प्रभात पोवाडा

शूर मर्द महशूर देश दख्खनचे सरदार,

मानकरी बारगीर बाणेदार शिलेदार.

गावगावचे मिळोनि भरली मजलस भरदार,

कवन कोणते गावे करितो फिकीर शाहीर.

रूप भयंकर, सुंदर, वाग्बळ थोर जोरदार,

पुराणकाळाचे अंगावर झगे चमकदार.

पूर्वकवीश्वर तेही सादर सदरेला झाले,

सिद्धरसाची गिरा तयांची नागर वच बोले-

"विचार करणे कशास" म्हणती "कवन म्हणायाचा?

काय शिरस्ता तुम्हा न ठावा शाहिरपेशाचा?"

चिरंजीव गत शाहीरांनो ! हीच धरून शिस्त

विद्यमान शाहीरमंडळी जाते नेमस्त.

यशःप्रशस्त्या, विजयकथा, ते समरचमत्कार

वीरपुरुष पुरुषार्थ निर्मिले आपण साचार.

अजब, मातबर, अगाध याहुनि भारदस्त काही

फिरोनि ऐसे, मान्य अम्हाला की होणे नाही.

गतास वंदुनि, गफलत सोडुनि, निजमार्गे चालू

वर्तमानकाळाची बाजू आम्ही सांभाळू.

चौशतकांची दीर्घ झटापट ही चालू आहे,

महाराष्ट्रजनसागर सगळा खळबळला आहे.

हिंदूयवनशीलातिल जो जो भिन्न भाव आहे

त्या दोहोतिल उत्तमतेचा हा झगडा आहे.

भरतखंड रणाअखाडा, झुंजार मल्ल दोन्ही,

निर्वाणीची दारुण त्यांची चाले झोंबी ही.

स्वदेशजनधर्माचा जीर्णोद्धार करायाते

झुंज मातबर सभोवार ही घनचक्कर होते.

हुल्लड हल्ला दौड गराडा घाला अवचीत,

शिकस्त खाणे, दुष्मन करणे चौमुंडी चीत,

मोड पळापळ झोड, जयाची आशा हिरमोड,

फसली मसलत, अंगा आली बाजू बिनतोड,

वीर यशस्वी, वीर अपेशी, वीर रणी पडला,

सामाज नावाजितो कडाकुन या सकळीकाला.

सर योद्धे करितात लढाई कमाल शर्थीने.

पतन सोशिती त्याहुन जास्ती जबर्‍या हिमतीने.

यास्तव आम्ही हार मानितो जीतीसम थोर

रणखंदाळी कडेविकट ही गातो घनघोर.

जीव कुडीसम शाहीराची मर्दाची जोडी

एकामागे दुजा तगेना लगे प्राण सोडी.

सभाजनांनो ! असे प्रार्थना तुम्हा शाहिराची

खबरदार होऊन खबर ऐकावी दुनियेची.

नुरो पैरवी पृथ्वीवरती हिंदूंची काही

जणू मनसुबा असा करी की सालिम दुनिया ही.

चौकिपहारे उत्कर्षाच्या ठेवुन हमरस्ती

हिंदुस्थानी बंदी केली हिंदूला पुरती.

कहीकवाडा वाढुन किंवा वेठबिगारींनी

पोट भरावे दुनिया म्हणते हरदम हिंदूंनी.

विसर विसर मस्तानी दुनिये ! तुझी बात पहिली

नजरबंद हिंदूंची आता नजर खुली झाली.

हिम्मत हिकमत धमक जोम निर्धार तडफ नेट,

धाडस धोरण हुरूप अक्कल पोच अटोकाट.

स्फूर्ति कल्पना प्रताप अघटित घटनासामर्थ्ये

पूर्वी होती, आता असती बघता सत्यार्थ्ये.

समुळ बुडावा हिंदू मर्जि असेल देवाची,

राजी आम्ही. करून जाऊ करणी मर्दाची.

जनचित्ताचे समुद्रमंथन दिशा दक्षिणेने

चालविले बहु काळापासुन हिरशी चुरशीने.

’स्वतंत्रता’ शिरताजरत्‍न वर उदरांतुनि येई

चतुर मराठ्याकरी प्रबल अभिमाने ती देई.

काळ मागला शोधुन बघता दृष्टीला दिसतेः

एके वेळी एक राष्ट्रची इतरांचे नेते;

पुढिल पिढ्यांना मानवतेच्या आस-भरोशाला

एका वेळी जामिन एकच देश होत आला.

देश मराठा लोक मराठा कुल वरकड देशा

नेता जामिन आज एक हा, नाही अंदेशा.

जय अपजय या स्वातंत्र्याचे युद्धी येतो की,

म्हणाला नकळे याचा शेवट कैसा होतो की.

कोण यशस्वी युद्धे झाली मागे सर्वस्वी ?

काय जगी निर्भेळ यशस्वी सांगा आम्हासी ?

आर्यराष्ट्र कृतकार्य कधी का ते होते झाले ?

कार्य निसर्गाचे का सांगा पूर्णतेस आले ?

विजयाचेही पोटी मोठी कार्ये उद्भवती

अधिक झटापट करणे लागे ज्यांच्या सिद्ध्यर्थी.

जनचित्ताला खळबळणारे एक ध्येय काही

जगदन्तापर्यंत टिकेसे कायमचे नाही.

ग्रहगोलांच्या निर्मळ ज्योती खुल्या हवेवरती

अंतराळागर्भांतुन पोहत पृथ्वीसह जाती.

काय तयांचे रहस्यमय ते साध्य न हे कळते

अचाट सुखमय आहे ’काही ते’ निष्ठा म्हणते.

जीवितगंगा त्याच एक आनंदसमुद्राते

प्रचंड वेगे गाठायाते धूमधडक जाते.

दैव मानवा साध्य सहज ते मिळवुनिया देते,

विपरित होता हिसकुन नेते असे असेना ते.

देशकार्य मागल्या पिढ्यांचे थांबुन का पडले?

धडे मागले गडी मराठे विसरुन का गेले ?

वृद्ध शुद्ध हतबुद्ध आपले कोणी का झाले ?

रस्ते भुलले, चळू लागले मागे रेंगळले ?

सरा पुढे पिळदार मराठे गति दुसरी नाही

तरुणाविण तो कार्यभार मग कोण शिरी वाही ?

उठा उठा नरनारी ! आता रात्र होय सरती

सूर्योदयकाळाचे शाहिर ललकारी देती.

नाथोदय चिन्हिता कंचुकी गात्री तटतटली

कणोकणी वसुधाङ्गी चंचल विद्युत्‌ संचरली.

सौंदर्याचा चढतो जणु की सत्यावर उजळा

लोकनाथ तो उदया येतो, वंदू या त्याला.

महाराष्ट्रपार्वती उग्रतप आजवरी तपली

परम कृपेची पाखर तिजवर परमेश्वर घाली.

दुःस्वप्नाची निशा चेटकी ओसरून गेली

उत्कट उत्कंठेने जनता उत्साहित झाली.

महाराष्ट्रभाग्याची आता पहाट ही फुटली

दैन्यकाळिमा मराठमंडळवदनाची फिटली.

वैगुण्याच्या हिडिस ढगांनी दिग्बंधन होता

अवनति वाहुन चहोकडोनी शिगेवरुन जाता,

किरण पूर्ण तेजाचा कोणी कडकुन निकडीने

करित चुराडा त्यांचा येतो भूवर धडक्याने.

महाराष्ट्रभाग्याची आता पहाट ही फुटली

दैन्यकाळिमा मराठमंडळवदनाची फिटली.

वैगुण्याच्या हिडिस ढगांनी दिग्बंधन होता

अवनति वाहुन चहोकडोनी शिगेवरुन जाता,

किरण पूर्ण तेजाचा कोणी कडकुन निकडीने

करित चुराडा त्यांचा येतो भूवर धडाक्याने.

महाराष्ट्रभूमंडन कंकण बांधुन विजयाचे

राय शिवाजी आला; वंदू चला चरण त्याचे !

स्थापायाला स्वराज्य दंडायाला मत्ताला

मदत करी तुळजा; हा राजा अवतारी झाला.

डाव मांडिला पांची प्राणा लावुन पैजेला

कोण जिवाचे साथी ? या ते साहस कर्माला.

स्थैर्याचे धैर्याचे क्षत्रिय वृत्तीचे असती

वाण सतीच त्यांनी घ्यावे हे उचलुन हाती.

पुरुषार्थाची एक सिद्धि की सर्वस्वी घात

साहसात या शिवरायाची तुमच्यावर भिस्त.

अमर्याद सत्ताबळ अगणित दळबळ शत्रूला

रणोन्माद उद्दाम जिद्द बेहोष करी त्याला.
विक्रमसागर त्याचा बुडवी उत्तर देशाला

लोट तयाचे धडका देती दक्षिण दाराला.

थोप थांबवायाला ती सह्याद्रि पुढे सरला

प्रचंड तो गिरिराज खरा पण आला टेकीला.

करुन चढाई फौजा आल्या भिडल्या दाराला

गड किल्ले कापती साहता त्यांच्या मार्‍याला.

महाराष्ट्रधर्माचे आहे क्षात्रकर्म बीज

'आब आज जाताहे' राखा भाई हो ! लाज.

शत्रुसंघ पाहता दाट बेछूट शूर होती

शिरा शिरा ताठती, अचाट स्फुरणे संचरती.

समरशूर गर्दीत एक बेधडक भिडुन मिसळे

शत्रुभार संहारकर्म विक्राळ परम चाले.

तुच्छ तनुब्रह्माण्ड चंड संग्रामकैफ चढतो

प्रशंसिता तुंबळ त्वेष लंगडा शब्द पडतो.

डंक्यावरती टिपरी पडली; हुकुम जमायाचा.

चला मराठे चला ! वख्त हा आणीबाणीचा.

हेटकरी मावळे, देशमु, पांडे रणबहिरी,

दरकदार, रामोशि, धारकरि सराईत भारी;

एक एक हंबीर वीर हा वर्णवे न काही

जय करण्याची चिंता अंबा जगदंबा वाही.

स्वधर्मकाव्यज्योति अखंडित तुम्हामुळे जळती,

राख तयांची होती सुरता तुमच्या जर नसती.

प्रबळ शत्रु खेटता तेज ये मुळचे प्रगटोनी

चला दाखवा तया मराठी भाल्याचे पाणी.

धर्मशिळेवर पाय ठेविला तो मागे घेणे

पूर्वजास ते उणे, आपुले हसु होइल तेणे.

पहा पहा ते पितर आपले काय बरे म्हणती-

"आभाळातुन पडला का हो ! तुम्ही धरेवरती ?

"भरीव छात वळीव भुज हे दिले तुम्हा आम्ही

"स्वोदपूर्तीकरिता केवळ आणु नका कामी.

"डोळे वाणी अमुची बघते वदते त्यात तुम्ही

"जीवलतेची नवती अमुची फुलली, तेच तुम्ही.

"स्वप्नाजागरी पडछायेसम आम्ही सांगाते

"करित मोकळे आहो तुमचे विजयाचे रस्ते."

काल बदलला, ध्येय बदलले, पूर्वपुण्य फळले;

अभिनवभारत जन हो ! आता जन्माला आले.

चित्र मागले तुम्हापुढे मी एक उभे केले

ओळख तुमची पटते का हो वदा त्यात पहिले.

चढती दौलत, बढता होवो वेल मराठ्यांचा

जय मराठे ! जय मराठे ! जय बोलो त्यांचा !

नव्या उमेदी, नवे जिव्हाळे, नव्या मराठ्यांचे

नवे भरोसे, नवे कवन हे नव्या उमाळ्याचे


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

क्षणभर

काटेरी वेलीचे जाळे

रठ्ठ चर्म, गाठांनी भरले;

अग्रावर पण निर्मळ ढवळे

होते एकच कुसुम विकसले !

कृष्ण निशा; अंबोधर घोर

ग्रसित करी गगनश्री सुंदर;

परंतु होती एक शिरावर

प्रसन्न तारा नयनमनोहर !

ते-ती असता एकएकटी

सुसह होय ती भयाण सृष्टि;

स्वर्गतिनिरयगतिप्रत्यय दे

जी एका समयावच्छेदे.

नित्य निराशेचे अवडंबर

जीर्णाशेचे जाल निरंतर,

करूनि तुज मन्मनी पुरःसर

व्यथित जिवा सुख देती क्षणभर !काटेरी वेलीचे जाळे

रठ्ठ चर्म, गाठांनी भरले;

अग्रावर पण निर्मळ ढवळे

होते एकच कुसुम विकसले !

कृष्ण निशा; अंबोधर घोर

ग्रसित करी गगनश्री सुंदर;

परंतु होती एक शिरावर

प्रसन्न तारा नयनमनोहर !

ते-ती असता एकएकटी

सुसह होय ती भयाण सृष्टि;

स्वर्गतिनिरयगतिप्रत्यय दे

जी एका समयावच्छेदे.

नित्य निराशेचे अवडंबर

जीर्णाशेचे जाल निरंतर,

करूनि तुज मन्मनी पुरःसर

व्यथित जिवा सुख देती क्षणभर !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

काव्यानंद

दैत्यांनो ! न समुद्रमंथन, वृथा येथे बाळाची कथा

येथे वायुसुता ! हतप्रभ तुझी उड्डाणदर्पप्रथा.

होते अक्षमवेग यद्यपि जगच्चक्षो ! तुझे दर्शन

वाया केवळ वादपाटव न हे वाचस्पते ! वाग्रण.

येथे अद्‌भुतरम्य नित्य पडले स्फूर्तिप्रभेचे कडे,

अम्लान प्रतिभा-कळ्या उमलल्या आहेत चोहीकडे.

वोसंडे दुथडी भरूनि सरिता संकल्पना पावन

वृत्तींची रसलीन चंचळ खराश्रेणी करी क्रीडन.

सारीही जड इंद्रिये न शकती येथे प्रवेशावया

बुद्धिग्राह्य न वाव त्यास, न कळे ठाव प्रमाणत्रया.

वृत्त्यन्तर्गत टाकणे कठिणता, तद्रूपता पावणे,

काव्यानंदरसप्रसंग मग निस्संग संभोगणे !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

बंडवाला

"शोभिवंत भीवरातीर गंभीर नीर वाहते

अफाटचि हिरवट वन भोवते !

"फुले भरुनि ओचले गुंफुनी स्वकरे त्यांचे सर

पुजावा वाटे गौरीहर."

आलापित घाला हे होती मंजुल गीतस्वर

गडाच्या बसोनि टोकावर.

"प्रफुल्ल ते भीवरातीर गंभीर नीर वाहते

अफाटचि हिरवट वन भोवते !

"राज्ञीपद सुखभोग सोहळे नको; डोहळे मनी-

सख्याच्या संगे वसणे वनी"

नगर गोपुरे सोडुनि सारे म्हणसी येइन वनी

अगोदर विचार कर साजणी

दर्‍या आणि दरकुटीत आम्ही क्रमितो दिनयामिनी

यातले मर्म समज कामिनी.

वनविहरण मग मनोहारिणी ! करणे वदलो तरी

गातसे तेच गीत सुंदरी.

"प्रफुल्ल ते भीवरातीर गंभीर नीर वाहते

अफाटचि हिरवट वन भोवते !

"राज्ञीपद सुखभोग सोहळे नको; डोहळे मनी-

सख्याच्या संगे वसणे वनी."

"वारु पंचकल्याणी अबलख, करी शिंग ह्या खुणा

दाविती उघड करुनि आपणा.

"नृपमृगयावनरक्षक आपण स्वामिभक्त 'बनकरी'

दिसोनी ये हे वरच्यावरी !"

बाले ! बनकर शिंग मजेने वाजे आरुणागमी

आमुचे घोर निशेच्या तमी.

तरिहि सखी गातसे. "तीर गंभीर नीर वाहते

अफाटचि हिरवट वन भोवते !

"राज्ञीपद सुखभोग सोहळे नको; डोहळे मनी-

सख्याच्या संगे बसणे वनी"

"फुले भरुनि ओचले गुंफुनी स्वकरे त्यांचे सर

पुजावा वाटे गौरीहर."

"अंगि ऐट; चमकती हत्यारे; रक्त करी रंवरंव

भेरिचे झडता भैरव रव.

"नित्य असे पाहते; वाटते शिलेदार फाकडे

असावे खास हुजुरचे गडे."

रणभेरी कर्ण्याचा आता नाद न कर्णी पडे

किर्रती रात्रींचे वनकिडे;

संकेतध्वनि तो परिसुनि सरसावुनि भाले करी

सज्ज मन्मित्र होति झडकरी.

खरे, रम्य भीवरातीर ते ! खळखळ जळ वाहते !

खरे ते प्रमोदवन भोवते !

मम स्वामिनी होउनि अपुले जीवित मज अर्पिणे

कर्म हे अति साहस साजणे !

मत्त यवनकिंकरत्व-चिन्ही रति तव, मज संप्रती

शहाचा गुन्हेगार बोलती.

नाव गाव ठाव न मुळि आम्हा, घडीचा न भरवसा

कळेना अंतहि होइल कसा;

यास्तव अमुचा सुभगसुन्दरी ! संग न श्रेयस्कर

आम्हाहुनि पिशाच बरवा वर !

विकटविपिनवाटिकेनिकट विस्तृतविटपांच्या तळी

मंडळी मिळते टोळीतली;

होतो मागे कोण तदा ते आता आहो कसे

फिकीर न याची आम्हा असे !

"प्रफुल्ल भिवरातीर, तरीहि, गंभीर नीर वाहते

अफाटचि हिरवट-वन भोवते !

"राज्ञीपद सुखभोग सोहळे नको; डोहळे मनी

सख्याच्या संगे बसणे वनी."


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

बकुल

जीवाचे पहिलेच फूल फुलले दे, मीहि ते घेतले.

स्वच्छंदे दिन दोनचार मग ती तत्संगमी रंगले.

रूपोन्मादभरागमे मज गमे सौम्दर्यलोकेश्वरी-

मी, माझा सहजाधिकार सुमनस्व्कार हा यापरी !

येताहो करभार घेउनि पुढे अन्य द्रुमांचा थवा.

चाकाटे मम चित्तवृत्ति बघुनि तो थाट त्यांचा नवा !

प्रारंभीच निशा वनात अपुला अंधार पाडीतसे,

हातीचे बकुलप्रसून गळले, केव्हा कळेना कसे !

सूर्याच्या प्रखर प्रभेत न मुळी नक्षत्र नेत्रा दिसे.

जाणे चित्त परंतु नित्य गगनी अस्तित्व त्याचे असे.

चेतोगर्भनभात नित्य तळपे नक्षत्र माझे तसे;

ते माते अथवा तयास विसरे मी- हे घडावे कसे ?

श्वासे देह करी प्रफुल्लित जरी संसर्ग याचा घडे,

चित्ता छंद जडे, अनावर मिठी प्राणास याची पडे,

स्फूर्तीच्या उठती अखंड लहरी याच्याच जीवातुन;

ठावे काय मला स्वभावचि असे याचा असा दारुण

पाहू वाट किती? 'क्षमस्व' म्हणते ! लाचार माझी स्थिति !

नेत्री प्राण उरे, कसूनि बघणे आता परीक्षा किती ?

नारीधर्मरहस्यभाग नव्हता ठाऊक माते जसा

नारीचा ह्रदयस्थभाव कळला नाही तुलाही तसा !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

बुलबुल

निबिड तिमिर वर नभी संचरे

तळी उष्ण निश्वसती वारे,

सरणांचे भोवती निखारे,

स्थली या देख- एकटाच पिंपळ एक

चिरव्यथित तरुजीवज्योति

खिन्न तेज वितरिते सभोती,

जीर्ण विरल तत्‌पर्णावरती

दुःख निर्वाण-उमटवी ठसा निज पूर्ण !

उपेक्षिलेली पहिली प्रीति

रम्योदास तसे एकान्ती

एकस्थल या रौद्र प्रान्ती

तरीहि आहे-दरवळूनि परिमळ वाहे.

पांडुर मृदु लावण्यद्युतिजल

स्थलपरिसर करि ढाळुनि निर्मळ

जातिलता कुणि एकच केवळ

अदय नियतीने-लाविली तिथे स्वकराने

देह तिचा कृश फिकट पांढरा

पाहुनि होई जीव घाबरा,

वाटे सुटता उडविल वारा

पर्णसंभारा-वर भिरभिर सैरावैरा.

लागो वारा पाउस पाणी,

कुणी धृष्टकर टाको चुरडुनि,

तरि वरि भर ये वोसंडोनी

विकासश्रीला-ती अखंड मंडित बाला.

करुणामय स्वर्ललना कोणी

दिव्याश्रूंचे शिंपुनि पाणी

खचित करी संगोपन जपुनी

असे चित्ताला-वाटते बघुन वेलीला.

मृदुल धवल नव कुसुमशालिनी

व्रतस्थेस जरि बघतिल नयनी

सहजोद्‌गारे वदतिल रमणी-

"अगाइग, नवल- ही जाई नच येथील !

"वसंत न करी चैत्रशिंपणे,

"डोलत रविकर न करी येणे,

"झुरे न अंतरि तरिही तेणे

"अगाइग, नवल- ही जाई न या महिवरिल !

"साहुनि राहे कडक हिवाळा

"कुंजाचा आधार न इजला

"तरी भोगकल्लोळ सोहळा

"फुलांचा भोगी- ही जाई नवल जोगी !"

आश्चर्य एक की कुणि अलबेला

पक्षी पडता नच दृष्टीला

येई तत्सन्निध रात्र्ला

प्रेमघायाळ-भटकोनि रानोमाळ !

चाले त्याचा दीर्घ निशेभर

गूढ भावमय मृदु गीतस्वर

जणु निर्जर वीणाझंकार

की बुलबुल बोले-वनराई मोहुनि डोले !

ह्रदयि खवळला शोकसागर

कंठातुनि तरि निघती सुस्वर

येती ऐकुनि होती ते नर

स्वच्छंदी फंदी - नादाच्या ब्रह्मानंदी !

पक्षी आपण, प्रीती केली

भासे त्यांना वाया गेली

नयनाश्रू ओघळती खाली

चाखिती धुंद-दुःखाचा परमानंद !

उदास रजनी नच संपावी,

जागर दुःखे ही सोसावी,

चित्त तयांचे असेचि भावी

विलक्षण भारी-विरुताची जादूगारी

दिशा फाकती, तेज उगवते,

प्रभात होते, गीत थांबते;

त्यासरसे ते दृश्य वितळते

तेजबंबाळी-रम्याची होते होळी !

उत्कटतेने ह्रदय फोडिती

ते स्वैर स्वर रूपा येती;

कोणी म्हणती त्यात उमटती

स्पष्ट साचार-रमणीचे नामोच्चार !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

एक संवाद

चिमुकल्याच चांदण्या चमकती स्फूर्तिकणाच्या परी-

'होती लुप्त अनन्तोदरी !'

वर्षाकाली जलमय भूतल निर्झरगण तो करी-

'राहे धूळ निदाघी खरी !'

बालतृणांकुर वेलबुटीची शाल महीची करी-

'विटते निमिषाच्या अवसरी !'

नाजुक फुल जाईचे भारी वासे भुवना भरी-

'एका श्वासे सुकते परी !'

सौंदर्याची मूस ओतली नार अशी साजरी-

'होतो रंग फिका लौकरी !'

नवकाव्ये कवि करिती, असती मोत्यांच्या जणु सरी-

'पाणी क्षणिकचि त्यांचे परी !'

सख्या खोडिसी मला असे का? सान चांदण्याविना

निशेची काही कर कल्पना.

बालासम हे स्वैर नाचरे ओढे नसते तरी

होती रुक्ष मही मग पुरी !

कोमल मधुरोज्ज्वल भावांची खाण न जरि सुंदरा

जिणे मग दुःसह होते नरा !

नभाएवढा भानु एकटा पृथ्वीभर की तळे

कल्पिता कल्पनाच मावळे !

चंद्र एकटा रम्य; वेष्टिता असंख्य तारांगणी,

शोभा होते का रे उणी ?

स्तुतिनिंदेची अभ्रे येती सामान्याच्या वर,

सत्कवि दोहींच्याही पर.

क्षणभर अमुचे जीवित म्हणशी, असोचि ते क्षणभरी

चमकुनि जाऊ 'कोठे तरी.'

भाग पाडुनि तोल जाता काळाचे एकदा,

गोंधळ संपेना मग कदा !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ