आमचे कार्य

अम्ही मांडू निर्भय ठाण। देऊ हो प्राण
स्वातंत्र्य-सुधेचे निजजननीला घडवू मंगलपान।। अम्ही...।।

स्वार्थाची करुनी होळी
छातीवर झेलू गोळी
करु मृत्युशि खेळीमेळी
मातृभूमिच्यासाठी मोदे करु सारे बलिदान।। अम्ही...।।

श्रीकृष्ण बोलुनी गेला
जय अखेर सत्पक्षाला
ना पराभूति सत्याला
जयजयकारा करुनी पुढती घुसु होउन बेभान।। अम्ही...।।

ही मंगल भारतभूमी
करु स्वतंत्र निश्चय आम्ही
हा निश्चय अंतर्यामी
मातृमोचना करुनी जगी तिज अर्पू पहिले स्थान।। अम्ही...।।

येतील जगातिल राष्ट्रे
वंदितील भारतमाते
करतील स्पर्श चरणाते
धन्य असा सोन्याचा वारस दाविल तो भगवान।। अम्ही...।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, मार्च १९३०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा