दोन 'मी'

१.

मज सर्वाज्ञा कळे न त्याला एक शिवी मी हासडतो,

'शतपाता' चा कलाभिज्ञ मी आग तयावर पाखडतो.

डोके लढवुनि पैका कमवी का मज म्हणता 'पोटभरू'?

खाल तुपाशी आणि उपाशी काय एकटा मीच मरू?

'माल गधोका अकलमंदका खुराक' हे आपण करिता,

गाल्या मजला का देता हे सत्यव्रत मी आचरिता ?

पुढे पुढे ते जाती त्यांना टांग ओढुनी पाडितसे,

पुरुषार्थाची, कृतार्थतेची सिद्धि याविना अन्य नसे !

मात्र तुम्हाला मते असावी, नकोत मज काही काय ?

'गाड मनी ती' मला सांगता, घोर होतसे अन्याय !

"हिंदुस्थाना रशिया बनवा"- महायुद्ध सांगे वर्म

'प्रथम भेद मग छेद भयंकर' हाच आमचा कुळधर्म !

२.

विशालतेतिल भिन्नत्वातिल एकसूत्रपण अव्यंग

कळोनि आहे आणायाचे वर्तनांत ते सर्वांग.

सुधारणा पाहता आजची आपणास हे स्पष्ट दिसे

पाशवता परिपूर्ण आतली उफाळुनि वर येत असे.

अणु परिमाणू रेणु आणि तिस्रेणुवर वर्चस्व दिसे

हा बुद्धीचा विकास, पण तो मानवतेचा खास नसे !

बुद्धीचा तर विकास येतो राक्षसातही आढळुन

मनुष्यत्व राक्षसास देणे आर्यधर्म हा सनातन.

उत्पत्ति, स्थिति तसाच लय हा सृष्टीचा क्रममार्ग असे

महन्मंगला चिच्छक्तीचा हा तर परमोल्हास दिसे.

३.

संस्कृति म्हणजे जीवनसरणी वेगवेगळ्या त्या असती

विशेषता तीतलि आपली दक्षपणे या रक्षू ती.

संस्कृती परकायांची करणे अकस्मात हे शक्य नसे,

अंगलगट करु नका तिच्याशी त्यात आपला घात असे.

जीवन-संजीवनी त्याग ही राष्ट्र असो संपन्न नसो

ना तरि त्याचा विनाश मनि हे अक्षयतेचे तत्त्व ठसो.

देश असो माझा मी त्याचा सर्वस्वार्पण करीन मी

निर्वाणही कधी न होइन देशाचा बेमानहरामी.

भारतास भूषण विश्वाचे करण्याचा निर्धार धरू

देशहितास्तव जगू, नाहि तर प्राणांचा उत्सर्ग करू !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा