पिकले पान

पद्य मजला येईल करू जाता,
त्यात ओतू मी काव्य कसे आता ?

अंगि नुरता निर्माणशक्ति लेश
कसा यावा भर काव्यकौमुदीस ?

स्फूर्तिशक्तीचा होय लुप्त 'मंत्र'
तिथे झाले विकलांग वहन 'यंत्र'

'तंत्र' विस्मरलो, होय मी उदास !
कसा यावा भर काव्यकौमुदीस ?

एक नैसर्गिम जन्म सर्वमान्य,
अन्य होतो संस्कारकर्मजन्य

छटा यांच्या होता न एकजीव
काव्यसौंदर्यी भासते उणीव !

काव्यदेवी देउळी गर्भभागी
शिरू शकलो मी ना कधी अभागी !

मुखश्रीचे, एकान्त-दर्शनाचे
सुख स्वप्नांतहि ते न मिळायाचे

भाग्य नसता मज रसिकरंजनाचे
कसे काढू उद्‌गार धन्यतेचे ?

कुणा सांगू या कर्मकहाणील ?
मला वाटे हा जन्म फुकट गेला !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

गाविलगड

सातपुडा जवळीच बोडखे वर डोंगर घाट,

खालते जंगल मोकाट.

इतस्तता पसरुनी भरारा उंचविती माथे

आक्रमशील सकळ येथे.

पहा वृक्ष-वेली की, खग-पशु-कीटकगण सारा.

सदा संनद्ध प्रतिकारा,

मुक्तछंदलीलेचे निष्टुर शासनविधिलेख

निसर्गी जीवनीहि एक.

मंगलोग्र शक्तींचा गिरिवर सदा सिद्ध मेळा

जीवनमरणाच्या खेळा.

विरुद्धेहि एकत्र नांदवी सत्तेचा व्याप

भयानक तिचे आद्यरूप.

जीवसृष्टि जीवनात तेची रूपबिंब नाचे

जणू ते चलत्‌चित्र तीचे.

द्वितीय पुरुष न जाणिव येथे प्रथमाचा थाट

जिवाचा तो पहिला पाठ.

द्वितीयतेची जाणिव मुकुरित होता ते ज्ञान

सृष्टिचे पहिले बलिदान.

समष्टीत तद्विकास व्हावा विस्तारित अझुनी

युगे किति जातिल की निघुनी !

साध्य न हे तोवरी अवश्यचि जीवितरणकर्म

घोर तरि तो मानवधर्म

विश्वपुरुष हा विश्वाहितास्तव त्रिगुणात्मक कुंडी

पाशवी-अंश-हवन मांडी.

त्याग आणि उत्सर्ग समुत्कट उद्दीपित करिती

महत्तम अंतर्हित शक्ति.

ती आत्मोन्नति, संस्कृति ती, ती मानवता विहित

अल्पतर तामसपण जीत.

संस्कारशील संस्कृति वदशी तू सर्व भ्रममूल

मना ! मग तूहि एक भूल.

तर्कवितर्कात्मक बुद्धीचे अति अस्थिर तेज

बुद्धिची श्रद्धा ही शेज.

जाणु शके ती शक्ति वाळल्या मात्र लाकडाची.

न जाणे शाद्वल हरळीची.

प्रचंड चाले स्थूलान्तरि तो व्यापार न विदित

मनुजमतिगति परिमित अमित.

ज्ञान सरुनि संस्कार उरे ते तेवढेच तूझे

बाकी भारभूत ओझे.

समवाय संस्कृति संस्कारांचा तदनुसार शील

जिणे तिजविण बाष्कळ खूळ.

क्षितिजाच्या कंकणी ललित लघु तारा जणु विमल

वेलिच्या पालवीत फूल.

तसे गाव एक हे नदीच्या वाकणात्राहे

पाणी बारमास वाहे.

विभुत्व गिरिचे अखंड पुरवी नवजीवन तीस

खळाळे म्हणुनि समुल्हास

कडेवर टेकडी सतीचे रम्य स्थळ परम

साभिमुख भैरव बलभीम.

खडा असे सन्मुख 'गाविलगड' साहत तप करिता

आतप-हिम-वर्षा-वाता.

दिसे अस्थिपंजर केवळ तो उरे प्राण कंठी

आर्त गतवैभवार्थ पोटी.

पूर नदीचे येती पायी लोटांगण घेती

निरामय मळ टाकुनि होती.

रिघ-निघ चाले, उधळण चाले हळदकुंकवाची

गर्दी होते नवसांची.

देती नेणत सद्‌भावांचे दृढतर संस्कार

सतीचे ते जयजयकार.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

दोन 'मी'

१.

मज सर्वाज्ञा कळे न त्याला एक शिवी मी हासडतो,

'शतपाता' चा कलाभिज्ञ मी आग तयावर पाखडतो.

डोके लढवुनि पैका कमवी का मज म्हणता 'पोटभरू'?

खाल तुपाशी आणि उपाशी काय एकटा मीच मरू?

'माल गधोका अकलमंदका खुराक' हे आपण करिता,

गाल्या मजला का देता हे सत्यव्रत मी आचरिता ?

पुढे पुढे ते जाती त्यांना टांग ओढुनी पाडितसे,

पुरुषार्थाची, कृतार्थतेची सिद्धि याविना अन्य नसे !

मात्र तुम्हाला मते असावी, नकोत मज काही काय ?

'गाड मनी ती' मला सांगता, घोर होतसे अन्याय !

"हिंदुस्थाना रशिया बनवा"- महायुद्ध सांगे वर्म

'प्रथम भेद मग छेद भयंकर' हाच आमचा कुळधर्म !

२.

विशालतेतिल भिन्नत्वातिल एकसूत्रपण अव्यंग

कळोनि आहे आणायाचे वर्तनांत ते सर्वांग.

सुधारणा पाहता आजची आपणास हे स्पष्ट दिसे

पाशवता परिपूर्ण आतली उफाळुनि वर येत असे.

अणु परिमाणू रेणु आणि तिस्रेणुवर वर्चस्व दिसे

हा बुद्धीचा विकास, पण तो मानवतेचा खास नसे !

बुद्धीचा तर विकास येतो राक्षसातही आढळुन

मनुष्यत्व राक्षसास देणे आर्यधर्म हा सनातन.

उत्पत्ति, स्थिति तसाच लय हा सृष्टीचा क्रममार्ग असे

महन्मंगला चिच्छक्तीचा हा तर परमोल्हास दिसे.

३.

संस्कृति म्हणजे जीवनसरणी वेगवेगळ्या त्या असती

विशेषता तीतलि आपली दक्षपणे या रक्षू ती.

संस्कृती परकायांची करणे अकस्मात हे शक्य नसे,

अंगलगट करु नका तिच्याशी त्यात आपला घात असे.

जीवन-संजीवनी त्याग ही राष्ट्र असो संपन्न नसो

ना तरि त्याचा विनाश मनि हे अक्षयतेचे तत्त्व ठसो.

देश असो माझा मी त्याचा सर्वस्वार्पण करीन मी

निर्वाणही कधी न होइन देशाचा बेमानहरामी.

भारतास भूषण विश्वाचे करण्याचा निर्धार धरू

देशहितास्तव जगू, नाहि तर प्राणांचा उत्सर्ग करू !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

स्वैर गीत

अयि स्वैरते ! गाइं गीत तू, मतवाली तू, तू अतुला,

विषयांची निर्मात्री ती तू, विषय कोणता देउ तुला ?

"स्वैर पाखरे विचरति वरती, स्वैर फिरे वनवायु वरी;

कृष्ण मेघमंडळ प्रकाशुनि मुक्त तेज संचार करी.

स्वतंत्रतेचा अर्णव फेकी स्वतंत्र लहरीवरी लहरी

जनसंमर्दा स्नात करोनी सौभाग्याचा + सेस भरी.

पूर लोटला उत्साहाचा उसळत महितळ सकळ भरी,

ऊठ, होय जागृत बसलासी काय उगा तू स्वस्थ घरी ?

प्रतिभेच्या आरशात पडते निसर्गछाया मनोहर,

वाङ्मयतप कर; प्रसन्न होइल प्रतिभादेवी निरंतर.

भेसुरतेला सांग मराठा भ्याला केव्हा काय तरी ?

वाङ्मयगंगा खाली नेउनि सहस्त्रायुधे देइ करी.

प्रणयपंकजासवे खेळणे आता तरि तू पुरे करी

नियमांचे परिपालन सरले जाय कराया मुलुखगिरी

यशोगान-दुंदुभी नादवुनि नेई त्याला दिगंतरी

ज्योत जागती करी धरोनी दीपस्तंभ उभारि वरी !"

बाइ स्वैरते ! स्वैर धावसी धावू मागे कोठवरी ?

दमलो ! 'लेखन-कामाठी' मी आता सारी पुरे करी.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

भारतीय जीवन

१.

जीवामात्रामधे राहे एक शक्ति अपार्थिव

जड सूक्ष्मेंद्रियद्वारा हो तिचा व्यक्त संभव.

क्रियाशक्तिस्वरूपाने अनेकविध जो घडे-

व्यवहार तयालागी 'कर्म' ही अभिधा पडे.

व्यक्तिकर्मप्रवाहाचे वाहणे तेच 'जीवन'

स्थली एकीच हो त्याचे जन्म आणि विसर्जन.

'चैतन्य' म्हणती त्याते सर्व विश्वास निर्मुनी

स्वभावचि असे त्याचा रहावे त्यात व्यापुनी.

सर्वव्यापक तत्त्वा या नावे बहुत ठेविती-

'जगज्ज्योति' 'अंतरात्मा' 'जगज्जीवन' बोलती

विभूती त्यांतुनी येती; जाती आम्हास देउन

ज्ञानतेजे समायुक्त विकासमय जीवन.

भारताचा असे मोठा विस्तार तरि आपणा

महाराष्ट्रप्रतीकाने करू येतेच अर्चना.

प्रतिमापूजने होती ईश्वराप्रति अर्पण

महाराष्ट्रमिषाने हो भारताचेच पूजन.

विपन्नकाली देशाच्या अग्रभागी सदा स्थित

राहिला हा महाराष्ट्र, आज राहिल निश्चित.

२.

एकान्तात महत्कार्ये स्फूर्ति-पूर्तीस पावती

राष्ट्रोदय नवे होती सूज्ञ सर्वत्र बोलती.

एकान्तात बसू जाता अन्य संकल्प सोडुनी

विचारांचे, विकारांचे काहूर उठते मनी.

विवेकभ्रष्ट तत्त्वांचा बडिवार विवादती;

तत्त्वे ती असती कोणासाठी हे ते न पाहती !

व्यावहारिक तत्त्वे ती सापेक्ष असती सदा,

भिन्नावस्थेत कामाला तेज ते ये न सर्वदा.

देशकार्यी तत्पराते निंदिती उत्तरोत्तर

कृतीच्या शून्य नावाने शब्दगुंड घरोघर !

स्वदेशाच्या गौरवात आपला होय गौरव

यातना, हाल जे त्याचे, आपला तोच रौरव !

शक्तीचे वसतिस्थान अंतःकरण केवळ.

पवित्र जीवनाधारे कर्मे होतात सोज्वळ.

सुखाची वर्णित स्वप्ने भ्रांत चित्ते सदोदित

सत्यसृष्टीत येती का ? व्हावे कार्यास उद्यत !

स्वतंत्राची देशवाची देशवैभव गर्जते

पराधीने स्वदेशचे रचावे स्तोत्र कोणते ?

जाणत्याने सदा व्हावे यत्‍नसाहसतत्पर

सिद्धिदाता होत आला सत्यसंकल्प ईश्वर !

शक्तीच्या चालका रामा ! पुरवी मनकामना

'सत्यं-शिवं'सुंदरम्' दे आनंदवनभुवना !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

अध्यात्म

अध्यातमशास्त्र म्हणती तरि ते कशाला ?

त्याचे प्रयोजन कळे नच जाणत्याला!

हे शास्त्र काय ? न दिसे उपयोग त्याचा-

हा तो विकल्प दिसतो कविकल्पनेचा !

जे का विचार करिते जड भौतिकाचा

ते मात्र शास्त्र म्हणणे अविचार साचा !

जे दे अचेतन अणुप्रति चेतनेते

ते नित्य तत्त्व कळणे अनिवार्य होते !

ते तत्त्व निर्णय करी जड शोधनाने,

संशोधिला सकलही व्यवहार त्याने,

अध्यात्म मानस तथा व्यवहारसार

एकत्र यात मजला दिसतो विचार.

यानेच शुद्धतर हा व्यवहार केला

यानेच व्यापकपणा दिधला तुम्हाला.

पूर्वेतिहास पढता पटते मनाला

देइल वैभव पुन्हा नवभारताला !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

रगडनी ( मळणी )

केला पीकाचा रे सांठा

जपीसन सर्व्याआधीं

शेत शिवाराचं धन

आतां आलं खयामधीं

खय झालं रे तैयार

सम्दी भूई सारवली

मधी उभारलं मेढ

पात बैलाची चालली

आतां चाल चाल बैला,

पात चाले गरगर

तसे कनूसामधून

दाने येती भरभर

आतां चाल चाल बैला,

आतां चाल भिरभिरा

व्हऊं दे रे कनुसाचा

तुझ्या खुराखाले चुरा

पाय उचल रे बैला,

कर बापा आतां घाई

चालूं दे रे रगडनं

तुझ्या पायाची पुन्याई !

पाय उचलरे बैला,

कनूसाचा कर भूसा

दाने एका एकांतून

पडतील पसा पसा

आतां चाल चाल बैला,

पुढें आली उपननी

वारा चालली रे वाया,

कसा ठेवू मी धरूनी

पात सरली सरली

रगडनी सुरूं झाली

आतां करूं उपननी

झट तिव्हार मांडली

आतां सोडी देल्ही पात

बैलं गेले चार्‍यावरी

डोयापुढें उपननी

जीव माझा वार्‍यावरी

रगडनी रगडनी

देवा, तुझीरे घडनी

दैवा तुझी झगडनी

माझी डोये उघडनी !


कवियत्री - बहिणाबाई चौधरी