आत्म्याची हाक

प्रभाकरने आपल्यापुढे करियरीस्ट हाण्याचे ध्येय कधीच ठेवले नव्हते. त्याचे नाव यामुळे पहिल्या दहा किंवा पाचात कधी झळकले नव्हते. परंतु हायस्कूलपासून तो एक आनंदी परंतु तत्त्वनिष्ठ मुलगा म्हणून सर्वांना ठाऊक होता. देशप्रेम, समाजसुधारणेविषयी आस्था आणि समाजातील अन्याय, विषमता यामुळे त्याचे रक्त उसळे. यामुळेच तो विद्यार्थी जीवनातही अनेक चळवळींत भाग घेत असे. त्याच्या वक्तृत्वांत आणि लेखनात एकप्रकारची धार असे. कॉलेजात गेल्यावर त्याला थोडे व्यापक क्षेत्र मिळाले. त्याच्या बहुमुखी प्रतिभेला मोठे क्षेत्र मिळाले. कॉलेजच्या आवाराबाहेरही प्रभाकर दिसू लागला. वृत्तपत्रांतून त्योच लेख मधून मधून झळकू लागले. त्याला सर्वांत चीड कसली असेल तर सर्वत्र बोकाळलेल्या दांभिकतेची. धर्मात, राजकारणात, एवढेच नव्हे तर शिक्षणक्षेत्रांतही दांभिकता पाहून त्याला वाईट वाटे आणि त्याचा आत्मा बंड करून उठे. समाजाच्या दु:खाचे सर्वांत मूळ कारण म्हणजे दांभिकता असे तो म्हणे आणि समाजाला जर थोडे अधिक सुख मिळवून द्यावयाचे असेल तर ही दांभिकतेची प्रतिष्ठा समाजातून नाहीशी केली पाहिजे असे त्याचे म्हणणे. त्याच्या ह्या नवविचाराने तो कोठल्याच चौकटीत बसत नव्हता.

आपली कॉलेजची चार वर्षे त्याने पुरी केली. घरची गरिबी होती. प्रभारची चार वर्षे कधी पूर्ण होतात याकडे त्याचे वडील डोळे लावून होते. प्रभाकर परीक्षा देऊन घरी आला. वडिलांच्या त्याच्याबद्दल मोठमोठया अपेक्षा होत्या. तो मोठा पगारदार अधिकारी होईल असे त्यांना वाटे. तो परत आला आणि त्यांनी त्याच्यामागे नोकरीचे टुमणे लावले. निकाल लागेपर्यंत थांबायलाही ते तयार नव्हते. त्यांच्या आग्रहाला कंटाळून मग प्रभाकर एकाद दुसरा अर्ज रोज पाठवी. अर्ज पाठविताना त्याच्या मनाला वेदना होत. आपण कॉलेजात समजत होतो तितका जीवनसंग्राम सोपा नाही हे त्याला दिसले. अर्ज करता करता त्याचा रिझल्ट लागला. तो पास झाला. परंतु त्याच्या अर्जाला समाधानकारक उत्तर कोठेच नव्हते. त्याच्याबरोबर मॅट्रिकला बसलेली मुले कुठे कुठे चिकटली होती. वरच्या जागा काहींना मिळाल्या होत्या. काहींनी मायाही बरीच जमा केली होती. प्रभाकरच्या वडिलांच्या समोर ही दृश्ये दिसत.
प्रभाकरच्या निकालाच्याच दिवशी वर्तमानपत्रात एक जाहिरात होती. संपादकाच्या जागेसाठी अर्ज मागविले होते. 'नवसमाज' मासिक निघायचे होते. संपादकाला तीनशे रुपये पगार मिळावयाचा होता. प्रभाकरने अर्ज केला. त्याच्या डोळयांसमोर 'नवसमाज'चे आपण संपादक झाल्याची दृश्ये तरळू लागली. परंतु मनात वाटे, ''माझ्यापेक्षा कितीतरी अनुभवी लोकांचे अर्ज येतील. तीनशे रुपये पगार म्हणजे मामुली गोष्ट नव्हे. कसची आपल्याला ती जागा मिळते.'' आणि जेव्हा पंधरा दिवस वाट पाहून उत्तर आले नाही तेव्हा तर तो निराशच झाला. पुन्हा दुस-या जाहिरातील शोधू लागला.

पण इतक्यात एक तारवाला आला. 'नवसमाज'चे मालक दीनदयालजी यांची तार होती. आणि प्रभाकरला भेटीसाठी पाचारण केले होते. प्रभाकर लगेच निघाला. जाताना गाडीत त्याने 'नवसमाज' कसे सजवायचे, कोणती सदरे द्यायची, याचा आराखडा तयार केला. सहज एका कागदावर त्याने लिहिले प्रभाकर भारती, बी.ए. संपादक नवसमाज. तो कागद हातात खेळवीत होता. पण मग लाज वाटली. अजून कशाला पत्ता नाही. जर कोणी आपल्याला पाहिले तर काय म्हणेल! त्याने तो कागद लगेच खिशात कोंबला. त्याचे उतरायचे स्टेशन आले. दीनदयालजींचा मनुष्य स्टेशनवर आला होताच. प्रभाकरला त्याने लगेच हुडकून काढले. घरी जाताच दीनदयालजींची मुलाखत झाली. म्हणाले, ''तुमचा स्पष्टवक्तेपणा मला आवडला. इतरांनी अर्जात समाजसेवेची इच्छा आहे वगैरे हजार भानगडी लिहिल्या. पण तुम्ही स्पष्ट लिहिले की, मला नोकरीची गरज आहे. समाजसेवा नोकरी करताना करता आली तर हवी आहे. तुमची कात्रणे पाहिली. चांगले लिहिता तुम्ही. तुमच्या लेखणीत जोश आहे.''

''तसे काही नाही. आपली कृपा आहे.''

''मी उगाच स्तुति नाही करीत. तुम्हीच नवसमाज सांभाळा. पहिला अंक कधी काढायचा? आज आहे जुलैची पहिली तारीख.''

''१५ ऑगस्टला काढू. स्वातंत्र्य दिनापासून 'नवसमाज' सुरू होऊ दे.''

''ठीक. पण जमेल एवढयांत?''
प्रभाकरची निवड झाली. प्रभाकर कंबर बांधून कामाला लागला. १५ ऑगस्टला नवसमाजाचा पहिला अंक निघाला आणि वाचकांच्या नुसत्या उडया पडल्या त्याच्यावर. लेख, गोष्टी, कविता उच्च प्रकारच्या आणि मुखपृष्ठ सुरेख आणि अंतरंगाची कल्पना देणारे होते. वृत्तपत्रांतून उत्कृष्ट अभिप्राय आले. एकजात सर्वांनी 'नवसमाज'ची पाठ थोपटली होती. दीनदयालजीही खूश होते. अंक एकापेक्षा एक सरस निघत होते.

सात आठ अंक निघाले असतील नसतील. गावात नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली. दीनदयालजी उभे राहिले. त्यांच्या विरूध्द एक पेन्शनर हेडमास्तर उभे होते. हे हेडमास्तर फार लोकप्रिय होते. समाजसेवेच्या प्रत्येक क्षेत्रांत अग्रभागी असत. गावातले कुठलेही सेवाकार्य असो तेथे ते असायचेच.

आणि एक दिवस निवडणुकीनिमित्त सभा झाली. म्युनिसिपल निवडणूक हा विषय होता. प्रभाकर बोलणार होता. लोकांची अफाट गर्दी झाली. प्रभाकरचे प्रवाही आणि प्रभावी भाषण सुरू झाले. कॉलेजमधला दांभिकतेविरूध्दचा सारा जोश त्याच्या अंगात संचारला. म्हणाला, ''नगरपालिका सुधारल्यावाचून स्वराज्य झोपडयांपर्यंत पोचणार नाही. सर्व लोभ, भय सोडून त्यागी समाजसेवकांना निवडून देण्याची हिम्मत मतदारांनी बाळगल्यावाचून नगरपालिका कशा सुधारणार? उद्याच्या निवडणुकीत सर्व मतदारांनी दाखविले पाहिजे की, खरे खोटे तुम्ही ओळखता. आपला हितकर्ता कोण ते तुम्हांला समजते. तुम्ही मते कोणाला देणार? तुमच्या सेवेसाठी अखंड तळमळणा-या ह्या हेडमास्तरांना - ज्यांनी लोकशिक्षणाचे कार्य सतत तीस वर्षे केले आहे त्यांना, की केवळ पैसा आहे म्हणून नगरपालिकेचे राजकारण करू पाहणा-या दीनदयालजींना?''

प्रभाकरच्या वक्तृत्वाचा परिणाम जनतेवर झाला आणि दीनदयालजींवरही. दुस-या दिवशी दीनदयालजींनी त्याला बोलाविले व सभेतील भाषणाविषयी विचारले.

ते म्हणाले, ''मी तुमचे काय घोडे मारले होते माझ्याविरूध्द प्रचार केलात!''

''मी नोकरी पत्करली म्हणजे माझी मते विकलीत असे नाही. मला जे खरे वाटेल ते बोलण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.''
एवढे बोलून तो तडक घरी आला आणि त्याने राजीनामा पाठवून दिला. तसे न करण्याबद्दल त्याला अनेकांनी सल्ला दिला. हेडमास्तर तर म्हणाले, ''मी आपले नावच मागे घेतो.'' पण प्रभाकरने निश्चय पार पाडला. ज्या स्पष्टवक्तेपणामुळे तो संपादक झाला त्यामुळेच त्याला नोकरी सोडावी लागली.

निवडणुका झाल्या. शेटजींना विजयाची खात्री वाटत होती. आपल्या पैशाचा आणि पुढे पुढे करणा-यांचा त्यांना फार भरवसा होता. पण निवडणुकीत हेडमास्तर निवडून आले. इकडे प्रभाकर राजीनामा देऊन बाहर पडला. त्याला त्याच्याजोगती नोकरी मिळाली नाही. शेवटी तो आपल्या गावी आला. एक छोटेसे दुकान त्याने घातले पण व्यापारी कौशल्य त्याच्यात नव्हते. दुकानातून घरखर्च चालत नसे. शेतीवाडीतही प्रभाकर लक्ष घाली. त्याचे जीवन कसे तरी चालले होते. लोक त्याच्याबद्दल हळहळत होते.

आणि एकदिवस त्याच्या त्या खेडयांतल्या दुकानापुढे एक मोटर उभी राहिले. दीनदयालजींनी विचारले, ''कसे काय चालले आहे दुकान?''

प्रभाकरला वाटले जखमेवर मीठ चोळण्यासाठी हे आले आहेत. चांगले चालले आहे, द्यावे दडपून असा विचारही डोकावून गेला. पण त्याने स्वत:ला सावरले. म्हणाला, ''कसा तरी संसार रेटतो आहे.''

दीनदयालजींनी प्रभाकरला मिठी मारली. ते म्हणाले, ''जीवनाशी खरा प्रामाणिक आहेस. 'नवसमाज' तुझ्यावाचून पोरका आहे. आजही उत्तम साहित्य त्यात आहे. पण ते तेज आज तेथे नाही, आत्मा तेथे नाही. तूच 'नवसमाज' सांभाळ. आत्म्याची हाक ऐकणारा प्रामाणिक, निर्दंभ मनुष्य तू आहेस. 'नवसमाज' चालवायला तूच लायक. माझी चूक झाली. तुझी आत्म्याची हाक दडपून टाकायला मी चुकीने सांगत होतो. तू आपल्या आत्म्याच्या हाकेचा अपमान केला नाहीस. 'नवसमाजा'ला तू लायक आहेस. माझ्या विनंतीचा अव्हेर करू नकोस.''

दुस-या महिन्यापासून पुन्हा प्रभाकरच्या संपादकात्वाखाली 'नवसमाज' निघू लागला.

मेंग चियांग - एक चिनी लोककथा

चीनमध्ये लूपू राजा होता. त्याचे मोठे उद्योग, अचाट आणि विचित्र! मानवी हृदयावर न कोरलेल्या गोष्टी विसरल्या जातात! परंतु घोर पापांच्या कथा, त्या कोण विसरेल? त्या युगानुयुग चालत येतात. शापित अशा कथा.

लूपूने साम्राज्य वाढविले आणि संरक्षणासाठी उत्तरेकडे भिंत बांधायचे ठरविले. भिंतीजवळ हाडांच्या राशी पडत आहेत. दृश्य बघून लोकांच्या अंगावर काटा येत आहे. सर्वत्र जुलूम आणि भीति! आकाश रडू लागले, भूमाता रडू लागली. ग्रंथ जाण्यात येत आहेत, पंडितांना ठार करण्यात येत आहे, जिवंत पुरण्यात येत आहे. कायदा नाही, नीतिनियम नाही. धर्म सारा लोपला.

मेंग चियांग  निघाली. ती पतिव्रता सती. तिचा पती कामाला सक्तीने नेण्यात आला. ती रडत बसे. किती कृश झाली आहे बघा. गाल खोल गेले. डोळे निस्तेज. अरेरे. तिचे लक्ष उत्तरेकडे आहे. तेथे कडक हिवाळा आहे! माझा पति! पुस्तकांत रमणारा. नाजुक, सुकुमार! त्याच्याने दगडधोंडे विटा कशा उचलल्या जातील? कोण त्याची कींव करील? कठोर अधिकारी हुकुम सोडीत असतील, वादीचे चाबूक कडाड् उडवित असतील. हे का त्याच्या नशिबी असावे? हे घर स्मशान वाटते. कशी येथे राहू? किती वाट पाहू? हृदय दुभंगते. मी त्याला शोधायला जाणार, भेटायला जाणार! दहा हजार मैल का असेना अंतर! मी जाईन.

ती निघाली. ती कोमलांगी, कृशांगी निघाली. शरीराने दुबळी परंतु आत्मा वज्राचा होता. साधे सुती लुगडे ती नेसली होती. ना अलंकार ना काही. तिचे ते सौंदर्य हाच तिचा दागिना. सौंदर्याचा प्रकाश फेकीत वा-यांतून, वादळांतून, पावसांतून ती निघाली. जवळच्या गाठोडयात काय आहे? पतीसाठी हाताने तयार करून आणलेले गरम कपडे! उत्तरेकडे चावरी थंडी आहे. जात होती. वाटेत नद्या लागत आहेत. दिवस मावळत आहे. गायीगुरे घरी येत आहेत. चूल पेटत आहे, परंतु ती? तिला विसांवा नाही. अनन्त पृथ्वी, अनन्त आकाश! एकटी, हो एकटी. जा एकटीच रडत, अश्रूंचे सडे घालीत. पावले उचलत नाहीत. थकली बिचारी. पदर चिखलात पडत आहे; तिला भान नाही. ओचा सुटला; कळत नाही. ते उघडे हात थंडीने हिरवे निळे झाले.

जातांना तो म्हणाला होता, ''मी परत येईन काय भरवसा? राजाचा हुकुम! कोणी मोडायचा? आता एका उशीवर डोकी ठेवून आपण पाखरांच्या जोडप्यांप्रमाणे पुन्हा प्रेमाने पडणार नाही. प्रिय सखी, पतिव्रते, खोटे स्वप्न मनात नको खेळवू. मनात आशा नको. पुन्हा परत येणे कठिण आहे.''

नाथ, त्या शब्दांत करुणा होती. तुम्ही का माझा मार्ग मोकळा करून जात होता? आपले वैवाहिक जीवन का विसरलात? मासा आणि पाणी तसे आपले एकत्र जीवन. माझे हृदय शुध्द आहे. पातिव्रत्य हेच माझे बळ. मायबापांची शिकवण का विसरू? मी येणार तुझ्या पाठोपाठ, येणार भेटायला, तुला गरम कपडे द्यायला. तुला मदत करायला, दहा हजार मैल अंतर असले म्हणून काय झाले?

दु:खाने ती दग्ध झाली होती. जरा काही सळसळले तरी घाबरे. आज थंड चावरे वारे वहात आहेत. कावळे चालले घरटयांकडे. ही कोठे जाणार? घंटांचा आवाज येत आहे. मिण मिण दिवा दूरचा दिसत आहे. गाव आहे जवळ? गाव नव्हता. त्या जंगलात ते देऊळ होते. त्या लहानशा देवळात ती बसली. देवासमोर अश्रू ढाळित बसली, ''देवा, अश्रूंनी तुझे मंदिर मलिन करित आहे म्हणून रागावू नको. मुलीला क्षमा कर. मी दुर्दैवी आहे. थंडीवा-यात तुझ्या पायी निवारा; उबारा.''

तेथे जागा झाडून दात शिवशिवत ती झोपली. कोठली झोप? तिच्या फाटक्या वस्त्रांतून वारा घुसत ओता. ती गारठली. आकाशात अष्टमीचा चंद्र मावळत होता. ती देवाला म्हणाली, ''देवा, माझ्या पतीला स्वप्न पाड. मी गरम कपडे घेऊन येत आहे. सांग, त्याला धीर येईल. माझ्या दया कर. वीस वर्षेहि माझ्या वयाला नाहीत! लहान मी. परंतु जाईन त्याला शोधीत.''

गालांवरून अश्रु घळघळले. ती पुन्हा जुडी करून पडली. स्वप्नात अस्थिपंजर पतीला ती बघते.

''कशाला तू आलीस?'' तो म्हणतो.

''नाथ, या, या,'' असे म्हणत त्याला ती हृदयाशीं धरू बघते, तुम्हांला ऊब देतें म्हणते.

बाहेर सों, सों वारा करतो. तिला जाग येते. अनंत तारे चमचम करीत असतात. सभोवती पृथ्वी धुक्यांत वेढलेली. हे स्वप्न दुर्दैवाचे सूचक का? तो नाही भेटणार?

तो स्वप्नात म्हणाला, ''माझी मूठभर हाडे, माझी माती, हीच तुझ्या अनंत श्रमांची भरपाई, दुसरे काय  तुला मिळणार?''

माझे विचार भरकटत गेले असतील. ते स्वप्न प्रचंड नद्या नि उंच पर्वत यांवरून येत होते. त्यामुळे ते अस्ताव्यस्त झाले असावे. मी का त्याला मातीच्या खाली पाहीन? हे का माझ्या नशिबी असेल? निदान त्याच्याजवळ मीहि पडेन. हें का कमी?

उजाडले. धुके पडून सारे ओलसर आहे. कावळे हिंडू फिरू लागले. देवाला नमस्कारून ती निघाली. हृदयांत आशा-निराशा. म्हणाली, ''किती संकटे असोत, कष्ट असोत, पतिपत्नीचे ऐक्य - त्याची कसोटी आहे.''

दंवाने तिचे वक्ष:स्थळ ओले झाले आहे आणि अश्रुंनीही. कठोर वारा तिला मिठी मारीत आहे. ती थरथरत आहे. पतीला हांक मारून म्हणते, ''कोठल्या बाजूला वळू, कोठें तुला पाहूं? कधी पुन्हा माझ्या केसांत फुलें घालशील? माझ्या कानांत कर्णफुलें घालशील? आपण रात्री चांदण्यांत फुलबागेत सारंगी वाजवित होतों. उत्तरेच्या भिंतीकडे मी येत आहे. भेटशील का? पुन्हा घरी जाऊन आपण सायंकाळचे जेवण करू का? जिन्यांतून दोघे बरोबर जाऊं का? नाथ, पूर्वजन्मी आपले काय पाप घडले कीं हें भोगायला लागावें? तळवे फाटले रे. सुकलेल्या फुलागत माझी दशा.'' वाटेंत कधी प्रचंड जंगले, प्रचंड वाळवंटे, प्रचंड नद्या, प्रचंड दर्या. कधी रस्ता नसे. कधी चार पावलें उमटलेलीं दिसत. कधीं झोपडी आढळे. कुत्रा भुंके. कोंबडा आरवतांना कानावर येई. कधी रस्त्यांत खानावळ लागे. तेथे चार घांस खाई. तिच्याकडून बघून खानावळवाला म्हणे, ''थोरा मोठयांची दिसते. दृष्टीत दु:ख आहे. परंतु किती सुंदर आहे ही नाही?''
त्याची बायको तिला विचारी, ''बाई कोठून आल्यात, कोठे जायचे?''

तिचे अश्रू धावत येत. हुंदका आवरून म्हणे, ''भिंत, उत्तरेकडची प्रचंड भिंत! वेठीला धरून माझ्या पतीला त्यांनी ओढीत नेले. त्याला भेटायला जाते. हे गरम कपडे घेऊन थंडीवा-यांतून जात आहे. घरी रडत बसण्यापेक्षा हा दु:खदायक प्रवास बरा. त्याला शोधीत जात आहे. त्याला पाहीन नि शान्त होईन.''

''वेडी तर नाहीस तू मुली? शेकडो हजारो मैल कशी चालत जाशील? थंडीचा कडाका. वाटेत वाटमारे, डाकू, तू सुंदर आहेस. तेच तर भय. नको जाऊ. हे तुझे सुकुमार पाय.''

''सर्व नात्यांत पतिपत्नींचें नातें श्रेष्ठ. सर्व संकटांची मला जाणीव आहे. परंतु माझे वेडे हृदय. त्याला पाहिल्याशिवाय विसावणार नाही. परत नाही फिरायचे या निश्चयाने मी निघाले आहे. मग आमची भेट धरित्रीच्या पोटात व्हायची असेल तरी तेथे होवो.''

ती म्हातारी खानावळी बाई म्हणते, ''मुली; तूं एकटी मी येऊ का सोबतीला? एकीपेक्षां दोघी ब-या. हा थकलेला देह येऊ दे का तुझ्या संगे?''

''नको आजीबाई नको. तुम्ही प्रेम दिलेत, दया दाखवलीत. तुमच्या मरणाला का मी कारणीभूत होऊं? शिवशिव. नाही आजी, ते बरे नाही. तुम्ही मला आईचे प्रेम दिलेत. पति भेटल्यावर परतेन तेव्हा तुमचे ऋण फेडीन हो.''

आजीबाई आणि मेंग चियांग कितीतरी वेळ बोलत बसतात. मग डोळा लागतो. उजाडले आता. रात्रीचे पहा-याचे हांकारे थांबले. कोंबडा आरवला. ती उठली. कपडयांचे बासन घेऊन निघाली.

थंडी, थंडी, कडक थंडी. कशी ही जाणार, कशी चालणार? वारा, चावरा वारा. झोंबतो अंगाला. कशी ही जाणार? पायांची चाळण झाली. अंगावरच्या वस्त्राच्या चिंध्या झाल्या. कशी राहणार थंडी? धुके, बर्फ, सारे गार गार, तिची हाडे दुखत आहेत. रक्ताळ अश्रू गळत आहेत. सुस्कारे! ते पहा उंच पर्व दिसू लागले. भिंत जवळ आली का? उत्तरेची भिंत? ती पर्व चढू लागली. भिंत कोठे आहे ती विचारी. आणि एक शेतकरी म्हणाला, ''आता जवळच आहे. समुद्रापर्यंत भिंत आता भिडेल. अघोरी काम.''

तिचे हृदय आशेने फुलले. जवळ आली भिंत. समोरचाच रस्ता. त्याला बघेन नि सारे श्रम नाहींसे होतील. अश्रूंची फुले होतील.

भिंतीचे काम लौकर आटपा. अपार खर्च होत आहे. करांखाली प्रजा आहे. लौकर आटपा काम. डोंगरावर पाणी न्यायचे, दगड चढवायचे! पाठीवर कडाड् चाबूक वाजे. हजारो मरत. सभोती हाडांचे ढीग!

आणि फॅन चि लियांगला तर कष्टांची सवय नाही. हातात पुस्तक खेळवणारा, तो दगडधोंडे उरापोटी उचलीत होता. तो कसा वाचणार? त्याची वेठीची मुदत संपण्याआंतच तो मरणार! आणि खरेच काम करताना एक दिवस तो पडला, मेला! कामगार हळहळले. तेथे त्या विटांतच त्यांनी त्याचीहि समाधि बांधली! त्या भिंतीतच!

आज संक्रांत होती. सुटीचा दिवस आणि ती आली. कोणाला विचारणार पत्ता? ते पहा फाटक्या कपडयांतले बिगारी. ती लाज-या धीटपणाने पुढे होऊन म्हणाली,

''एक क्षणभर थांबा मित्रांनो.''
ती थकलेली होती तरी सुंदर दिसत होती. थोरामोठयांच्या घरातील वाटली. ते थांबले.

''येथे टेकडया आणि समुद्र मिळत आहेत. येथल्या कामांत माझा पति होता. फॅन चि लियांग त्याचें नाव. कोठे आहे तो?''

तो बांधकाम करणारे गवंडी होते. ते सद्गदित झाले व म्हणाले, ''त्याच्यासाठीच आज आलो आहोत. तो कोवळा तरुण होता, सुकुमार होता. श्रमाची सवय नाही. तो मेला. त्याचे प्रेत उघडे कसे टाकायचे? आम्ही त्याला पुरले. आज सणाचा दिवस. त्याच्या समाधीला फुले वाहायला, मैत्री दाखवायला आलो आहोत.''

ते बोलत होते, तिचे डोळे निराशेने जवळ जवळ मिटत आले. प्रियजनांचा चिरवियोग यासारखे दु:ख नाही. पतिपत्नींना जोडणारे नाते प्राणमय असते. पति मेला ऐकताच तिचा तडफडणारा, विव्हळणारा आत्मा शरीर फाडून जायला लागला.

शेवटची वेदनामय वाणी मुखातून बाहेर पडत आहे, ''नाथ, नाथ!''

ती पडली!

थोडया वेळाने पुन्हा सचेत होऊन म्हणाली, ''माझा पति किती सद्वर्तनी. तो प्रवचने करी, धर्मग्रंथ सांगे. तो परत येईल म्हणून कितीजण वाट पहात आहेत तिकडे. परंतु पाण्यांत दगड बुडावा तसा तो गेला. नाही, पुन्हा दिसणार नाही! शेवटचा निरोप घेताना तो जे बोलला त्याने पाषाणहि पाझरेल. म्हणाला, 'पतिपत्नींचे अभेद्य नाते असते. दोन पक्ष्यांचा जोडा. परंतु दुर्दैव ओढवले म्हणजे त्यांनाहि विमुक्त व्हावे लागते. पतीने पुरुषार्थ मिळवावा, कधी पत्नीला सोडू नये असे मला नाही का वाटत? परंतु येथे काय इलाज? पूर्वजन्मींच्या पापांची ही शिक्षा! दैवाला कोण जिंकणार? त्या लांब भिंतीपासून पुन्हा यायचा रस्ता नाही. आपण स्वप्नातच भेटू.' नाथ, तुमची वाणी खरी ठरली अखेर. मलाहि परत जायला रस्ता नाही! मला आता घर ना दार... मी मेल्यावर माझ्या देहाचे काय होईल चिंता नको. वारा माझ्या या भग्न हाडांची धूळ जगभर फेकील.'' ते बांधकाम्ये गहिंवरले व म्हणाले, ''नका रडू, पुसा डोळे, विसावा घ्या.''

तिने डोळे पुसले. ती शांत झाली व म्हणाली, ''तुम्ही माझ्या पतीला मूठमाती दिलीत. तुमचे उपकार कसे फेडू? हृदयावर ते कोरलेले राहतील. मला ती जागा दाखवता, जेथे त्याला पुरलेत?''

''तुमच्याबरोबर आम्हीहि अश्रूंची तिलांजली द्यायला येतो चला.''

घट्ट पदर बांधून जड गांठोडे उचलून ती निघाली. हृदय फोडून अश्रूंचे पाट वहात येत होते.

ते पहा. भिंतीचे शेवटचे टोक, समुद्राला ते मिळाले आहे. खाली लाटा उसळत आहेत. आकाशाला भेटू बघत आहेत! ती म्हणाली, ''कोठे पुरलेत? दाखवा थडगे.''

ते म्हणाले, ''ही सारी सम्राटाची जागा. त्याची मालकी. येथे कोणाला कसे पुरता येईल? म्हणून येथे भिंतीच्या पायाशी त्याला पुरले. खूण म्हणून तीन हाती दगड बसवला. त्यावर त्याचे नाव खोदले. ही अमर शिळा आहे. ती बघा, ती.?''

तिने तो दगड पाहिला. वारा, पाऊस, ऊन यांना पुसून टाकता न येणारे नाव तिने पाहिले. तिची प्रेमज्वाळा पेटली, भडकली. ''नाथ, वेडया आशेने तुम्ही जिवंत भेटाल म्हणून आले. आणि आता का एकटी राहू? शून्य आकाशाकडे बघत? नाही, कधीहि नाही!''

तिचे प्रेम, तिचे पातिव्रत्य आकाशाला भेदून गेली. पातिव्रत्याची शक्ति विश्वाला हलवील. ती आपल्या पतीची हाडे मिळतात का पहात होती. आणि भिंत फाटली! दगड माती जरा दूर झाली. पतीची त्रिभुवन मोलाची हाडे मिळाली. अंमलदाराने सम्राटाला चमत्कार कळविला. सम्राटाने मेंग चियांगला प्रासादराणी करतों कळवले!

सम्राटाची आज्ञा ती धिक्कारते. ती हाडे आपल्या विश्वासू हृदयाशी धरून लांब भिंतीच्या टोकावर ती उभी राहते. खाली समुद्र उसळत असतो.

घेतली तिने उडी! डुब्!
पूर्व समुद्रात ती विलीन झाली.

आणि सम्राटाला तिच्या पातिव्रत्याची खात्री पटली. तेथे त्या भिंतीजवळ तिचे समाधिमंदीर त्याने उभारले. तिचा दिवस चीनभर पाळण्यात येऊ लागला. तिची पूजा होऊ लागली. मेंग चियांग अमर झाली!

श्री चांगदेव पासष्टी

स्वति श्रीवटेशु । जो लपोनि जगदाभासु । दावी मग ग्रासु । प्रगटला करी ॥१॥
हे श्री वटेश चांगदेवा ! तुझे कल्याण असो. स्वतः परमात्मा गुप्त राहून या जगताचा आभास दाखवितो. तो प्रकट होतो तेव्हा जगाचा भास नाहीसा करतो. ॥१॥

प्रगटे तंव न दिसे । लपे तंव तंव आभासे । प्रगट ना लपला असे । न खोमता जो ॥२॥
परमात्म्याचे स्वरूप जेव्हा दिसत नाही तेव्हा जगताची जाणीव होते. तो जेव्हा प्रकटतो तेव्हा दिसतोच असे नाही. विचारान्ती असे दिसेल की, परमेश्वर दिसतही नाही किंवा गुप्तही होत नाही. हे दोन्ही गुणधर्म त्याला स्पर्श करीत नाहीत.॥२॥

बहु जंव जंव होये । तंव तंव कांहींच न होये । कांहीं नहोनि आहे । अवघाची जो॥3॥
स्वरूपाने परमात्मा विशाल होत असतां भासमान जगत् नाहींसे होत जाते. वास्तविक परमात्म्याने काही जगाचे रूप घेतलेले नसून सगळीकडे तोच पूर्णपणे व्यापलेला आहे. ॥३॥

सोनें सोनेपणा उणें । न येतांचि झालें लेणें । तेंवि न वेंचतां जग होणें । अंगे जया ॥४॥
सुवर्णाचे दागिने घडवितात, परंतु त्यामुळे त्याच्या सोनेपणात मुळीच उणीव निर्माण होत नाही. हे जसे आहे, त्याप्रमाणे स्वतः परमात्मा विविध आकारांनी, रूपांनी नटला तरी त्याच्या मूळ परमात्मा स्वरूपात काहीही कमीपणा येत नाही. ॥४॥

कल्लोळ कंचुक । न फेडितां उघडें उदक । तेंवि जगेंसी सम्यक् । स्वरूप जो ॥५॥
पाण्यावर अनेक लाटा उठत असतात. त्यामुळे ते पाणी लाटांच्या आवरणाने झाकलें आहे असे वाटते. तरीही ते पूर्णतया पाणीच असते. हेच परमात्मा आणि जगत् यांच्या बाबतीत आहे. परब्रह्म आणि विश्व यांत काहीही फरक नाही. ॥५॥

परमाणूंचिया मांदिया । पृथ्वीषणें न वचेचि वायां । तेंवि विश्वस्फूर्ति इयां । झांकवेना जो ॥६॥
पृथ्वीवर अनेक लहान लहान कण (अणु-परमाणु) आहेत. परमाणु हे पृथ्वीच्या रूपाने आहेत म्हणून काही पृथ्वीचा पृथ्वीपणा नाहीसा होत नाही. त्याचप्रमाणे विश्वाच्या अविष्कारामुळे परमात्मा मुळीच झाकला जात नाही. ॥६॥

कळांचेनि पांघुरणे । चंद्रमा हरपों नेणें । का वन्ही दीपपणेम । आन नोहे ॥७॥
कल्पना केली की चंद्रावर त्याच्या सोळा कलांचे आच्छादन घातले आहे, तरीही चंद्राचा निश्चित लोप होत नाही. दिव्याच्या रूपाने अग्नि दिसला तरी तो अग्निच असतो. ॥७॥

म्हणोनि अविद्यानिमित्तें । दृश्य द्रष्टत्व वर्ते । तें मी नेणें आईतें । ऎसेंचि असे ॥८॥
(म्हणून म्हणतो चांगदेवा ! तुला) अज्ञानामुळे (अविद्येने) ज्ञानरूपी आत्मा हा वेगळेपणानें दृश्य आहे आणि मी द्रष्टावेगळा आहे असे भासतें. परंतु मला मात्र वेगळेपणाची जाणीव नाही.॥८॥

जेविं नाममात्र लुगडें । येर्‍हवी सूतचि तें उघडें । कां माती मृद्‌भांडें । जयापरी ॥९॥
वस्त्रापैकीं एखाद्या वस्त्राला लोक लुगडे म्हणतात. तरीहि लुगडे ज्या सुताचे विणलेले असते त्याचे सूतरूप कायमच असते. माती आणि मातीचे भांडे यांच्या बाबतीत असेच सांगता येईल. ॥९॥

तेंवी द्रष्टा दृश्य दशे । अतीत दृङ्‌मात्र जें असे । तेंचि द्रष्टादृश्यमिसें । केवळ होय ॥ १० ॥
(म्हणून म्हणतो) द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि दृश्य म्हणजे जे पाहावयाचे ते अशा दोन्हीच्याही पलीकडे परमात्मतत्त्व ज्ञानस्वरूप असें आहे. हेच द्रष्टा आणि दृश्य या प्रकारांनी अनुभवाला येते. ॥१०॥

अलंकार येणें नामें । असिजे निखिल हेमें । नाना अवयवसंभ्रमें । अवयविया जेंवी ॥ ११ ॥
अलंकाररूपाने जसे केवळ सुवर्णच असतें किंवा अनेक अवयवांच्या रूपाने अवयवीच असतो.॥११॥

तेंवी शिवोनि पृथीवरी । भासती पदार्थांचिया परी । प्रकाशे ते एकसरी । संवित्ति हे ॥ १२ ॥
ईश्वरापासून पाषाणापर्यंत नाना प्रकारे पदार्थांची प्रतीति करून देणारे एक ज्ञानच असतें, म्हणजे त्या त्या आकारानें ज्ञानच परिणाम पावलेंले असते. ॥१२॥

नाहीं तें चित्र दाविती । परि असे केवळ भिंती । प्रकाशे ते संवित्ति । जगदाकारें ॥ १३ ॥
भिंतीवर चित्रें दिसली तरी त्या चित्ररूपाने वास्तविक भिंतीचीच प्रतीति असतें, त्याप्रमाणे जगदाकाराने ज्ञानाची म्हणजे परमात्म्याचीच प्रतीति असतें. ॥१३॥

बांधयाचिया मोडी । बांधा नहोनि गुळाचि गोडी । तयापरि जगपरवडी । संवित्ति जाण ॥ १४ ॥
गुळाची ढेप केल्याने गोडीला ढेपेचा आकार येत नाही; अगर ढेप मोडल्याने गोडी मोडताही येत नाही. त्याप्रमाणे जगात अनंत प्रकारे द्वैतप्रतीती झाली तरी ती परमात्म्याचीच प्रतीति आहे, द्वैत नाहीच. ॥१४॥

घडियेचेंइ आकारें । प्रकाशिजे जेवीं अंबरें । तेंवि विश्वस्फुर्तिं स्फुरें । स्फुर्तिचि हे ॥ १५ ॥
घडीच्या आकारात ज्याप्रमाणे वस्त्र स्पष्ट व्हावें, त्याप्रमाणे परमात्माच विश्वरूपाने स्फुरत असतो. ॥१५॥

न लिंपतां सुखदुःख । येणें आकारें क्षोभोनि नावेक । होय आपणिया सन्मुख । आपणचि जो ॥ १६ ॥
अविद्येच्या निमित्ताने अविद्याकाळी क्षणमात्र दृष्टि किंवा दृश्य आकारात अनुभवाला येणारा परमात्मा त्या आकाराच्या सुखदुःखाने सुखी किंवा दुःखी होत नाही. तो स्वतःच द्रष्टा किंवा दृश्य रूपांत असतो. ॥१६॥

तया नांव दृश्याचें होणें । संवित्ति दृष्टॄत्वा आणिजे जेणें । बिंबा बिंबत्व जालेपणें । प्रतिबिंबाचेनि ॥ १७ ॥
आरशातील प्रतिबिंबामुळे बघणार्‍या तोंडाला बिंबत्व भाव येतो, या प्रकाराचे अविद्या ज्ञानरूप परमात्म्यास द्रष्टृत्व भावाला आणते. ॥१७॥

तेंवी आपणचि आपुला पोटीं। आपणया दृश्य दावित उठी । दृष्टादृश्यदर्शनत्रिपुटी । मांडें तें हे ॥ १८ ॥
असे असले तरी द्रष्टा, दृश्य इत्यादी भावांचा अनुभव परमात्म्यावर येतो. याचाच अर्थ असा की स्वतः परमात्माच द्रष्टा, दृश्य आणि दर्शन या त्रिपुटींच्या रूपाने व्यवहार करतो.॥१८॥

सुताचिये गुंजे । आंतबाहेर नाहीं दुजें । तेवी तीनपणेविण जाणिजे । त्रिपुटी हें ॥ १९ ॥
सुताच्या गुंजेमध्ये सुतावाचूने दुसरे काही नाही. त्याप्रमाणे परमात्मस्वरूपावर द्रष्टा, दृश्य, दर्शन अशा त्रिपुटींचा व्यवहार झाला तरी एका परमात्म्याच्या ठिकाणी भिन्न भिन्न भाव उत्पन्न न होता तीनपणावाचून त्रिपुटी असते. ॥१९॥

नुसधें मुख जैसें । देखिजतसें दर्पणमिसें । वायांचि देखणें ऐसें । गमों लागे ॥ २० ॥
केवळ मानेवरचे तोंड आरशाच्या उपाधीने स्वतः आपल्यासच पाहते, त्याप्रमाणे अविद्योपाधींने दृश्यद्रष्टादी भावाची प्रतीति येते असे वाटतें. ॥२०॥

तैसें न वचतां भेदा । संवित्ति गमे त्रिधा । हेचि जाणे प्रसिद्धा । उपपत्ति इया ॥ २१ ॥
वरील उदाहरणात संवित्ति (परमात्मा) त्याच्या स्वरूपात भेद न होता अविद्योपाधीने द्रष्टा, दृश्य, दर्शन असा भेद झालासा दिसतो. तत्त्वतः तो भेद नसतोच. चांगदेवा, हीच अखंड अभेदाविषयी उपपत्ती समज. ॥२१॥

दृश्याचा जो उभारा । तेंचि दृष्टत्व होये संसारा । या दोहींमाजिला अंतरा । दृष्टि पंगु होय ॥ २२ ॥
अविद्येच्या योगाने दृश्याचा होणारा आविर्भाव द्रष्टृत्वाच्या व्यवहाराला हेतु होतो. पारमार्थिक दृष्टीने द्रष्टा आणि दृश्यातील भेद पाहिल्यास विचार पांगळा होतो; म्हणजे नाहीसा होतो. ॥२२॥

दृश्य जेधवां नाहीं । तेधवां दृष्टी घेऊनि असे काई ? । आणि दृश्येंविण कांहीं । द्रष्टत्व असे? । २३ ॥
जेव्हा दृश्य नाही असे ठरते तेव्हा त्याला प्रकाशित करणारे ज्ञान कोणाला प्रकाशित करील? दृश्यापासून द्रष्टत्व कोठे दिसते का? तात्पर्य, अध्यात्मज्ञानाच्या उदयकाली द्रष्टा,दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी मावळते. ॥२३॥

म्हणोनि दृश्याचे जालेंपणें । दृष्टि द्रष्टत्व होणें । पुढती तें गेलिया जाणें । तैसेचि दोन्ही ॥ २४ ॥
दृश्य तयार झाले म्हणजे दर्शन आणि द्रष्टृत्व हीं असतात. जर विचाराने दृश्यत्वच नष्ट झाले, तर द्रष्टा आणि दृष्टी या दोहोंचाही अभाव होतो. ॥२४॥

एवं एकचि झालीं ती होती । तिन्ही गेलिया एकचि व्यक्ती । तरी तिन्ही भ्रांति । एकपण साच ॥ २५ ॥
याप्रमाणे अविद्येच्या निमित्ताने एकाच परमात्म्याची द्रष्टादर्शनादि तीन रूपे होतात. विचारजागृतीने त्या तिघांचाही नाश होतो आणि एकच परमात्मा राहतो. ॥२५॥

दर्पणाचिया आधि शेखीं । मुख असतचि असे मुखीं । माजीं दर्पण अवलोकीं । आन कांहीं होये ? ॥ २६ ॥
आरसा आणण्याच्या पूर्वी किंवा आरसा नेल्यावरही मुख जागेवर मुखपणानेच असते. पण त्यावेळी आरशात पाहताना त्याचा काही निराळेपणा होतो काय? ॥२६॥

पुढें देखिजे तेणे बगे । देखतें ऐसें गमों लागे । परी दृष्टीतें वाउगें । झकवित असे ॥ २७ ॥
आरशात आपले मुख आपणच पाहतो. दृष्टीने मूळ मुखाला द्रष्टेपणा आला असे वाटतें पण असे वाटणें म्हणजे ज्ञानाची फसवणूकच होय. ॥२७॥

म्हणोनि दृश्याचिये वेळे । दृश्यद्रष्टत्वावेगळें । वस्तुमात्र निहाळे । आपणापाशीं ॥ २८ ॥
म्हणून दृश्याच्या कालांतहि दृश्यत्व, द्रष्टत्व या धर्माहून भिन्न असणारी परमात्म वस्तु आपणच आहोत असा निश्चय कर. ॥२८॥

वाद्यजातेविण ध्वनी । काष्ठजातेविण वन्ही । तैसें विशेष ग्रासूनि । स्वयेंचि असे ॥ २९ ॥
चांगदेवा! वाद्यातून निघणार्‍या ध्वनीच्या आधी सामान्य ध्वनी हा असतोच किंवा लाकडात अनुभवायला मिळणार्‍या स्पष्ट अग्नीच्या पूर्वी सामान्य अग्नि असतोच. त्याचप्रमाणे दृश्यादि विशेष भाव नष्ट झाले तरी त्यांना आश्रयभूत ब्रह्मवस्तु असतेच. ॥२९॥

जें म्हणतां नये कांहीं । जाणो नये कैसेही । असतचि असे पाही । असणें जया ॥ ३० ॥
ज्या वस्तूचे अशी-तशी, एवढी-तेवढी, इत्यादी शव्दाने वर्णन करता येत नाही, ती ज्ञानाचा विषय होत नाही. अशी ती परमात्मवस्तु आहे. ॥३०॥

आपुलिया बुबुळा । दृष्टि असोनि अखम डोळा । तैसा आत्मज्ञानीं दुबळा । ज्ञानरूप जो ॥ ३१ ॥
सर्व दृश्य वस्तु पाहण्याची दृष्टी डोळ्याच्या ठिकाणीं आहे. पण तो स्वतःला बघण्याच्या बाबतीत आंधळाच ठरतो. कारण तो पाहणेंरूपच आहे. त्याच्या ठिकाणी पाहणेपणाचा व्यवहार होत नाही. त्याप्रमाणे परमात्मा ज्ञानरूप आहे म्हणून तो आपल्या ज्ञानाचा विषय होणे शक्य नाही. ॥३१॥

जें जाणणेंचि कीं ठाईं । नेणणें कीर नाहीं । परि जाणणें म्हणोनियांही । जाणणें कैंचें ॥ ३२ ॥
ज्या ज्ञानरूप परमात्म्याच्या जवळ अज्ञान कालत्रयी नाहीं तो स्वतः ज्ञानरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी जाणण्याचा व्यवहार कसा होणार? ॥३२॥

यालागीं मौनेंची बोलिजे । कांहीं नहोनि सर्व होईजे । नव्हतां लाहिजे । कांहीच नाहीं ॥ ३३ ॥
म्हणून केवळ मौन हेंच ज्याचे बोलणे, काही नसले तरी असणे, काही न होता लाभणे अशी सर्व गुणधर्मशून्य अशी ती परमात्मवस्तु जीव जेव्हा कोणत्याही बाधेने युक्त नसेल तेव्हा प्राप्त होईल. ॥३३॥

नाना बोधाचिये सोयरिके । साचपण जेणें एके । नाना कल्लोळमाळिके । पाणी जेंवी ॥ ३४ ॥
किंवा अनंत ज्ञानाचे व्यवहार झाले तरी त्या सर्व व्यवहारसंबंधाला सत्यत्व देणारे जे एक ज्ञान असते; जसे लाटांच्या अनंत मालिकेमध्ये पाणी एकरूपाने असते. ॥३४॥

जें देखिजतेविण । एकलें देखतेंपण । हें असो आपणिया आपण । आपणचि जें ॥ ३५ ॥
जे कोणाला दृश्य न होता, स्वरूपाने द्रष्टेपणानें एकटे असते त्या ज्ञानाचे शब्दाने कितीसें वर्णन करावें? तें अद्वितीय आहे, म्हणजे आपले नातेवाईक आपणच. ॥३५॥

जें कोणाचे नव्हतेनि असणें । जें कोणाचे नव्हतां दिसणें । कोणाचें नव्हतां भोगणें । केवळ जो ॥ ३६ ॥
परमात्मवस्तु अस्तित्वरूपच असल्यामुळे तिचे अस्तित्व अन्य दुसर्‍या कोणाच्या अस्तित्वावर अवलंबून नसते; कोणाला विषय न बनविता स्वतःच प्रकाशमान आहे आणि अन्य दुसर्‍या कोणत्याही भोग्य पदार्थावाचून स्वरूपाने आनंदस्वरूप आहे. ॥३६॥

तया पुत्र तूं वटेश्वराचा । रवा जैसा कापुराचा । चांगया मज तुज आपणयाचा । बोल ऐके ॥ ३७ ॥
चांगदेवा! ज्या परमात्म्याला वटेश्वर इत्यादि अनेक नामें आहेत; त्याचाच तू पुत्र आहेस. अरे कापराचा कण हा कापूररूपच असतो ना! तसा तू परमात्मस्वरूप आहेस. आत्म्यात आणि परमात्म्यात ऐक्य असते. तुझ्यामाझ्यात तसा ऐक्यभाव कोणत्या रीतींने आहे ते तू आता ऐक! ॥३७॥

ज्ञानदेव म्हणे । तुज माझा बोल ऐकणें । ते तळहाता तळीं मिठी देणें । जयापरि । ३८ ॥
तू परमात्मस्वरूप आहेस, मी ही तसाच परमात्मस्वरूप आहे. म्हणूनच तुझ्यात आणि माझ्यात अभेद आहे. (म्हणूनच म्हणतो) माझा उपदेश तू ऐकायचा म्हणजे तुझा स्वतःचाच उपदेश ऐकण्यासारखें नाही का? अरे (एखाद्याच्या) उजव्या हाताने त्याच्याच डाव्या हाताला मिठी घालावी तसे हे आहे. ॥३८॥

बोलेंचि बोल ऐकिजे । स्वादेंचि स्वाद चाखिजे । कां उजिवडे देखिजे । उजिडा जेंवी ॥ ३९ ॥
शब्दाने स्वतःचा शब्द ऐकावा, गोडीने स्वतःची गोडी चाखावी, उजेडाने आपल्या स्वतःचा उजेड बघावा तसे हे आहे. ॥३९॥

सोनिया वरकल सोनें जैसा । कां मुख मुखा हो आरिसा । मज तुज संवाद तैसा । चक्रपाणि ॥ ४० ॥
अथवा सोन्याची कसोटी असावी; मुख हेच आरसा म्हणून पाहण्यासाठी उपयोगी आणावे, तसे चांगदेवा! तुझ्या आणि माझ्या संवादाचे आहे. ॥४०॥

गोडिये आपुली गोडी । घेतां काय न माये तोंडी । आम्हां परस्परें आवडी । तो पाडु असे ॥ ४१ ॥
गोडीने स्वतःचा गोडवा स्वतः अनुभवायचा म्हटले तर ते शक्य आहे का? अगदी नेमका हाच प्रकार तुझ्या आणि माझ्या आनंदाबद्द्ल आहे. ॥४१॥

सखया तुझेनि उद्देशें । भेटावया जीव उल्हासे । कीं सिद्धभेटी विसकुसे । ऐशिया बिहे ॥ ४२ ॥
चांगदेवा! मोठ्या उल्हासाने तुझी भेट घ्यायला माझा जीव उत्सुक झाला आहे हे तर खरेच, पण आत्मतत्त्वाच्या दृष्टीनें स्वतःसिद्ध ही भेट उपाधिदृष्टीनें बिघडून जाईल कीं काय या भीतीनें मी शंकाकुल झालो आहे. ॥४२॥

भेवों पाहे तुझें दर्शन । तंव रूपा येनों पाहे मन । तेथें दर्शना होय अवजतन । ऐसें गमों लागे ॥ ४३ ॥
कारण तुझें दर्शन घ्यावें अशी इच्छा करताच माझें मन आत्माकार व्हायला वेळ लागत नाही आणि मग त्या स्थितीत दर्शनाची कृतीच होणे नाही असे वाटतें. ॥४३॥

कांहीं करी बोले कल्पी । कां न करी न बोले न कल्पी । ये दोन्ही तुझ्या स्वरूपीं । न घेती उमसू ॥ ४४ ॥
चांगदेवा ! तू एखादी चांगली कृति केलीस , बोललास, कल्पना केलीस किंवा असे काही नाही केलेस तरी हे काही तुझ्या मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणीं उत्पन्न होतच नाहीत. ॥४४॥

चांगया ! तुझेनि नांवे । करणें न करणें न व्हावें । हें काय म्हणों परि न धरवे । मीपण हें ॥ ४५ ॥
करणें किंवा न करणें हा व्यवहार चांगदेवा! स्वरूपाच्या ठायी होत नाही. आत्मत्वाचा उपदेश तुला करताना माझ्या आत्म्याजवळ असलेला उपाधीचा मीपणासुद्धा नाहीसा होत आहे. ॥४५॥

लवण पाणियाचा थावो । माजि रिघोनि गेलें पाहो । तंव तेंचि नाहीं मा काय घेवो । माप जळा ॥ ४६ ॥
चांगदेवा! पाण्याची खोली समजून घेण्यासाठी मिठाच्या पाण्याने बुडी मारली तर तेथे मीठ काही मिठाच्या रूपात शिल्लक राहत नाही. मग त्या पाण्याची खोली मोजायची रे कोणी ? ॥४६॥

तैसें तुज आत्मयातें पाही । देखो गेलिया मीचि नाहीं । तेथें तूं कैचा काई । कल्पावया जोगा ॥ ४७ ॥
तुझ्या यथार्थ आत्मस्वरूपाचा विचार करू लागलो की माझा औपाधिक मीपणा नाहीसा होतो; मग मीपणाच्या कल्पनेने येणार्‍या तूपणाची कल्पनातरी करता येण्याजोगी आहे काय? ॥४७॥

जो जागोनि नीद देखे । तो देखणेपणा जेंवी मुके । तेंवि तूंतें देखोनि मी थाके । कांहीं नहोनि ॥ ४८ ॥
एखादा माणूस झोप येताना ती कशी येते, निद्रा हा कसला पदार्थ आहे हे जाणून घेण्याची इच्छा करतो; पण निद्रा कोणत्याही पदार्थाच्या रूपाने त्याच्यापुढे आली नाही म्हणजे तो माणूस निद्रा जाणून घेण्याच्या भूमिकेसही मुकतो. त्याप्रमाणे ज्ञानाचा विषय नसलेल्या स्वरूपाचा मीही प्रमुख द्रष्टाच होऊन जातो. ॥४८॥

अंधाराचे ठाईं । सूर्यप्रकाश तंव नाहीं । परी मी आहें हें कांहीं । नवचेचि जेंवी ॥ ४९ ॥
दाट अंधारात बसले की तेथे सूर्याचा प्रकाश मिळायचा दूर राहतोच पण स्वतःचेही भान नाहीसें होते. ॥४९॥

तेंवि तूंतें मी गिवसी । तेथें तूंपण मीपणेंसी । उखते पडे ग्रासीं । भेटीची उरे ॥ ५० ॥
त्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा विचार करताना माझा मीपणा आणि तुझा तूपणा दोन्ही नाहीसे होऊन फक्त एक आत्मतत्त्व काय ते शिल्लक उरतें. ॥५०॥

डोळ्याचे भूमिके । डोळा चित्र होय कौतुकें । आणि तेणेंचि तो देखे । न डंडळितां ॥ ५१ ॥
बोटाने डोळा दाबला की त्याच्या जोरावर आपल्याला चित्रविचित्र पदार्थं दृष्टीसमोर भासू लागतात, पण हे दाखविणारा डोळा मात्र अनेकरूप होत नाही. आणि अनेकत्वाचा प्रकाश दाखविल्याखेरीज मात्र तो राहत नाही. ॥५१॥

तैसी उपजतां गोष्टी । न फुटतां दृष्टि । मी तूंवीण भेटी । माझी तुझी ॥ ५२ ॥
त्याप्रमाणें आत्मैक्यामध्ये अभेदपणा प्राप्त होऊन तुझा माझा अभेद मात्र मी-तू पणावाचून सिद्धच आहे. ॥५२॥

आतां मी तूं या उपाधी । ग्रासूनि भेटी नुसधी । ते भोगिली अनुवादीं । घोळघोळू ॥ ५३ ॥
मी आणि तू या उपाधीस बाजूला करून आत्म्याच्या एकत्वाने मी जशी भेट घेतली (उपभोगली) आणि तिचा ऊहापोह केला, इतका वेळ ज्या स्थितीचा अनुवाद केला तशाच रीतीने तू ही स्वतःसिद्ध भेटीचा अनुभव घ्यावास. ॥५३॥

रूपतियाचेनि मिसें । रूचितें जेविजे जैसें । कां दर्पणव्याजें दिसे । देखतें जेंवी ॥ ५४ ॥
अन्न सेवन करणार्‍याला पदार्थाचा स्वाद आवडला तर त्यातील रस जेवणार्‍याच्या रुचीला जेववू लागतो म्हणजे रुचीचा उपयोत रुची हीच घेते किंवा पाहणाराच आरशाच्या मिषाने स्वतःस बघतो. ॥५४॥

तैसी अप्रमेयें प्रमेयें भरलीं । मौनाचीं अक्षरें भली । रचोनि गोष्टी केली । मेळियेचि ॥ ५५ ॥
अप्रमेय परमात्मा विशद करणारा आणि प्रमेयांचे साधन असा जो शब्द त्याला गिळून टाकणारी अक्षरे गुंफ़ून तुझ्या माझ्यातील ऐक्याचा हा संवाद लिहिला आहे. ॥५५॥

इयेचें करुनि व्याज । तूं आपणयातें बुझ । दीप दीपपणें पाहे निज । आपुलें जैसें ॥ ५६ ॥
स्वतःच्या प्रकाशाने दिवा आपले स्वरूप उघड करतो, त्याप्रमाणे मी तुझ्या माझ्यातील एकत्वाची स्थिती लिहिली आहे. तिच्या साहाय्याने तू आपले यथार्थ आत्मस्वरूप जाणून घ्यावेस म्हणजे 'मी ब्रह्मस्वरूप आहे' अशा बोधात तू रहा. ॥५६॥

तैसी केलिया गोठी । तया उघडिजे दृष्टी । आपणिया आपण भेटी । आपणामाजी ॥ ५७ ॥
तुझा आत्मभाव स्पष्ट होईल अशा गोष्टी मी तुला सांगितल्या आहेत. त्यांच्या मदतीने तू ज्ञानदृष्टी मिळव म्हणजे आपणच आपली भेट घे. चांगदेवा! तू योगेश्वर्ययुक्त असलास तरी त्याच्या सान्निध्याने उदित होणाऱ्या 'अहं मम' ह्या अध्यायाचा त्याग करून असंग कूटस्थ आत्मा म्हणजे मीच आहे याची निश्चिती करून घे. यामुळे आपण आपणास भेटलो असे होते. ॥५७॥

जालिया प्रळयीं एकार्णव । अपार पाणियाची धांव । गिळी आपुला उगव । तैसें करी ॥ ५८ ॥
प्रलयाच्या वेळी सगळीकडे पाणीच पाणी होते; ते सर्व प्रवाहांचे उगम आणि प्रवाहसुद्धा नाहीसे करतें. त्याप्रमाणे तू करावेस. म्हणजे तू स्वगत, स्वजातीय, विजातीय, संबंधशून्य असें ब्रह्म मीच आहे या दृढ निश्चयाने देशादिकांतील अनात्मभाव नाहीसा कर. ॥५८॥

ज्ञानदेव म्हणे नामरूपें । विण तुझें साच आहे आपणपें । तें स्वानंदजीवनपे । सुखिया होई ॥ ५९ ॥
चांगदेवा! तुझा यथार्थ सच्चिदानंदात्मभाव हा नाम रूपातीत आहे. त्या स्वानंदाच्या अनुभवाने तू सुखरूप हो. ॥५९॥

चांगया पुढत पुढती । घरा आलिया ज्ञानसंपत्ति । वेद्यवेदकत्वही अतीतीं । पदीं बैसें ॥ ६० ॥
हे ब्रह्मैक्यत्वाचे ज्ञान, वेद्यवेदकत्व इत्यादी भेदांच्या पलीकडे असणारें सच्चिदानंदस्वरूप प्राप्त करून देते. त्याची तू खूणगाठ बांध असें माझे तुला वारंवार सांगणे आहे. ॥६०॥

चांगदेवा तुझेनि व्याजें । माउलिया श्रीनिवृत्तिराजे । स्वानुभव रसाळ खाजें । दिधलें लोभें ॥ ६१ ॥
चांगदेवा! तुझ्या पत्राचे उत्तर देण्याच्या मिषानें माझ्या श्रीगुरुनिवृत्तिराज माऊलीने माझ्याकडून तुला उपदेश करविला असे नाही तर मोठ्या लोभाने रसभरित आत्मानंदाचा मलाच खाऊ दिला. ॥६१॥

एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे । दोन्ही डोळस आरिसे । परस्पर पाहतां कैसें । मुकले भेदा ॥ ६२ ॥
अशा प्रकारे ज्ञानदेवांनी या पत्राद्वारे चक्रपाणी(चांगदेव )यांना ज्ञाननिष्ठ (डोळस) केल्यामुळे त्यांचे आरसे(ज्ञानदेव आणि ते स्वतः) परस्परांना पाहताना आपआपसातला भेद विसरून गेले.

तियेपरि जो इया । दर्पण करील ओंविया । तो आत्माएवढिया । मिळेल सुखा ॥ ६३ ॥
ब्रह्मात्मैक्यज्ञान प्राप्त करण्यासाठी जो कोणी आम्ही चांगदेवास केलेल्या या उपदेशाचा सतत विचार करील तो आनंदरूपच होईल. ॥६३॥

नाहीं तेंचि काय नेणों असें । दिसें तेंचि कैसें नेणों दिसे । असें तेंचि नेणों आपैसे । तें कीं होइहे ॥ ६४ ॥
आत्म्यासंबंधी तो असा आहे, तसा आहे, एवढा आहे असे काहींच सांगता येत नाही. तें सद्‌रूप प्रकाशमय, अपरिमित आनंदाने सर्वत्र ओतप्रोत असूनही अल्पबुद्धीच्या लोकांना ते कोठेही दिसत नाही हेही एक आश्चर्य नव्हे काय! ॥६४॥

निदेपरौते निदैजणें । जागृति गिळोनि जागणें । केलें तैसें जुंफणें । ज्ञानदेवो म्हणे ॥ ६५ ॥
देहामुळे उत्पन्न होणाऱ्या, निद्रेपलीकडचे निर्विकार परमात्मस्वरूप, देहविषयक विचारांचा नाश करणारी आत्मजागृती आणि त्या परमात्म्याचे एकत्व या ग्रंथांत विशद केले आहे, असे आमचे (ज्ञानेश्वर महाराजांचे) सांगणे आहे. ॥६५॥
वडील तूं बंधु असोनी अविचार । केला कां निर्धार सांग मज ॥१॥
न पुसतां कां बा आलासि धांवत । वहिनी आकांत करतील कीं ॥२॥
येरू मह्णे विठु पुरविल सामोग्री । भार तयावरी घातिलासे ॥३॥
निर्मळा म्हणे ही बरी नोहे गोष्टी । विठोबासी कष्टी करणें काज ॥४॥


 - संत निर्मळा

वाईट !

बायको : अहो, खर सांगा ना.
नवरा : काय ?
बायको : तुम्हाला कधि असं वाटलं कां, जर माझ लग्न दुसर्‍या कुणाशी झालं असत तर.........
नवरा : नाही, मी कुणा बद्दल असा वाईट विचार करत नसतो.

दोन गाढव !

लग्नाला जाताना नवरदेवाला गाढवावर न बसवता घोड्यावर बसवूनच का नेले जाते ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण दोन गाढव बघून लोक घाबरायला नकोत !

दारुचा राग

बायका दारु पिणार्‍या नवर्‍याचा इतका राग का करतात ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण त्यांचा नेहमी घाबरुन उंदरा सारखा रहाणारा नवरा दारु प्यायल्यावर वाघा सारखा वगतो !