स्वर्ग, पृथ्वी आणि मनुष्य

आरम्भीं, म्हणजे मनुष्य नव्हता तेव्हां, क्षितीपासुनी
होता स्वर्ग न फार दूर, अपुल्या कान्तिप्रसन्नेक्षणीं
तो पृथ्वीप्रत सौख्य नित्य वितरी तेव्हां पुढें त्यावरी
गेली प्रीति जडूनि गन्धवतिचे चित्तांत भारी खरी.

निर्मीला नर नन्तर स्वतनुच्या तीनें मळीपासुनी
इच्छा आपुलिया धरूनि ह्रदयीं हीः--- गायनें गाउनी
स्वार्गा आळवुनी नरें सुकुशलें मोहूनियां टाकिजे,
स्वर्गें येउनि खालतीं मग तिशीं प्रेमें सदा राहिजे.

या दुष्टें, पण मानवें स्वजननीपृथ्वीस ताडूनियां
लाथेनें, अपुल्या मनीं अवथिलें स्वर्गावरी जावया;
ती पाहूनि कृतघ्नता निजमनीं तो स्वर्ग जो कोपला,
आवेशांत उडुनि दूरवर तो जाता तघीं जाहला.

तेव्हांपासुनि ही धरा झुरतसे ! माते ! चुकी जाहली !
स्वर्गा ! तूंहि अम्हां क्षमस्व सदया !--- ये खालता भूतलीं---
ये बा ! आणिक या घरेस अगदीं देऊं नको अन्तर !---
आहे तूजवरी तसेंच बसलें स्वर्गा ! तिचें अन्तर.


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- खेड, ११ एप्रिल १८९०

1 टिप्पणी: