साने गुरूजी

पत्री

पत्री समर्पण
हृदय मदीय तव सिंहासन होवो
मजवर कृपा करावी
एक किरण
माझी बुडत आज होडी
अति आनंद हृदयी भरला
मम जीवन हरिमय होऊ दे!
मजला तुझ्यावीण जगी नाही कोणी
तव अल्प हातून होई न सेवा
सदयहृदय तू प्रभु मम माता
दिसतात सुखी तात! सारेच लोक
देवा! धाव धाव धाव
दु:ख मला जे मला ठावे
नयनी मुळी नीरच नाही
वेल
जीवनतरू
मज माहेराला नेई
येतो का तो दुरून
पूजा मी करु रे कैशी?
कर्ममय पूजा
मजूर
श्रमाची महती
मन माझे सुंदर होवो
मी केवळ मरुनी जावे
असो तुला देवा! माझा सदा नमस्कार
प्रभो! काय सांगू तुला मी वदोनी
वेणु
मनमोहना
मनोमंदिर-राम
हृदयाकाशी मेघराशी
देवा! झुरतो तव हा दास
प्रभु! सतत मदंतर हासू दे
जागृत हो माझ्या रामा!
हे नाथ! येईन तव नित्य कामी
हे तात! दे हात करुणासमुद्रा
तुजवीण अधार मज कोणि नाही
काही कळेना, काही वळेना
आईचा मार
दिव्य आनंद
कैसे लावियले मी दार
हस रे माझ्या मुला!
झुरतो मी रात्रंदिवस
काय सांगू देवा, कोणा सांगू?
नमस्कार
गाडी धीरे धीरे हाक
आशानिराशा
ये रे मला तार
निराधार
दाखव मज अपुले चरण
येवो वसंतवारा
माझे ध्येय
तुझ्या हातातला
रडण्याचे ध्येय
द्विविध अनुभव
हे सुंदरा अनंता!
रडायाचा लागलासे देवा एक छंद
रामवेडा
आई, दार उघड
देवाजवळ
जीवननाथ
सुखामृताची मग नित्य धार
तुला देतो मी जमिन ही लिहून
आशा
सोन्याचा दिवस
प्रेम का करावे?
 प्रार्थना
 प्रसन्नता
 प्रकाश केव्हा भवनी भरेल?
 हृदयाचे बोल
 जीवनार्पण
 जीवनात माझ्या सदा राम गुंफिन
तुजसाठि जीव हा उरला
करुणाष्टक
जीवनबाग
भाग्याचे अश्रु
तळमळतो रे तुझा तान्हा
निर्वाणीचे सांगणे
कधि येशिल हृदयि रघुराया
का मजला देता प्रेम?
अश्रु
माझा देव
प्रभु मम हृदयि आज येणार!
फुलाची आत्मकथा
मयसभा राहिली भरुन
खरा धर्म
कशासाठी जगावे?
जीवनातील दिव्यता
मित्रांसाठी प्रार्थना 
संत
मेघासारखे जीवन
वंदन
मदीय त्या नमस्कृती
नवीन संन्यास
विपत्ति दे तीहि हवी विकासा
दु:ख आनंदरुप
प्रेमधर्म
परी बाळाला सकळ ती समान
ग्रंथमहिमा
गुढीपाडवा
नागपंचमी
दसरा
संक्रांत
लहान मित्राबद्दल!
लहानपणची आठवण
मृत्युमित्र
शांति कोण आणते?
गायीची करुण कहाणी
जीवनमित्रास!
कसे तरी मग जग दिसते?
प्रेमाचे गाणे
आत्मा ओत रे ओत
भारतमाता
मनमोहन मूर्ति तुझी माते
माझी एकच इच्छा
प्रभु! भारतिचे वैभव कोठे गेले?
स्वातंत्र्याचे अम्ही शिपाई!
देशभक्त किति ते मरती
भारतसेवा
जा रे पुढे व्हा रे पुढे!
बलसागर भारत होवो!
हा देश वैभवी न्यावा!
भूषण जगताला!
भारतजननी सुखखनि साजो
हृदय जणु तुम्हां ते नसे!
माझा महाराष्ट्र भाग्ये सजो
भारतमाता माझी लावण्याची खाण!
मरणही ये तरी वरिन मोदे
दिव्य मी स्वर्ग निर्मीन
देशासाठी मरु!
तेव्हा घडे उन्नती!
तुफान झालो!
प्रिय भारता सुंदरा!
दुबळी मम भारतमाता!
देशभक्ताची विनवणी!
मातृभूमिगान
गाऊ मी कसले गाणे?
स्वातंत्र्य
स्वातंत्र्यदेवीचे शुभ आगमन
स्वातंत्र्यानंदाचे गाणे
भारतास!
भारता ऊठ!
वंदे मातरम्!
भारतजननी तव शरणम्!
सुसंस्कृत कोण?
खरा हुतात्मा!
ऊठ झुगारुन देई बेडी
प्रभु-प्रार्थना!
राष्ट्राचे उद्यान
राष्ट्रपताका
प्रतीध्यान
झेंडागीत
नवयुवक
बाल-वृद्ध संवाद
एकच वेड
स्वातंत्र दिव्यदर्शन!
भारतातील मुले
महाराष्ट्रास!
राणा प्रताप
महात्माजींस
खरे सनातनी
सत्याग्रही (खंडकाव्य)
माझी पत्री

देवाची देणगी.

एकदा ब्रम्हदेव आपल्या सर्व दूतांना व कर्मचार्‍यांना एका बैठकित सांगत होते," हे बघा, आपल्याला काही चांगले निर्माण करायचे असेल तर तेथेच काहीतरी वाईट पण द्यावे. म्हणजे त्या क्षेत्रात संतुलन कायम रहाते. सर्व कामे अशी करायची कि कोठेही संतुलन बिघडता कामा नये.

थोडे थांबुन देव म्हणाले," कुणाला काही अडचण ? माझे म्हणणे कुणाला कळले नसेल तर विचारा मी माझ्या म्हणण्य़ाचे स्पष्टीकरण द्यायला तयार आहे."

काही वेळाने एक देवदूत ऊभा राहिला व देवाला म्हणाला,"देवा आपले म्हणणे कळले पण आपण एखादे उदाहरण द्याल का ?"

ब्रम्हदेव म्हणाले," हे बघा मी अमेरिकेला सर्व काही दिले आहे. तेथील लोकांना मी भरभरुन श्रीमंती दिली, मजा करायला बरिच ठिकाणे दिली पण त्यांना भितीही दिली.  त्यांना कायम भिती वाटत असते."
दूसरा देवदूत म्हणाला, " देवा अजुन एक उदाहरण द्याना."

ब्रम्हदेव म्हणाले," मी अफ्रिकेला निसर्गाचे दान भरभरुन दिले पण त्यासोबतच गरिबीही दिली."
तर तिसरा देवदूत म्हणाला," देवा तुम्ही म्हणता ते बरोबर नाही, आपण सर्वच ठिकाणी असे संतुलन सांभाळत नाही. आता बघाना भारताला निसर्गाचे दान दिले, समॄद्धि दिली, श्रीमंती दिली व कुठेच काही कमी दिसत नाही."

देव म्हणाले," होय तेथेही मी संतुलन कायम राखले आहे. त्यांना शेजारी मी पाकिस्तान दिलाय ना."

गाढव

एकदा एका शाळेतल्या व्रात्य मुलांनी शाळेत काहीतरी मस्ती करायची ठरवले.
बर्‍याच विचारांती त्यांनी तीन गाढव आणले व त्यांच्या पाठीवर १, २ व ४ हे क्रमांक घातले व त्यांना शाळेच्या मैदानात सोडून दिले.
मुख्याधापकांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी शाळेतले सर्व कर्मचारी गाढव क्रमांक ३ शोधायला दिवसभर राबवले.

आरसे

चारी बाजूंना चार
वरती एक
आणि खालती एक
असे अभावाला कैद करू पाहणारे
आरसे.

"आम्ही आहोत, आम्ही आहोत"
असे ते आक्रोशले
पण अभाव त्यांच्या पुढून
अभाव त्यांच्या मागून
अभाव त्यांच्या भोवतालून
व अभाव त्यांच्यामधून
खदखदा हसला.

आरसे वेडे झाले.
आरसे भेदरले.
स्वतःच्या अस्तित्वाविषयी
त्यांना भ्रांत पडली.

आणि
आरशांनी आत्महत्या केली.


कवी - अरुण कोलटकर

श्रीकृष्णाचा पाळणा

बाळा जो जो रे, कुळभूषणा, । श्रीनंदनंदना ॥
निद्रा करिं बाळा, मनमोहना । परमानंदा कृष्णा ॥बाळा धृ.॥
जन्मुनि मथुरेत, यदुकुळीं । आलासी वनमाळी ॥
पाळणा लांबविला, गोकुळीं । धन्य केले गौळी ॥ बाळा जो.॥
बंदीशाळेत, अवतरूनी । द्वारे मोकलुनी ॥
जनकशृंखला, तोडोनी । यमुना दुभंगोनी ॥ बाळा जो. ॥
मार्गी नेताना, श्रीकृष्णा । मेघनिवारणा ॥
शेष धावला, तत्क्षणा । उंचावूनी फणा ॥ बाळा जो. ॥
यत्नजडित, पालख । झळके अमोलिक ॥
वरती पहुडले, कुलतिलक । वैकुंठनायक ॥ बाळा जो. ॥
हालवी यशोदा, सुंदरी । धरूनी ज्ञानदोरी ॥
पुष्पें वर्षिली, सुरवरी । गर्जती जयजयकारीं ॥ बाळा जो. ॥
विश्वव्यापका, यदुराया । निद्रा करिं बा सखया ॥
तुजवरिं कुरवंडी, करूनियां । सांडिन मी निज काया ॥ बाळा जो.॥
गर्ग येऊनि, सत्वर । सांगे जन्मांतर ॥
कृष्ण परब्रह्म, साचार । आठवा अवतार ॥ बाळा जो. ॥
विश्वव्यापी हा, बाळक । दुष्ट-दैत्यांतक ॥
प्रेमळ भक्तांचा, पालक । श्रीलक्ष्मीनायक ॥ बाळा जो. ॥
विष पाजाया, पूतना । येतां घेईल प्राणा ॥
शकटासुरासी, उताणा । पाडिल लाथें जाणा ॥ बाळा जो. ॥
उखळाला बांधिता, मातेनें । रांगतां श्रीकृष्ण ॥
यमलार्जुनांचे, उध्दरण । दावानलप्राशन ॥ बाळा जो. ॥
गोधन राखितां, अवलीळा । काळीया मर्दीला ॥
गाई गोपाळां, रक्षून । केलें वनभोजन ॥ बाळा जो. ॥
कालिंदीतीरी, जगदीश । वज्रवनितांशी रास ... ॥
खेळुनी मारिले, कंसास । मुष्टिक चाणूरास ॥ बाळा जो.॥
ऐशी चरित्रे, अपार । दावुनि भूमीवर ॥
पांडव रक्षिल, सत्वर । ब्रह्मानंदी स्थिर ॥ बाळा जो.॥

जुगलबंदी

एकदा जुगल हंसराज झाकीर हुसेन च्या कार्यक्रमाला जातो....तिकीट पण
काढतो..तरी त्याला तिथे आत सोडत नाहीत ... का ????
.....
.
कारण..
.
.
.
तिथे आत "जुगलबंदी" सुरु असते !!

लग्नाचं गाण

गाडी गुलाबी, बैलं खिलारी,
भाऊ सजना, दादा सजना,
बहिणीच्या नथासाठी, मोडं खजिना.

गाडी गुलाबी, बैलं खिलारी,
भाऊ सजना, दादा सजना,
बहिणीच्या डुलासाठी, मोडं खजिना.

गाडी गुलाबी, बैलं खिलारी,
भाऊ सजना, दादा सजना,
बहिणीच्या पैंजनासाठी, मोडं खजिना.

गाडी गुलाबी, बैलं खिलारी,
भाऊ सजना, दादा सजना,
बहिणीच्या बांगडीसाठी, मोडं खजिना.

गाडी गुलाबी, बैलं खिलारी,
भाऊ सजना, दादा सजना,
बहिणीच्या लेणसाठी, मोडं खजिना.

गाडी गुलाबी, बैलं खिलारी,
भाऊ सजना, दादा सजना,
बहिणीच्या चोळीसाठी, मोडं खजिना.

जॅकरांडा

जॅकरांडा जॅकरांडा
वाट भरून घाट भरून
बागांमधून जागा धरून
इथे तिथे जिथे तिथे
वळणावरून फिरून फिरून
खूप खूप जॅकरांडा !

उन्हामधे कात टाकून
अंगणामधे न्हाऊन माखून
सावलीमध्ये जांभळी झोकून
रंगानेच अंग झाकून
उंच-नींच जॅकरांडा !
ओठी चित्रपंखा धरून
छत्रीखाली जॅकरांडा !


कोपर्‍यावरती खुणा करीत
आव्हान देत जॅकरांडा ..
पक्के शिक्के जॅकरांडा
डोळेभर जॅकरांडा
डोकेभर जॅकरांडा !

हाडांमधून घसरणार्‍या
नसाभर पसरणार्‍या
मणक्यांमधे मणीमणी
वरवर सरकणार्‍या
रंग-रस जॅकरांडा !

इथेतिथे जिथेतिथे उघड उघड जॅकरांडा !
फुफ्फुसांच्या कप्प्यांमधून लप्पेछप्पे जॅकरांडा !

जॅकरांडा जॅकरांडा जॅकरांडा जॅकरांडा !


कवी - वसंत बापट

केळी साठी नापास

बन्डु नापास होतो म्हणुन गुरुजी त्याच्या पालकांना बोलवितात.

गुरुजी : मी बन्डुला विचारले कि जर माझ्याजवळ ५ केळी आहेत आणि त्यातील मी ३ केळी खाल्ली तर खाली किती केळी राहिली ? तर २ केळी राहिली हे साधे त्याला सान्गता आले नाही.

बन्डुची आई : काय मास्तर, २ केळासाठी पोराला नापास केलं व्हय. उद्या २ डझन केळी पाठवुन देते, करुन टाका पोराला पास.

आठवणी

मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा
ह्सतमुखानं त्यांना या म्हणावं;
ऊंची, मखमली, आसनं देऊन
प्रेमानं बसा म्हणावं;
स्थानापन्न झाल्या की हळूच विचारावं,
काय घेणार ?
त्याही बेट्या मिस्कील ;
निष्पाप बालपणाचा आव आणून विचारतील,
काय देणार ?
मोकळेपणानं उत्तर द्यावं
मागाल ते तुमचंच...
मग एक हळूच म्हणेल, डोळे द्या,
पुन्हा पुन्हा आमच्याकडे वळून पाहणारे --
दुसरी म्हणेल, हात द्या
न धरता आम्हाला पकडून ठेवणारे --
तिसरी म्हणेल, शब्द द्या,
इंद्रधनुष्यातले रंग आमच्यावर उधळणारे --

पण कुणाला काहीच देऊ नये;
शब्द तर मुळीच देऊ नयेत !
चवथी, पाचवी -- सगळ्या होतील पुढं;
पण मधभरल्या गळ्यानं नुसतंच हूं म्हणावं.
डोळे मिटून घ्यावेत
अन सगळ्यांना कुरवाळीत, कुरवाळीत
मनाच्या तळमहालात झोपवून टाकावं
-- पुन्हा कधीतरी अशीच गर्दी करण्यासाठी


कवियत्री - पद्मा गोळे

वाटा

हरवलेल्या वाटा....
चुकलेल्या वाटा....
रुळलेल्या वाटा....
पहिली धरते एक हात;
दुसरी धरते दुसरा;
पाय ओढून तिसरी म्हणते
आता इथेच पसरा !


कवियत्री - पद्मा गोळे

पोपट आणि ड्रायव्हर !

एकदा एक पोपट उडत जात असतांना एक ट्रकला धडकतो आणि बेशुद्ध पडतो.

त्या ट्रक ड्रायव्हरला त्याची दया येते.

तो त्या पोपटाला पकडतो, फार काळजीपूर्वक घरी आणतो व एका पिंजर्‍यात ठेवतो.

ट्रक ड्रायव्हरच्या उपचारांनी पोपटाला शुद्ध येते व स्वत:ला पिंजर्‍यात बघून तो घाबरतो व जोरात ओरडतो," अरे बापरे जेल. तो ट्रक ड्रायव्हर मेला की काय."

चार होत्या पक्षिणी त्या

चार होत्या पक्षिणी त्या रात्र होती वादळी
चार स्वप्ने बांधणारी एक होती साखळी

दोन होत्या त्यात हंसी राजहंसी एक ती
आणि एकीला कळेना जात माझी कोणती

शुभ्र पंखांतून त्यांच्या वीज होती साठली
ना कळे एकीस की माझी लियाकत कोठली

तोडुनी आंधी तुफाने चालल्या ती चालली
तीन होत्या दीपमाळा एक होती सावली

तोच आला तीर कोठुन जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली जात माझी कोकिळा

कोकिळेने काय केले? गीत झाडांना दिले
आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले

मी सुरांच्या अत्तराने रात्र सारी शिंपिली
साधनेवर वेदनेवर रागदारी ओतली

ती म्हणाली, एकटी मी राहिले तर राहिले
या स्वरांचे सूर्य झाले, त्यात सारे पावले



कवी - कुसुमाग्रज
(वीज म्हणाली धरतीला)

राष्ट्रपिता

एकदा देवाने माधवराव शिंद्यांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" माधवराव शिंदे म्हणाले, "एक". देवाने खूश होऊन त्यांना एक नवीकोरी मर्सिडीझ भेट म्हणून दिली.

नंतर देवाने विलासराव देशमुखांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" विलासराव म्हणाले, "तीन". देव थोडासा नाराज झाला आणि त्याने त्यांना एक होंडा सिटी भेट म्हणून दिली.

त्यानंतर देवाने लालूप्रसाद यादवांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" लालू म्हणाले, "बारा". देव चिडला. त्याने लालूंना एक जुनीपुराणी स्कूटर दिली.

हे तिघे रस्त्यातून जात असताना काही वेळाने त्यांना गांधीजी चालत येताना दिसले. लालूंनी गांधीजींना विचारलं, "काय हो गांधीजी, देवाने तुम्हाला काही दिलं नाही वाटतं?"
गांधीजी म्हणाले, "ते राहू द्या. आधी मला सांगा की देवाला कोणी सांगितलं की मला 'राष्ट्रपिता' म्हणतात?"

हदग्याच्या एखाद्या पावसात

हदग्याच्या एखाद्या पावसात
उलगून जाते विस्मरण
आणि नादावल्या काळाचे अंगण पुन्हा दिसू लागते
पाय नाचू लागतात
जुनी हरवलेली गाणी मिळतात
आभाळाच्या हत्तीभोवती फेर धरण्याइतके
पुन्हा लहान होतो आपण
हातावर टेकवलेली खिरापत, तसे हसावे कुणी
आणि गोड व्हावा सरता दिवस
असे आपसूक मिळतात सुखाचे क्षण
सगळ्या भवतालावरचा बाळविश्वास
नकळत आपल्यात रुजून मोठा झालेला दिसतो पुन्हा
आणि करावासा वाटतो परत एकदा
आभाळाएवढ्या आयुष्याभोवती फेर धरत
आतबाहेर चिंब भिजण्याचा सचैल गुन्हा


कवियत्री - अरुणा ढेरे

आधार

जोवर फुलांच्या बागा फुलताहेत,
पहाडामागे वारा अडत नाही.
शब्दांपोटी सूर्योदयासारखा अर्थ आहे,
फळे नित्यनेमाने पिकत आहेत,
माणसाला उपकार आणि आणि त्याची
निर्व्याज परतफेड करता येत आहे,
एखाद्याची महायात्रा पाहून एखादा
सहजच नमस्कार करतो आहे
तोवर आम्हाला एकमेकांबरोबर
अबोला धरण्याचा अधिकार नाही.
आम्ही आमच्या पडजिभेइतकेच
सर्वार्थांनी एकमेकांचे आहोत.
कालच प्रत्येक क्षण उष्टावतो
तरी काल ताजा टवटवीत आहे.

ईश्वराने दिलेले हे अंग प्रत्येकजण
बारा दिवसाच्या अर्भकाइतक्याच
हळुवारपणे सर्व तर्‍हांनी धूत राहतो,
आपापल्या मापाचे पापपुण्य बेतून
सगळे आयुष्य कारणी लावतो.
म्हणून कधीतरीची प्रसन्नताही
मनाची उन्हे करते आणि सारा ताप
उन्हातला पाऊस होऊन टपटपतो.
धरेच्या पोटात पाणी आहे,
घशाखाली त्याची तहान आहे,
माणसाच्या पोटात आनंद आहे
म्हणूनच नेहमी भूक लागते,
इंद्रियांची वेल पसरत पसरत
झोपेचा गारेगार मोगरा फुलतो.

शेतकरी पिकाला जपत असतो
पहिलटकरणीसारखा, रात्रंदिवस
कायावाचामनाचा पावसाळा करुन
मातीच्या कणाकणातून झिरपतो,
अशा वेळी आकाशाच्या कोनन कोनाचा
स्पर्श त्याला झुळकाझुळकातून होतो,
हवेचेही कोनेकोपरे प्रत्यक्ष चाचपतो.
दाण्यादाण्यातील धारोष्ण दुधाची जाग
पाखरांच्या पिसापिसातून जाते,
थव्याथव्यांनी आनंद उतरतो,
शेतमळा डुलतो, वारा डुलतो,
शेताचा पिका पिका दरवळ
झुळझुळत्या झर्‍यासारखा
शेतकर्‍याच्या मनातून वाहतो,
सुईणीच्या मुखावरील कष्टासारखी
रसरसून लखाखते कोयतीची धार.

जीवनावर प्रेम करणारे सगळे जण
एकमेकांना नमस्कार करीत करीत
सुखदुःख वाटतात जिवाभावाने.
सर्वांना पोटाशी धरुन सर्वांवर
स्वत:च्या आयुष्याची सावली धरतात,
एखादा अनवाणी चालणारा विरक्‍त पाहून
सांगतात : सर्वांच्या पायतळी जमीन आहे.
एखाद्या मेलेल्या मित्राच्या स्मृतीवर
हलकेच कधीतरी अमोल क्षणांचा
एखादा ताटवा वाहून रात्रभर जागतात,
आणि मग कधीतरी झोपेतून उठून
स्वत:वरच आनंदाश्रू ढाळतात,
स्वत:लाच नमस्कार करतात.

सखीने सजणाल्या दिलेल्या गुलाबाच्या
गेंदाप्रमाणे, वचनाप्रमाणे प्रत्येकानेच
कधीतरी मन दिले - घेतलेले असतो;
सखी-सजणाच्या संकेतस्थलासारखेच
हे आयुष्यही एकमेकांचेच आहे.

या जगण्यात खोल बुडी मारुन आलेला
एखादा कोणी सर्वांना पोटाशी धरणारा
आणि ते पोटाशी धरले गेलेले सगळे -
दोघांनाही एकमेकांचाच आधार आहे


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें
रमेश : माझ्या प्रेयसीने अशी मागणी केली ज्यामुळे मी तिला सोडून दिले .
दिनेश : पण तिची मागणी तरी काय होती ?
.
.
.
... .
.
.
.
.

रमेश : लग्नाची !

निरोप

बाबा रे,

निरोपाचा सोहळा करण्याइतके
जवळ काही उरले तरी आहे का ?

कबूल की दिल्याघेतल्या गोष्टींना
मनाचा वास होता एकेकाळी धुंद
पण आता चिमूटभर कोरडी मातीच ना नुसती ?
एक फोन उचलला तरी मधल्या अंतरातून
तारेवर सरसरतेय निर्जन वाळवंटच लांबलचक किती !

असं बघ
ही माती आणि ही वाळूदेखील
ओली असती पुरेशी
तर पेरली असती रोपे हिरवी
उद्या घमघमतील अशी
निदान नुसतीच रंग उधळणारी, जशी गुलबशी

ते वृक्षारोपण आणि एखादे स्वप्नभरले नाजूक भाषण
एकमेकांसाठी एवढे तरी केलेच असते आपण.

म्हणून म्हणते,
हट्ट नको बाबा रे
आंदोळून गेले एकवार सुखाचे वारे
तथास्तु म्हण, एवढेच पुरे.


कवियत्री - अरूणा ढेरे

सकाळी उजाडता उजाडता

सकाळी उजाडता उजाडता उठले, पाहिलं
..... आणि कमालच!
एक वीट निखळलेली.
मी उचलून लावली ती जिथल्या तिथे.
पुन्हा चार दिवसांनी
पूर्वा लाल व्हायच्या आधीच उठले, पाहिलं,
तर अर्ध्याअधिक विटा उचकटून फेकलेल्या !
पुन्हा माझी कारागिरी!
पुन्हा काही दिवसांनी
मध्यरात्रीच जाग आली, पाहिलं :
थडगं पूर्ण उस्कटलेलं !
आणि उघडलेल्या शवपेटीत
मन चक्क डोळे चोळीत
उठून बसलेलं!
तसं रडतच होतं म्हणा. पण जिवंत?
अकल्पनीय!
म्हणजे थडगं बांधूनही मन...
याला निलाजरं म्हणायचं की असहाय्य !


कवयित्री - पद्मा गोळे

फुकटात केस कापुन

एक माणुस मुलाला घेऊन सलुन मध्ये गेला. स्वता:चे केस कापुन घेतल्यावर तो दुकानदाराला म्हणाला, "मी पंधरा मिनटात येतो. तो पर्यंत याचे केस मस्त कापुन ठेव."

दुकानदाराने मुलाचे केस कापुन ठेवले. दोन तास झाले तरी तो माणुस परत आला नाही. दुकानदार त्या मुलाला म्हणाला, "अरे बाळा, तुझ्या बरोबर जे गृहस्थ होते ते कुठे गेले? कोण होते ते तुझे ?"

मुलगा म्हणाला, "मला ते कुठे गेले हे माहीत नाही, आणि ते कोण होते हे सुद्धा माहित नाही. मला ते म्हणाला, चल तुला फुकटात केस कापुन देतो. बाकी मला काही माहित नाही."

CCTV चा फायदा

पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले...
दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल रूमला आलेला पहिला फोन..:

.
.
.
.
"अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना,
चितळे उघडले आहेत का...?"

निसर्ग

प्रेमळ पवित्र करी तुझा स्पर्श !

हास हास बाई कलिके एकदा

आपुल्या सुगंधा सोड सोड

लडिवाळपणे केल्या गुदगुल्या

परी काही केल्या हासेना ती

तिला फुलवाया हवा रविकर

वायूची लहर खेळकर

व्यर्थ हे करिती गाण्याचा आग्रह

नाही अनुग्रह देवा, तुझा

प्रेमळ पवित्र करी तुझा स्पर्श

गाईन सहर्ष वाडेकोडे


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

अजुनी चालतोचि वाट

अजुनी चालतोचि वाट! माळ हा सरेना
विश्रांतिस्थल केव्हा यायचे कळेना!

त्राण न देहात लेश, पाय टाकवेना,
गरगर शिर फिरत अजि होय पुरी दैना!

सुखकर संदेश अमित पोचविले कोणा,
भार वाहुनी परार्थ जाहलो दिवाणा!

काट्य़ांवरी घातलाची जीव तयासाठी,
हसवाया या केली किती आटाआटी!

हेच खास माझे घर म्हणुनी शीण केला,
उमगुनी मग चूक किती अश्रुसेक झाला;

दिन गेले, मास तसे वत्सरेही गेली,
निकट वाटते जीवनसंध्या ही आली!

कुठुनी निघालो, कोठे जायचे न ठावे,
मार्गातच काय सकळ आयु सरुनि जावे!

काय निरुद्देश सर्व जीवन मम होते
मरुसरितेपरी अवचित झरुनि जायचे ते?

पुरे! पुरे ही असली मुशाफरी आता,
या धुळीत दगडावर टेकलाच माथा


कवी - ए.पां.रेंदाळकर

दत्ताचा पाळणा

जो जो जो जो रे सुकुमारा । दत्तात्रया अवतारा ॥धृ॥

कमलासन विष्णू त्रिपुरारी । अत्रिमुनीचे घरी ।

सत्त्व हरु आले नवल परी । भ्रम दवडिला दुरी ॥१॥

प्रसन्न त्रिमूर्ति होऊनी । पुत्रत्वा पावुनि ।

हर्ष झालासे त्रिभुवनी । राहे ॠषिचे सदनी ॥२॥

पालख बांधविला सायासी । निर्गुण ऋषिचे वंशी ।

पुत्र जन्माला अविनाशी । अनसूयेचे कुशी ॥३॥

षट्दश नामासी आधार । दत्तात्रय अवतार ।

कृष्णदासासी सुख थोर । आनंद होतो फार ॥४॥

आनंदलोक

माझ्या आनंदलोकात
चंद्र मावळत नाही
दर्या अथांग प्रेमाचा
कधी वादळत नाही

माझ्या आनंदलोकात
केले वसंताने घर
आंब्या-आंब्याच्या फांदीला
फुटे कोकिळेचा स्वर

सात रंगांची मैफल
वाहे येथे हवेतून
येथे मरणही नाचे
मोरपिसारा होऊन.


कवी - कुसुमाग्रज

कोकिळा

कोकिळा जेव्हा सुरांचा
फ़ुलविते पंखा निळा
आम्र लेउनी पंख तेव्हा
होउ बघतो कोकिळा

कोकिळा जेव्हा स्वरांची
उघडिते अबदागिरी
जंगले शाहीर होती
शब्द होते मंजिरी

कोकिळा जेव्हा स्वरांची
काश्मिरे करते उभी
हो नदीची नृत्यशाला
रुमझुमे वारा नभी

कोकिळा जेव्हा स्वरांची
माळते सुमनावली
तेधवा वणवा म्हणे मी
चंदनाची सावली

कोकिळा घाली स्वरांचा
मोरपंखी फ़ुल्वरा
जांभळ्या डोही झपूर्झा
खेळती त्या आसरा

कोकिळा जेव्हा ढगांना
आर्ततेने बाहते
धूसरावर स्वप्न त्यांच्या
एक सुंदर वाहते

कोकिळा जेव्हा सुरांचे
गेंद गगनी फ़ेकते
अंचलावर पैठणीच्या
रात्र अत्तर ओतते

कोकिळा स्वरशिल्प असले
बांधता शून्यावरी
आसमंते होत सारी
क्षुब्ध आणिक बावरी

कोकिळा शिशिरात शिरुनी
बर्फ़ जेव्हा होतसे
या जगाला सर्व तेव्हा
जाग थोडी येतसे


कवी - कुसुमाग्रज

एकाकी

’तुझा’ आणि ’तुझ्यासाठी’
शब्द सारे खोटे,
खरी फ़क्त क्वचित कधी
बिलगणारी बोटे
बिलगणारी बोटे तीही
बिलगून सुद्धा दूर
खोल खोल भुयारात
कण्हणारे सूर.
दूरदूरच्या ओसाडीत
भटकणारे पाय
त्वचेमागील एकाकीपण
कधी सरते काय?


कवियत्री - शांता शेळके

पालखीचे भोई

पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई
पालखीत कोण? आम्हां पुसायाचे नाही!

घराण्याची रीत जुनी पीढीजात धंदा
पोटाबरोबर जगी जन्मा आला खांदा
खांद्याकडे बघूनीच सोयरीक होई ॥

काटंकुटं किडकाची लागे कधी वाट
कधी उतरण, कधी चढणीचा घाट
तरी पाय चालतात, कुरकुर नाही ॥

वाहणारा आला तेव्हा बसणारा आला
मागणारा आला तेव्हा देणाराही आला
देणाऱ्याचं ओझं काय न्यावयाचं नाही? ॥

बायलीचा पडे कधी खांद्यावरती हातं
कडे घेतलेलं पोर तिथं झोपी जातं
पालखीचा दांडा मग लई जड होई ॥


कवि - शंकर वैद्य
कवितासंग्रह - दर्शन

ती माणसेच होती..!

ती माणसेच होती..!
देहाविना जळाली..ती माणसेच होती..
पुन्हा फुलून आली..ती माणसेच होती..!!

गोळी समोर छाती देण्यात अर्थ नाही --'
...हे सांगुनी पळाली..ती माणसेच होती..!!

फासावरी खुन्यांना देवू नका परन्तू--
ज्यांची शिकार झाली..ती माणसेच होती..!!

माझा तुझ्या लढ्याशी संबंध काय येतो ?
...ऐसे मला म्हणाली..ती माणसेच होती..!!

चवचाल उंदरांना साऱ्या बिळात जागा..
जी पोरकी निघाली..ती माणसेच होती..!!

घनदाट पावसाचे केले तुफान वादे..
..अन कोरडी निघाली..ती माणसेच होती..!!

आता कुणाकुणाचे मांडू हिशेब बोला..?
जी आरशास भ्याली..ती माणसेच होती..!!
                                             

कवी - ज्ञानेश वाकुडकर

हा असा पाउस पडत असताना

हा असा पाउस पडत असताना
तुमच्यासारख्या अनोळखी तरूणीला विश्वासानं माझ्या छत्रीत यावंस वाटलं…. याचं बरं वाटलं..!!
ह्या अशा पावसाच्या वेळी कुणीतरी बरोबर हवंच…!

छत्री तशी छोटीच आहे, पण घेईल सामावून दोघांना..
समजूतीने चाललो तर…!
पुढं पाणी बरंच साचलेलं आहे, रस्ता चाचपीतच पावलं टाकायला हवीत.

शक्य असेल तर माझ्या हाताचा…
अं…खांद्याचा आधार घ्या,
म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर नीट चालत रहाल… न पडता.
शिवाय तुम्हाला पाहीजे तितकं तुम्ही मला दूरही ठेवू शकाल.

मी तुमच्याकडे न पाहताच चाललो आहे खरा…
पण मला कुठूनतरी केवड्याचा वास येतो आहे.
अं.. तुमचं नांव ‘केतकी’च आहे, असं मी धरून चाललो आहे.

तुमच्या बोटांतली अंगठी कळत्येय माझ्या खांद्याला;
लक्शं कसं सारखं तिथेच घोटाळतंय…

अरे..!
तुमच्या पोहचण्याचं ठिकाण तर मागेच गेलं.. तुम्ही बोलल्या कशा नाहीत?
अं…माझं काय..?!
अमूक एका ठिकाणी पोहचण्याचा उद्देश नव्हताच माझा.

पावसाचा जोर एकदम वाढलाय म्हणून तुमच्या हाताची पकड घट्ट झाल्यासारखी वाटत्येय.
पण घाबरू नका.. पुढचा रस्ता चांगला आहे!

एक पाहिलंत का?
तुम्ही अगदी नीट चालल्या आहात… माझ्याबरोबर..!
त्यामुळे….छत्री किती मोठी झाल्यासारखी वाटत्येय… नाही का..?!!


कवि - शंकर वैद्य
कवितासंग्रह - दर्शन

शेवटचे पान

आवर पद हे मत्त प्रवासी,

पहा जरा परतून प्रवासी, पहा जरा परतून्

घेत सुगंधाचा मागोसा

अलीपरी आलास विलासा

आणि फुलोरा लुटून जासी नव वेलीवरतून्

प्रवासी, पहा जरा परतून्

कलेकलेने चान्द खरोनी

आवस आली माझ्या गगनी

तोच उदेले दोन सुधाकर सुन्दर नयनातून्

प्रवासी, पहा जर परतून्

आणि चान्दणे सवे घेउनी

दुणावुनी तम जासी निघुनी

कशी साहुं रे धुन्द रात ही बाहेरून आतून्

प्रवासी, पहा जरा परतून्

क्षणभर येउन क्षणभर राहुन

क्षणभर हांसुन क्षणभर पाहुन

क्षणात जासी चार युगांचा घाव उरी घालून

प्रवासी, पहा जरा परतून्

वाळवण्टि तू एक पदाती

ना कुणि सोबत ना साङ्गाती

पायतळी पेटेल आग उद्दाम शिरावर ऊन्

प्रवासी, पहा जरा परतून्

परत पाखरा, खन्त कशाला

घालिन तनुची तुला दुशाला

उन्नत माझे ऊर उशाला घोष तुझा ज्यांतून्

प्रवासी, पहा जरा परतून्

जाणारच का-सुखात जा तर

बाग मोहरो तव वाटेवर

माग घेत तव चंद्र पुनेचा येवो गगनातून्

प्रवासी, पहा जरा परतून्

शेवटले जा पान मिटू दे

सुखेनैव यापुढे तुटू दे-

ह्रदयाचे रेशीम पदी तव बसलेले गुंतून

प्रवासी, पहा जरा परतून्


कवी - कुसुमाग्रज
ठिकाण - पुणे
सन - १९३८

प्रेमयोग

प्रेम कुणावरं करावं?....कुणावरही करावं
राधेच्या वत्सल स्तनावर करावं
कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावं
भीष्मद्रोणाच्या थकलेल्या तीर्थरुप चरणांवर करावं
दुर्योधन कर्णाच्या अभिमानी,अपराजित मरणांवर करावं
प्रेम कुणावरही करावं.....
सुदामा नावाच्या भटजीवर करावं
अर्जुन नावाच्या राजेन्द्रावर करावं
बासरीतुन पाझरनार्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं
यमुनेचा डोह जहरुन टाकणार्या कालियाच्या फण्यावर करावं
प्रेम कुणावरही करावं
रुक्मीनिच्या लालस ऒठावरं करावं
वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं
गाईच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं
मोराच्या पिसार्यातील अद्भुत लावण्यावर करावं
प्रेम काळजाच्या नात्यावर करावं
आणी
खङगाच्या पात्यावर कराव
प्रेम कुणावरही करावं
प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं
पेंद्याच्या बोबड्या बोलावर करावं
यशोदेच्या दुधावर....देवकीच्या आसवांवर करावं
प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नागराच्या फाळावर करावं
कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावरं करावं
ज्याला तारायचं...त्याच्यावर तर करावंच ,
पण ज्याला मारायचं,त्याच्यावरही करावं
प्रेम कुणावरही करावं
प्रेम योगावर कराव..प्रेम भोगावर करावं
आणी त्याहुन अधिक त्यागावर करावं
प्रेम चारी पुरुषा्रथाची झींग देणा्रया जीवनाच्या द्रवावर करावं
आणी पारध्याच्या बाणांनी घायाळ होवुन
अरण्यात एकाकी पडणार्या स्वताच्या शवांवरही करावं
प्रेम कुणावरही करावं कारण,
प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणी...
भविष्यकाळातील त्याच्या अभ्युदयाची आशा ऎकमेव..............


कवी - कुसुमाग्रज
देवा तुजपें माझ्या पूर्वजांचें ऋण । आहे ते कां नेदिसी अझून ।

अवगलासी झोडपणें । परि मी जाण जीवें जिरों नेदी ॥१॥

कळों येईल रोकडें । उभा करीन संतांपुढें ।

तुझें काय एवढें भय आपुलें मागतां ॥२॥

आजीवरी होतों नेणता । तों तुज फावलें रे अनंता ।

कवडीचा तों आतां । पडों नेदीन फेर ॥३॥

ठेविला ये जीवनीं जीव । म्हणे तुकयाचा बांधव ।

माझा गळा तुझा पाव । एके ठायी बांधेन ॥४॥


- संत कान्होबा महाराज
भवजळ काया पंचतत्त्वमाया । भजन उभया पंढरीरावो ॥ १ ॥

तारक पंढरी प्रत्यक्ष भीमातीरीं । ब्रीदें चराचरीं बोले वेदु ॥ २ ॥

माया मोहजाळ ममता निखळ । सेवितां सकळ होय हरी ॥ ३ ॥

निवृत्तीचें फळ सकळ हा गोपाळ । तोडी मायाजाळ संकीर्तने ॥ ४ ॥


- संत निवृत्तीनाथ
चोखा चोखट निर्मळ । तया अंगी नाही मळ ॥१॥

चोखा सुखाचा सागर । चोखा भक्तिचा आगर ॥२॥

चोखा प्रेमाची माउली । चोखा कृपेची साउली ॥३॥

चोखा मनाचें मोहन । वंका घाली लोटांगण ॥४॥


- संत वंका/ संत बंका
सर्व हा गोपाळ भरियेला.
काढले कुटाळ वासना वरळ ।
सर्व हा गोपाळ भरियेला ।।१।।

गेले पै परते शरीर दिसे ।
नाशिवंत भूते दूरी केली ।।२।।

स्थावर जंगम स्थावरिला राम ।
सर्वगत शाम नि:संदेहे ।।३।।

सोपान निवटे परब्रह्म घोटे ।
प्रपंच सपाट निवाटियेला ।।४।।


- संत सोपानदेव

वासुदेव

टळोनि गेले प्रहर तीन । काय निजतां झांकोन लोचन ।
आलों मागावया दान । नका विन्मुख होऊं जाण गा ॥ १ ॥

रामकृष्ण वासुदेवा । जाणवितों सकल जिवा ।
द्या मज दान वासुदेवा । मागुता फेरा नाहीं या गांवा गा ॥ २ ॥

आलों दुरुनी सायास । द्याल दान मागायास ।
नका करूं माझी निरास । धर्मसार फळ संसारास गा ॥ ३ ॥

एक भाव देवाकारणें । फारसें नलगे देणें घेणें ।
करा एकचित्त रिघा शरण । हेंचि मागणें तुम्हांकारणें गा ॥ ४ ॥

नका पाहूं काळ वेळां । दान देई वासुदेवा ।
व्हां सावध झोपेला । सेना न्हावी चरणीं लागला गा ॥ ५ ॥




- संत सेनान्हावी
संपवून कामधाम यावें तुझियाजवळ

पापणीशीं झेपलेंलें जरा सारावें जावळ

आवराया बाळचाळे कवळावें दोही हातीं

रागारागावत गाल कुस्करावे भुक्या ओठीं

घ्यावें बळेंच कुशींत गात अंगाई लाडकी

काऊ चिऊंची धाडावी हट्टी झोपेला पालखी !

गंध पाकळींत रात सांजावल्या क्षितिजांत

तशी यावी नीज डोळां रेशमाच्या पावलांत

जड मिटतां पापणी घ्यावें ओढून उबेंत

मायकुशीला लाभावें शिंपपण भाग्यवंत !

मंगलाष्टक

दारी मंडप हा असे सजविला लावुनिया तोरणे
वाद्ये सुस्वर वाजती सुखवती आलाप आवर्तने
येती सर्व सुवासिनी प्रमुदिता लेउनिया भूषणे
आहे मंगल कार्य आज सदनी, "कुर्यात सदा मंगलम

कुणी टाकला डाका

कुणी टाकला डाका तर कोणी लुटलेले आहे
ह्या शहराचे शटर सारखे उचकटलेले आहे

नव्यानवेल्या विवाहितेचे कुंकू पुसल्यावाणी
कुणीतरी ह्या तिन्हिसांजेला विस्कटलेले आहे

इथे कुणीही कुरूप नाही वेडेविद्रे नाही
हे जग कसल्या सुंदरतेने बरबटलेले आहे

काय तुझ्याही दारी आला तो फिरता विक्रेता
शर्टापेक्षा कपाळ ज्याचे कळकटलेले आहे

नवीन दुनिया सापडेल पण सवाल इतका आहे
काय तुझे तारू तितकेसे भरकटलेले आहे

कुठे न माझा मागमूस मी कसा पोचलो इथवर
मला कोणत्या जनावराने फरफटलेले आहे


कवी - चित्तरंजन भट

दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?

दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?
अश्रू का इतके पितो, खवळतो, खारावतो सारखा?

केव्हाचा खटल्यापरी गुदरतो आहेस तू जीवना ?
फिर्याद्यासम श्वासश्वास फिरतो, ठोठावतो सारखा

नाही ह्या दुनियेत मित्र अथवा वैरी मनासारखा
कोणी निर्दय एवढा न जपतो, जोजावतो सारखा

रक्ताने अमुच्या भिजून क्षितिजे तेजाळली येथली !
दर्पाने कसल्या प्रकाश इथला घोंघावतो सारखा ?

आभाळा, चमकून का निरखतो आहेस बाबा मला?
माझी झेप स्मरून मीच अजुनी भांबावतो सारखा !

भेटावा चकवा तसे दिवसही येतात भेटायला
आहे त्याच स्थळी अजून दुनिया, मी धावतो सारखा

"ये मागे परतून, खेळ अपुला मांडू नव्याने पुन्हा,"
माझ्यातील कुणी निरागस मला बोलावतो सारखा


कवी - चित्तरंजन भट

कोणत्या चिमटीत मी त्याला धरू ?

कोणत्या चिमटीत मी त्याला धरू ?
हिंडते मेंदूत जे फुलपाखरू

तू अता बघशील वाताहत खरी
लागले पाणी पुराचे ओसरू

गायही तेव्हाच पान्हा सोडते
लागते जेव्हा लुचाया वासरू

पटवती साऱ्या पुरातन ओळखी
कुठुन हे आले नवे माथेफिरू ?

खुळखुळाया लागले अश्रू किती !
केवढे लिहितोस तू गल्लाभरू

साठवू इतके सुगंधी सल कुठे ?
आठवू कोणास, कोणा विस्मरू ?

खूप नक्षीदार आहे शाल पण
एकमेकांनाच आता पांघरू

आपल्या दोघांमधे कोणी नको
ये मिठी नेसू, तिची वस्त्रे करू

पापण्यांनी चित्र आहे रेखले
रंग कुठले सांग ओठांनी भरू ?

ओठ, डोळे, केस, बाहू, हनुवटी
(हे करू की ते करू की ते करू)


कवी - चित्तरंजन भट

आनंदाने

हसता-हसता सरून जावे आनंदाने
मागे केवळ उरून जावे आनंदाने

डोळ्यांमधले सर्व चेहरे जिवंत व्हावे
अकस्मात घर भरून जावे आनंदाने

जिथे जिथे जाशील तू तुझ्या मागेमागे
बोट सुखाचे धरून जावे आनंदाने

पुन्हा मनाने अवखळ पोरासमान व्हावे
घरात यावे, घरून जावे आनंदाने

घरास जेव्हा पाय लावणे अशक्य व्हावे
नुसते दारावरून जावे आनंदाने

मिळालीच तर अशी देखणी व्यथा मिळावी
जिला पाहुनी झुरून जावे आनंदाने

सल कुठलाही जपून कोणा स्मरण्यापेक्षा
हेच बरे विस्मरून जावे आनंदाने

दोन घडींच्या भेटीसाठी यावे आणिक
जन्मासाठी ठरून जावे आनंदाने

जाण्याची घटका आली की अवतीभवती
जिवलग गोळा करून जावे आनंदाने


कवी - चित्तरंजन भट

शिल्प

जे सांगायचे
ते हवे कसे अगदी घट्ट
बांधेसूद्;
प्रत्येक शब्दाला एक प्रतिशब्द,
खुंट्या पिरगाळून
जागच्या जागी सुतंत्र
टांगलेला;
एकंदर ठाण कसे अगदी
वास्तुशिल्पित.
पण मध्येच
जे मधाचे पक्षी येऊन हलकारतात,
सळंग एखाद्या झाडाची सतारलेली
नक्षी वेल्हाळते,
वार्‍याची पताका चित्रावते,
त्याने सगळी आबोहवा वेगळून जाते
- मनासारखी.
शब्दांना
पटत नाही आपली पहिली ओळख.
ते बिथरतात
भलत्याच खुंट्या धरून बसतात्;
म्हणतात :
आम्हाला एक नवी भाषा
घालून द्या.
मी म्हणतो : हो, हो;
उगाच त्यांना चुचकारीत.


कवी -  पु.शि.रेगे

केव्हातरी मिटण्यासाठीच

केव्हातरी मिटण्यासाठीच
काळजामधला श्वास असतो
वाट केव्हा वैरीण झाली
तरी झाडे प्रेमळ होती
लाल जांभळे भेटून गेली
साथीत उरली निळी नाती
काळोखाच्या गुहेतदेखील
धडपडणारे किरण होते
पेटविलेल्या दीपालींना
वादळवारयात मरण होते
असणे आता असत असत
नसण्यापाशी अडले आहे
जिव्हाळ्याच्या चिता पेटवीत
बरेच चालणे घडले आहे
माथ्यावरचा आभाळबाबा
सवाल आता पुसत नाही
पृथ्वी झाली पावलापुरती
अल्याड पल्याड दिसत नाही


कवी - कुसुमाग्रज

आधार

चिंब चिंब भिजतो आहे
भिजता भिजता मातीमध्ये
पुन्हा एकदा रुजतो आहे
हिरवे कोवळे कोंब माती
माझ्या भोवती बांधते आहे
सरते पाश विरते नाते….
पुन्हा एकदा सांधते आहे

अहो माझे तारणहार
जांभळे मेघ धुवांधार
तेवढा पाऊस माघार घ्या
आकाशातल्या प्रवासाला
आता तरी आधार द्या
आधार म्हणजे
निराधार…



कवि -  कुसुमाग्रज
कवितासंग्रह - छंदोमयी

जखमांचं देणं

आकाशपण
हटता हटत नाही
मातीपण
मिटता मिटत नाही
आकाश मातीच्या
या संघर्षात
माझ्या जखमांचं देणं
फिटता फिटत नाही.



कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - छंदोमयी

सातवा

चमच्यांच्या स्टँडवर

सात चमचे होते

एक चमचा एक दिवशी

गहाळ झाला

उरलेल्या सहांच्या गळ्यातून

प्रथमच

अनावर हुंदका फुटला

‘ ती असती तर’ – ते उद्गारले,

तो हरवला नसता

मीही अनावरपणे

सातवा चमचा झालो

आणि त्याची रिकामी जागा घेउन

सहांच्या हुंदक्यात

सामील झालो – आणि

पुटपुटलो;

खरं आहे, मित्रांनो

ती असती तर

मी हरवलो नसतो.


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मुक्तायन

जोगीण

साद घालशील
तेव्हाच येईन
जितकं मागशील
तितकच देईन

दिल्यानंतर
देहावेगळ्या
सावलीसारखी
निघून जाईन.

तुझा मुगुट
मागणार नाही
सभेत नातं
सांगणार नाही

माझ्यामधल्या
तुझेपणात
जोगीण बनून
जगत राहीन.


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - छंदोमयी