तू देशी न तुझे

तू देशी न तुझे, कशास मग मी द्यावे तुला आपले

दे माझे परतोनि चित्त मज जे ठायी तुझ्या गुंतले.

छे ! ते ठेव तसेच. नाहक नको तो शीण का की, हटे

माझे चोरुनि चित्त नेतिल पुन्हा डोळे तुझे चोरटे.

एका संकुचितान्तरी उगिच का चित्तद्वया दाटणी

दोघांना मिळणी जरी न घडते एकान्त एकासनी ?

कोठे ते सदयत्व सांग, ह्रदये फोडोनिया, आपणा

ठेवाया सजलीस दूर जरि तू स्नेहानुबंधाविना ?

वाटे प्रीति मला महा बिकट ही कूट स्वरूपे असे.

ती निर्धार मनास एकहि धरू देना. करावे कसे ?

भासे, आकळिले रहस्य सगळे प्रेयप्रमेयातले

तो तो चंचल होउनी मन पुनः शंकेमुळे गोंधळे.

चिन्ते, यास्तव जा त्यजून मज, तू खेदाहि जा, या क्षणी.

नाना व्यर्थ करूनि तर्क तुमच्या संगे झुरावे कुणी ?

माझे लंपट चित्त- तेवि सखिचे माझ्या ठिकाणी-असे

ऐसे भावुनि वाट पाहिन तिची निःशंक मी मानसे.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

विचारतरंग

नीलप्रभ निर्मल गगनी विशुद्ध वाहे सुरतटिनी

पारावारि समवटुनी रमती विबुधरमणरमणी.

चंद्र सुधामय पुष्करिणी गगनाला शोभा आणी

दीप्तींची लेवुनि दुकुले तारांगण तेथे जमले.

क्षुब्धार्णव जल मग्नाला दाखविती हे मार्गाला

भोगाचा कर्तव्याचा मेळ मनोहर हा साचा !

वाटे, तारा होवोनी विचारावे अवघ्या भुवनी

धरणीच्या ह्रदयावरती ठेउनि कर हसवावी ती !

विहंगमोत्तम की व्हावे आकाशी वरवर जावे !

नूतन नूतन प्राम्ताते आक्रमुनी जावे वरते.

उदयगिरीच्या पलीकडे बालरवीचा किरण पडे

प्रथम करुनि त्याला प्रणती शुभवार्ता कळवू जगती-

"घोर निशा संपुन गेली ! मंगल वेळ जवळ आली !

खंत सोडुनी कामाला लागा, रवि उदया आला

हताश जे झाले स्वजन चैतन्याचे संचरण

करणे त्यांच्या देहात भाग्य हे थोड्यांना प्राप्त !

सोप्या सोप्या शब्दांनी, स्फुर्तिसूत्राने गुंफोनी,

मंजुळ मंजुळशी गाणी रचुनी रसिकान्तःकरणी

हळू शिरावे चोरोनी जावे मीपण लोपोनी,

हौस मनी ही असे परी टीका तीते विफल करी !

अंतःकरणपटावर ती आत्यंतिक वेगे उठती

दिव्य लेख उन्मेषाचे धरावया ते स्मृति काचे.

बुद्धीच्या भिंगावरती बिंबित ज्या प्रतिमा होती

शब्दचित्र त्यांचे कसले नकळे काढिल मन दुबळे

सरस्वती कंठा भरण वाचुनि हे वरचे कवन

गद्गद वदला हासोन धन्य कवी ! कविता धन्य

शब्दचमत्कृति यात नसे, गांभीर्याचा लेश नसे,

सत्याचाही गंध नसे हनुमंताचे पुच्छ जसे !"

वानर होता नर झाला ग्रहण लागले ग्रहगोला

धूमकेतु गगनि आला विषय असे घ्या कवनाला.

सिद्धान्त घेउनि शास्त्रांचे करा कथन त्या सत्यांचे

पुरे पुरे कल्पना पुरे काळ मागला आज सरे.

थांबा थांबा रसिकवरा ! गदारोळ हा पुरे करा !

प्राण कल्पना काव्याला न कळे हे मतिमंदाला

एक न धड भाराभर ती चिंध्यांची खोगिरभरती

तुटपुंज्या ज्ञाने फुगती रसज्ञ अपणाला म्हणती.

पंडितपन ते रसिकपण बहुधा असती ही भिन्न

दोहोंचा अन्वय एकी सांप्रत दुर्मिळ ह्या लोकी !

महाराष्ट्र कवि परंपरा खंड न पडला तिला जरा

उणीव रसिकांचीच परी आज भासते खरोखरी.

भौतिक शास्त्री या काव्यी कल्पनाच वैभव मिरवी

अभेद मज दोहोत दिसे कोण शहाणे, कोण पिसे ?

जे जे विश्वी ज्ञेय असे त्यात कल्पना मात्र वसे

करा कल्पना वजा बरे म्हणजे बाकी शून्य उरे

संगम ह्रदयंगम साचा मृणाल अलि या युगुलाचा

अथवा सज्जन रसिकाचा सहजमनोहर कवितेचा !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

अनुकार

दोष कुणाला ? एकदा निखालस बोल.

भूभृत्कटकावृतवनखंडी,

कटु वाग्‌जल्पनतांडव मांडी,

प्रतिध्वनिप्रति परिसुनि सांडी,

निज भानाला. एकदा निखालस बोला.

अंतर्वीणातंतुततींना

कठोर हस्ते करी ताडना,

कर्कश रव कर्णी पडताना

येत रळीला. एकदा निखालस बोला

निःस्वार्थी सारस्वत तीर्था

पंक त्यावरी फेकी जाता,

कोणी या स्वैरास वारिता

निंदी त्याला. एकदा निखालस बोला.

प्रकृति-सद्‌भिरुचीचे युग्म

आहे प्राक्तन संस्कारासम.

विसरुनि तद्वैचित्र्य मनोरम

कोपा आला. एकदा निखालस बोला.

व्यासोच्छिष्ट जरी जग सारे

का झाले होतात पसारे ?

उष्ट्या जगती जन्म हरे ! रे !

का सर्वाला ! एकदा निखालस बोला.

विश्वविभूषण पुष्प हवे ना ?

दुखवुनि लघुगुरु तरुलतिकांआ

न मिळे ! आता पुरे विघटना.

जीव तान्हेला ! एकदा निखालस बोला.

अमोघ बळ शब्दांचे पाही,

आत साठवी अनन्तासही

शब्दे शब्द कसा मग जाई

हा हारीला ? एकदा निखालस बोला.

अंधार नगरचा उलटा न्याय,

अदंड्य दंडा भाजन होय;

पय घटिका परी, घड्याळ, हाय !

खाई टोला. एकदा निखालस बोला.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

नागेश

स्वैरालापमनोज्ञभावनिवहा तारस्वरे क्षेपुनी,

टाकी त्या मधुरे निनादनिकरे दिक्प्रांत संव्यापुनी,

तो प्रेमाकुल कोकिल स्वरमणीसाठीच ह्या रंजना

आरंभी यदि, काय ते न करिते सानंद अन्या जना ?

का होतोस विषण्ण काव्यविटपाग्रारूढ हे कोकिला ?

लागावा तुज वामने वद कसा पाषाण जो फेकिला ?

पादाघात- सरागवीक्षण - सुहास्यालिंगन -प्रोक्षणी

आहे वाग्वधुने सुमान्वित तुझा उद्यान केला क्षणी.

माते रानवटास ये न विविधालंकारनामावलि

गुंजा-कांचन-काचर‍त्‍न-निचये हो वा न हो वाकली

व्यापारी जन आदरोत असली लेणी; मदीयांतरी

आहे ती रुचिरा निसर्गमधुरा नागेशवागीश्वरी !

आहे भुषणहीन वाग्वधु तुझी ना व्यंजना का मुळी ?

हे आश्चर्य ! वधू विरक्त न कधी म्या ऐकिली पाहिली !

मुग्धा शास्त्र विदग्धधींस न पुसे, ते पूज्य हे तो खरे

व्हावी ही गुरुमंडळी पण- ? पुढे बोलू कशाला पुरे !

टीकाकारमतानुसार रचना जाता करू सत्वर

रम्योद्यान उजाड रान अवघे होईल, शंका नको !

व्हावा नष्ट ’विशेष’ इष्ट न मुळी वैचित्र्य याच्यामुळे

त्यांना काय रुचे मला न बहुधा त्यांचे न त्यांना कळे !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

चांदणी

चकाके ’चुनी’ मुदीवरची, चांदणी तसलिच नवलाची !

साज नव तेजाचा करुनी लखाके किति कोमल किरणी

तिचे ते उदित तेज पिउनी जनवन गेले वहकोनी !

प्रौढपण निज निपत त्यजुनि बनली पोरच जणु धरणी !

गिरि गंभीरपणा त्यजुनी पाहतो शिर वरवर करुनी.

नेत्रपुट तृण झटपट मिटुनि खिळले चुळबुळ विसरोनी.

खगगण शब्दविषय फितुनी गेले ठायिच विरघळुनी !

जटिल वनदेव बावचळुनी भ्रमे वनि शमदम गमवोनी !

कुठे तो स्वर्ग, कुठे धरणी ! चांदणी त्यांची नच कोणी !

मग ही ह्रदयंगम करणी काय ये ’निष्कारण’ घडुनी ?

कर्कश शुष्क तर्कनिपुण प्राज्ञवर पंडित परिपूर्ण

मात्र हे विशाळ ’मणिगोटे’ भिजले नच सद्रसलोटे !

नजर न त्यांचेवर ठरते, उरावर जड दडपण पडते.

गहन विद्वत्ता परितापे प्राकृत जग थरथर कापे !

सुंदर मंजुळ मधु मृदुल भूतिबलमुदमंगल-मूल

भावमय सत्‌चित जग असले, त्यास हे प्रज्ञाघन मुकले.

चमक गे तारे ! तू गगनि आपुल्या शीतळ किरणांनी

शान्त सम शुद्ध तुझे तेज, रुक्ष जीवन रंगवि सहज.

खाच निज ह्रदय साच करुनी गाडिला जगदीश्वर ज्यांनी,

तुज ते ’अल्पतेज’ म्हणती, क्षुद्रपण उघडे निज करिती !

उंच अति-मनुजशिरावरती असे तव सतत सहज वसती.

तेज-अभिषिक्त ज्यांस करिते, तयांचे स्वय्म समर्थन ते

प्रौढपण मज निज विसरू दे, दिव्य तव तेज तेजी मिसळू दे;

शुद्ध अद्‌भुतरस उसळू दे, जगज्जीवन जगि कवळू दे.

काव्यगगनांगणगत नवल ’बालकवि’ तारा अति विमल.

हाहि सरसोज्ज्वल कविताही जीव मम बुडवी सुखडोही !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

प्रभात पोवाडा

शूर मर्द महशूर देश दख्खनचे सरदार,

मानकरी बारगीर बाणेदार शिलेदार.

गावगावचे मिळोनि भरली मजलस भरदार,

कवन कोणते गावे करितो फिकीर शाहीर.

रूप भयंकर, सुंदर, वाग्बळ थोर जोरदार,

पुराणकाळाचे अंगावर झगे चमकदार.

पूर्वकवीश्वर तेही सादर सदरेला झाले,

सिद्धरसाची गिरा तयांची नागर वच बोले-

"विचार करणे कशास" म्हणती "कवन म्हणायाचा?

काय शिरस्ता तुम्हा न ठावा शाहिरपेशाचा?"

चिरंजीव गत शाहीरांनो ! हीच धरून शिस्त

विद्यमान शाहीरमंडळी जाते नेमस्त.

यशःप्रशस्त्या, विजयकथा, ते समरचमत्कार

वीरपुरुष पुरुषार्थ निर्मिले आपण साचार.

अजब, मातबर, अगाध याहुनि भारदस्त काही

फिरोनि ऐसे, मान्य अम्हाला की होणे नाही.

गतास वंदुनि, गफलत सोडुनि, निजमार्गे चालू

वर्तमानकाळाची बाजू आम्ही सांभाळू.

चौशतकांची दीर्घ झटापट ही चालू आहे,

महाराष्ट्रजनसागर सगळा खळबळला आहे.

हिंदूयवनशीलातिल जो जो भिन्न भाव आहे

त्या दोहोतिल उत्तमतेचा हा झगडा आहे.

भरतखंड रणाअखाडा, झुंजार मल्ल दोन्ही,

निर्वाणीची दारुण त्यांची चाले झोंबी ही.

स्वदेशजनधर्माचा जीर्णोद्धार करायाते

झुंज मातबर सभोवार ही घनचक्कर होते.

हुल्लड हल्ला दौड गराडा घाला अवचीत,

शिकस्त खाणे, दुष्मन करणे चौमुंडी चीत,

मोड पळापळ झोड, जयाची आशा हिरमोड,

फसली मसलत, अंगा आली बाजू बिनतोड,

वीर यशस्वी, वीर अपेशी, वीर रणी पडला,

सामाज नावाजितो कडाकुन या सकळीकाला.

सर योद्धे करितात लढाई कमाल शर्थीने.

पतन सोशिती त्याहुन जास्ती जबर्‍या हिमतीने.

यास्तव आम्ही हार मानितो जीतीसम थोर

रणखंदाळी कडेविकट ही गातो घनघोर.

जीव कुडीसम शाहीराची मर्दाची जोडी

एकामागे दुजा तगेना लगे प्राण सोडी.

सभाजनांनो ! असे प्रार्थना तुम्हा शाहिराची

खबरदार होऊन खबर ऐकावी दुनियेची.

नुरो पैरवी पृथ्वीवरती हिंदूंची काही

जणू मनसुबा असा करी की सालिम दुनिया ही.

चौकिपहारे उत्कर्षाच्या ठेवुन हमरस्ती

हिंदुस्थानी बंदी केली हिंदूला पुरती.

कहीकवाडा वाढुन किंवा वेठबिगारींनी

पोट भरावे दुनिया म्हणते हरदम हिंदूंनी.

विसर विसर मस्तानी दुनिये ! तुझी बात पहिली

नजरबंद हिंदूंची आता नजर खुली झाली.

हिम्मत हिकमत धमक जोम निर्धार तडफ नेट,

धाडस धोरण हुरूप अक्कल पोच अटोकाट.

स्फूर्ति कल्पना प्रताप अघटित घटनासामर्थ्ये

पूर्वी होती, आता असती बघता सत्यार्थ्ये.

समुळ बुडावा हिंदू मर्जि असेल देवाची,

राजी आम्ही. करून जाऊ करणी मर्दाची.

जनचित्ताचे समुद्रमंथन दिशा दक्षिणेने

चालविले बहु काळापासुन हिरशी चुरशीने.

’स्वतंत्रता’ शिरताजरत्‍न वर उदरांतुनि येई

चतुर मराठ्याकरी प्रबल अभिमाने ती देई.

काळ मागला शोधुन बघता दृष्टीला दिसतेः

एके वेळी एक राष्ट्रची इतरांचे नेते;

पुढिल पिढ्यांना मानवतेच्या आस-भरोशाला

एका वेळी जामिन एकच देश होत आला.

देश मराठा लोक मराठा कुल वरकड देशा

नेता जामिन आज एक हा, नाही अंदेशा.

जय अपजय या स्वातंत्र्याचे युद्धी येतो की,

म्हणाला नकळे याचा शेवट कैसा होतो की.

कोण यशस्वी युद्धे झाली मागे सर्वस्वी ?

काय जगी निर्भेळ यशस्वी सांगा आम्हासी ?

आर्यराष्ट्र कृतकार्य कधी का ते होते झाले ?

कार्य निसर्गाचे का सांगा पूर्णतेस आले ?

विजयाचेही पोटी मोठी कार्ये उद्भवती

अधिक झटापट करणे लागे ज्यांच्या सिद्ध्यर्थी.

जनचित्ताला खळबळणारे एक ध्येय काही

जगदन्तापर्यंत टिकेसे कायमचे नाही.

ग्रहगोलांच्या निर्मळ ज्योती खुल्या हवेवरती

अंतराळागर्भांतुन पोहत पृथ्वीसह जाती.

काय तयांचे रहस्यमय ते साध्य न हे कळते

अचाट सुखमय आहे ’काही ते’ निष्ठा म्हणते.

जीवितगंगा त्याच एक आनंदसमुद्राते

प्रचंड वेगे गाठायाते धूमधडक जाते.

दैव मानवा साध्य सहज ते मिळवुनिया देते,

विपरित होता हिसकुन नेते असे असेना ते.

देशकार्य मागल्या पिढ्यांचे थांबुन का पडले?

धडे मागले गडी मराठे विसरुन का गेले ?

वृद्ध शुद्ध हतबुद्ध आपले कोणी का झाले ?

रस्ते भुलले, चळू लागले मागे रेंगळले ?

सरा पुढे पिळदार मराठे गति दुसरी नाही

तरुणाविण तो कार्यभार मग कोण शिरी वाही ?

उठा उठा नरनारी ! आता रात्र होय सरती

सूर्योदयकाळाचे शाहिर ललकारी देती.

नाथोदय चिन्हिता कंचुकी गात्री तटतटली

कणोकणी वसुधाङ्गी चंचल विद्युत्‌ संचरली.

सौंदर्याचा चढतो जणु की सत्यावर उजळा

लोकनाथ तो उदया येतो, वंदू या त्याला.

महाराष्ट्रपार्वती उग्रतप आजवरी तपली

परम कृपेची पाखर तिजवर परमेश्वर घाली.

दुःस्वप्नाची निशा चेटकी ओसरून गेली

उत्कट उत्कंठेने जनता उत्साहित झाली.

महाराष्ट्रभाग्याची आता पहाट ही फुटली

दैन्यकाळिमा मराठमंडळवदनाची फिटली.

वैगुण्याच्या हिडिस ढगांनी दिग्बंधन होता

अवनति वाहुन चहोकडोनी शिगेवरुन जाता,

किरण पूर्ण तेजाचा कोणी कडकुन निकडीने

करित चुराडा त्यांचा येतो भूवर धडक्याने.

महाराष्ट्रभाग्याची आता पहाट ही फुटली

दैन्यकाळिमा मराठमंडळवदनाची फिटली.

वैगुण्याच्या हिडिस ढगांनी दिग्बंधन होता

अवनति वाहुन चहोकडोनी शिगेवरुन जाता,

किरण पूर्ण तेजाचा कोणी कडकुन निकडीने

करित चुराडा त्यांचा येतो भूवर धडाक्याने.

महाराष्ट्रभूमंडन कंकण बांधुन विजयाचे

राय शिवाजी आला; वंदू चला चरण त्याचे !

स्थापायाला स्वराज्य दंडायाला मत्ताला

मदत करी तुळजा; हा राजा अवतारी झाला.

डाव मांडिला पांची प्राणा लावुन पैजेला

कोण जिवाचे साथी ? या ते साहस कर्माला.

स्थैर्याचे धैर्याचे क्षत्रिय वृत्तीचे असती

वाण सतीच त्यांनी घ्यावे हे उचलुन हाती.

पुरुषार्थाची एक सिद्धि की सर्वस्वी घात

साहसात या शिवरायाची तुमच्यावर भिस्त.

अमर्याद सत्ताबळ अगणित दळबळ शत्रूला

रणोन्माद उद्दाम जिद्द बेहोष करी त्याला.
विक्रमसागर त्याचा बुडवी उत्तर देशाला

लोट तयाचे धडका देती दक्षिण दाराला.

थोप थांबवायाला ती सह्याद्रि पुढे सरला

प्रचंड तो गिरिराज खरा पण आला टेकीला.

करुन चढाई फौजा आल्या भिडल्या दाराला

गड किल्ले कापती साहता त्यांच्या मार्‍याला.

महाराष्ट्रधर्माचे आहे क्षात्रकर्म बीज

'आब आज जाताहे' राखा भाई हो ! लाज.

शत्रुसंघ पाहता दाट बेछूट शूर होती

शिरा शिरा ताठती, अचाट स्फुरणे संचरती.

समरशूर गर्दीत एक बेधडक भिडुन मिसळे

शत्रुभार संहारकर्म विक्राळ परम चाले.

तुच्छ तनुब्रह्माण्ड चंड संग्रामकैफ चढतो

प्रशंसिता तुंबळ त्वेष लंगडा शब्द पडतो.

डंक्यावरती टिपरी पडली; हुकुम जमायाचा.

चला मराठे चला ! वख्त हा आणीबाणीचा.

हेटकरी मावळे, देशमु, पांडे रणबहिरी,

दरकदार, रामोशि, धारकरि सराईत भारी;

एक एक हंबीर वीर हा वर्णवे न काही

जय करण्याची चिंता अंबा जगदंबा वाही.

स्वधर्मकाव्यज्योति अखंडित तुम्हामुळे जळती,

राख तयांची होती सुरता तुमच्या जर नसती.

प्रबळ शत्रु खेटता तेज ये मुळचे प्रगटोनी

चला दाखवा तया मराठी भाल्याचे पाणी.

धर्मशिळेवर पाय ठेविला तो मागे घेणे

पूर्वजास ते उणे, आपुले हसु होइल तेणे.

पहा पहा ते पितर आपले काय बरे म्हणती-

"आभाळातुन पडला का हो ! तुम्ही धरेवरती ?

"भरीव छात वळीव भुज हे दिले तुम्हा आम्ही

"स्वोदपूर्तीकरिता केवळ आणु नका कामी.

"डोळे वाणी अमुची बघते वदते त्यात तुम्ही

"जीवलतेची नवती अमुची फुलली, तेच तुम्ही.

"स्वप्नाजागरी पडछायेसम आम्ही सांगाते

"करित मोकळे आहो तुमचे विजयाचे रस्ते."

काल बदलला, ध्येय बदलले, पूर्वपुण्य फळले;

अभिनवभारत जन हो ! आता जन्माला आले.

चित्र मागले तुम्हापुढे मी एक उभे केले

ओळख तुमची पटते का हो वदा त्यात पहिले.

चढती दौलत, बढता होवो वेल मराठ्यांचा

जय मराठे ! जय मराठे ! जय बोलो त्यांचा !

नव्या उमेदी, नवे जिव्हाळे, नव्या मराठ्यांचे

नवे भरोसे, नवे कवन हे नव्या उमाळ्याचे


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

क्षणभर

काटेरी वेलीचे जाळे

रठ्ठ चर्म, गाठांनी भरले;

अग्रावर पण निर्मळ ढवळे

होते एकच कुसुम विकसले !

कृष्ण निशा; अंबोधर घोर

ग्रसित करी गगनश्री सुंदर;

परंतु होती एक शिरावर

प्रसन्न तारा नयनमनोहर !

ते-ती असता एकएकटी

सुसह होय ती भयाण सृष्टि;

स्वर्गतिनिरयगतिप्रत्यय दे

जी एका समयावच्छेदे.

नित्य निराशेचे अवडंबर

जीर्णाशेचे जाल निरंतर,

करूनि तुज मन्मनी पुरःसर

व्यथित जिवा सुख देती क्षणभर !काटेरी वेलीचे जाळे

रठ्ठ चर्म, गाठांनी भरले;

अग्रावर पण निर्मळ ढवळे

होते एकच कुसुम विकसले !

कृष्ण निशा; अंबोधर घोर

ग्रसित करी गगनश्री सुंदर;

परंतु होती एक शिरावर

प्रसन्न तारा नयनमनोहर !

ते-ती असता एकएकटी

सुसह होय ती भयाण सृष्टि;

स्वर्गतिनिरयगतिप्रत्यय दे

जी एका समयावच्छेदे.

नित्य निराशेचे अवडंबर

जीर्णाशेचे जाल निरंतर,

करूनि तुज मन्मनी पुरःसर

व्यथित जिवा सुख देती क्षणभर !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ