नवयुवक

हसो दिवस वा असो निशा ती। असो पौर्णिमा असो अमा ती
अम्हांस नाही लवही भीती। पुढेच घुसणे ठरली नीती

अदम्य आम्ही पुढेच जाऊ। धैर्ये शौर्ये पुढेच धावू
स्मशानशांती अम्हां रुचेना। भयनकाला करु आव्हाना

प्रचंड पर्वत पायी तुडवू। लोळ विजेचा हाती अडवू
छातीवर ती झेलू गोळी। करु मृत्युशी खेळीमेळी

दिव्य असीम प्रताप अमुचा। पुढेच घुसणे नेम सदाचा
धृवाजवळची थंडी येवो। तन अमुचीही गोठून जावो

सहारातली येवो आग। पुढेच जाऊ काढित माग
अफाट दर्या मना न भिववी। प्रचंड तटिनी मना न डरवी

भीषण दाट प्रचंड कानन। द-याखोरि जी फिरवित नयन
असोत किल्ले कडे असोत। जाऊ दृढ निज पाय रोवित

धूमकेतु ते अभद्र येवो। तुफान डोक्यावर घोंघावो
अपत्तींचे पर्वत येवो। मृत्यू येउनी सन्मुख राहो

मृत्यु असे तो मित्र आमुचा। संकट तो तर सखा जिवाचा
हे प्रिय सगळे सखे सवंगडी। आम्हावरि ते करितिल न कडी

रडावया जे आम्हां येतिल। हसवुन आम्हां तेची रडतिल
अम्हां कशाची तमा न तिळभर। रणधीर अम्ही निर्भय वीर

नवभारतसुत आम्ही दिव्य। घ्याया जाते उत्कट भव्य
जसा मारुती वरति उडाला। जन्मताच धरण्यास रवीला

तेजार्थ तसे असो भुकेले। राहु न आता मृत पडलेले
रडत झुरत ना अम्हि बसणार। भाग्यगिरीवर दृढ चढणार

खुशाल कोणी करो विरोध। झुंजार अम्ही निर्भय योध
प्राणांची ना अम्हां फिकीर। नसे कशाची अम्हां जिकीर

त्यागाने तळपणार हीर। झालो आम्ही खरे फकीर
भारतात या आणू तेज। भारतात या आणू वीज

भारतात या आणू जोम। भारतात या निर्मू प्रेम
प्राण भारती सतेज आणू। ज्ञान भारती जिवंत आणू

जन्म सफल हा तरीच मानू। स्वतंत्रता भारतात आणू
आम्ही युव नवभारत-पुत्र। व्रती पवित्र ज्वलच्चरित्र

घालित न बसू वाद वितंड। केवळ जमवित बसू न फंड
भैरव आम्ही दुर्जय चंड। करु दास्याचे तिळतिळ खंड

तेज आमुचे दिव्य उदंड। जाळिल अवघे हे ब्रह्मांड
हिमालयाला गदगद हलवू। सिंहालाही हिसडे देऊ

कोण अम्हाला करिल विरोध। झुंजार अम्ही निर्भय योध
प्राणांवर जाहलो उदार। कोण अता घेइल माघार

विचार केवळ रुचे न सतत। कृती करावी हे अमुचे व्रत
लंबकापरी आंदोलनता। देइल कधि न स्थिति समुन्नता

या जे उत्सुक नव कार्याला। चला उठा या दिव्य रणाला
काय काम ते विचारता का? ऐका तरि ते उरो न शंका

राजकीय वा सामाजिक ते। दास्य अम्हांते सहन न होते
या दास्याला पदि तुडवाया। अन्यायाला पदि तुडवाया

जगददुष्टता ही बदलाया। दु:खनिराशा दूर कराया
दुष्ट रुढींना बुडवायाला। दुष्ट धर्म ते उडवायाला

वैषम्याला दूर कराया। दारिद्र्याला दूर कराया
रोगराइला दूर कराया। दुष्काळाला दूर कराया

पापाला त्या दूर कराया। अज्ञानाला दूर कराया
संकुचिताला दूर कराया। संचयबुद्धिस दूर कराया

मदोद्धतांचा मद उतराया। उद्दामांची रग जिरवाया
पुंजपतींची पत हरवाया। सत्ता त्यांची ती हरवाया

अम्हि उठलेले युव तेजाळ। अम्हि आगीचे जळते लोळ
करी घेतले सतिचे वाण। उठलो आम्ही युव बेभान

झालो आता जसे तुफान। अम्हां कशाची नसे गुमान
मान अता ही वर करणार। कुणास आता ना डरणार

बेडर बेशक बेदरकार। पुढेच आता अम्हि घुसणार
वाटेमध्ये जे जे वाइट। टाकू करुनीच नायनाट

अवास्तविक जे जुलमाचे जे। रास्त नसे जे पाक्त नसे जे
भ्याड असे जे मलिन असे जे। दुष्ट असे जे नष्ट असे जे

जे सडलेले जे कुजलेले। निरुपयोगि जे जे मेलेले
विरोध जे जे करिल विकासा। त्याच्या त्याच्या करुच नाशा

त्या सर्वांना पृथ्वीवरुन। सुदूर देऊ भिरकावून
या जे उत्सुक या कार्याला। तेज आणु या स्वजीवनाला

या या सगळे सखे सहोदर। या जे नवयुव परम उदार
या रे सगळे, समानतेची। माधुर्याची मांगल्याची

सर्वैक्याची सारल्याची। स्वतंत्रतेची समृद्धतेची
सच्छांतीची सतज्ञानाची। सदभक्तीची सत्स्फूर्तीची

निर्मू पावन मंगल गंगा। अनंतरंगा दिव्य अभंगा
सत्प्रेमाला करु अभिषेक। सत्याला या करु अभिषेक

मानव्याला करु अभिषेक। बंधुत्वाला करु अभिषेक
यात्रेकरु हो आपण सारे। यात्रेलागी चला निघा रे

दिव्य निशाणे हाती घ्यारे। सदध्येयाची गाणी गारे
खरे तरुण नव आपण होऊ। भारतास या शोभुन राहू

धृवबाळाचे प्रल्हादाचे। सत्त्वसिंधु चिमण्या चिलयाचे
रोहिदास अभिमन्यू यांचे। सत्यकाम नचिकेता यांचे

शुकसनकांचे उपमन्यूचे। ज्ञानेशांचे शिवबाजींचे
जनकोजीचे विश्वासाचे। वंशज आपण पवित्र साचे

परंपरा ही आहे थोर। तिचा आपणा अनंत जोर
परंपरा ही पुढे चालवू। परंपरा ही कधि न मालवू

परंपरेचा नंदादीप। सदैव पेटत ठेवु समीप
स्वप्राणांचे घालू तेल। सदा दीप हा मग तेवेल

यथार्थ आपण होऊ तरुण। नव्या मनूचे होऊ अरुण
परमेशाचे करुन ध्यान। हीच घेउ या मनात आण

‘हसो दिवस वा असो निशा ती। असो पौर्णिमा असो अमा ती
अम्हांस नाही लवही भीती। पुढेच घुसणे ठरली नीती’


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा