेंड्या नमन
तुला करितसे, तव भक्तीने जावो अमुचे भरुन मन।।

कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०

नवयुवक

हसो दिवस वा असो निशा ती। असो पौर्णिमा असो अमा ती
अम्हांस नाही लवही भीती। पुढेच घुसणे ठरली नीती

अदम्य आम्ही पुढेच जाऊ। धैर्ये शौर्ये पुढेच धावू
स्मशानशांती अम्हां रुचेना। भयनकाला करु आव्हाना

प्रचंड पर्वत पायी तुडवू। लोळ विजेचा हाती अडवू
छातीवर ती झेलू गोळी। करु मृत्युशी खेळीमेळी

दिव्य असीम प्रताप अमुचा। पुढेच घुसणे नेम सदाचा
धृवाजवळची थंडी येवो। तन अमुचीही गोठून जावो

सहारातली येवो आग। पुढेच जाऊ काढित माग
अफाट दर्या मना न भिववी। प्रचंड तटिनी मना न डरवी

भीषण दाट प्रचंड कानन। द-याखोरि जी फिरवित नयन
असोत किल्ले कडे असोत। जाऊ दृढ निज पाय रोवित

धूमकेतु ते अभद्र येवो। तुफान डोक्यावर घोंघावो
अपत्तींचे पर्वत येवो। मृत्यू येउनी सन्मुख राहो

मृत्यु असे तो मित्र आमुचा। संकट तो तर सखा जिवाचा
हे प्रिय सगळे सखे सवंगडी। आम्हावरि ते करितिल न कडी

रडावया जे आम्हां येतिल। हसवुन आम्हां तेची रडतिल
अम्हां कशाची तमा न तिळभर। रणधीर अम्ही निर्भय वीर

नवभारतसुत आम्ही दिव्य। घ्याया जाते उत्कट भव्य
जसा मारुती वरति उडाला। जन्मताच धरण्यास रवीला

तेजार्थ तसे असो भुकेले। राहु न आता मृत पडलेले
रडत झुरत ना अम्हि बसणार। भाग्यगिरीवर दृढ चढणार

खुशाल कोणी करो विरोध। झुंजार अम्ही निर्भय योध
प्राणांची ना अम्हां फिकीर। नसे कशाची अम्हां जिकीर

त्यागाने तळपणार हीर। झालो आम्ही खरे फकीर
भारतात या आणू तेज। भारतात या आणू वीज

भारतात या आणू जोम। भारतात या निर्मू प्रेम
प्राण भारती सतेज आणू। ज्ञान भारती जिवंत आणू

जन्म सफल हा तरीच मानू। स्वतंत्रता भारतात आणू
आम्ही युव नवभारत-पुत्र। व्रती पवित्र ज्वलच्चरित्र

घालित न बसू वाद वितंड। केवळ जमवित बसू न फंड
भैरव आम्ही दुर्जय चंड। करु दास्याचे तिळतिळ खंड

तेज आमुचे दिव्य उदंड। जाळिल अवघे हे ब्रह्मांड
हिमालयाला गदगद हलवू। सिंहालाही हिसडे देऊ

कोण अम्हाला करिल विरोध। झुंजार अम्ही निर्भय योध
प्राणांवर जाहलो उदार। कोण अता घेइल माघार

विचार केवळ रुचे न सतत। कृती करावी हे अमुचे व्रत
लंबकापरी आंदोलनता। देइल कधि न स्थिति समुन्नता

या जे उत्सुक नव कार्याला। चला उठा या दिव्य रणाला
काय काम ते विचारता का? ऐका तरि ते उरो न शंका

राजकीय वा सामाजिक ते। दास्य अम्हांते सहन न होते
या दास्याला पदि तुडवाया। अन्यायाला पदि तुडवाया

जगददुष्टता ही बदलाया। दु:खनिराशा दूर कराया
दुष्ट रुढींना बुडवायाला। दुष्ट धर्म ते उडवायाला

वैषम्याला दूर कराया। दारिद्र्याला दूर कराया
रोगराइला दूर कराया। दुष्काळाला दूर कराया

पापाला त्या दूर कराया। अज्ञानाला दूर कराया
संकुचिताला दूर कराया। संचयबुद्धिस दूर कराया

मदोद्धतांचा मद उतराया। उद्दामांची रग जिरवाया
पुंजपतींची पत हरवाया। सत्ता त्यांची ती हरवाया

अम्हि उठलेले युव तेजाळ। अम्हि आगीचे जळते लोळ
करी घेतले सतिचे वाण। उठलो आम्ही युव बेभान

झालो आता जसे तुफान। अम्हां कशाची नसे गुमान
मान अता ही वर करणार। कुणास आता ना डरणार

बेडर बेशक बेदरकार। पुढेच आता अम्हि घुसणार
वाटेमध्ये जे जे वाइट। टाकू करुनीच नायनाट

अवास्तविक जे जुलमाचे जे। रास्त नसे जे पाक्त नसे जे
भ्याड असे जे मलिन असे जे। दुष्ट असे जे नष्ट असे जे

जे सडलेले जे कुजलेले। निरुपयोगि जे जे मेलेले
विरोध जे जे करिल विकासा। त्याच्या त्याच्या करुच नाशा

त्या सर्वांना पृथ्वीवरुन। सुदूर देऊ भिरकावून
या जे उत्सुक या कार्याला। तेज आणु या स्वजीवनाला

या या सगळे सखे सहोदर। या जे नवयुव परम उदार
या रे सगळे, समानतेची। माधुर्याची मांगल्याची

सर्वैक्याची सारल्याची। स्वतंत्रतेची समृद्धतेची
सच्छांतीची सतज्ञानाची। सदभक्तीची सत्स्फूर्तीची

निर्मू पावन मंगल गंगा। अनंतरंगा दिव्य अभंगा
सत्प्रेमाला करु अभिषेक। सत्याला या करु अभिषेक

मानव्याला करु अभिषेक। बंधुत्वाला करु अभिषेक
यात्रेकरु हो आपण सारे। यात्रेलागी चला निघा रे

दिव्य निशाणे हाती घ्यारे। सदध्येयाची गाणी गारे
खरे तरुण नव आपण होऊ। भारतास या शोभुन राहू

धृवबाळाचे प्रल्हादाचे। सत्त्वसिंधु चिमण्या चिलयाचे
रोहिदास अभिमन्यू यांचे। सत्यकाम नचिकेता यांचे

शुकसनकांचे उपमन्यूचे। ज्ञानेशांचे शिवबाजींचे
जनकोजीचे विश्वासाचे। वंशज आपण पवित्र साचे

परंपरा ही आहे थोर। तिचा आपणा अनंत जोर
परंपरा ही पुढे चालवू। परंपरा ही कधि न मालवू

परंपरेचा नंदादीप। सदैव पेटत ठेवु समीप
स्वप्राणांचे घालू तेल। सदा दीप हा मग तेवेल

यथार्थ आपण होऊ तरुण। नव्या मनूचे होऊ अरुण
परमेशाचे करुन ध्यान। हीच घेउ या मनात आण

‘हसो दिवस वा असो निशा ती। असो पौर्णिमा असो अमा ती
अम्हांस नाही लवही भीती। पुढेच घुसणे ठरली नीती’


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२९

बाल-वृद्ध संवाद

शाळा सुटली कटकट मिटली बाळे मग जमली
वदने तेजाने फुलली
शाळा सुटते कधी अशी ते वाट बघत होते
बाळक तेजस्वी हो ते
सगळे जमले एके ठायी रांग झालि नीट
दिसती उल्हासी धीट
झेंडा घेउन नायक झाला सर्वांच्या पुढती
मग मिरवणूकीस निघती
हुकूम झाला कूच कराया मग वानरसेना
निघाली गात दिव्य गाना
उत्साहाने उल्हासाने बाळे ती निघती
मुखाने मातगीत म्हणती
जो निघाली तोच भेटला वृद्ध एक त्यांस
विचारी प्रश्न बालकांस

वृद्ध: कुठे, मुलांनो! जाता तुम्ही? निशाण हे कसले?
सांगे काम कोण असले?
लहान तुम्ही बाळ मजेने हासत खेळावे
मांडीवरती लोळावे
खावे प्यावे मौज करावी चिंता ना करणे
हसुनी इतरां हासविणे
बाल वय असे अजुनी तुमचे हसण्या रडण्याचे
क्षणात रुसण्याफुगण्याचे
कुठे जातसा निशाण घेउन? दिसता मज वेडे
परता मागे घ्या पेढे
मुलामुलींनी घरी बसावे आईशेजारी
जावे कधी न बाहेरी
चला सकळही परता तुम्ही माझे ऐकावे
वृद्धा सदैव मानावे
परता, बघता काय असे रे ऐकावे माझे
तुम्हि तर गोड बाळराजे’

एक मुलगा: अमुचा आहे नायक हा हो तुम्हा सांगेल
कसला खेळतसो खेळ
बोलत नाही आम्ही कोणी शिस्त असे अमुची
आज्ञा ऐकतसो याची
सांग गड्या रे यांना सारे यांना समजावी
शंका त्यांचि न ठेवावी
आम्ही सगळे उभे राहतो रांगेमधि नीट
त्यांना सांग, तूट धीट।।

वृद्ध: नायक तुमचा? काय बोलता? पाळितसा शिस्त? ठेउन त्याच्यावर भिस्त?
शिपायीच जणु झाला? करता थट्टा वृद्धाची नसावी बुद्धि अशी साची?

नायक: अहो खरोखर आम्ही सगळे आहोत शिपायी खोटे सांगुन करु कायी?
शिस्त पाळतो, नीट वागतो, जातो खेळाया
कसला खेळ सांगतो, या
गाणी गावी सुंदर सुंदर भारतमातेची
चित्ते हरण्या लोकांची
देशभक्तिची स्वदेशिची ती दिव्य गाणि गातो
रस्त्यांतून गात जातो
निशाण अपुल्या देशाचे हे झेंडा राष्ट्राचा
सुंदर अपूर्व तेजाचा
तीन रंग हे पहा केशरी हिरवा हा धवल
वरती चरका हा विमल
धर्मैक्याचे स्वातंत्र्याचे झेंडा हे चिन्ह
झेंडा समानता-खूण
थोरामोठ्यांनी हा केला झेंडा निर्माण
भारतसेवेची खूण
या झेंड्याची गाणी गातो करितो तत्पूजा
तेव्हा वाजवितो बाजा
लोकां करणे जागृत, जागृत करणे व्यापारी
म्हणुनी अमुचि निघे स्वारी
दुकानदारापाशी जाउन जोडुन त्या हात
वदतो काय अम्ही गोष्ट
नका विकू हो नका विकू तो परदेशी माल
होती बंधूंचे हाल
नका खरेदी करू नव्याने परदेशी माल
होती देशाचे हाल
परदेशातील मोहक वस्तू वस्त्रे न विकावी
भारतमाय न रडवावी
घरोघरीही जातो आम्ही आळीआळीत
गातो देशभक्ति- गीत
जो जो आम्हां वेळ सापडे सांभाळुन शाळा
देतो तो या कार्याला
खेळ अमुचा हाच, अम्हाला यातच आनंद
नाही इतर अम्हां छंद
कशास पेढे देता? त्यातहि साखर परदेशी
वाइट वाटे आम्हांसी।।

वृद्ध: मला वाटते भय, बाळांनो! साहस न करावे
झडकर तुम्ही घरि जावे
वाट तुमचि ते पहात असतिल घरी आइबाप
होइल त्यांस किती ताप
जा परतुन माघारे, ऐका आगित न शिरावे
स्वगृही शांतपणे जावे
जा माघारे म्हाता-याचा ऐकावा बोल
मन निज ठेवा समतोल।।

नायक: भीती न शिवे थोडी देखिल अमुच्या चित्ताला
न भितो जगात कोणाला
नि:शंक अम्ही सारे जातो गात देशगीते
आम्ही नाहि मुळी भित्रे
गांधीजींचे नाव नाचते ओठांवर नित्य
नाही कळिकाळा भीत
भारतमातेचे हो आम्ही छोटे सरदार
न रुचे खेळ, न घरदार
भारतमातेचे हो आम्ही भावी आधार
घेऊ कधी न माघार
अमुच्यामध्ये असे पहा हा सुभान त्या नाव
त्याचे तेज किति अपूर्व
लहान आहे तरि तो आहे सिंहाचा छावा
भीति न शब्द त्यास ठावा
लहान दिसतो तरि तो आहे दिव्य बालवीर
अदभुत त्याचा तो धीर
पलीकडे तो बालक दुसरा नामे शिवराम
मोठा निश्चयि अभिराम
पलीकडे तो बाळ हासतो ‘साधु’ त्यास म्हणती
त्याच्या निश्चयास ना मिति
प्रल्हाद, भिका, रामदास तो त्रिंबक तो चौथा
त्यांची स्मृति राहो चित्ता
कितिकांची मी सांगू नावे बालवीर सारे
काळहि त्यांच्याशी हारे
भीतीच्या ना सांगे गोष्टी आम्हां भय नाही
हृदयी देशदेव राही
गांधीजींचे नाव मुखी मग भीति कशी राही
भीती सर्व पळुन जाई
तीन रंगी हा झेंडा अमुचा तिम्ही जगी फिरवू
याला तेजाने मिरवू
लयास सारी चित्तामधली भयभीती जावी
सेवक देशाचे भावी
अम्ही भयाचे गिरवित बसलो धडे जरी आज
होइल पुढे केवि काज
स्वातंत्र्याला मिळवायाला मिळले राखाया
झिजवू आम्हि मुदे काया
नसे मोह तो आता आम्हां खाण्यापिण्याचा
मोह न उरला नटण्याचा

गाणी गावी झेंडा घ्यावा यातच आनंद
आम्हां इतर नुरे छंद
खेळायाला जरी आवडे वेळ नसे त्याला
करणे स्वतंत्र देशाला
स्वस्थ न आता अम्हां बैसवे आम्ही जरि बाळ
होऊ काळाचे काळ
बाळच होता धृव परि सोडुनी अन्यायी बाप
जाई देवाचे समिप
अढळपदावर नेउनिया बसवू
त्याला स्वातंत्र्ये नटवू
रोहिदास तो बाळच होता सोशी किती कष्ट
छळि जरि कौशिक तो दुष्ट
सत्त्व न त्याने ते हारविले तेजे तळपतसे
होऊ बाळहि आम्हि तसे
लहान होते किती लवांकुश तरि ना डगमगले
लढण्या रामाशी सजले
लहान होता चिमणा चिलया सत्त्वास्तव मेला
भूषण भारतास झाला
कड्यावरुन लोटिती घालिती जळत्या खाईत
परि तो प्रल्हाद न भीत
तप्त तैल कढईत टाकिती बाळ सुधन्वा तो
हसतो कृष्ण कृष्ण म्हणतो
मान न लववी श्रीशिव भूपति परक्या सत्तेला
नव्हती वर्षे ते सोळा
लहान होते समर्थ तरि ते त्यागिति घरदार
त्यांच्या धृतिस नाहि पार
जनकोजी विश्वासराव ते ते माधवराव
देती भीतीस न ठाव
सोळा सतरा वर्षे त्यांची सेनापति होती
लाखो लढायांत लढती
लहान आम्ही तरि ना भीती, काळाचे काळ
ना अळुनाळ न लडिवाळ
म्हणू नये की लहान आहे छावा सिंहाचा
घेइ प्राण गजेंद्राचा
म्हणू नये की लहान पिल्लू तल्लख नागाचे
चावे कडकडून साचे
स्फुलिंगकण तो लहान न म्हणा लहानशी ठिणगी
लाविल आग समस्त जगी
लहान न म्हणा त्वेषे सणणण करित जाइ तीर
तोडित रिपुचे झणि शीर
लहान म्हणुनी अम्हां भिवविता भिणार ना आम्ही
येऊ देशाच्या कामी
डी व्हॅलेरा होता म्हणती तीनच वरषांचा
तुडवी ध्वज रिपुचा वाचा
असे मॅझिनी बाल्यापासुन देशास्तव दु:खी
राहे सदोदित सुतकी
काळा पट्टा शोकनिदर्शक हातावर बांधी
वाचा गोष्ट त्याचि आधी
लहान म्हणुनी गोंजारुनी घरात ठेवून
फळ ते काय? जाउ मरुन
मरावयाचे तुम्हां आम्हां आहे सगळ्यांते
किमर्थ धरणे भीतीते
कर्तव्याचा रस्ता दिसतो आम्हांस समोर
येवो संकटेहि घोर
कर्तव्य अम्ही करणे त्यातच आम्हां आनंद
नाही रुचत इतर छंद

वृद्ध: मरावयाचे असे एक दिन जरि ते सगळ्यांते
आजच का जा मरण्याते
लहान तुम्ही, करा तयारी, धष्ट पुष्ट व्हावे
खावे प्यावे खेळावे
अभ्यास करा ज्ञाना मिळवा उतावीळ व्हा न
अजुनी बाळ तुम्ही सान
कर्तव्यच्युत व्हा न सांगतो, कर्तव्य कराया
आहे वेळ अजुनि राया!
मोठे व्हावे तनामनाने ज्ञानहि मिळवावे
मग ते कर्तव्य करावे
अपक्व बुद्धी अजुनी तुमची, तुम्हास ते म्हणती
मर्कट वानरसेना ती
खोड्या करणे, गंमत करणे, स्वभाव हा तुमचा
काळ प्रसन्न बाल्याचा
करा तयारी, धरुन हुशारी, भावी कार्याची
ठेवा स्मृति चित्ती त्याची
नका हट्टाला पेटू त्याने न घडे कल्याण
अंती रडतिल हे नयन
कमवायाची वेळ असे तनु ना गमवायाची
मिळवा जोडहि ज्ञानाची
घाई न करा सकळ नासती कार्ये घाईने
घ्यावे सकळहि धीराने
जा माघारे हात जोडतो होतिल रे हाल
माते बघवतिल न बाळ
राजस सुंदर बाळ तुम्ही रे मृदु जणु नवनीत
माझे अंतरंग भीत
फुलापरिस सुकुमार अरे कुणि येउन तुडवील
पाये तुम्हा कुसकरिल
सदगुण मिळवा, ज्ञाना मिळवा, करा निजविकास
यावे पुढती कामास
सुंदर शरिरे मने सुंदर करा आधि तुम्ही
पूजा पुढे मातृभूमी
भविष्य आहे अपार तुमच्या समोर का घाई
मन्मन कळवळोन जाई
अविचार नका करु मुलांनो वृद्धाचे ऐका
सोडा सर्व तुम्ही हेका
जा माघारे आईबाप ते अपुले हसवावे
त्यांच्या सन्निध नाचावे

नायक: पोक्त असे जरि सल्ला तुमचा न रुचे हृदयास
न पटे अमुच्या बुद्धीस
केवळ वाचुन घरात बसुनी ज्ञान ते न मिळते
ज्ञान प्रसंगानेच कळते
देशभक्तिचे धडे वाचुनी केवळ ना अर्थ
पुस्तक केवळ ते व्यर्थ
आली आहे संधि शिकाया देशभक्ति चीज
घेऊ केवि धरि नीज
वस्तुपाठ हा देशभक्तिचा समोर असताना
वाचिल कोण पुस्तकांना
प्रत्यक्षाचे ज्ञान असे जे महत्त्व त्या फार
उपयोगी न ग्रंथभार
भावी कार्या करण्यासाठी आजपासुनीच
मिरवू धडे जे महोच्च
धैर्य, धडाडी, त्याग, अभयता, बाणा सत्याचा
शिकतो ओनामा त्याचा
घरात बसुनी मोठा झाला कोणी ना केव्हा
बसता फसे, समय जेव्हा
वानर म्हणती! चेष्टा ना ती, तो ना अपमान
अमुचा तोच खरा मान
वानरांस त्या संगे घेई प्रभू रामचंद्र
जिंकी बलाढ्य असुरेंद्र
पालाखाऊ वानर करिती जगताला चकित
करुनी रावण रणि चित
पालाखाऊ वानर करिती करणीस अचाट
घाली जग तोंडी बोट
वानर होते परी तयांनी सुरवर सुखवीले
स्वयश त्रिभुवनि मिरवीले
वानर झाले पूज्य तयांचा नायक हनुमंत
झाला देव थोर संत
वानर नावाची न वाटते आम्हां तिळ लाज
करणे मातृभूमि-काज
गांधि महात्मा करितिल अमुचे प्रेमे कवतूक
अमुचे तेच सर्व सूख
लहान आम्ही तरी जागवू देशभक्ति हृदयी
सुखवू भारतभू- मायी
लहान तारा असे तरी तो चमके तेजाने
तिमिरा अल्प तरि लया ने
लहान असले फूल तरी ते करुनी छायेला
रक्षी मृदु दवबिंदुला
लहानासहि यथाशक्ति ये करावया काम
नलगे कीर्ति नको नाम
क्षमा करा हो मदवज्ञेची, हेतु असे शुद्ध
व्हावे अम्हावरि न कृद्ध
तुम्ही जाहला वृद्ध परि असे उल्हासी अमुची
वृत्ती निर्भय तेजाची
नका रोखु हो स्वदेशकार्या अडथळा न आणा
अमुचा निश्चय तुम्हि वाना
आशीर्वादा द्या आम्हाते अमुच्या हातून
होवो दूर माय-शीण
आशीर्वादा द्या भय न शिरो अमुच्या चित्तांत
देऊ मातृभूस हात
आशीर्वादा द्या की निश्चय राहो अविचलित
निर्मळ असो सदा चित्त
त्रास, हाल ही अम्हां भूषणे थोर अलंकार
सांगू काय तुम्हां फार
मनी शुभेच्छा तुम्ही बाळगा ‘स्वतंत्र हा देश
करु दे लौकर जगदीश’
जगदीशाला स्मरा अम्हाला उत्तेजन द्यावे
अमुचे कौतूक करावे
जरी आमुचे आइबाप ते विरोध करितील
आम्हां ओढुन नेतील
त्यांना वळवा कथुन शब्द ते धीराचे चार
की हे ‘दिव्य बाळ वीर
घडो स्वभूमीसेवा यांचे हातुन हे हीर
देऊ यांस चला धीर’

नायक वृद्धाला हे ऐसे बोलत जो बोल
जे स्फूर्तीचे कल्लोळ
तोच तिथे तो पिता तयाचा अकस्मात आला
पकडी घट्ट नायकाला

बाप: अरे कारट्या! येथे अससी शोधुन मी दमलो
वणवण करुनी मी श्रमलो
डोळा चुकवुन अहो कारटा निसटुन की आला
नाही धाक मुळी याला
कितीदा तुला बजावले की सांड सकल फंद
असेल नकोतची छंद
नको गळ्याला लावू अमुच्या फास घरी नीघ
नीघच उचल पाय शीघ्र

नायक: बाबा! बाबा! नका असे हो बोलु नका माते
होते दु:ख मन्मनाते
कटु विष वमता मला ताडिता या वाग्बाणांनी
येते मन्नयनी पाणी
घरी न बाबा मला राहवे करु तरी काय
मारी हाक देशमाय
घरी बैसणे नरक वाटतो मला मूर्तिमंत
तगमग होते चित्तात
मारुन टाका मुलगा तुमचा, तुमचा अधिकार
जावा जरि ना बाहेर
घरी बैसण्यापेक्षा मरणे रुचे तात! माते
मारा तुमच्या पुत्राते
अनेक निघती मजसम मुलगे कसा घरी राहू
माझे तोंड कुणा दावू
बाबा! राग न तुम्ही करावा, धरितो मी पाय
सांगा मी तरि करु काय?

(गाणे)

हृदयि मम भरतभूमि ‘जा’ वदे मला
‘जा’ वदे मला
घरि बसणे हा न गमे मार्ग मज भला
मार्ग मज भला
भारतभू मारि हाक
‘ये सेवेसाठि ठाक
करी मद्दास्यास खाक
पुसुन टाक मत्कलंक
उठूनिया मुला’
हृदयि मम भरतभूमि ‘जा’ वदे मला
‘जा’ वदे मला
भारतमातेच्या हाकेला ओ न कसा देऊ
कैसा घरामध्ये राहू?

बाप: तत्त्वज्ञाने तुझी नको तू मजला शिकवाया
येथून शीघ्र काढ पाया
मोठ्या गप्पा नकोत मजला येथुन चल निमुट
ऐके वदतो जी गोष्ट
बापाचा ना राग तुझ्या का ठाउक रे तुजला
चल निघ उचल पाऊलाला
खपणार मुळी नाही मजला तव वेडे चाळे
चल तू घरी ब-या बोले
गाठ असे बघ माझ्यापाशी ध्यानी धरि नीट
चल, बघ घरास तू थेट

नायक: ठार करा परि मी ना येइन घरास माघारा
तनु ही तुमची तुम्हि मारा
देहास तुम्ही माराल परी मना न माराल
तनुचे करा हालहाल
घरे सोडशुनी असली जाऊ भारतभूमीत
हिंडू स्वतंत्र अम्हि मुक्त
चला, मुलांनो! गीत म्हणा रे, मी ना जाणार
होवो जे जे होणार.

बाप: फरफटीत मी नेइन ओढुन गुरापरी तुजला
तमाशा दिसेल जगताला
घरी ये खरा थोबाड तुझे पहा रंगवीन
इंगा तुला दाखवीन
बांधुन ठेविन माळ्यावरती चार दिवस तुजला
काहि न देइन खायाला
धरुन बकोटी नेइन ओढुन काय पाहतोसी
चल बघ अपुल्या भवनासी
चल घरि, पोरा! कुठे जाशि रे पोरा! फिर मागे
आता शेवटचे सांगे

नायक: गांधि महात्मा पिता आमुचा सकळहि बाळांचा
धरितो पंथ अम्ही त्यांचा
भरतभूमि ही माय माउली आम्हां बाळांची
सेवा सदैव करु तीची
चला, मुलांनो! गीत म्हणा रे देशाचे दिव्य
करु या कृति सुंदर भव्य
चला, काय रे बघता? बाबा जातील माघारे
म्हणु या दिव्य गीत सारे

बाप: तमाशा न मी जगास इच्छित दावाया पोरा
परि करि विचार मनि सारा
पुन्हा न तुजला घरात घेइन दावु नको वदन
माझे बंद तुला सदन
मी न कुणि तुझा, तू न माझा, ऐसे समजावे
ध्यानी नीट, आणि जावे
मेला माझा मुलगा म्हणुनि साखर वाटीन
माझे बंद तुला सदन

नायक: बाबा! तुम्ही पूज्य मला जरि मज ना राहवते
जाणे भाग मला पडते
दारावरुनी झेंडा जाई तो मज बोलावी
जणु तो बोटाने खुणवी
झेंडा मजशी किती बोलतो, मारी मज हाक
माझे मलाच ठाउक
घरात आता ना माझ्याने बसवे क्षणभरही
डसती विंचु तसे होई
रागावा, ना बाबा! घ्या ना घरात, परि हृदय
राहो सदैव ते सदय
मनी तरि म्हणा, जनात न जरी ‘बाळक गुणवंत
माझा धृवचिलयामित्र’
भीती तुम्हां जरि माझी वाटे, तरि सत्संबंध
सोडा असो प्रेमबंध
‘मिळो न खाया परी असो हा चित्ती भगवान’
वदला तुकाराम धन्य
‘मिळो न खाया मरु उपाशी सत्त्व न परि गमवू’
वदला हरिश्चंद्र राऊ
परि जाऊ दे त्या हो गोष्टी, मी ना येईन
तुमचे घर न बाटवीन
हृदयसदन परि असो मोकळे, द्यावी ही भीक
मागत मी ना आणीक
नका घेउ हा बाळक अपुल्या घरात माघारा
देऊ नका तिथे थारा
मी न तुम्हाला सतावयाला घरात येईन
घेतो चरणांची आण
सांगा आईस, बाबा! माझे प्रणाम सप्रेम
करितो मातृभूमिकाम
आईची मज आइ बोलवी काय वदू फार
येई लोचनांत नीर
मनात तुमचे कृतज्ञतेने भक्तीने स्मरण
करिन स्त्रवतिल मन्नयन
कुठे तरी मी बसेन जोवर जीवन राहील
थारा भारत देईल
विशाल अंबर वरी, धरित्री खालि पसरलेली
प्रेमे स्नेहे भरलेली
दमलेले हे मदंग, बाबा! तिजवर टाकीन
जाइन आनंदे निजून
कंदमुळे मी खाइन देतिल फळे वृक्षराज
माझी राखितील लाज
कधी कधी मी गोड कोवळ्या बोख्या खाईन
चिंता काही न मी करिन
अडुळशाचि ती फुले तशी ती फुले अगस्त्याची
देतिल मधु मज मध साची
भारतभूमी समृद्ध सुंदर देइल खायास
फळमुळ अथवा पाल्यास
खाइन पाला कृतज्ञतेने मानिन मोदास
कंठिन सुखे जीवनास
नद्या, झरे ते देतिल पाणी स्फटिकासम छान
सांभाळितील मत्प्राण
वारा मजला वारा घालिल हरील मम शीण
पल्लव सुंदर पांघरिन
भारतमाता पडू न देइल कसलीही वाण
घरि परतून न येईल
घरात घ्यावे न मला,वाटे जरि मी अपराधी जो मी देशकार्य साधी
माघारा मज घेउ नका जरि तुमचे नुकसान
उघडे असो हृदयसदन
मातेहूनी स्वपित्याहूनी देव देश थोर
मजला देशाचा घोर
मातृभूमिची सेवा करिता तुमचीही सेवा
होते, कळे देवदेवा
मुलावरी या प्रेम असू दे, माया ठेवावी
माझी स्मृती असो द्यावी
काय किती मी सांगू, बाबा! उघडा मम हृदय
तेथे दिसेल भूमाय
हनुमंताच्या हृदयामाजी सदा रामराय
हृदयी मम भारतमाय
तुमच्यास्तवही आहे हृदयी भरलेले प्रेम
पहिले परी देशकाम
घ्या शेवटचा नमस्कार हा सविनय सप्रेम
धरितो भवत्पादपद्म
चला, मुलांनो! म्हणा गीत रे भारतमातेचे
आपण तत्सुत तेजाचे
चला, म्हणा रे ध्वजगीताते, जनता-चित्तांत
निर्मू स्फूर्तीचा झोत
मुले लागली गीत म्हणाया बाप बघे रागे
नायक परि न बघे मागे

‘झेंडा भारतमातेचा हा आला फडफडत
झळकत तेजे विक्रांत
झेंडा उन्मत्तांना नमविल दीना सुखवील
झेंडा जुलुम संहरील
झेंडा देइल राष्ट्राला या दिव्य स्वातंत्र्य
झेंडा हरिल पारतंत्र्य
झेंडा भारतमातेचा हा भाग्यवंत आला
बोला जय भारत बोला’

मुले निघाली गात, राहिला पिता तेथ बघत
गात्रे क्रोधे थरथरत
वृद्ध तिथे तो होता तो मग पित्याजवळ गेला
बोले सौम्य वचे त्याला
“आपण झालो पिकली पाने उपयोग न अपुला
आता राम राम बोला
नवी पिढी ही पुढेच जाइल, त्यातच आनंद
मानू, घालु न निजबंध
गुलाम न करू प्रेमे अपुल्या, देऊ मोकळीक
करोत उड्डाण विशंक
आशीर्वादा त्यांना देऊ करोत सत्कार्य
आपण भारतीय आर्य
चला, फिराया जाऊ आपण दोघे म्हातारे
बोलू मनातील सारे
दिन मावळला टेकडीवरी बैसू जाऊन
झालो पिकलेले पान”

म्हातारे ते गेले, गेली मुले गीत गात
आला भाग्योदय खचित
बाळे जी जी गाणी गातिल, गोष्टी करितील
जे जे खेळ खेळतील
भविष्यकाळाचे ते असते त्यातच सदबीज
आली जवळ भाग्यबीज
स्वतंत्र होइल, सुंदर होइल भारत हा खचित
लवकर सत्य सत्य सत्य


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, सप्टेंबर १९३१

एकच वेड

मातृभूमि! माझ्या चित्ता एक वेड लागे
मायभूमि! चिंतनि तव गे जीव नित्य जागे
झोपबीप न सुचे माते हायहाय वाटे
हीन दीन त्वस्थिति बघुनी अंतरंग फाटे।।

काय आइ! करू मी कोठे जाउ गे त्वदर्थ
परतंत्र्य पाहून वाटे जन्म सर्व व्यर्थ
चित्त वित्त बुद्धी माझी देह हा मदीय
जरी तुझ्या कामी येती धन्य धन्य होय।।

मला सदा वाटे द्यावे सर्वही त्वदर्थ
तुला वैभवावर नेता होउ दे मदस्त
देह इंद्रिये ही सारी सर्वदा खपावी
त्वदुद्धारकार्यी आई धन्य धन्य होय।।

तुझ्या ध्यानरंगी रंगो हे मदंतरंग
मुखी वसो गोड तुझ्या सत्कीर्तिचे अभंग
हात पाय बुद्धि अखंड श्रमो त्वदुद्धारा
दूर करिन झिजुनी झटुनी पारतंत्र्यभारा।।

थोर महात्म्यांना जे जे स्फुरति गे उपाय
आचरेन न गणीन मनी संकटे अपाय
तुझा शिपाई मी आई ‘का’ न मी म्हणेन
पुढे घुसुन धारातीर्थी झुंजता पडेन।।

घाव घालण्याला उत्सुक, शृंखला तुझ्या मी
तोडुनी, तुला चढविन गे आइ! मोक्षधामी
तुझ्यासाठि आई! लाखो सुत तुझे खपोत
तुझ्या शृंखला भंगू दे अंगि ना खुपोत।।

विपत् तुझी जाइल विलया दैन्य हे हरेल
तेज दिव्य त्वन्मुखकंजी माउली! फुलेल
कलाज्ञानवैभवयोगे आइ! शोभशील
निकट विश्व घेशिल राष्ट्रे सर्व हर्षतील।।

धन्य तो न दिन येइल का जो असे मदायु?
न यो, त्वदुद्धारी परि मज्जन्म सर्व जाऊ
आइ! सर्व जीवन तुझिया अर्पिले पदाला
हा विचार देइल अंती शांति मन्मनाला।।

तुझ्या पोटि जन्म पुन्हा मी घेइन प्रमोदे
पुन: पुन्हा जन्मुन सेवा करुनिया मरु दे
आइ गोड सेवा तव गे अमृतमधुर मेवा
प्रभो! देइ जन्मोजन्मी मला मातृसेवा।।

मातृसेवनाविण देवा! मागणे न काही
एक मात्र आनंद असे मजसि हाच पाही
चंदनापरी मदगात्रे सर्वदा झिजू दे
अहर्निश श्रमुनी श्रमुनी शांतिने पडू दे।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०