पुष्पाप्रत

फुला, सुरम्य त्या उषेचिया सुरेख रे मुला,
विकास पावुनी अतां प्रभाव दाव मापुला;
जगांत दुष्ट दर्प जे भरून फार राहिले,
तयांस मार टाकुनी सुवासजाल आपलें

तुझ्याकडे पहावयास लागतील लोक ते,
प्रीतिचें तयांस सांग तत्त्व फार रम्य तें :---
जिथें दिसेल चारुत तिथें बसेल आवडी,
मेळवा म्हणून सत्य चारुतेस तांतडी.

तुझ्यांतल्या मधूस मक्षिकेस नेऊं दे लुदून,
स्वोपयोगबद्धतेमधून जा तधीं सुदून;
जगास सांग अल्प मी असूनिही, पराचिया
जागतों हिता स्वह्रद्यदानही करूनियां.

बालिका तुला कुणी खुडील कोमलें करें,
त्वद्वीय हास्यभंग तो तधीं घडेल काय रे !
मृत्युची घडी खुडी जधीं जगीं कृतार्थ ते
तधीं तिहीं न पोंचणं जराहि शोकपात्र ते !

वा, लतेवरीच शीघ्र शुष्कतेस जाइ रे,
रम्य दिव्य जें तयास काल तूर्ण नेइ रे;
दुःख याविशीं कशास मन्मनास होतसे ?
उदात्त कृत्य दिव्य तें क्षणीं करून जातसे.

जा परंतु मी तुला धरीन आपुल्या मनीं,
मुके त्वदीय बोल बोलवीन सर्वही जनीं;
अम्हां भ्रमिष्ट बालकांस काव्यदेवतेचिया
जीव निर्जिवांतलाहि नेमिलें पहावया !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
-पंचचामर
- १८८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा