अन्यथा

तत्त्वज्ञान त्याचे विवेचन करील
पण कविता त्याचा शोध लावते
कारण
तो आणि आपण
यांच्यातील संबंध
नाही मीमांसेचा,
तो आहे फक्त
काव्याचा
आणि म्हणूनच
बेबलच्या सनातन मनोर्‍यामधे
जेव्हा नेति – अस्तीचे वादंग
मीमांसक माजवीत असतात,
तेव्हा -
केवळ कवीसाठी
तो करतो स्वत:चा सारांश
इंद्रियसुंदर स्वरुपात
सृष्टीतून उतरतो खाली,
रहस्यदुर्गाच्या उग्र सावल्यांतून
पहारे चुकवीत बाहेर निसटणार्‍या
कलंदर राजपुत्रासारखा,
आणि
कवीच्या संवादी हातात घालून
रागदरीतील महत्तम स्वरासारखा
भ्रमण करतो
अस्तित्वाच्या सर्व हद्दीपर्यंत
- अन्यथा
तुकारामांचा अभंग
संभवलाच नसता



कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मुक्तायन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा