आलों -स्वतंत्र तव भाव !-स्वतंत्रतेने

आराधण्या प्रथम तन्मय आर्जवाने,

प्रेमार्तता उघड बोलुनि दाखवीली

-शब्दांत, जे ठरति बालिश अन्य वेळीं.

दोघेंच आपण सुहास, न पाहणारा,

निश्चिन्त- चित्त बघ मांडुनि हा पसारा

विश्वासपूर्ण बसलों मम भावनांचा,

रागानुराग नि विनोदमय स्तुतीचा.

किंचित क्षणांत वरती ताव दृष्टि जावी,

अन हासरी चमक लोचनिं वेड लावी !

होतें निवांत; मन संशयशून्य, भोळें;

अर्थविना सरस-वाक्पटुताहि वोळे.

किंचित पुन्हा नजर ही वरती करून

तूं हासतां बघितले फिरवून मान,

-भांबावलों-स्तिमित-बावरलों- कळेना

कोठे, कसा, कुठुनि मी……..


तों विश्वनाट्यगृहांतुन या दिगंत,

हास्य-ध्वनी दुमदुमून भरे हवेंत;

अन रंगभूमिवरला जगतांत खास

गेलों विदूषक पुरा ठरुनी सुहास !

 गेलों विदूषक जरी ठरुनी सुहास,

दान्ते-नि-शेक्सपिअर-संगत आसपास

कोठे तरी स्वमरणोत्तर भाग्यकालीं -!

हाही विचार न कमी मज शांतिदायी.

 जातेस तरि सुखाने । जा आपुल्याच ठायां;

हृदयांत साठलेलें । गेलें न रूप वाया.

ही एक मुग्ध कलिका । ताऱ्यास वेड लावी,

परि तत्प्रभात-अश्रू । हृदयी डुजीच ठेवी,

आधार या तरूचा । वरती चढावयाला,

आलिंगणें लतेने । स्नेहें वरी दुजाला.

ही रीत काय नाहीं । येथील कोमलांची,

अपवाद त्यास कैशी । होशील एक तूंची !


रेताड जीवनांत । भवितव्यता-किनारीं,

अति तीव्र वेदनांनी । व्याकूळतां जिव्हारीं,

सौंदर्यरूप ईशा । भावें बघून हृदयीं,

मम पोळल्या जिवाला । लाभेल दिव्य शांती.


तारुण्य-रूप जातां । बघशील बावरून,

शांती अशांततेची । तूतें न तीहि जाण.

 मन वाचनिं आज ना रमे; स्मृति होते तव एकसारखी;

हुरहूर भरून ये हृदीं; भर संध्या करि त्यांत आणखी.

बसलों म्हणुनीच येउनी — जग-कोलाहल लांब मागुती —

दगडावर त्याच, ज्यावरी गतकालीं तव स्निग्ध संगती.


पसरे लहरींत वायुच्या मधु छायार्णव सांध्य भोवती;

निमिषांत नभावरी निळ्या किति नानाविध रंग फाकती.

अति संथ समीर-गारवा सुटुनी वाटसरास सांगतो,

“जरि वाट कितीहि चाललां, नच आता तरि अध्व-खेद तो.”

विहरून नभांत स्वैरसें घरटयाला निज शेवटीं त्वरें,

चिंवचींवित सांज-माधुरी बघ हीं जात सुखांत पाखरें.

मिटणार फुलाफुलांतुनी, प्रतिपानावर कंप पावुनी,

लहरीलहरींतुनी जलीं, प्रतिमेघावर गोड रंगुनी,

श्रुतिशांत दिनांत-गीत ये श्रवणीं, “श्रांत जिवा विसाव घे !”

मज हाय कुठे न आसरा; करिती पारध हे विचार गे.

हळुवार सुहास, रात्र ही मखमाली पसरीत हात ये;

अपघात घडून देह हा पडला एक रुळावर इथे,

बघुनी क्षण शांति मन्मनीं न कळे कां परि खास वाटली,

कुठुनी तरि शक्ति ;…………………

 प्रीतीची दुनिया सुहास, हसते वाऱ्यावरी भाबडी;

स्वानंदें रमते समुत्सुक जनीं निर्हेतुका बापुडी;

अद्वैतांतिल मंजु गीत-रव तो आलापुनी गुंजनीं,

राही मग्न अशीच गोड अपुल्या स्वप्नांत रात्रंदिनीं.

आशांची बकुलावली विकसली मंदस्मितें भोवती;

ईषत्कंपितकल्पनाकिसलयीं निष्काम डोलेल ती !

चाखावा मकरंद त्यांतिल जरा; जावें, झुलावें जरा;

शंकाही नच की कधी वठुनि हा जाईल गे मोगरा.

सौख्याभाव नि सौख्य एकच इथे संवेदनाजीवनीं;

नीती आणि अनीति संभ्रम फिटे स्नेहार्द्र संभावनीं;

संध्यादेवि उषेसह प्रगटते आकाल निलांबरीं;

येई गे, अजरामत्व मरुनी निर्वेध ताऱ्यांपरी.


नाही हें नशिबीं ! — नसोच ! — मिटती जागेपणीं पापण्या;

आई ! येत म्हणून मस्तक तुझ्या अंकावरी ठेवण्या.

 सचिंत पारध गोड तत्वतः

सोडुनि देतों अता सुखाने !


सावज मागे, पुढे शिकारी !

गति-धुंदी ही भरे शरीरी;

नसानसातुंन वेग चढे शिरिं;

वळुनी बघणें आता कसले !


पाय लागले डोंगर-माथां,

गतिमत्वाने एकतानता,

प्रभू-पावलें लांब तेजतां –

अंधुक, पारध तिथे संपणें

 चंद्रकिरणांनो, तुम्हां

वाजते का कधी थंडी

स्वतःची ? मध्यरात्री

हिवाळ्यांत हुडहुडी !


नाही ना ? मीं म्हणुनीच

लांबवले मरणाला;

गारठून जाल जेव्हा –

चिता हवी शेगोटीला.