आयुष्याच्या खेळात रस्सीखेच चालली आहे एकाच बाजूने

 रस्सीचे दुसरे टोक माझ्या हाती दिले असते तर गोष्ट वेगळी!

 प्रतिस्पर्धी तगडा तर आहेच, शिवाय तो समोरही येत नाही! 

 लोकांची तर मेळ्यामध्ये सुद्धा चुकामूक होते 

पण भेटतातच ना कहाणीच्या एका सुंदर वळणावर?

 तसे कायमचे थोडेच कुणी दुरावते परस्परांना?

 रात्री थकल्या भागल्या रस्त्यावर एक सावली

 हलत डुलत आली, खांबावर धडकली, गतप्राण झाली

 खचित, काळोखाचीच कुणी बेवारस अवलाद असणार ती!

 मारून टाका हे विषारी डास, उठणाऱ्या आवाजांचे –

 त्यांच्या चाव्याने सूज येत राहाते 

मच्छरदाणी लावूनही जगणे अवघड झाले आहे! 

 पृथ्वी घालते आहे सूर्याभोवती प्रदक्षिणा

 आणि चंद्र फिरतो आहे पृथ्वीभोवती रात्रंदिवस

 आम्ही आहोत तिघेजण, आमचे कुटुंब आहे तिघांचे!

 गल्लीत सगळीकडे पत्रके वाटली जाताहेत

 आपली कत्तल करणारांनाच निवडून द्या!

 जवळ येऊन ठेपली आहे निवडणुकीची अवघड घटका!

  कुणी दोस्त होते माझे, असायचे सतत माझ्याबरोबर 

आले कुणी, घेऊन गेले त्यांना, पुन्हा आलेच नाहीत ते 

फळीवरुन काढलेल्या पुस्तकांची जागा पडली आहे रिती!