निरोप

(घरी फार बिकट परिस्थिती असलेल्या उत्तम पाटील या मित्रास धाडलेला हा निरोप.)

निरोप धाडू काय तुला मी बांधो गुणसुंदरा
त्वत्स्थिती रडवी मम अंतरा
असहाय तुझी दशा बघोनी मन्मन हे गहिवरे
सुटती नयनांतुन शत झरे
बघतो सत्त्व तुधे ईश्वर
त्याचा असशी तू प्रियकर
म्हणुनी येई आपदभर
कृपा प्रभुची होइ जयावर जगि सुख ना त्या नरा
घण हाणुन तो बघती हिरा

जसे जसे हे दूर करितसे धिक्कारुनी जग कुणा
घडि घडि करुनि मानखंडना
जसे जसे जगदाघात शिरी बसती निशिदिन मुला
भाजिति अंगार जसे फुला
होउनि निरहंकृति तसातसा
बनतो निर्मळ जणु आरसा
पाहिल तो प्रभुपद- सारसा
भाग्य मिळे त्या भेटायाचे जगदीशा सुंदरा
होइल मुक्त निरंजन खरा

नको घाबरु नको बावरु अभंग धीरा धरी
करुणा वितरिल तो श्रीहरी
जगात त्याच्याविण कोणाचा खरा आसरा नसे
बाकी फोल सोलपट जसे
दे तू सुकाशणु त्याच्या करी
तोची विपत्समुद्री तरी
नेइल सांभाळून बंदरी
सूत्र प्रभुकरि देइल धरुनी श्रद्धा अचलाऽमरा
नाही नाश कधी त्या नरा।।

श्रद्धा जिंकी श्रद्धा विकळवि संकटमय पर्वता
श्रद्धा अमृतधारा मृता
विपत्तिमिर संहरी चंद्रमा श्रद्धेचा सोज्वळ
श्रद्धा दुर्बल जीवा बळ
श्रद्धा असेल यन्मानसी
तो जगि होइल ना अपयशी
संजीवनीच श्रद्धा जशी
श्रद्धा धरुनी गडबडलेल्या मतिला करि तू स्थिर
होइल विपद्दशेचा चूर।।

कर्तव्याचा पंथ बिकट हा उत्साहा वाढवो
निश्चय तिळभर ना हालवो
जशी संकटे येतील तशी त्वदीय चमको प्रभा
येइल मंगल वेळा शुभा
तुज मी सहाय्य करु काय रे
पामर निर्धन मी दीन रे
झरती माझे लोचनझरे
त्वदर्थ निशिदिन आळवीन परि सखया जगदीश्वरा
जो जोडितसे उभयांतरा।।

कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, मे १९३३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा