कोठें मुली जासि ?

उगवे निशाकांत झाल्या दिशा शांत
न्हालें जगत्‌ काय क्षीराब्धि फेनांत ? ||ध्रु०||

या काळवेळेस निघतात वेताळ
नाचोन खिदळोन बेताल गातात ! ||१||

बाई, शरीरास उन्मादकर वास
तो आवडे यांस येतील अंगांत ! ||२||

गुंडाळुनी काम- धंदे मुली लोक
मातींत राबोन स्वगृहा परततात. ||३||

तरुवेलिच्या खालिं हे अंगणीं अंग
टाकूनिया स्वैर रमतात निभ्रांत ! ||४||

घालोनि चटयांस हे अल्पसंतुष्ट
स्वच्छंद तंबाखु पीतात खातात. ||५||

हीं पांखरें पाहिं येतात घरट्यांस
चंचूपुटीं भक्ष्य पिल्लांस नेतात. ||६||

तूं एकली मात्र कोठें मुली जासि ?
या राक्षसी वेळिं छाया विचरतात. ||७||


कवी - भा. रा. तांबे
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - ११ नोव्हेंबर १९४१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा