पढत मूर्ख

आठ वर्षांचा घेलाराम कच्छमधून बापाचे बोट धरून पुण्यात आला. बापाने किराणामालाच्या दुकानात नोकरी केली. हळूहळू घेलारामच्या बापाने स्वतःचे दुकान टाकले. दुकानाच्या मागेच राहायला लागले. दुकान बंद करताना गिऱ्हाईक आले तर पुन्हा दार उघडून त्याला माल देत. पुण्याच्या प्रसिद्ध पेठामधल्या पाट्या त्याच्या दुकानावर नव्हत्या. तसेच एक पैसा नफ्यावर ते धंदा करत. घेलाराम लहान वयातच दुकानावर बसायला लागला. कोणती गोष्ट केवढ्याला विकायची हे सांगून बाप माल आणायला, येणी वसूल करायला जायचा. पाढे पाठ करायला घेलारामला शाळेत जावे लागले नाही. दुकानाचा जम बसला. घेलारामच्या बापाने त्याच्या दोन्ही मुलींची लग्ने करून दिली. घेलारामचेही लग्न कच्छमधील मुलगी पाहून करून दिले.


घेलारामच्या बरोबरीने त्याची नवपरिणित पत्नीही दुकानात पुड्या बांधू लागली. ही गोष्ट आहे 1955 सालामधली. घेलारामने दुकान आणखी वाढविले. दुकानामागची राहण्याची जागाही वाढवली. पैसा मिळाला आणि वाढला तरी त्याच्या गाठी मारलेले धोतर नवीन धोतरात बदलले नाही. घेलाराम घेलाशेठ झाला. दुकान उघडायची व बंद व्हायची वेळ कधीही बदलली नाही. तुफान पाऊस असो, कडाक्‍याची थंडी असो, सकाळी सात वाजता त्याचे दुकान उघडत असे. इतर लोक गाजावाजा करून जंक फूडचे स्टॉल टाकतात. सुरुवातीचा हुरूप संपल्यानंतर दुकानाच्या वेळा आकुंचन पावतात. खूप पाऊस असेल तर गिऱ्हाईक येणारच नाही अशा ठाम समजुतीने दुकान उघडले जात नाही. थंडीत दुकान लवकर बंद होते. असे होत होत दुकान दुसऱ्या कुणालातरी चालवायला दिले जाते.


वर्षांमागून वर्षे गेली. आसपासचा परिसर बदलला. घेलाशेठच्या दुकानाच्या आजूबाजूला त्याच्याच धंद्यातील इतर दुकाने आली. घेलाशेठ मजेत. माल कुठून, कसा स्वस्त मिळवायचा, त्याची प्रतवारी कशी करायची व तो कसा विकायचा हे ज्ञान घेलाशेठच्या मुठीत बंद होते.

घेलाशेठने त्याच्या मुलाला शाळेत घातले. मुलगा मॅट्रीकपर्यंत पोचला. नंतर दुकानावर आला. घेलाशेठचे समोर एकाने किराणामालाचे दुकान टाकले. घेलाशेठचा मुख्य धंदा तेल विक्रीचा होता; वाणसामान जोडधंदा. समोरच्याने दुकानाची भरपूर जाहिरात केली. दुकानाच्या ओपनिंगला घेलाशेठला बोलावले. ते आवर्जून गेले.


“”आओ, जी घेलाशेठ आओ” “”जय गोपाल हरिराम” “”मारो डिकरा बिझनेस मॅनेजमेंट की शिक्षा पुरी करके आयो” हरिरामचं पॉश कपड्यातलं शिक्षित पोरगं घेलाशेठकडे बेरकी नजरेनं पाहत होतं. हरिरामचे दुकान सुरू झाले आणि त्याच्या मुलाने दहा दिवसांत “प्राइस वॉर’ सुरू केले. घेलाशेठच्या दुकानात तेलाच्या भावाची पाटी होती “साठ रुपये किलो’. समोरच्या दुकानात पाटी लागली 58 रुपये. गिऱ्हाईकाला किमतीशी सोयसुतक असतं. आठ दिवसांनी घेलाशेठच्या दुकानात 58 रुपयांची पाटी लागली. जुने गिऱ्हाईक परत आले. काही दिवस गेले. समोरच्या दुकानात 55 रुपयांची पाटी लागली. आठ दिवसांनी घेलाशेठचे दुकानातही 55 रुपयांची पाटी. लक्षण ठीक दिसत नव्हते. ही व्यापारी पद्धत नसते. हरिरामच्या दुकानात पन्नासची पाटी लागली. आठ दिवसांनी घेलाशेठच्या दुकानात 48 रुपयांची पाटी. घेलाशेठचं पोरगं गडबडलं.


“”बापू अपना धंदा बंद हो जायेगा” घेलाशेठने त्याला गप्प राहायला सांगितले. आता हरिरामची पाटी 45 वर आली. घेलाशेठने 40 ची पाटी लावली. पुन्हा हरिरामने 35 ची पाटी लावली. घेलाशेठचे गिऱ्हाईक तुटले. घेलाशेठ निवांत. पोरगं गडबडलेलं. हरिरामचे दुकान पंचक्रोशीत स्वस्त म्हणून रांगा लागल्या. चार महिन्यानंतर हरिरामच्या दुकानाचे दिवाळे निघाले. घेलारामने पुन्हा 60 रुपयांची पाटी लावली. हरिरामने त्याच्या बिझिनेस मॅनेजमेंटवाल्या मुलाला चांगलेच धारेवर धरले. बिनशिकलेल्या घेलाशेठने कोणाचा सल्ला घेतला हा विचार हरिरामला छळू लागला.


एक दिवस हरिराम घेलाशेठच्या दुकानावर आले. “”आओ, आओ भाई” व्यापारी चहा झाला. हरिरामने हळूच विषयाला हात घातला. “”थारो कन्सलटंट कौन छे, तू तो पढा लिखा नही” घेलाशेठ मिश्‍कील हसले. “”अरे हरिराम आपल्या धंद्यात आपला कन्सलटंट आपले जीवन असते.”

“”मी समजलो नाय.” “”अरे, तुझ्या पोराने आपल्या व्यापारी वर्गातल्या रितीला सोडून धंदा केला. तू भाव पाडले आणि वस्तू मूळ खरेदी किमतीपेक्षा कमी भावाने विकलेस मी फक्‍त पाटीवरचे भाव बदलले. पण…” “”पण काय शेठ?” हरिराम अधिर झाला. “”मी फक्‍त पाट्या कमी भावाच्या लावल्या. वस्तू विकलीच नाही. गिऱ्हाईक आले की, माझ्याकड नाही सांगून तुझ्याकडे पाठवले” हरिरामचं पोरगं अजूनही पुस्तक चाळतच बसलंय.

😊

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा