ग्रीष्म

स्वारि बाइ केवि आलि !
घर्मि अंग अंग न्हालि !
आलि गालिं बाइ लालि,
उतरिन जलकुंभ मी ! ध्रु०

तापे शिरिं अंशुमालि,
आग आग भोवतालि,
रखरखीत ह्या अकालिं
अग्निच्या जिभा झळा ! १

तरुतळिं बसुनी विवशी
रवंथ करिति गाइम्हशी,
गुपचुप हे पशुपक्षी
दडति गुहाकोटरीं. २

पक्षि एकटा सुतार
ठकठक करि बेसुमार,
सारखा करी प्रहार,
ध्वनि गभीर खोल हा ! ३

पोपट पिंजर्‍यांत शांत
चित्रसा बसे निवांत,
श्वान हलुनि नखशिखांत
धापा हें टाकितें ! ४

वाटेवर तप्त धूळ,
फिरके ना मुळिं पाउल,
गांव जणूं निद्राकुल,
सामसूम चहुंकडे ५

आगीची उठे लाट,
तप्त भिंति, तप्त वाट,
तप्त वाट, तप्त खाट,
लाहि लाहि काहिली ! ६

ओढ दासिची नितांत,
आलां या वेळिं कांत !
पाय धुतें, बसा शांत,
वारा मी घालितें ! ७


कवी - भा. रा. तांबे
जाति - अरुण
राग - सारंग
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १८ ऑक्टोबर १९३५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा