अनुकार

दोष कुणाला ? एकदा निखालस बोल.

भूभृत्कटकावृतवनखंडी,

कटु वाग्‌जल्पनतांडव मांडी,

प्रतिध्वनिप्रति परिसुनि सांडी,

निज भानाला. एकदा निखालस बोला.

अंतर्वीणातंतुततींना

कठोर हस्ते करी ताडना,

कर्कश रव कर्णी पडताना

येत रळीला. एकदा निखालस बोला

निःस्वार्थी सारस्वत तीर्था

पंक त्यावरी फेकी जाता,

कोणी या स्वैरास वारिता

निंदी त्याला. एकदा निखालस बोला.

प्रकृति-सद्‌भिरुचीचे युग्म

आहे प्राक्तन संस्कारासम.

विसरुनि तद्वैचित्र्य मनोरम

कोपा आला. एकदा निखालस बोला.

व्यासोच्छिष्ट जरी जग सारे

का झाले होतात पसारे ?

उष्ट्या जगती जन्म हरे ! रे !

का सर्वाला ! एकदा निखालस बोला.

विश्वविभूषण पुष्प हवे ना ?

दुखवुनि लघुगुरु तरुलतिकांआ

न मिळे ! आता पुरे विघटना.

जीव तान्हेला ! एकदा निखालस बोला.

अमोघ बळ शब्दांचे पाही,

आत साठवी अनन्तासही

शब्दे शब्द कसा मग जाई

हा हारीला ? एकदा निखालस बोला.

अंधार नगरचा उलटा न्याय,

अदंड्य दंडा भाजन होय;

पय घटिका परी, घड्याळ, हाय !

खाई टोला. एकदा निखालस बोला.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा