बकुल

जीवाचे पहिलेच फूल फुलले दे, मीहि ते घेतले.

स्वच्छंदे दिन दोनचार मग ती तत्संगमी रंगले.

रूपोन्मादभरागमे मज गमे सौम्दर्यलोकेश्वरी-

मी, माझा सहजाधिकार सुमनस्व्कार हा यापरी !

येताहो करभार घेउनि पुढे अन्य द्रुमांचा थवा.

चाकाटे मम चित्तवृत्ति बघुनि तो थाट त्यांचा नवा !

प्रारंभीच निशा वनात अपुला अंधार पाडीतसे,

हातीचे बकुलप्रसून गळले, केव्हा कळेना कसे !

सूर्याच्या प्रखर प्रभेत न मुळी नक्षत्र नेत्रा दिसे.

जाणे चित्त परंतु नित्य गगनी अस्तित्व त्याचे असे.

चेतोगर्भनभात नित्य तळपे नक्षत्र माझे तसे;

ते माते अथवा तयास विसरे मी- हे घडावे कसे ?

श्वासे देह करी प्रफुल्लित जरी संसर्ग याचा घडे,

चित्ता छंद जडे, अनावर मिठी प्राणास याची पडे,

स्फूर्तीच्या उठती अखंड लहरी याच्याच जीवातुन;

ठावे काय मला स्वभावचि असे याचा असा दारुण

पाहू वाट किती? 'क्षमस्व' म्हणते ! लाचार माझी स्थिति !

नेत्री प्राण उरे, कसूनि बघणे आता परीक्षा किती ?

नारीधर्मरहस्यभाग नव्हता ठाऊक माते जसा

नारीचा ह्रदयस्थभाव कळला नाही तुलाही तसा !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा