केवळ पाण्याचा आवाज येतो आहे झुळझुळता, मंद 

घाट सोडून सारे नावाडी कधीच निघून गेले आहेत 

चला ना! आपण या चंद्राच्या नौकेतूनच तलाव पार करु!

 कुठे उधळते आहे धूळ, कुठे टोचताहेत खडे 

ठेचकाळत चालली आहे पोरवयाची हवेची झुळूक 

किती सुंदर वाटतात हे कौमार्यातले बालिश आविर्भाव! 

 रोज उठून टांगायचा चंद्र रात्री आभाळात 

रोज दिवसाच्या उजेडात रात्र होईतो वाट बघायची 

हातभर अंतर पार करण्यासाठी आयुष्यभर चालावे लागते! 

 दुसरे महायुद्ध संपूनही किती वर्षे उलटली, तरी 

अजूनही कामावर येणारे काही जपानी ऑफिसर लपतछपत भेटले – 

आपण आता कधी भेटणार? आताही तू नाराज आहेस का?

 बिछान्यावरुन ओढावी चादर ओहटणारी नदी 

तळाशी झोपलेल्या कुणाला शोधते आहे ती? 

पाण्यात बुडलेल्यांना झोपूही देत नाही सुखाने! 

 भडकलेल्या वणव्यासारखी माझ्याजवळून जातेस

 कुठल्या ज्योतीपासून उजळले आहे देवाने तुला? 

माझे घर तर काड्यामोड्यांचे, आलीस तरी काय बिघडले?

 आली समोरुन, पाहिले, बोलली दोन शब्द 

हसली सुद्धा! सारे लाघव जुन्या ओळखीखातर 

कालचा पेपर होता, उघडून पाहिला, ठेवून दिला