कृपा उपजली जयराम स्वामीसी । आले पाहायासी भाव माझा ॥ १ ॥
देखोनी तयासी आनंद वाटला । कंठ कोंदटला आनंदाने ॥ २ ॥
मनेंचि आरती केला नमस्कार । पूजिला साचार मनामाजीं ॥ ३ ॥
बहिणी म्हणे त्याचे मनांतील हेत । ओळखे निश्चित पांडुरंगा ॥ ४ ॥

- संत बहिणाबाई 

गांव

खरं खरं सांगतो राव् ,
उगीच न्हायी ठेवत नाव....

या मोबाईलनं बिघडवलं
आता सारं माझ गांव....

वडाचा मोठा पार होता,
वारा थंडगार होता.....

गप्पा ,निरोप,खुशाली,
कहाण्यांचा बाजार होता....

काय चाललय?कस चाललय?
एकमेकांत संवाद हाेता....

कबड्डी होती,कुस्ती होती,
आट्या - पाट्या,लपा-छपी,

सुर-पारंब्यावरचे झाेके हाेते,
आेढ्याच्या डाेहात पाेहणे हाेत.

आंब्याच्या झाडावरच बसुन,
कच्चे-पीकलेले आंबे खायची मजा हाेती...

विटी-दांडु,खेळाच मैदान होतं,
इतर अनेक मैंदानी खेळ होते...

उनाडक्या होत्या,मस्ती होती,
आप-आपसात मेळ होता...

चिंचा होत्या,बोरं होती,
आंबे हाेते,ऊस हाेता...

गोठाभर ढोरं होती...
ढाेरां बराेबर पाेर हाेती....

जिवाला जीव देनारे,
दिलदार मित्र होते......

किर्तन होतं,भजन होतं,
जात्यावरचं गानं होतं.…

शाळेतल्या कवितेले,
आनंदाचं उधान होतं...

पण..............

जसं गावात हा काेठुन,
मोबाईल आला,नेट आलं....

चँनलच कनिक्शन,
घरा घरात थेटआलं...

गजबजलेलं गाव माझ,
आता निर्जन बेट झाले....

सकाळ संध्याकाळ सारी माणस,
टीव्हीलाच चिटकुन राहीली..

रस्तावर वर्दळ करणारी माणसे,
टी वी पुढंच सेट झालीत.....

मैंदानावरील मुल सारी,
देवळामागच्या अंधारात...

माेबाईल मध्येच,गुंतली सारी......

सुनेसुने झाले वडाचे पार,
मुके झाले देवळाचे ओटे....

दिवस-रात्र मोबाईल वर,
नुसती फिरवत राहतात बोटे.....

खर-खर सांगताे राव.....
या माेबईलनच बीघडवल माझ सार गाव !


कवी - सतिश आहेर
मच्छ जैसा जळावांचोनी तडफडी । तैसीच आवडी तुकोबाची ॥ १ ॥
अंतरींचा साक्षी असेल जो प्राणी । अनुभवें मनीं जाणेल तो ॥ २ ॥
तृषितांसी जैसें आवडे जीवन । तैसा पिंड प्राणावीण तया ॥ ३ ॥
बहिणी म्हणे हेत तुकोबांचे पायीं । ऐकोनिया देहीं पदें त्यांचीं ॥ ४ ॥

- संत बहिणाबाई

मित्रा , हा भारत आहे

एक म्हैस जंगलात घाबरून पळत होती .

एका उंदराने,विचारले " अगं, इतकी का पळतेस ?"

म्हैस: जंगलात पोलिस आलेत हत्ती पकडायला.

उंदीर : पण , तू तर म्हैस आहेस . तू का पळतेस ?

म्हैस :  मित्रा , हा भारत आहे .
एकदा त्यांनी पकडले की पुढची वीस वर्ष कोर्टात सिद्ध करावं लागेल की मी हत्ती नाही , म्हैस आहे .
ऐकून उंदीरही पळू लागला .

** आम्ही असे शिकलो **

"आयते शर्ट
ते बी ढगळ,
चड्डीला आमच्या
मागून ठिगळ..
             त्यावर करतो
             तांब्यानी प्रेस,
             तयार आमचा
             शाळेचा ड्रेस..
       
खताची पिशवी
स्कूल बॅग,
ओढ्याचं पाणी
वाॅटर बॅग..
       
            धोतराचं फडकं
            आमचं टिफीन,
            खिशात ठेवुन 
            करतो इन..
करगोटा आमचा
असे बेल्ट,
लाकडाची चावी
होईल का फेल ?
            मिरचीचा ठेचा
            लोणच्याचा खार,
            हाच आमचा
            पोषण आहार..
            
रानातला रानमेवा
भारी मौज,
अनवाणी पाय
आमचे शुज..
             काट्यांच रूतणं
             दगडांची ठेच,
             कसा सोडवायचा
             हा सारा पेच..
मुसळधार पाऊस
पाण्याचा कडेलोट,
पोत्याचा घोंगटा
आमचा रेनकोट..
             जुन्या पुस्तकांची
             अर्धी किंमत,
             शिवलेल्या वह्यांची
             वेगळीच गंमत..
पेन मागता
कांडी मिळायची,
गाईड मागण्याची
भिती वाटायची..
             केस कापण्याची
             एकच शक्कल,
             गप्प बसायचे
             होईपर्यंत टक्कल..
गेले ते दिवस,राहिल्या त्या फक्त आठवणी....

पाषाण विठ्ठल

पाषाण विठ्ठल स्वप्नांतील तुका । प्रत्यक्ष कां सुखा अंतरावें ॥ १ ॥

घेईन उदंड सेवासुख देहीं । साक्ष या विदेही आहे मज ॥ २ ॥

भ्रताराची सेवा पतिव्रता करी । तरी ती उद्धरी उभय कुळें ॥ ३ ॥

बहिणी म्हणे माझ्या जीवाची विश्रांति । भ्रतारें समाप्ती जन्ममृत्यु ॥ ४ ॥


- संत बहिणाबाई

न बोलवे शब्द अंतरींचा


न बोलवे शब्द अंतरींचा धावा । नायके तुकोबा काय कीजे ॥ १ ॥

अदृष्ट करंटें साह्य न हो देव । अंतरींची हांव काय करूं ॥ २ ॥

तेरा दिवस ज्यानें वह्या उदकांत । घालोनियां सत्य वाचविल्या ॥ ३ ॥

महाराष्ट्री शब्दांत वेदान्ताचा अर्थ । बोलिला लोकांत सर्वद्रष्टा ॥ ४ ॥

अंतर साक्ष आहे निरोपणीं हेत । जडे परी चित्त वोळखेना ॥ ५ ॥

बहिणी म्हणे मीच असेन अपराधी । अध्याय त्रिशुद्धी काय त्यांचा ॥ ६ ॥


- संत बहिणाबाई

एकदा एक कंजूस जंगलातून जात असतो तेवढ्यात त्याच्या पायात काटा घुसतो....
..
..
..
..
..
..
कंजूस काटा काढत स्वताशीच: आयला बरे झाले चप्पल घालून नाही आलो ते नाहीतर चप्पलला होल पडले असत.
झंप्याच्या डाईनिंग रूम मधील छत गळायला लागले
.
.
.
.
प्लंबर : तुम्हाला कधी कळले ?
.
.
.
झम्या : काल रात्री माझ सूप
३ तास झाले संपेना तेंव्हा...

" नेमाडपंथ "


ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या "कोसला" या कादंबरीनं मराठी साहित्य विश्वात एक युग निर्माण केलं आहे. कॉलेजमध्ये नेमाडपंथीय सुरु झाले, ते ही कादंबरी वाचवूनच…! कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकर यांचं हे कथन. त्यातून आपलचं आयुष्य वेगळं वाटत समोर येतं. भिडतं आणि थक्क करतं. कोसला वाचल्यावर पु. ल. देशपांडे दाद देताना म्हणतात. '..कोसलावर कोसलाइतकेच लिहिता येईल. कितीतरी अंगांनी ही कादंबरी हाती घेऊन खेळवावी. पण शेवटच्या अति थोर भागाबद्दल लिहिलेच पाहिजे. तो म्हणजे मनूचा मृत्यू. दुःख नावाच्या वस्तूचे असे निखळ दर्शन मी नाही यापूर्वी वाचले."

तर हिंदू कादंबरी बाबत बोलायचे झाले तर कित्येक शतकांपूर्वी सिंधु नदीच्या तीरावर आर्यांच्या आगमनाबरोबर एका संस्कृतीची पाळेमुळे रुजली आणि नंतरच्या काळात संपूर्ण भारतीय उपखंडात 'हिंदू संस्कृती' म्हणून ती अनेक अंगांनी बहरली. वेगवेगळ्या काळातील समाजरचनेच्या गरजांनुसार आणि अनेक विचारवंत, तत्त्वज्ञांनी मांडलेल्या तात्त्विक विचारधारांमुळे यात नवनवी भर पडत गेली, बदल होत गेले. संस्कृतीची मूळ बैठक कायम राहिली तरी येणारी प्रत्येक नवीन विचारधारणा सामावून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे संस्कृतीची वीण बहुरंगी होत गेली आणि रूढी, परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, चालीरीती, कुटुंबव्यवस्था, परस्पर नातेसंबंध यांचा एक पट निर्माण होत गेला. शतकानुशतके या संस्कृतीने माणसांचे अवघे जीवन व्यापू  टाकले. या संस्कृतीचा सगळा पसारा, अनेक चांगल्या वाईट गोष्टींची ही अडगळच माणसाचे आयुष्य समृद्ध करीत असते. म्हणूनच ही 'जगण्याची समृद्ध अडगळ'. या 'समृद्ध अडगळीचे' चकित करून सोडणारे सुरम्य दर्शन 'हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीतून घडते. जीवनाची व्यापकता, मिश्रता यांचे दर्शन घडवणे जसे महाकाव्याकडून अपेक्षित आहे तसेच ते कादंबरीकडूनही अपेक्षित असते. 'कोसला' आणि नंतरच्या 'चांगदेव चतुष्टय' मधल्या 'बिढार', 'हूल', 'जरीला' प्रमाणेच ही कादंबरीदेखील ही अपेक्षा पूर्ण करते. आणि 'हिंदू चतुष्टया' तील पुढच्या प्रत्येक कादंबरीविषयची उत्सुकता निर्माण करते. वाचनाचे समाधान देतानाच वाचकाला जीवनाच्या अनेक अंगांचा नव्याने विचार करायला लावण्याचे सामर्थ्य या कादंबरीत आहे.

प्राध्यापक ते सडेतोड समीक्षक या त्यांच्या प्रवासावर एक दृष्टिक्षेप...

* प्रा. डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे
* जळगाव जिल्ह्यात सांगवीत १९३८ मध्ये जन्म
* पुणे विद्यापीठातून बी.ए. (१९६१)
* मुंबई विद्यापीठातून एम.ए. (१९६४)
* १९६५ ते १९७१ या काळात नगर, धुळे, औरंगाबादमध्ये इंग्रजीचं अध्यापन
* गोवा विद्यापीठात इंग्रजीचे विभागप्रमुख
* तौलनिक साहित्याभ्यास विषयाच्या प्रमुखपदावरून मुंबई विद्यापीठातून निवृत्त

साहित्यसंपदा-

* छंद, रहस्यरंजन, प्रतिष्ठान, अथर्व या नियतकालिकांमधून भालचंद्र नेमाडेंनी कविता लिहिल्या.
* १९६३ मध्ये, उमेदवारीच्या काळात 'कोसला' कादंबरी प्रकाशित... या कादंबरीनं कादंबरीच्या रचनेचे संकेत मोडले...
* 'कोसला'नंतर तब्बल एका तपानं, समकालीन मराठी समाजावर भाष्य करणाऱ्या 'बिढार', 'जरीला', 'झूल', 'हूल' या कादंबऱ्यांनी मराठी रसिक वाचकांना वेगळी अनुभूती दिली.
* 'मेलडी' आणि 'देखणी' हे काव्यसंग्रह प्रकाशित... विंदा करंदीकरांच्या शैलीशी साधर्म्य साधणाऱ्या कविता... व्यवहारी, अमानुष जगातल्या वास्तवावर उपरोधिक भाष्य...
* मराठी समीक्षेला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं श्रेय नेमाडेंना जातं... 'साहित्याची भाषा' हे भाषाविज्ञानपर पुस्तक आणि 'टीकास्वयंवर' हा समीक्षा लेखसंग्रह प्रकाशित. 
* २०१० मध्ये 'हिंदू' या महाकादंबरीचे प्रकाशन.  

पुरस्कार- 

* "साहित्य अकादमी पुरस्कार - १९९०"
* "पद्मश्री पुरस्कार"' - २०११"
* कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा "जनस्थान पुरस्कार" व नुकताच जाहीर झालेला "ज्ञानपीठ पुरस्कर"… 


आपल्याला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्कराने अवघे मराठी जन आनंदून गेले आहे, आज पुन्हा एकदा मराठी साहित्यक्षेत्रात एक मनाचा तुरा खोवला आहे.  आपले मनपुर्वक अभिनंदन व पुढील आयुष्यास अनेक शुभेच्छा…!!

-
अभिनय महाडिक 
रम्या : सम्या, कानात बाळी कधीपासून घालाय लागलास?

सम्या : बायको माहेरी जाऊन आल्यापासून.

रम्या : वहिनींनी तुझ्यासाठी आणली कायती माहेराहून?

सम्या : नाही रे. ही बाळी तिला माझ्याअंथरुणात सापडली. ती माझीच आहे सांगितल्यापासून ती कानात घालतोय.
एक मुंगी घाईत जात असलेली पाहून दुसऱ्या एका मुंगीने तिला विचारले:- अगं कुठे चाललीस एवढ्या गडबडीने??

पहिली मुंगी म्हणाली:- अगं हॉस्पिटलला चाललेय......

दुसरी मुंगी:- का काय झालंय??

पहिली मुंगी:- अगं हत्तीदादा आजारी आहेत ना. त्यांना रक्ताची गरज आहे. मी रक्त देऊन येते,

आलों, थांबव शिंग !

आलों, थांबव शिंग दूता, आलों ! थांबव शिंग !

किति निकडीनें फुंकिशि वरिवरि ! कळला मला प्रसंग ध्रु०

जरि सखे जन हाटा निघती,

आर्जवुनी मजला बोलविती,

परोपरी येती काकुळती,

पहा सोडिला संग. दूता० १

जरि नाटकगृह हें गजबजलें,

जरि नानाविध जन हे सजले,

मजविण त्यांचें कितीहि अडलें,

पहा सोडिला रंग. दूता० २

जरी खवळलें तुफान सागरिं,

मार्ग भरे हा जरि घन तिमिरीं,

पहा टाकिली होडी मीं तरि

नमुनि तिला साष्टांग. दूता० ३

अतां पुकारो फेरीवाला,

गवळी नेवो गाइ वनाला,

कारकून जावो हपिसाला,

झालों मी निस्संग. दूता० ४

विसर्जिली मीं स्वप्नें सारीं,

आशा लावियल्या माघारी,

दुनियेच्या आतां बाजारीं

माझा न घडे संग दूता० ५


कवी - भा. रा. तांबे
जाति - अंजनी
राग - हिंदोल
ठिकाण - अजमेर
दिनांक - १४ ऑगस्ट १९२१

तृणाचें पातें

तृणांचे पातें हालतें डोलतें वातें. ध्रु०

झगा मख्मली हिरवा गार,

मुकुटहि रत्‍नजडित छान्दार,

तुरा तयावर झुपकेदार,

हलवि ह्रदयातें १

यावरि तेज कसें रसरसतें;

जीवन नसांतुनी थबथबतें,

चिमणें इंद्रचाप थयथयतें.

दंवीं जइं न्हातें. २

तुम्हापरि सूर्य किरणिं या न्हाणि !

तुम्हापरि वरुण पाजि या पाणि,

तुम्हापरि पवन गाइ या गाणिं,

बघा हें नातें. ३

मग या पायिं कसें तुडवीतां ?

खड्‌ग यांतलें उद्यत बघतां

भरे कांपरें स्मरतां सत्ता

झुलवि जा यातें. ४

यांतुनि कृष्ण मुरलि वाजवितो,

वामन बलीस यांत दडवितो,

यांतुनि नारसिंह गुरगुरतो,

भ्या रे यातें. ५


कवी - भा. रा. तांबे
ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर
साल - १९२७

कोण रोधील ?

या भविष्याचिया दिव्य कारागिरा
कोण रोधील ? दे कोण कर सागरा ? ध्रु०

शूल राजा, तुझा रक्त त्यांचे पिओ,
गृध्रगण भक्षण्या पुण्य गात्रां शिवो,
दुर्गिं त्यांचिं शिरें अधम कुणि लोंबवो,
अंत त्याचा नको समजुं हा नृपवरा ! १

ज्योति मृत्युंजय प्रबळ पिंडाहुनी
समज दावाग्निशा चहुंकडे पेटुनी
देशकालांसि रे टाकितिल व्यापुनी,
अंतिं फडकेल रे ध्वज तयांचा खरा. २

ज्यावरी भार तव, ज्यावरी गर्व तव,
विफल तोफा तुझ्या, पलटणी सर्व तव,
विफल बलदर्प तव, यांत का शर्व तव ?
उघड लोचन, पहा दूर राजा, जरा. ३

भव्य ते स्तंभ बघ तुंग अट्टालिका,
त्या कमानी पहा, त्या गवाक्षादिकां,
सौध ते, कळस तो सोनियाचा निका,
ध्वज तरी प्रीतिचा मोहवी भास्करा. ४

तेथ त्या रत्‍नमय दिव्य सिंहासनीं
लखलखे भरतभूजननि बघ विजयिनी !
प्रणय, नय, सत्य हे सज्ज गण रक्षणीं,
बघ भविष्याचिया दिव्य त्या मंदिरा. ५


कवी - भा. रा. तांबे
जाति - वरमंगला
राग - भूप
ठिकाण - अजमेर
दिनांक - १८ ऑगस्ट १९२२

मिळे ग नयनां नयन जरी

मिळे गे नयनां नयन जरी-

नयनमोहिनी, मनीं उसळती लहरींवर लहरी. ध्रु०

काय घुसळिला यापरि सागर मंथनकालिं सुरीं ?

विजेपरी लखलखतां अवचित दिपविशि नेत्र खरी.

पिटाळुनी स्मृति, धृति, मति ह्रदया व्यापिशि तूंच पुरी.

निलाजरे हे नयन पाहतिच, हासति लोक तरी.

नयनगवाक्षीं सकलेंद्रियगण एकवटे सुंदरी.

पापदृष्टि ही म्हणति, त्यांहिं मज ओळखिलें नच परी.


कवी - भा. रा. तांबे
जाति - पतितपावन
राग - भीमपलासी
ठिकाण - आग्रा रेल्वेस्टेशन
दिनांक - २२ जुलै १९२२

अवमानिता

कां मज आज तुम्हीं बोलविलें ?
बहु दिवसांनीं स्मरण जाहलें,
आज कसें हें घडलें ? ध्रु०

बालपणांतिल बालिश वर्तन,
तरुणपणांतिल तें भ्रूनर्तन,
स्वप्निं आज कां दिसलें ? १

चित्रगुप्त लिहि वह्या आपुल्या,
वरी धुळीच्या राशि सांचल्या,
त्यांस कुणीं हालविलें ? २

ह्रदयपटावरि सुंदर चित्रें
आपण रचिलीं पूर्वि पवित्रें,
बघुनि आजवर जगलें. ३

स्मराल कधिं तरि या आशेवरि
उदासवाणे दिवस कसे तरि
आजवरी घालविले. ४

परि समजूं का हा भाग्योदय,
भाग्यास्तचि कींपूर्ण तमोमय ?
ह्रदय तरल खळबळलें ! ५

सोक्षमोक्ष घेइन करुनी मी,
जगेन कीं जाइन मरुनी मी,
कांपत येण्या सजलें ! ६


कवी - भा. रा. तांबे
जाति - भूपदंड
राग - तोडी
ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर,
दिनांक - १५ मे १९३४

दुर्गा

छेड सखे, दुर्गा मधु रागिणि;
बीनलयीं घर टाक थरारुनि. ध्रु०

लालन लालडि, लोचनमोहिनि
अमृत झरूं दे निजकंठातुनि. १

उन्मादक सुर-मोत्यांच्या सरि
उधळ, थरारीं मैफल भारुनि. २

धवल चांदणें स्रवे अमृतरस,
कशी पसरली शांत यामिनी ! ३

धीरोदात्त गभीरा दुर्गा,
ओत ओत सुर गभीर साजणि ! ४


कवी - भा. रा. तांबे
जाति - पादाकुलक
राग - दुर्गा
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १८ सप्टेंबर १९३५

चरणाखालिल हाय मीच रज !

सांगुं कुणा गुज साजणि, मनिंचे ?

बोलहि वदण्या चोरि समज मज;

मी पतिविरहित, शंकित नयनें

बघुति लोक मज, अशुभ गणुनिया टाळतात मज. ध्रु०

कुणाजवळ करुं ह्रदय मोकळें ?

कोंडमार किति ! दिवस कंठितें गिळुनि दुःख निज १

मी न मनुज का ? काय न मज मन ?

नच विकार का? लहरि उठति मनिं, काय सांगुं तुज ! २

पुरुष वरिति नव नवरि कितितरी,

सकल शुभच तें ! असहायच मी मुकेंच सावज ! ३

कशास जाई तो या मार्गी ?

बघुनि दुरुनिया पाणी पाणी होतें काळीज. ४

दुसर्‍या मिरविति युवति पतिशिरीं,

तुडविति पाउलिं चरणाखालिल हाय मीच रज ! ५


कवी - भा. रा. तांबे
जाति - श्रीमती
राग - तिलककामोद
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १८ सप्टेंबर १९३५

कवनकमळें

सखिलोचनकसारीं सारीं माझीं कवनें फुलति बहारीं ध्रु०

मूळ धरुनि तळिं गहन, जळावरि नाचति ठुमकुनि सारीं !

अथांग तुळ तुज न कळे रसिका, सुषमा वरिल निहारीं. १

सुरांगनांचें क्रीडास्थळ हें ह्या कमळांमाझारी,

इंद्रासह त्या उतरुनि या जळिं केलि करिति शृंगारीं. २

सुरासुरांची झुंज कमळिं या, रमति इथे नरनारी;

उषा-निशा नाचती, न उठती काळाच्या ललकारी ! ३


कवी - भा. रा. तांबे
जाति - लवंगलता
राग - काफी
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १९ सप्टेंबर १९३५

मेनकावतरण

आलि आलि दीप्तिशाली
कोटि चंद्र नेत्रिं भालिं
स्वर्गाहुनि खालिं खालिं
मेनका वसंतीं १

अवतरली जैं छुमछुम
जिरुनि तपाची खुमखुम
थरथरूनि रोम रोम
टकमक मुनि पाही ! २

लटपटला गाधिजमुनि
जोडी जी सिद्धि तपुनि
चरणिं तिच्या ती ओतुनि
श्वानासम लोळे ! ३

जय जय जय जय मदना !
ब्रह्मा-शिव-विष्णु-गणां,
न चुके तव शर कवणा,
ध्वज तुझा त्रिलोकीं ! ४


कवी - भा. रा. तांबे
जाति - मंदहसित
राग - खमाज
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - २४ सप्टेंबर १९३५

जय रतिपतिवर !

सुरासुरांचा चुरा करी स्मर,
मंत्रि शीतकर, सेनाधिपवर
मधुऋतु मृदुतर, युवतिनयन शर ! ध्रु०

वैरि भयंकर योगीश्वर हर,
सोडि तयावर मृदुल नयनशर;
जळफळला क्षोभला मुनीश्वर
झोडुनि परि त्या स्मर करि जर्जर ! १

डळमळलें अढळहि योगासन,
तृतीय नयनीं क्षोभ हुताशन,
धगधगला जणुं जाळी त्रिभुवन !
भस्म जाहला जळुनि कुसुमशर ! २

आटोपेना अशरीरहि परि
शरावरी शर सोडी हरावरि,
जेरिस ये हर, अस्त्रें आवरि,
आला शरणागत चरणांवर. ३

स्मरमीनध्वज फडके त्रिभुवनिं,
सुर-नर-खग-मृग लोळति चरणीं,
वृथा वल्गना प्रीतीच्या जनिं !
जय कविकुलगुरु ! जय रतिपतिवर ! ४


कवी - भा. रा. तांबे
जाति - पादाकुलक
राग - मारवा
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १ ऑक्टोबर १९३५

शरणागत

दारिं उभा शरणागत तव मी,
क्षुद्र जंतु अति भवसंभव मी. ध्रु०

दिशि दिशि वणवण करुनि खपुनि अति
धरुनि देहली करितों स्तव मी. १

गहन तिमिरिं चांचपत येइं वर
त्रिविध ताप सोसुनि नव नव मी. २

ताड ढकल ! हें सोडिं दार नच;
उभा अढळ तें उघडशि तंव मी ! ३


कवी - भा. रा. तांबे
जाति - पादाकुलक
राग - केदार
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १ ऑक्टोबर १९३५

घर राहिलें दूर !

उरला दिवस अल्प, घोडें थकुनि चूर,

पथ रानिं चधणींत, घर राहिलें दूर. ध्रु०

असशील घरिं आज तूं गे बघत वाट,

प्राण स्वनयनांत, पोटांत काहूर. १

मुद्रा तुझी म्लान डोळ्यापुढे येइ,

नाहीं मला पंख, ह्रदयांत हुरहूर. २

या निर्जनीं रानिं दे कोण मज साथ ?

माम् त्राहि जगदीश ! होई न निष्ठूर ! ३


कवी - भा. रा. तांबे
जाति - किंकिणी
राग - भीमपलासी
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - ३ ऑक्टोअर १९३५

चुकला बाण

आलिस काय खिडकींतून गेलिस काय पळ ढुंकून

एक कटाक्षशर टाकून कासावीस जीव करून ? ध्रु०

आंबराईत झुळुक शिरून मोहर जाय जशी उधळून

शांत तळ्यांत पवन घुसून जाई शीघ्र जळ ढवळून !

आलिस काय, गेलिस काय ? १

मी पांथस्थ मार्गी जाइं, तुझिये दारिं ठरलों नाहिं,

धरिला नेम अन्यासाठिं चुकला बाण कां मज गांठि ?

आलिस काय, गेलिस काय ? २


कवी - भा. रा. तांबे
जाति - गंधलहरी
राग - हमीर
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - २ ऑक्टोबर १९३५

पाणपोईवाली

झाली ती ओणवी, तों पदर उरिं सरे सैल झाला, झुले तो

पाणी दे पाणपोईजवळ उभि, पितां ऊर्ध्वदृष्टी फुले तो !

बोटें तीं ओंजळीचीं विरळ, मग तिची धार बारीक झाली;

मद्येच्छू काय पीतो अविचल ? मदिराक्षी तरी काय घाली !


कवी - भा. रा. तांबे
वृत्त - स्रग्धरा
ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर

वारुणीस्तोत्र

जयतु जय भगवती ! जयतु जय वारुणी !
मूलमायाभगिनि जय जगन्मोहिनी ! ध्रु०

मूलशक्त्यंतरी
उठति लहरि न जरी
सृजन कवणेपरी
करिल मायाविनी ? १

केवि जगदंड हें,
सोममार्तंड हे,
रचिल नव पिंड हे
मोह नसतां मनीं ? २

कल्पनागार तूं !
मोहभांडार तूं !
पुरविशी सार तूं
शक्तिसहचारिणी. ३

देवदानव मिळुनि
धर्म निज सांडुनी
सागरा मंथुनी
काढिलें तुज गणीं ! ४

श्रीसहोदरिणि तूं !
अप्सरा-भगिनि तूं !
रतिसुखस्त्रविणि तूं !
जयतु जय भास्विनी ! ५

दुःखदलमर्दिनी,
विभवसुखवर्धिनी !
मोहिले ऋषिमुनी
जयतु उन्मादिनी ! ६

जय कराल-प्रिये !
मोहनिद्रामये !
मूर्त हास्य स्वयें
हटविकटहासिनी ! ७

देवि उदयोऽस्तु तव!
देवि विजयोऽस्तु तव !
जय उदे ! जय उदे !
जय उदे ! स्वामिनी ८


कवी - भा. रा. तांबे
जाति - सुरमंदिर

जमादार

'काय जमादार तुझा शेवटील पाहरा ?
जागशि निमकास खरा, पाहर्‍यांत मोहरा !
क्षितिइं अर्धमग्न चंद्र वाट पाहि का सखिची ?
मदनापरि हा प्रवालवर्ण उधळी किरणशरां ! १

जागुनिया अंवशीचा दाट पालवीमधून
पक्षि, हांक दे प्रियेस, 'जाइन बाहेर जरा,'
'परवल बतलाव जाव ! रोकटोक फिर किसकी ?'
'परवली बात मजशि करिशि काय चाकरा ?' २

'मालिक तुम मैं नोकर कवराणिसाब, सही;
पर बंदा हुक्म का हुं, पहरेका काम बुरा !'
'सरली रे रात्र परी, परवलचें काम काय ?
हटकशील दिवसा का ? तूं आखडसासरा ! ३

'नहि तंबुर, बगुल नही, वर्दि नही, बजि अबतक;
अमल तिन बजनेका, हिरना नहि अभि उतरा !'
'सारि रात्र झोप नाहिं, ये हुशारि पवनिं गार,'
'नींद लेव बाइसाब !' नेक एक तुंच खरा !' ४


कवी - भा. रा. तांबे
जाति - दासी
राग - कलिंगडा
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - ६ ऑक्टोबर १९३५

ग्रीष्म

स्वारि बाइ केवि आलि !
घर्मि अंग अंग न्हालि !
आलि गालिं बाइ लालि,
उतरिन जलकुंभ मी ! ध्रु०

तापे शिरिं अंशुमालि,
आग आग भोवतालि,
रखरखीत ह्या अकालिं
अग्निच्या जिभा झळा ! १

तरुतळिं बसुनी विवशी
रवंथ करिति गाइम्हशी,
गुपचुप हे पशुपक्षी
दडति गुहाकोटरीं. २

पक्षि एकटा सुतार
ठकठक करि बेसुमार,
सारखा करी प्रहार,
ध्वनि गभीर खोल हा ! ३

पोपट पिंजर्‍यांत शांत
चित्रसा बसे निवांत,
श्वान हलुनि नखशिखांत
धापा हें टाकितें ! ४

वाटेवर तप्त धूळ,
फिरके ना मुळिं पाउल,
गांव जणूं निद्राकुल,
सामसूम चहुंकडे ५

आगीची उठे लाट,
तप्त भिंति, तप्त वाट,
तप्त वाट, तप्त खाट,
लाहि लाहि काहिली ! ६

ओढ दासिची नितांत,
आलां या वेळिं कांत !
पाय धुतें, बसा शांत,
वारा मी घालितें ! ७


कवी - भा. रा. तांबे
जाति - अरुण
राग - सारंग
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १८ ऑक्टोबर १९३५

विरहांतील जीवन

केवि सरे रजनी ! मज नीज न,

सरे कसा तरि कामकाजिं दिन. ध्रु०

विरहिं विकल तळमळतां, साजणि पळपळ निघतें युगसें जाण. १

मिणमिण करि असुदीप अंतरीं जळे कसातरि सजणाकारण. २

विरहपवनिं जरि ज्योत थरथरे, तगे आसपट, आड येइ घन. ३

तिळभरि परि नच उरलें तैलहि, जळे अतां तर वातहि त्याविण. ४

किति दिन बघशिल अंत साजणी, झरझर सरतें चंचल यौवन. ५


कवी - भा. रा. तांबे
जाति - पादाकुलक
राग -बागेसरी
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - २५ ऑक्टोबर १९३५