जडाच्या जांभया

रडण्याचेंही बळ नाही;
हसण्याचेही बळ नाही;
मज्जा मेली; इथें आतां
जीवबाची कळ नाही.

संस्कृतीला साज नाही.
मानवाला माज नाही;
आज कोणा, आज कोणा,
जीवनाची खाज नाही.

इथें आतां युद्ध नाही;
इथें आतां बुद्ध नाही;
दु:ख देण्या, दु:ख घेण्या
इथे आतं शुद्ध नाही.

भावनेला गंध नाही;
वेदनेला छंद नाही;
जीवानाची गद्य गाथा
वाहतें ही; बंध नाहीं!

चोर नाही; साव नाही;
मानवाला नांव नाही;
कोळ्शाच भाव तेजीं
कस्तुरीला भाव नाही.

जागतें कैवल्या नाही;
संशयाचे शल्य नाही;
पापपुण्या छेद गेला.
मुक्ततेला मूल्य नाही.

जन्मलेल्या बाप नाही;
संचिताचा ताप नाही;
यापुढे या मानवाला
अमृताचा शाप नाही.

जाणीवेची याच साधी
राहिली मागें उपाधीं;
– या जडाच्या जांभया हो
ना तरी आहे समाधी!


कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - मृद्‌गंध
- कागल, २१ सप्टेंबर ५०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा