तू

सहवासाची संगत तू
चांदण्यांची गंमत तू ,
रवि किरणांचा तुच तजेला
जलधारंची गंमत तू .

कधी अचानक रुसतेस
मनापासुन हसतेस तू,
साद घालते मनास
ऐसे जीवनगाणे तू,

खळखळणारा झरा तू
चंचलतेचा वारा तू,
लाट धावते ज्याच्यासाठी
कधी तो शांत किनारा तू,

निखळ मनाचे तुझे वागणे
मला प्रेमाने साद घालणे,
राग लोभ जरी आले गेले
उरले केवळ जीव लावणे,

गुण दोषांचा स्वीकार तू
माझ्यावरचा अधिकार तू,
शब्दांमद्ये आकार तू
प्रेमामध्ये  साकार तू,

प्रत्येक दिवशी आठवतात
या प्रेमाची  खुप कारणं,
सर्वात सुंदर हेच
आपलं एकमेकांच्या मनात राहणं


-किरण अदम 

तो मीच असेन ..!

आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेन ..!

माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेन ..!

कधी जर पाहशील पौर्णिमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेन ..!

कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुक मीच असेन .

-किरण अदम 

न्यायदेवता 'चोर' म्हणाली..!!

न्यायदेवता 'चोर' म्हणाली..
पब्लिक त्याला 'थोर' म्हणाली..!

धमाल 'बापू' तुझी गिधाडे..
संसद त्यांना 'मोर' म्हणाली..!

माणुसकीला बघून दुनिया..
'हे कोणाचे पोर'..म्हणाली..!

दार उघडले चोरासाठी..
अन आम्हाला 'घोर' म्हणाली..!

गझल ऐकुनी रडली दुनिया..
तीच गझल तू 'बोर' म्हणाली..!


कवी -  ज्ञानेश वाकुडकर

खंत नाही खेद नाही...........

कोण आहे शेजारी
कोण आहे आजारी
काय चालले बाजारी
मला काही माहीत नाही
ह्या कशाची खंत नाही खेद नाही...........

भावनांचा बाजार भरला
अश्रु झाले मुके सारे
वार होती किती तरी
रक्त गेले सुकुन सारे
ना रक्त्ताची जात पाहु
समर्थनाचे भाट होवु
काय मजला घेणॆ देणे
जीवाला कशाची खंत नाही खेद नाही.........

थांबला रस्यावरी
वार करणारा जरी
दार माझे बंद मी
सुरक्षित आहे आत तरी
सरकार काय झोपले
बघुन घेतील लोक सारे
किती मेले किती गेले
बघु उद्या टि.व्ही.पुढे
कशाची खंत नाही खेद नाही.........

कवियत्री - सौ .विणा बेलगांवकर

देवांनो..!

या इकडे अन माझ्यासोबत जरा बसा रे देवांनो..
ही धर्माची लफडी सोडा..जरा हसा रे देवांनो !

मंदिर-मस्जिद करता करता माणूस पागल झाला..
हृदयी त्याच्या तुम्ही एकदा जरा धसा रे देवांनो !

कुणी ओढतो रेष मधे अन..देश वेगळा होतो..
त्या रेषेचे घाव मनातून जरा पुसा रे देवांनो !

इथला सैनिक, तिथला दुश्मन.. अर्थ बदलतो सारा..
रंगासोबत न्याय बदलतो.. असा कसा रे देवांनो ?

'तो' येण्याची पुन्हा नव्याने बोंब कशाला मारू ?
सांगून सांगून थकला माझा खुळा घसा रे देवांनो !



कवी - ज्ञानेश वाकुडकर

रडू नका बापू..!

बकरी तुमची खतम केली..आम्ही कापू कापू
रडू नका बापू आता.. रडू नका बापू !

काळ आता बदलून गेला.. गणितं ही न्यारी
बापू तुम्ही समजून घ्याहो..खरी दुनियादारी !
माल दिसल्याशिवाय हल्ली..पिकत नाहीत शेते
कमिशनच्या विना बापू हसत नाहीत नेते !
गब्बर झालेत हपापाचा माल ढापू ढापू !
रडू नका बापू..आता रडू नका बापू !!

बघा बघा बापू कुठे निघाला जमाना
चरखा सोडा , पंचा सोडा..'हायटेक' व्हाना !
काहीतरी करू बापू..हुशारीने वागू
सरकारकडे तुमच्यासाठी कोळसा खदान मागू !
तुम्ही फक्त हो म्हणा..मिळून नोटा छापू..
रडू नका बापू असे..रडू नका बापू !



कवी - ज्ञानेश वाकुडकर

'पाली','मुंग्या' आणि 'आपण'..!

मेघांचे फसवे वादे.. हा फसवा फसवा वारा
हा पाऊस खोटा खोटा .. ह्या फसव्या फसव्या धारा
ही बंजर बंजर राने.. ही पंजर पंजर पाने
मातीच्या गर्भामध्ये.. पाण्याविन कुजले दाणे
सुकली धरणे, ठणठण विहिरी.. अजून फोडती टाहो
'पालींच्या' मुतण्याला मी..पाऊस म्हणावा काहो?

ही संदूक संदूक सत्ता..हे बंदूक बंदूक नेते
'द्यूत' नाही खेळलो तरीही.. 'शकुनी'च अजूनही जेते!
मग अवती भवती भिंती.. ह्या सवती सवती भिंती
एखादी तुटता तुटता .. डझनानी उगवती भिंती!
घरात भिंती, ऊरात भिंती..अंगण शाबूत राहो
पालींच्या मुतण्याला मी .. पाऊस म्हणावा काहो?

ह्या भजल्या भिजल्या 'मुंग्या'..ह्या विझल्या विझल्या 'मुंग्या'
प्रलयाच्या असल्या वेळी.. ह्या घोरत निजल्या 'मुंग्या'
ह्या टपल्या टपल्या 'पाली'..ह्या लपल्या लपल्या 'पाली'
भिंतीवर फोटो मधुनी.. ह्या आम्हीच जपल्या 'पाली'
'मुंगी' 'मुंगी' पुन्हा जागवू ..सोबत माझ्या याहो
पालींच्या मुतण्याला मी .. पाऊस म्हणावा काहो?




कवी - ज्ञानेश वाकुडकर