सकाळी उजाडता उजाडता

सकाळी उजाडता उजाडता उठले, पाहिलं
..... आणि कमालच!
एक वीट निखळलेली.
मी उचलून लावली ती जिथल्या तिथे.
पुन्हा चार दिवसांनी
पूर्वा लाल व्हायच्या आधीच उठले, पाहिलं,
तर अर्ध्याअधिक विटा उचकटून फेकलेल्या !
पुन्हा माझी कारागिरी!
पुन्हा काही दिवसांनी
मध्यरात्रीच जाग आली, पाहिलं :
थडगं पूर्ण उस्कटलेलं !
आणि उघडलेल्या शवपेटीत
मन चक्क डोळे चोळीत
उठून बसलेलं!
तसं रडतच होतं म्हणा. पण जिवंत?
अकल्पनीय!
म्हणजे थडगं बांधूनही मन...
याला निलाजरं म्हणायचं की असहाय्य !


कवयित्री - पद्मा गोळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा