माझा अन्त

मीं पाहिली एक सुरम्य बाला;
वर्णू कसा त्या स्मरसंपदेला ?
वृक्षावरी वीज जघीं पडावी,
त्याच्या स्थितींतचि तिची महती पहावी.

माझी अवस्था बघुनीच तीचें
सौंदर्य सोपें अजमावयाचें;
वस्ताद जी चीज जगीं असावी,
तिचें स्वरूप सगळें परिणाम दावीं.

सौंदर्य पुष्पासम वर्णितात,
झालें मला कंटकसें प्रतीत;
सौंदर्य मानोत सुधानिधान,
तें जाहलें मज परंतु विषासमान !

नेत्रें क्षणीं तारवटून गेलीं,
अंगें ज्वरीं त्या परतंत्र झालीं,
झालों तिला मी बघतां भ्रमिष्ट,
शुद्धि सवेंचि मग होय अहा ! विनष्ट.

माझा असा अन्त अहो जहाला !
‘ कोठूनियां हा मग येथ आला !---’
ऐसा तुम्हां संशय येतसे का ?
मी भूत हें मम असें, नच यांत शंका !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- वृत्तधैचित्र्य
- मुंबई, ४ जानेवारी १८९०

फार दिवसांनीं भेट

( चाल --- इस तनधनकी कोन बढाई )

बहुतां दिवशीं भेट जाहली,
प्रणयसिंधूला भरती आली ! ॥ध्रु०॥

आलिंगन दृढ देतां आला
उभयीं ह्रदयीं त्वरित उमाळा;
नावरून तो रमणीनयनीं
बाष्पें आलीं ऊन होउनी;

गलितशीर्ष निज पतिच्या ह्रदयीं
ठेवुनि रडली ती त्या समयीं;
तोहि उसासे टाकित, तिजला
चुम्बित, गाळूं टिपें लागला;

उभयाश्रुजलें मिसळुनि गेलीं !
बहुतां दिवशीं भेट जाहली !
वियोगसमयीं झालें त्यांचें
म्लान रूप तें परस्परांचें ---

ध्यानीं येतां, प्रेमग्रंथी
त्यांची झाली अधिकच दृढ ती;
कालें आणिक कष्टदशेनें
क्षीणत्वाला होतें जाणें

सगळयांचेंहि, परी प्रीतिचा
जोम वाढतो उलटा साचा !---
कुरवाळित अन्योन्यां ठेलीं !
बहुतां दिवशीं भेट जाहली !

किती वेळपर्यंत तयांना
कांहीं केल्याही वदवेना;
‘ प्रिय लाडके !’--‘ जिवलग नाथा !’
हे रव वदली मग उत्सुकता;

फुटकळ वाक्यें मग दोघांहीं
परस्परां जीं म्हटलीं कांहीं,
भाव त्यांतला कीं---नच व्हावा
वियोग फिरुनी, किंवा यावा

मृत्यूच दोघां त्याच सुवेळीं !
जधीं बहु दिनीं भेट जाहली !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- २६ जानेवारी १८९८

प्रणय - कथन

म्हणे मला आपला ‘ प्रिय---जिवलग ’ हे मधुरे !
वद असे मजवरी प्रेम तुझें गे तारे ! जिवलगे ! ॥ध्रु०॥

जें वाटे तें वदण्याहुनि तदनु रूप बरवें करणें,
सुज्ञ सांगती व्यवहारी हा नियम निज मनीं धरणें;
शहाणपण हें लौकिक सखये गुंडाळूनि तूं ठेवी,
क्षणभर त्याच्या विरुद्ध मजला निजवर्तन तूं दावीं.
म्हण मला आपला ’ प्रिय---जिवलग ’ हे मधुरे !

हारतुरे हे मजकरितां तूं असती सुंदर केले,
अगरूची ही उटी सुवासिक सिद्ध असे या वेळे;
यावरुनि जरी शंका न उरे मला तुझ्या प्रणयाची ---
तरीहि वेडयापरि मी तुजला तसें वदाया याचीं !

म्हण मला आपला ’ प्रिय--- जिवलग ; हे मधुरे !
व्यवहाराची काय कसोटी प्रीतीला लावावी ?
विसर विसर तूं व्यवहाराला विसरहि सुज्ञपणाला,
आणिक वेडी होउनि वद जें व्हावें या वेडयाला !
म्हण मला आपला ’ प्रिय---जिवलग ’ गे मधुरे !

जलाशयाला झरी मिळाया असतां जात, तयाला
निज मंजु रवें न काय वितरी ती अपुल्या प्रणयाला ?
नदी निधीला भेटायाला जातां ती वेगानें,
काय बरें स्वप्रिया कथाया गाते खळखळ गाणें ?
म्हण मला आपला ’ प्रि---जिवलग ’ हे मधुरे !

सागरलहरी किनार्‍यास घे वळघे आलिंगाया,
किति निस्सीस प्रेमघोष ते करिते वद समयीं त्या ?
हवा गिरीशीं रमावयाला त्वरित गतीनें धावे
प्रणयकथन तें तीचें तुझिया श्रवणां काय न ठावें ?
म्हण मला आपला ’ प्रिय---जिवलग ’ हे मधुरे !

सांगितल्या या प्रणयवतींचें वळण तुवांही ध्यावें,
मौन असे हें काय म्हणुनि तूं वद गे स्वीकारावें ?
ताम्बूल असो, मधुपर्क असो, असो पुष्पशय्याही,
येइल तुझिया आशयास का पुरी व्यक्तता यांहीं ?
म्हण मला आपला ’ प्रिय---जिवलग ’ हे मधुरे !

जड हस्तांच्या मर्यादित या कृतींमधें पर्थाप्ति
जडातीत त्या मनोगताची कशी बरें व्हावी ती ?
शुक्तिपुटीं जर समाविष्ट तो रत्नाकर होईल,
उपचारीं निस्सीम प्रीतिही पुरती समजावेल !
म्हण मला आपला ’ प्रिय---जिवलग ’ हे मधुरे !

स्वाभिप्राया विदित कराया एकच साधन मोठें---
जिव्हाग्रीं तें; पहा विचारुनि मनीं खरें कीं खोटें ?
दों ह्रदयांच्या संगमसमयीं कसल्या लौकिकरीति---
घेउनि बससी ! सोड लाडके मर्यादेवी स्फीति !

विसर तर झणीं व्यवहाराला विसर शहाणपणाला,
आणिक वेडी होउनि वद जें व्हावें या वेडयाला !
म्हण मला आपला ’ प्रिय---जिवलग ’ हे मधुरे !
वद असे मजवरि प्रेम तुझें गे तारे !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- १८९८

मनोहारिणी

( चाल---भक्ति ग वेणी० )

तीच मनोहारिणी !--- जी ठसलीसे मन्मनीं ! ॥ध्रु०॥

सृष्टिलतेची कलिका फुलली
अनुपम, माधूर्यानें भरली;
जिच्या दर्शनीं तटस्थ वृत्ती
भान सर्वही विसरुनी जाती;

ती युवती पद्मिनी---जी ठसलीसे मन्मनीं !

निज गौरत्वें शशिकान्तीला
लज्जा आणीलच ती बाला,
तल्लावण्यप्रभा चमकते !
विजेहूनिही नेत्र दिपविते !

रूपाची ती खनी---जी टसलीसे मन्मनीं.

“ इच्या कुन्तलावरणाखालीं
तारका कुणी काय पहुडली ?
उज्ज्वलता ही तरीच विलसे
भाळीं ! ” हा उद‍गार निघतसे,

ती तरुणी पाहूनी---जी ठसलीसे मन्मनीं !

“ शीर्षीं निजल्या त्या तारेचे
किरण आगळे या रमणीचे
नेत्रांवाटें काय फांकती !”
उद्‍गारविते प्रेक्षकास ती

निज दृष्टिप्रेषणीं--- जी ठसलीसें मन्मनीं !

गुलाब गालीं अहा ! विकसले
आणि तेथ जे खुलुनि राहिले,
विलक्षणचि---ते कंटक त्यांचे
सलती ह्र्दयीं कामिजनांचे !

ऐशी ती कामिनी---जी ठसलीसे मन्मनीं !

मृदु हंसतां ती मधुर बोलतां,
प्रगट होय जी ह्र्दयंगमता,
तीच्या ग्रहणा नयनें श्रवणें
सुरांचींहि वळतिल लुब्धपणें

ऐशी ती भामिनी---जी ठसलीसे मन्मनीं !

वक्षःस्थल पीनत्व पावलें,
गुरुत्वहि नितंबीं तें आलें;
तेणें सिंहकटित्व तियेचें
अधिकचि चित्ताकर्षक साचें !

विकल करी मोहिनी---जी ठसलीसे मन्मनीं !

बहाराला नवयौवन आलें,
ओथंबुनि तें देहीं गेलें !
म्हणुनि पळाली बाल्यचपलता,
गतिनें धरिली रुचिर मंदता

गजगमनें शोभिनी --- जी ठसलीसे मन्मनीं !

सौंदर्यें शालिन्यें पुतळी
ती रामायणमूर्तिच गमली,
उदात्त मुद्रा, गंभीर चर्या,
यांहीं भारत खचिता वर्या,

तीं रमणी सद्‍गुणी--- जी ठसलीसे मन्मनीं !

तिच्या दर्शनें मन उल्हासे,
तिजविण सगळें शून्यचि भासे,
म्हणुनी करुनी ध्यानधारणा
अन्तर्यामीं बघतों ललना
तीच मनोहारिणी---जी ठसलीसे मन्मनीं !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- १९०४

मयूरासन आणि ताजमहाल

कामें दोन सुरेख त्या नृपवरें केलीं :--- मयूरासनीं,
ज्या तो बैसुनि शोभला; प्रथम तें सा कोटि ज्या लागले,
राजे ज्यापुढते जुळूनि अपुल्या हस्तद्वया वांकले,
झाले कम्पित, तत्कारीं शिर असे, येऊनियां हें मनीं;

प्रेमें मन्दिरही तसें निजसखीसाठीं तयें लादुनी ---
कोटि तीनच त्या गभीर यमुनातीरावरी बांधिलें !
चोरें आसन तें दुरी पळविलें ! स्मर्तव्य कीं जाहलें !
आहे अद‍भुत तो महाल अजुनी तेथें उभा राहूनो !

विल्हेवाट अशीच रे तव कृती त्या सर्वदा पावती;
मत्त भ्रान्त नरा ! सदैव कितिही तूं धूप रे जाळिला

स्वार्थाच्या प्रकृतीपुढें---निजमनीं ही याद तूं जागती
राहू दे---तरि धूर होइल जगीं केव्हांच तो लोपला !

काडी एकच गंधयुक्त, नमुनी प्रीतीस तूं लाव ती,
तीचा वास सदा जगीं पसरुनी देई तो तुष्टिला !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- १३ नोव्हेंबर १८९२

चिरवियुक्ताचा उद्‍गार

वृष्टीमागुनि चन्द्रकान्तिधवला ती ये शरत्‍ सजिरी,
तैसा रम्य वसन्त तीव्र शिशिरामागूनि तो येतसे,
सूतिक्लेश सरे अनन्तर सुखा तें तान्हुलें देतसे,
पाणी ओसरतां समग्र भरती येते पुन्हा सागरीं.

द्युत्याविष्कृति मोक्षकाल करितो खग्रास झाल्यावरी,
कृष्णानन्तर शुक्ल पक्ष चढती तो कौमुदी घेतसे,
प्रातः काल सुरेख गाढ रजनीमागुनि तो होतसे,
होता दारुण कल्प-अन्त फिरुनी सृष्टि स्मिता आदरी !

या गोष्टी गणणें असे सुलभ गे त्यांला जयाच्या मनीं
आशातन्तु नसे अजूनि तुटला; ते भाग्यशीली खरे !
कान्ते ! मत्सम मे परन्तु असती जे या अभागी जनीं,
त्यांची वाट विपत्समाकुल जगीं होणार कैशी बरें ?

उत्कंठाज्वलनें तुझा विरह हा टाकी मला पोळुनी
या गोष्टी गणतां निराश ह्रदयीं माझ्या भरे कांपरे !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
-  शार्दूलविक्रीडित
- मुंबई १५ नोव्हेंबर १८९२

वियुक्ताचा उद्‍गार

राहे नित्य वसुंधरेस धरुनी हा भाग्यशाली गिरी;
वेलेला लहरीकरीं निरवधी हा अब्धि आलिंगितो;
रेषेला क्षितिजाचिया बिलगुनी आकाश तो नांदतो;

तैसा तो ध्रुव उत्तरेस न कधीं सोडून जाई दुरी;
चित्रोल्लास चिर प्रकाश सुभगच्छायासखीशीं करी;
पोटाशीं धरुनी सदा सुरधुनी स्वर्लोक हा राहतो,
घेऊनी द्युतिदेवतेस तरणी संगें तसा चालतो;

प्रेमें पूरुष संतत प्रकृतिला आश्लेषुनी ती धरी !

हीं युग्में बधतां सुखी, मम मनीं प्राणप्रिये कालवे;
त्यांचा मत्सर उद्‍भवून ह्र्दयीं, होतें नकोसें जिणें !
तूतें सोडूनि दूर हाय ! न मला आतां मुळीं राहवे;
कैसे तूं असशील गे दिवस हे कंठीत माझ्याविणें !

धिक्कारीं मज मीच, ज्यास तुजला कष्टांत या लोटवे !
हीं युग्में बघतां, सखे ! विरह हा दे दूःख मातें दुणें !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित 
- १५ डिसेंबर १९०१