निरोप

बाळ, चाललासे रणा
घरा बांधिते तोरण,
पंचप्राणांच्या ज्योतींनीं
तुज करिते औक्षण.

याच विक्रमी बाहुंनी
स्वतंत्रता राखायची,
खांद्यावरी या विसावे
शांती उद्याच्या जगाची.

म्हणूनिया माझ्या डोळा
नाही थेंबही दुःखाचा,
मीही महाराष्ट् कन्या
धर्मं जाणते विरांचा.

नाही एकही हुंदका
मुखावाटे काढणार,
मीच लावुनी ठेविली
तुझ्या तलवारीस धार.

अशुभाची सावलीही
नाही पडणार येथे
अरे मीही सांगते ना
जीजा लक्ष्मीशी नाते.

तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना
शक्ती देईल भवानी,
शिवरायांचे स्वरुप
आठवावे रणांगणी.

घन्य करी माझी कूस
येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने
दूधभात भरवीन.


कवियत्री - पद्मा गोळे

२ टिप्पण्या: