गांवीं गेलेल्या मित्राचि खोली लागलेली पाहून --

( जलधरमाला वृत्ताच्या चालीवर )

येथें होता राहत माझा स्नेही,
स्नेह्यांसाठीं जो या लोकीं राही,
पाशांला जो तोडायाला पाही
स्वदेशपाशीं अपणा बांधुनि घेई.

पाशांविण या कोठें कांहीं नाही,
पाशांकरितां चाले अवघें कांहीं; --
पाशांतुनि या सुटतां सुंदर तारे,
तेज तयांचें विझूनि जाई सारें.

चन्द्रानें या सदैव पृथ्वीपाशीं
राहुनीच कां सेवावें सूर्याशीं ?
शक्त जरी का असेल तो, तरि त्यानें
सेवावा रवि खुशाल निजतंत्रानें

सोडी पत्नीपाशाची तो आस,
स्वदेशसेवेकरितां घाली कास,
तो मत्सख निज गांवीं गेला आहे,
खोलीला या कुलुप लटकुनि राहे.

येथें गोष्टी आम्ही करीत होतों,
होतों, विद्याभ्यासहि करीत होतों,
मित्रत्वाचें बीज पेरुणी खासें
मैत्रीवल्ली वाढविली सहवासें.

देशाविषयीं गोष्टी बोलत येथें
बसलों, विसरुनि कितीकदां निद्रेतें ;
श्वासीं अमुचे श्वास मिळाले तेव्हां.
अश्रूंमध्यें अश्रु गळाले तेव्हां.

ऐसें असतां पहांट भूपाळयांला
पक्षिमुखांहीं लागियली गायाला,
हवा चालली मंद मंद ती गार,
प्रभाप्रभावें वितळे तो अंधार;

तेव्हां आम्ही म्हटलें---’ ही र्‍हासाची
रजनी केव्हां जाइल विरूनि साची ?
स्वतंत्रतेची पहांट तो येईल,
उत्कर्षाचा दिन केव्हां सुचवील ?---

” या डोळयांनीं पहांट ती बघण्याचें
असेल का हो नशिबीं दुदैव्यांचे ?
किंवा तीतें आणायाचे कांहीं
यत्न आमुच्या होतिल काय करांहीं ?”

असो. यापरी आम्ही प्रश्न अनंत
केले, होउनि कष्टी, परस्परांत;
” इच्छा धरितां मार्ग मिळे अपणांला ”
या वचनें मग धीर दिला चित्ताला.

कोठें असशिल आतां मित्रा माझे ?--
करीत असशिल काय काय तीं काजें ?--
देशासाठीं शरीर झिजवायाला
स्फूतीं आणित असशिल का कोणाला ?

तुझी बघुनि ही मित्रा खोली बंद,
विरहाग्नीनें भाजें चेतःकंद,
पुनरपि आपण येथें भेटूं, ऐशी
आशा होई जलधारा मग त्यासी.

( शार्दूलविक्रीडित )

झाल्यानंतर अस्त तो, कमल तें पाहूनियां लागलें,
” उद्यां मित्र करील तो निजकरें येऊनि याला खुलें,”

ऐसें बोलुनि ज्यापरी भ्रमर तो जातो श्रमानें दुरी,
जातों बोलुनि या स्थलासहि तसें, मित्रा ! अतां मी घरीं.


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- मे १८८७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा