भारतास!

मनोहरा भारता! मदंतर देवा! त्वन्मुखकळा
शोभेल कधी दिव्ये तेजे कळे कळेना मला
मोहरात्र संपेल कधी ही उषा कधी येइल
सदभाग्याची सुंदर किरणे कदा बरे पसरिल
स्वार्थ कधी जाईल लयाला, कलह कधी सरतिल
सद्धर्माची परमैक्याची फुले कधी फुलतिल
हे भाइभाइचे परि होतील कधी हिंदिजन
कधी हृदया मिळतिल हृदये, जोडेल मनाला मन
उठतील कधी तेजाने हातात हात घालुन
अलौकिक अपूर्वा कृति करितिल त्वत्सुत कधी निर्मळ
आनंदाश्रू त्वन्नयनांतुन वाहवतिल घळघळ।।

अस्मन्माता करु स्वतंत्रा ध्येय हेच लोचनी
त्वत्पुत्रांच्या दिसुनी केव्हा उठतिल त्वन्मोचना
जपती अजुनी निज शरिरांना अमूल्य ठेव्यापरी
मरणाची ती भीति क्षुद्रा अजुन तदीयांतरी
निज आप्तांच्या निज गेहांच्या मोही हे अडकती
रडती, पडती, प्रखरता न ता पेटवी चित्ताप्रती
तोडितील आई! केव्हा त्वत्सुत हे मायापाश
त्वत्स्वातंत्र्याचा केव्हा लागेल एक त्या ध्यास
त्वदभक्तीचा तो केव्हा दरवळेल तन्मनि वास
देशभक्त तो रक्त एकच व्रती इतर विसरुन
घेइ करी जो वाण सतीचे वज्रमूर्ति होउन।।

नयनी, वदनी, भाळी, ज्यांच्या देशभक्ति रेखिली
नररत्ने ना अशी सहस्त्रावधि अजुनी देखिली
ज्यांचे जीवन तहानलेले स्वातंत्र्यसुधेस्तव
तळमळते जळते मन ज्यांचे, धीर न धरिते लव
उच्चारी आचारी ज्यांच्या अखंडित प्रगटते
स्वातंत्र्याची मंगल गंगा, तरुण असे कितिक ते?
भोगावरती दृष्टि तयांची विलासैकजीवन
अनंतभोगी भ्रमरसम रमे नित्य तयांचे मन
भावना उज्वला नाही मेल्यापरि दिसती तरुण
स्वातंत्र्यरवीचे ज्यांनी आगामी व्हावे अरुण
हसवावे निजजननींचे मुखकमल जयांनी करुण
व्यसनशरण हे तरुण बघोनी जीव किती तडफडे
मदंतराला ठावे, माते! अश्रुसडा मम पडे।।

तुझ्या भारता! वातावरणी जिकडे तिकडे कदा
स्वातंत्र्याचे वारे उठतिल पळावया रिपु-मदा
स्वातंत्र्याचे पुरुषार्थाचे पराक्रमाचे तसे
विचार केव्हा रोमरोमिं ते भरतिल भरपूरसे
देशभक्ति पाजितील केव्हा माता निज लेकरा
देशप्रेमे दिव्ये भरतिल कधी तदीयांतरा
अज्ञानसागरी बुडती, भारतीय माता अजुनी
देशभक्ति पाजील कोण माता जरि पडती निजुनि
देशभक्ती खेळे जो ना मातांच्या नयनी वदनी
तोवरि नाही आशा, देशा! त्वदुद्धृतीची मला
दृश्य असे हे नैराश्याचे पाहुन दाटे गळा

मातापितरे शिक्षक रमतिल देशभक्तिसागरी
जेव्हा तेव्हा आशेला मम पल्लव फुटतिल तरी
जिकडे तिकडे एक दिसावे दृश्य देशभक्तिचे
कानी यावे जिकडे तिकडे शब्द देशभक्तिचे
विचारविद्युत एकच खेळो सर्वांच्या हृन्मनी
ध्येय दिसावे एक सर्वदा सर्वांना निशिदिनी
सर्वांच्या दृष्टीपुढती स्वातंत्र्यचित्र शोभावे
सर्वांनी यत्न करावे त्यासाठी जीवेभावे
प्राणचित्त वित्त असे जे सर्वस्व सुखे वेचावे
लाखो जेव्हा अशा विचारे उठतिल मग तळपला
भाग्यसूर्य तव समज भारता! संशय नाही मला

प्रसन्न होतिल दिशा, निराशानिशा नष्ट होइल
त्वदभाग्याचे जगी पवाडे सत्कवि मग गातिल
त्वन्मुखकंजी लावण्याची दिव्य चढेल प्रभा
गगनमंडपी वृंद सुरांचा राहिल येउन उभा
पुष्पवृष्टि करितील तुझ्यावर मग गंधर्वस्वर
यशोगान तव गातिल डोलत प्रेमाने निर्भर
होईल त्रिभुवनी तेव्हा सोहळा महानंहाचा
बोलतील एकामेका जन सारे नाचा नाचा
शांतीचा मांगल्याचा स्नेहाचा सौभाग्याचा
तो दिन येइल त्वत्पुत्र जरी वेडे त्वदभक्तिने
होतील, करितिल शर्थ जिवाची मरतील स्फूर्तीने।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, जून १९३०

भारता ऊठ!

ऊठ ऊठ, भारता! तू ऊठ उज्वला!
अभिनवबलवैभवयुत शोभ मंगला।।
दशदिशांत कीर्तिगंध मधुर दरवळो
त्वत्पावन-नामबळे दुरित ते पळो
धैर्य तुझे शौर्य तुझे अमित ना ढळो
जीर्ण शीर्ण सकळ आज जे तुझे गळो
दास्ये ना फिरुन कधी मुख तुझे मळो
शांता, दाता, कांता
रुचिर थोर कृति कर तू सतत निर्मळा।। ऊठ....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, ऑगस्ट १९३०

वंदे मातरम्!

वंदे मातरम् वंदे मातरम्
वंदे मातरम् वंदे मातरम्।।

तव गतवैभव पुनरपि मिळवू
तव सत्कीर्ति न पुनरपि मळवू
उज्वल करु तव वदन त्रिभुवनि
करु कष्ट तुझ्यासाठी निशिदिनी
वंदे मातरम् वंदे मातरम्
वंदे मातरम् वंदे मातरम्।।

तुज पुनरपि जननी गे हसवू
तुज राष्ट्रांच्या शीर्षी बसवू
सकळ जगाची होशिल माता
देलि हतपतिता तू हाता
वंदे मातरम् वंदे मातरम्
वंदे मातरम् वंदे मातरम्।।

अश्रु न आई! आता ढाळी
आइ! नआता पाही खाली
त्वत्सुत आम्ही पराक्रमाने
मिरवू तुज जगि सन्मानाने
वंदे मातरम् वंदे मातरम्
वंदे मातरम् वंदे मातरम्।।

ऊठ, पहा आम्हि सारे भाई
एक जाहलो द्रोह न राही
घसरु पुढती मिळवू विजया
दास्य झणी तव नेऊ विलया
वंदे मातरम् वंदे मातरम्
वंदे मातरम् वंदे मातरम्।।

विद्यावैभवविकास येइल
तववदनांबुज, आइ! फुलेल
तुज भाग्यगिरीवरि बघ नेऊ
त्वच्चरणी रत सतत राहू
वंदे मातरम् वंदे मातरम्
वंदे मातरम् वंदे मातरम्।।



कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, ऑक्टोबर १९३०

भारतजननी तव शरणम्!

भारतजननी तव शरणम्। भारतमाते तव शरणम्
मोददायिनी बोधदायिनी अन्नदायिनी तव शरणम्।।

विद्यावंते तव शरणम्
वैभववंते तव शरणम्
अनंत-तेज:प्रसवे अस्मन्मानससुखदे तव शरणम्

विक्रमकारिणि तव शरणम्
पवित्रकारिणि तव शरणम्
पुण्यकर्मसत्प्रभावतंसे हे ज्ञानरसे तव शरणम्

लावण्यमये तव शरणम्
अनाद्यनंते तव शरणम्
अति-रुचिरे सुचिरस्थिरकीर्ते परमोदारे तव शरणम्

अति-महनीये तव शरणम्
अति-रमणीये तव शरणम्
सुरवर-मुनिवर-नरवर-प्रत्यह-नमनीये हे तव शरणम्

विमले कमले तव शरणम्
नित्यानंदे तव शरणम्
शरणागतजन-अभयदायिनी तापहारिणी तव शरणम्

सुजले सुफले तव शरणम्
अजरे अमरे तव शरणम्
भक्तिज्ञानामृतलेविनि हे शांतरुपिणी तव शरणम्

तपस्विनी हे तव शरणम्
महायोगिनी तव शरणम्
भाग्याभाग्ये विजयापजये सततहासिनी तव शरणम्

प्रभुप्रिये! हे तव शरणम्
प्रभुपरिपाल्ये तव शरणम्
त्वत्पदकंजी रुंझी घालू मिलिंदसम अम्हि तव शरणम्।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
-त्रिचनापल्ली तुरुंग, ऑक्टोबर १९३०

सुसंस्कृत कोण?

अन्यां करील जगती निज जो गुलाम
तो दुष्ट, संस्कृति न त्या शठ तो हराम
तो रानटी मज गमे न मनुष्य खास
जो मानवा करुन ठेवितसे स्व-दास।।

पापी कृतघ्न अतिदांभिक वित्तदेव
अन्यांस नित्य लुटणे कृति ही सदैव
ऐसे असून ‘अम्हि संस्कृत’ बोलतात
ना लाज ती जणु अणूहि तदंतरात।।

जातील तेथ करिती भयद स्मशान
अन्यांस नागवुनिया करितात दीन
जे कोणि या पशुंस संस्कृत नाव देती
त्यांना नसे लव विचार उदार चित्ती।।

अन्यांस जो तुडवितो पशू त्या गणावे
त्या व्याघ्र वा वृक म्हणा, नर ना म्हणावे
तो रानटी पतित, संस्कृति ती न त्याला
न स्थान यन्मनि असे लव बंधुतेला।।

ओतीत तोफ वरती फिरवी विमाने
माने तसा विहरतो मिरवे मदाने
ही संस्कृती जरि असे, वृकव्याघ्ररीस
त्यांना सुसंस्कृत म्हणा मनुजापरीस।।

स्वार्थांध नित्य बनुनी करिती लढाई
शस्त्रे पहा अमुचि! हीच सदा बढाई
रक्तार्थ जे तृषित चाटित ओठ नित्य
माझे सुसंस्कृत तया वदती न ओठ।।

जेथे असे विजय, जेथ असेल वित्त
तेथेच सुसंस्कृत असे, न असेच सत्य
मोठे यदीय मन, सर्व समान मानी
त्यालाच संस्कृति असे, नच ती विमानी।।

मानव्य ना अवगणी न कुणाहि जाची
जो काळजी निज करी करिही पराची
अन्यापदा बघुन धावत शीघ्र जाई
त्याला ‘सुसंस्कृत’ म्हणा न दुजा कुणाही।।

कोणी न या जगि असो कधिही गुलाम
नांदो स्वतंत्र सगळे, मनि हाच काम
दीना साहाय्य करण्या निरपेक्ष धावे
त्याला ‘सुसंस्कृत’ विशेषण हे मिळावे।।

ज्याला समस्त जग हे अपुलेच वाटे
दु:खी कुणीहि बघुन स्वमनात दाटे
ज्यालास्वदेश सगळे निजबंधु सारे
त्याला ‘सुसंस्कृत’ म्हणाल तरी खरे रे।।

पोळी तुपात भिजवील न आपुलीच
संसार जो करि न अन्य लुटून नीच
मोदे मरेल इतरां हसवावयाला
तुम्ही ‘सुसंस्कृत’ खरा म्हणणे तयाला।।

ना आढ्यता, सरलता मधुरा समीप
डोळे यदीय गमती अनुराग-दीप
कापट्य ना मनि, विनम्र विशुद्ध शील
त्याला ‘सुसंस्कृत’ अशी पदवी खुलेल।।

लावीत शोध म्हणुनी न सुधारलेला
ओतील तोफ म्हणुनी न सुधारलेला
ज्याचे उदार मन अंतर ते विशाल
त्याला ‘सुसंस्कृत’ असे म्हणणे खुशाल।।

जाईन मी मरुन, ना दुसरे मरोत
जाईन मी शिणुन ना दुसरे शिणोत
ऐसे म्हणे, हृदयि जो धरि दीनरंक
त्याला ‘सुसंस्कृत’ तुम्ही म्हणणे विशंक।।



कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, मार्च १९३१

खरा हुतात्मा!

सत्याचा जगतात खून करिती, सत्यास फासावरी
देती हे मदमत्त पापनिरत स्वार्थांध हे आसुरी
अन्याया अभिषिक्त आज करिती निर्लज्ज सिंहासनी
जे जे सत् अवकाश त्यास नुरला त्या न विचारी कुणी।।

दंभाला कवटाळिती सतत हे पापासची पूजिती
संपददैवत अर्चिती गरीब जे त्यांचे बळी अर्पिती
सारासार-विवेकअल्प न दिसे सदबुद्धि झाली मृत
लोकी या भरले किती तरी पहा सर्वत्र हे दुष्कृत।।

ऐशा या समयी जगास सगळ्या सत्पंथ जो दावितो
ध्येयध्यास उदात्त आत्मकृतिने लोकांस जो लावितो
क्रांती जीवनि जो अपूर्व घडवी पाडी उभारीतसे
विश्वा उन्नत जो करी मनि धरा की तो हुतात्मा असे।।

विश्वाला कवटाळितो पसरुन प्रेमे भुजा आपुल्या
प्रेमाने बदलावया बघतसे ज्या कल्पना हो खुळ्या
क्रांती रक्तविहीन जो करितसे दीना जना उद्धरी
सोशी कष्ट अनंत त्यास पदवी शोभे हुतात्मा खरी।।

क्लेशाने हसतो न धार खचतो हासेल फासावरी
ध्येयप्राप्ति करावयास पशिता ती ना कधी आदरी
होवो अल्प तरीही तुष्ट हृदयी आशा सदा अंतरी
कर्तव्यार्थ जगे, तयास पदवी शोभे हुतात्मा खरी।।

येती संकटराशी घोर ठिक-या त्यांच्या प्रतापे करी
स्वार्थापासुन नित्य दूर, अचव श्रद्धा अमर्त्या वरी
ज्याचे निर्मळ हेतु, दंभ लव ना, निष्पाप बाळापरी
वैराग्याकर थोर, त्यास पदवी शोभे हुतात्मा खरी।।

केले साध्य जगात काय न बघा, ते यत्न केले किती
साध्यासाठि नरे, तयावरुनिया घ्या तत्परीक्षेप्रती
ध्येयासाठि उदंड यत्न करि जो आजन्म, जाती जरी
सारे बंधु विरुद्ध, त्यास पदवी शोभे हुतात्मा खरी।।

सोशी नित्य दुरुक्ति शांत हृदये, दारिद्र्य ज्याचे धन
जाई धावुन देखताच दुबळा दु:खार्त कष्टी जन
पापीही जवळी करी निजगुणे पावित्र्य देई, धरी
प्रेमे त्या हृदयी, तयास पदवी शोभे हुतात्मा खरी।।

धिक्कारी न कुणा, गुणास बघतो, तत्त्वा न सोडी कधी
देशद्रोह धरी दुरी, शिरति ते ज्याच्या मनी ना कधी
देवा एक भजे तयास हृदयी ध्यातो, न भीती धरी
कोणाचीहि जगी, तयास पदवी शोभे हुतात्मा खरी।।

द्रव्ये मानमरातबे न, पदवीदाने न होई वश
सत्तेने दबला न जात विलसे निर्दोष ज्याचे यश
चारित्र्यावर डाग नाही इवला, घालून तेला जरी
डोळ्यांमाजि बघाल, त्यास पदवी शोभे हुतात्मा खरी।।

ध्येयी जीवनि भिन्नती न उरली ते ध्येय यज्जीवन
ना रात्री दिन वा बघे श्रमतसे खर्ची तदर्थ क्षण
ध्येयाचे अनिवार वेड, न जगी त्यागा यदीया सरी
ऐशा थोर नरास दिव्य पदवी शोभे हुतात्मा खरी।।

ऐशी थोर महा विभूति दिसते जेव्हा धरित्रीवरी
स्वार्थी दुष्ट असत्य दंभमति जे ते कापती अंतरी
सत्या स्थापुन प्रेम निर्मुन जगा देतो धडे उज्वल
जे होता पडले तयांस उठवी दे दुर्बळाला बळ।।

ऐसा एक जगात आज मजला गांधी महात्मा दिसे
दीनांसाठी सदा जळे तळमळे सत्यास पूजीतसे
होती जी मळली धुळीत पडली ती भारती संस्कृती
देवोनी उजाळा तिला करि नवी वानू किती तत्कृती।।

गांधी धर्मच, मूर्त सत्य गमती, धर्मार्थ तज्जीवन
गांधी प्रेमच मूर्त, निर्मळ सदा प्रेमार्द्र त्यांचे मन
गीता चालति बोलती मज गमे, गीतार्थ त्यांची कृती
ऐशी थोर विभूति लाभत अम्हां, भाग्यास नाही मिती।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१

ऊठ झुगारुन देई बेडी

उज्वला! निर्मला
हे भारतवर्षा
हे मंगलदेशा
ऊठ झुगारुन देई बेडी दवडी स्वक्लेशा।।

कितितरि, बापा! काळ लोटला तुजला रे निजुनी
सकल बंधने तोडिश तडातड तेजस्वी बनुनी
अमृता! भारता!
शिर वर कर आता
ऊठ झणी आता
त्वत्पदावरी त्रैलोक्य उभे ठेविल रे माथा।।

पराक्रमाने तेजे आता दास्या तुडवावे
तुझे पवाडे जगात जरि रे सकळांनी गावे
पावना! मोहना!
रमणीया भव्या
स्तवनीया दिव्या
राष्ट्रांच्या तू शिरी शोभ रे अभिनव सत्सेव्या।।

तुझी संस्कृती अनंत, रुचिरा, निर्मल, अमरा, ती
धुळीत परके मिळवु पाहती, ऊठ सोड भीती
दुर्जया! निर्भया!
सुरवरमुनिपूज्या
त्रिभुवनसंस्तव्या
अनंत कीर्ती दिगंतात तू मिरवी निज दिव्या।।

तुझे बळ किती तुझी धृतिती किती ते आणी ध्यानी
अवनीवरती धन्य होउनी शोभे स्वस्थानी
प्रेमळा! कोमळा!
प्रखर बने बापा
हटवी निज तापा
दीनापरि ना पडुनी राही दूर करी पापा।।

स्वातंत्र्याच्या स्वर्गी नांदे, दास्याते तोडी
दैन्य निराशा निरानंदता सकल झणी मोडी
सद्रता! सुव्रता!
विक्रांता दावी
भाग्याला मिरवी
दु:स्थिति अपुली विपत्ति अपुली विलयाला न्यावी।।

डोळे उघडुन केवळ पाही धैर्य मनी धरुनी
नेमेल अवनी सारी निजबळ येइल तुज कळुनी
दुर्धरा! गंभिरा!
सागरसम धीरा
मेरुपरि धीरा
वीरा! वासरणिसम तळपे करि आत्मोद्धारा।।

समय असा ना पुनरपि येइल विलंब ना लावी
व्हावा स्वातंत्र्योदय आता भाग्यवेळ यावी
सिंहसा भीमसा
ऊठ त्वेषाने
झळके तेजाने
दुर्गति अपुली विक्रमसिंधो त्वरित लयाला ने।।

स्वाभिमानघन तू रे होई खितपत न पडावे
धावे, विजये जगी वैभवे तू रे शोभावे
ऊठ रे! ऊठ रे!
तू तर जगजेठी
कृति करि तू मोठी
त्वतभाग्येदूवरी लोभु दे सकल-जगतदृष्टी।।

स्वतंत्र होउन सच्छांतीच्या सुंदर संदेशा
तूच जगा दे हीच असे रे इच्छा जगदीशा
उज्वला! निर्मला
हे भारतवर्षा
हे मंगलदेशा
ऊठ झुगारुन देई बेडी दवडी स्वक्लेशा।।



कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, ऑगस्ट १९३१