यशवंतराव होळकरावर पोवाडा

सुभेदार यशवंत कन्हया सदा फत्ते करी तलवारी । सवाई यशवंतराव होळकर प्रसन्न मल्हारी हस्त शिरीं ॥ध्रुवपद॥

वडील नावकर मल्हार ऐका गर्दी झाली त्यावरती । जे सावध होते परंतु सर्यत केली सरतासरती ।

भाऊ यशवंतराव बहादर ऐकून घ्याया ह्या कीर्ति । दोन लाख फौजेचा जमाव दों वर्षांमधिं घ्या गणती ।

बनकस कंपू पठाण कडिये फौजेमधिं नित्य झडती । मान भिडावून देति लढावुन टोपीवाले नाहीं गणती ।

नागोपंत सरदार शिपाई अनेक उमराव हे बाहेरी ॥सुभे०॥१॥

शहर पुण्याशीं यावें ऐसा विचार ठरला फौजेचा । दरकूच घेउनि आघाडी मुकाम केला फलटणचा ।

मागून दुसरा गोलपठाणशाह आमदखान मीरखानचा । मार्गीं येतां लढाई संग्राम झाला टोपीवाल्याचा ।

उद्यां लढाई दुसरी नेमिली आला हलकारा लष्करचा ।

खाशासुद्धां करुनि तयारी मुकाम केला जेजूरिचा किं मल्हाराचें दर्शन घ्यावें मग निर्दाळावे वैरी ॥सुभे०॥२॥

सोमवारच्या दिवशीं प्रातःकाळीं लढाई नेमिली । फत्तेसिंगमानी यांणीं तल्लख लिहून पाठविली ।

अशी लढाई करा म्हणावें मागें मोहरें नाहीं जाहली । टोपीवाले फार हरामी त्यांनीं बहु धुंद केली ।

सवाई यशवंतराव जाऊन अंगें तरवार चमकविली । दोन लाख फौजेमधिं जाऊन कणसापरि कत्तल केली ।

तमाम कंपू पळ सुटला चहूंकडे गेले हो पेंढारी ॥सुभे०॥३॥

सवाई मल्हार ऐका गर्दी झाली त्यावरती । बेफाम होते परंतु भली केली सरतांसरती ।

सवाई यशवंतराव बहादर ऐकून ध्याव्या या कीर्ति । दोन लाख फौजेचा जमाव दोप्रहरांमधिं ध्या गणति ।

बंक कंपु पठाण कडवे फौजेमधिं नित्य झडती । मान भिडावून देती लुढावून टोपीवाले नाहीं गणती ।

फत्तेसिंग मान्या कुलअखत्यारी ऐकुनि घ्या या शूर मूर्ति । नागोपंत सरदार शिपाई अनेक उमराव हे बहिरी ।

जसा कृष्ण अवतार मुरारी गोपिकांवर कृपा करी ॥सुभे०॥४॥

सुभेदार महाराज प्रतापी नामें ऐक एक मोहोरा । कारभारी ऐकुनि घ्यावे हरनाथाचा कुलकल्ला ।

शहर पुण्याची नाकेबंदी वागुं देईना पसारा । खटमार मोठा कठिण नाहीं कुठें ऐकिली तर्‍हा ।

मार देउनि खंडण्या घेतो चौमुलखामधिं दरारा । वडिला वडिलीं पुरुषार्थ महिमा सवाई यशवंतराव जुरा ।

अनंद फंदीचे छंद ऐकतां लढाई झाली ही सारी । सुभेदार यशवंत कन्हया सदा फत्ते करी तलवारी ।

सवाई यशवंतराव होळकर प्रसन्न मल्हारी हस्त शिरीं ॥सुभे०॥५॥


कवी - अनंत फंदी

खर्ड्याचे लढाईचा पोवाडा

दैन्य दिवस आज सरले । सवाई माधवराव प्रतापि कलियुगात अवतरले ॥ध्रुपद॥

भूभार सर्व हराया । युगायुगी अवतार धरी हरी दानव संहाराया ॥

कलियुगी धर्म ताराया ॥ ब्राह्मणवंशी जन्म घेतला रिपुनिर्मूळ कराया ॥

सुकिर्ती मागे उराया ॥ सौख्य दिले सर्वास अहारे सवाई माधवराया ॥चाल॥

धन्य धन्य नानाचे शहाणपण । बृहस्पति ते बनले आपण ।

गर्भी प्रभुचे पाहुनि रोपण । तेव्हाच केला दुर्धट हा पण ।

आरंभिले मग रक्षण शिंपण । सरदारांचे घालून कुंपण ।

आपल्या अंगी ठेवून निरूपण । हरिपंताना करुनि रवाना ॥

(चाल) दादासाहेब मागे वळविले । लगट करुनि फौजांनी मिळविले ।

अपुल्या राज्यापार पळविले । काही दिवस दुःखात आळविले ।

इतर कारणी भले लोळविले । लोहोलंगर पायात खिळविले ।

ठेवून गडावर चणे दळविले । बंदीवान तेथेच खपविले ॥चाल॥

बंड तोतया सहज मोडिला । एक एक त्याचा मंत्री फोडिला ।

जमाव ठायींच ठायी तोडिला । अडचण जागी मुख्य कोंडिला ।

शहराबाहेर नेऊन झोडिला । जो नानांनी पैसा जोडिला । तोच प्रसंगी हुजुर ओढिला ।

लागेल तितके द्र्व्य पुरविले ॥चाल॥ तळेगावावर इंग्रज हरला ।

इष्टुर साहेब रणीच वीरला । उरला इंग्रज घाट उतरला ।

सरमजाम गलबतात भरला । रातोरात मुंबईत शिरला ।

सवेच गाढर पुढेच सरला । शिकस्त खाउन तोही फिरला ।

फिरुन पुण्याकडे कधी पाहीना ॥चाल॥ अशी रिपूची मस्ती जिरविली ।

शुद्ध बुद्ध पहा त्याची हरली । कारभार्‍यांनी पाठ पुरविली ।

पुण्यामध्ये अमदानी करविली । पुरंदराहुन स्वारी फिरविली ।

पर्वतीस मग मुंज ठरविली । गजराची भिक्षावळ मिरविली ।

कालूकर्णे वाजंत्री वाजती ॥चाल॥ लग्नचिठ्या देशावर लिहिल्या ।

ब्राह्मणांस पालख्याश्व वहिल्या । पाठविल्या बोलाऊ पहिल्या ।

पठाण मोंगलसहित सहिल्या । छत्रपति रोहिले रोहिल्या ।

भोसल्यांच्या मौजा पाहिल्या । आणिक किती नावनिशा राहिल्या ।

कवीश्वराची नजर पुरेना ॥चाल॥ आरशाचे मंडप सजविले ।

चित्रे काढून चौक उजविले । थयथयांत जन सर्व रिझविले ।

गुलाब आणि अत्तरे भिजविले । शिष्ठ शिष्ट शेवटी पुजविले ।

रुपये होन मोहोरांनी बुजविले । श्रीमंत कार्यार्थ देह झिजविले ।

यशस्वी झाली सकल मंडळी ॥चाल॥

सत्राशे सातात बदामी । हल्लयाखाली केली रिकामी ।

एक एक मोहोरे नामी नामी । फार उडाले रणसंग्रामी ।

बाजीपंत अण्णा ते कामी हरीपंत तात्याचे लगामी ।

परशुरामपंत त्या मुक्कामी । स्वामी सेवक बहुत जपले ॥चाल॥

गलीमास काही नव्हते भेऊन । पराक्रमाने किल्ला घेऊन ।

अलिबक्षावर निशाण ठेवून । पुण्यास नानासहित येऊन ।

श्रीमंतांनी वाड्यामध्ये नेऊन । पंचामृती आनंदे जेऊन ।

बहुमानाची वस्त्रे देऊन । बोळविले तयाला ॥चाल॥

सत्राशे तेरावे वरीस । अवघड गेले पहिल्या परीस ।

करनाटकच्या पहा स्वारीस । टोपीकर मोंगल पडले भरीस ।

तरी तो टिपू येइना हारीस । त्यावर तात्या गेले परीस ।

आणुन टिपू खूब जेरीस । साधुनी मतलब हरिपंतांनी ॥चाल पहिली ॥

नंतर मागे फिरले । दरकुच येऊन पुण्यास प्रभुचे चरण मस्तकी धरिले ॥

दैन्य दिवस आज सरले ॥१॥

केवढे भाग्य रायाचे । चहुंकडे सेवक यशस्वी होती हे पुण्य त्या पायांचे ॥

करिता स्मरण जयाचे । काही तरी व्हावा लाभ असे बलवत्तर नाम जयाचे ॥

प्रधानपद मूळ याचे । सत्रशे चवदात मिळाले वजीरपद बाच्छायाचे ॥चाल॥

मुगुटमणी ते पाट्लबावा । कोठवर त्यांचा प्रताप गावा ।

दर्शनमात्रे तापच जावा । नवस नवसिता फळास यावा ।

हर हमेशा शत्रुसि दावा । माहित सगळा मराठी कावा ।

हुशार फौजा लढाई लावा । जिंकुन हिंदुस्थान परतले ॥चाल॥

चवदा वर्षे बहुत भागले । म्हणून शिरस्ते पाहून मागले ।

तरतुदीस कारभारी लागले । उंच उंच पोषाग चांगले ।

देउन फार मर्जीने वागले । भेटीसमयी जंबूर डागले ।

मग तोफांचे बार शिलगले । सूर्यबिंब अगदींच झाकले ॥चाल॥

राव जेव्हा नालकीत बसले । कृष्ण तेव्हा ते जनास दिसले ।

अर्जुन पाटिलबावा भासले । पायपोस पदराने पुसले ।

चरणी मिथी माराया घुसले । कर प्रभुनी बगलेत खुपसले ।

इमानी चाकर नाहीत असले । धन्य धनी आणि धन्य दास ते ॥चाल॥

दोन्ही दळे या सुखात दंग । त्यावर जाला अमोल रंग ।

गुलाल आणि अनिवार पतंग । पळस फुलाचा नाही प्रसंग ।

मस्त चालतीपुढे मातंग । कोतवाल घोडे करिती ढंग ।

राज्य प्रभुचे असो अभंग । अहर्निशि कल्याण चिंतिती ॥चाल॥

गुलाम सोदे बुडवुनि पाजी । पंत प्रधान राखुन राजी ।

लष्कर दुनया करून ताजी । शके सत्राशे पंधरामाजी ।

माघ मासी भली मारून बाजी । पाटिलबावा सुरमर्द गाजी ।

अगोदर गेले विष्णुपदाजी । शरीर वानवडीस ठेवुनी ॥चाल॥

सवाचार महिन्यांचे अन्तर । हरीपंत तात्या गेले नंतर ।

तेथे न चाले तंतर मंतर । वर्तमान हे एक अधिकोत्तर ।

काही न करिती नाना उत्तर । दिलगीर मर्जी सुकले अंतर ।

हिरे हरपले राहिले फत्तर । तरि तो पुरुष बहुत धिराचा ॥चाल॥

दौलतीचे आज खांबच खचले । लाल्होते ते कोठेच पचले ।

शिपायांचे काय चुडेच पिचले । परंतु नाना नाही कचले ।

कडोविकडीचे विकार सुचले । कलमज्यारीचे घटाव मचले ।

मोंगलावर मोर्चे रचले । जिकडे तिकडे झाली तयारी (चाल) पुकार पडला पृथ्वीवरती ।

सैन्य समुद्रा आली भरती । आगाऊ खर्ची मोहरा सुर्ती ।

रात्रंदिवस श्रम नाना करती । कशी ही मोहिम होईल पुरती ।

राव निघाले सुदिनमुहूर्ती । लिंबलोण उतरितात गरती । इडापिडा काढून टाकिती ॥चाल॥

गारपिराच्या मग रोखांना । तमाम रिघला फरासखाना ।

उजव्या बाजुस जामदारखाना । डावेकडे तो जवेरखाना ।

देवढीबराबर सराफखाना । चकचकीत खुब सिलेखाना ।

मध्ये रायाचा तालिमखाना खळ ॥ खळ खळ लेजिमा वाजती ॥चाल॥

वाड्याबाहेर जिन्नसखाना । पदार्थ भरपुर मोदीखाना ।

मागे उतरला उष्टरखाना । डेर्‍यासन्निध नगारखाना ।

तर्‍हतर्‍हेचा शिकारखाना । बाजाराच्या पुढे पिलखाना ।

दिला बिनीवर तोफखाना । मोठमोठ्या पल्ल्याच्या जरबा ॥चाल पहिली॥

चोहोंकडे लोक पसरले । नित्य नवे गणतीस लागती एकांडे देशावरले ।

दैन्य दिवस आज सरले० ॥२॥ बहुत शिंदे जमले ।

शिलेपोस पलटणे लाविती पठाण जरीचे समले ॥ रणपंडित ते गमले ।

भले भले पंजाबी ज्वान दक्षिणेत येउन रमले ।

ज्यापुढे शत्रु दमले । त्यांणी शतावधि कोस स्वामिकार्यास्तव लवकर क्रमिले ॥चाल॥

आधीच दौलतराव निघाले । काय दैवाचे शिकंदर ताले ।

फौज सभोवती जमून चाले । खांद्यावरती घेऊन भाले ।

सर्व लढावया तयार झाले । जिवबादादा गर्जत आले ।

हासनभाई उज्जनीवाले । महाराजांचे केवळ कलिजे ॥चाल॥

बाळोबास तर काळिज नाही । धीट रणामध्ये उभाच राही ।

धोंडिबास जगदंबा साही । जय करण्याची चिंता वाही ।

सदाशीव मल्हार काही । मागे पुढे तिळमात्र न पाही ।

देवजी गवळी रिपूस बाही । रणांगणाचा समय साघिती ॥चाल॥

निसंग नारायणराव बक्षी । हटकुन मारी उडता पक्षी ।

बंदुकीला कटपट्यास नक्षी । फत्ते होई तो गौंड न भक्षी ।

रायाजी पाटिल महत्त्व रक्षी । नित्य कल्ल्याण धन्याचे लक्षी ।

पिढीजाद शिंद्याचे पक्षी । केवळ अंतरंग जिवाचे ॥चाल॥

मेरूसाहेब कठिण फिरंगी । कलाकुशलता ज्याचे अंगी ।

सामायन किळकाटा जंगी । मुकीरसाहेब भले बहुरंगी ।

हपिसर पदरी चंगी भंगी । जीनसाहेबाची समशेर नंगी ।

दुर्जन साहेब झटे प्रसंगी । झर झर झर झर बुरुज बांधुनी ॥चाल॥

शाहामतखा सरदार किराणी । बाच्छायजदे थेट इराणी ।

किती काबूल खंदार दुराणी । मुजफरखाची टोळी खोराणी ।

कडकडीत सिंगरूपची राणी । तारीफ करती गोष्ट पुराणी ।

इतरांची ठेविना शिराणी । पंचविशीमधे ज्वान पलटणी ॥ ( चाल ) ॥

येथून सरली शिंदेशाई । होळकराची आली अवाई ।

तुकोजी बावांना गुरमाई । आधीच बळ स्वार शिपाई ।

वारगळ बरोबर फणशे जावाई । लांब हात बुळे वाघ सवाई ।

वाघमारे कुळ धगनगभाई । खेरीज ब्राह्मण नागो जिवाजी ॥चाल॥

शिवाय होळकर खासे खासे । काशीबाजी तर हुंगुन फासे ।

लढाईचे आणून नकाशे । स्वस्थपणे करतात तमाशे ।

बापुसाहेबांना येती उमासे । मल्हारजींनी देउन दिलासे ।

जा जा म्हणती लोक बगासे । जहामर्द तरवारकरांचे ॥चाल॥

हरजी विठूजी आनंदराव । स्वता धनी यशवंतराव ।

संताजीचे प्रसिद्ध नाव । आबाजीचा तिखट स्वभाव ।

दूर नेला साधितात डाव । विचारी मतकर माधवराव ।

भागवतांनी सोडुन गाव । ताबडतोब निघाले ॥चाल॥

महाशूर पटवर्धन सारे । ठाइं ठाइं त्यांचे फार पसारे ।

चिंतामणराव शूर कसारे । केवळ एकांगी वीर जसारे ।

परशुराम रामचंद्र असारे । चहुकडे ज्याचा पूर्ण ठसारे ।

अप्पासाहेब तोही तसारे । थरथर ज्याला शूर कापती ॥चाल॥

रास्ते आनंदराव दादा । पानशांची बहु मर्यादा ।

विंचुरकरांमधि गांडु एखादा । राजाबहाद्दर पुरुष जवादा ।

चौपट खर्च दुप्पट आदा । पुरंधर्‍यांची कदीम इरादा ।

तत्पर पेठे मोगल वादा । ओढेकरही येऊन भेटले ॥ ( चाल पहिली ) ॥

वामोरकर सावरले । आंबेकर आणि बारामतीकर प्रसंगास अनुसरले । दैन्य दिवस आज सरले ॥३॥

खास पतक नानाचे । निवडक माणुस त्यात पुरातन सूचक संधानाचे ॥

पद देऊनि मानाचे । खुष करुनि बाबास काम मग सांगुन सुलतानाचे ॥

बळ विशेष यवनांचे । हे ऐकुनी लोकांनी सोडिले पाणी शीरसदनाचे ॥चाल॥

आपा बळवंतराव सुबुद्ध । बिनिवाले पुरुषार्थी प्रबुद्ध । पवारात मर्दाने शुद्ध ।

वाढविती भापकर विरुद्ध । केवढ्यांना शुष्कवत युद्ध ।

काढिती हांडे रणी अशुद्ध । धायगुडे निर्बाणी कुबुद्ध ।

शेखमिरा फौजेत मिसळले ॥चाल॥

पराक्रमी हिमतीचे दरेकर । तसेच जाधव बुरुजवाडीकर ।

अमीरसिंग जाधव माळेगावकर । सुजाण गोपाळराव तळेगावकर ।

जानराव नाईक नट निंबाळकर । शेकर सोयरे बाळो वडाळकर ।

करारी डफळे अनंतपुरकर । आढोळ्याचे लोक इमानी ॥चाल॥

कामरगावकर मग बोलवले । प्रतिनिधीला किती गौरविले ।

हर्ष वाहिले पुढे सरसावले । रण नवरे दरकुच धावले ।

समाधान राऊत पावले । बन्या बापु जसे नवरे मिरविले ।

शहर पुणे रक्षणार्थ ठेविले । माधवराव रामचंद्र कानडे ॥चाल॥

सरमजामी सरदार संपले । शिलेदार मागे नाही लपले ।

धाराशिवकर लेले खपले । जमेत सुद्धा ते आपापले ।

गोट गणतिला तमाम जपले । सानपदोर्गे निगडे टपले ।

खुळे वाघ आणि बाबर सुपले । भगत बडे डोबाले दिपले ।

जाधव काळे माळशिकारे ॥चाल॥ बाजीराव गोविंद बर्वे ।

लाड शिरोळे धायबर सुर्वे । दाभाड्याचा हात न धरवे ।

भगवंतसिंग बैसे बेपर्वे । वझरकराचा लौकिक मिरवे ।

खंडाळ्याचे पोषाग हिरवे । नलगे भोयते सुंदर सर्व ।

सखाराम हरी बाबुराव ते ॥चाल॥

कडकडीत हुजुरात हुजुरची । वीस सहस्त्र जूट पदरची ।

राउत घोडा बंदुक बरची । केवळ आगच उतरे वरची ।

एक एक पागा अमोल घरची । दाद न देती देशांतरची ।

काय कथा त्या भागा नगरची । रणांगणी काळास जिंकिती ॥चाल॥

दिघे फडतरे बाबरकाठे । तळापीर मानसिंग खलोट ।

मारिती पुढे समोर सपाटे । निलाम कवडे झाले खपाटे ।

देवकात्याचे फार हाकाटे । मुळे गांवढे करिती गल्हाटे ।

जगतापाचे महतर भोयटे । भले मर्तृजा महात थड्याचे ॥चाल॥

गणेश गंगाधर थोरात । निळकंठ रामचंद्र भरात ।

आयतुळे मान्य सकळ शूरात । बेहरे मांजरे योग्य बीरात ।

राघो बापुजी रणघोरात । येसोजी हरी सैन्य पुरात ।

दारकोजीबावा निंबाळकरांत । वीरश्रीत तो धुंद सग्याबा ॥चाल॥

कृष्णसिंग हैबतसिंग तारे । तसेच लक्ष्मणसिंग बारे ।

दावलबावा महात सारे । मिळाले भापकर ते परभारे ।

मैराळजी पायघुडे विचारे । इंदापुरकर नव्हत बिचारे ।

गणेश विठ्ठल वाघमारे । बिडकर खुर्देकर आटीचे ॥चाल॥

गिरजोजी बर्गे फार दमाचे । बहादर बारगिर ते कदमाचे ।

आठवले तर बहु कामाचे । दुर्जनसिंग राठोड श्रमाचे ।

टिळे कपाळी रामनामाचे । बिनीबरोबर ते नेमाचे ।

श्रीमंतस्मरणे काळ क्रमाचे । जसे दूत सांबाचे प्रतापी ॥चाल पहिली॥

प्रपंच वैद्य विसरले । चिलखत बखतर शिलेटोप मल्हारराव पांघरले ॥ दैन्य दिवस आज ते सरले० ॥४॥

लष्कर सगळे गुर्के । जरी पटक्याभोताले घालिती गरर मानकरी गर्के ।

सुंदर गोरे भुर्के । घोरपडे पाटणकर महाडिक खानविलकर शिर्के ।

मुंगी मध्ये ना फिर्के । चव्हाण मोहिते गुजर घाडगे निंबाळकर दे चर्के ॥चाल॥

पुढे पसरले रिसालदार । मुसा मुत्रीम नामदार । सय्यद अहमद जमादार ।

अमीर आबास नव्हे नादार । शहामिरखा ते डौलदार ।

इतक्या वर ते हुकूमदार । राघोपंत ते दौलतदार । तसे काशिबा बल्लाळ रानडे ॥चाल॥

गोरा मुसावास अमोल । मुसानारद तो समतोल ।

विनायकपंताचा गलोल । आबा काळे गुणीच डोल ।

टोपकराचे बोलती बोल । पायदळांचा बांधुनि गोल ।

तंबुर ताशे वाजती ढोल । उठावल्या बैरखा निशाणे ॥चाल॥

संस्थानी याविरहित राजे । सेनासाहेब किताब साजे ।

राघोजीबावा नाव विराजे । बाणांचा भडीमार माजे ।

सरखेलांचा लौकिक गाजे । समशेर बहादर गरीब नवाजे ।

अकलकोटी लोक ताजे । दुर्जनसिंग रजपूत हडोदी ॥चाल॥

दक्षण उत्तर पश्चिम भागी । पसरुन तोफा जागोजागी ।

तमाम गारदी त्याचे मार्गी । स्वार सैन्य त्यामागे झगागी ।

जरी पटका तो दुरुन धगागी । कोणीच नव्हता त्यात अभागी ।

स्वस्ति बक्षिस पावे बिदागी । जासूद सांडणी स्वार धावती ॥चाल॥

काय पलटणच्या फैरा झडती । पर्जन्यापरि गोळ्या झडती ।

शिरकमळे कंदुकवत उडती । छिन्न भिन्न किती होऊन रडती ।

कितीक पाण्याविण तडफडती । कितीक प्रेतामधीच दडती ।

वीर विरांशी निसंग भिडती । सतीसारखे विडे उचलिती ॥चाल॥

पाउल पाउल पुढे सरकती । घाव चुकाउनी शुर थडकती ।

सपुत वाघापरी गुरकती । हत्यार लाउन मागे मुरकती ।

खुणेने शत्रुवर्म तरकती । मोंगल बच्चे मागे सरकती ।

जिवबादादा मनी चरकती । अररररर शाबास बापांनो ॥चाल॥

सुटती तोफा धुंद दणाणत । गुंगत गोळे येती छणाछण ।

सों सों करिती बाण सणासण । खालेले घोडे उडती टणाटण ।

टापा हाणती दुरुन ठणाठण । वाजति पट्टे खांडे खणाखण ।

नौबती झांझा झडती झणाझण । एकच गर्दी झाली धुराची ॥चाल॥

थोर मांडली रणधुमाळ । अगदीच बसली मग काठाळी ।

फौज पसरली रानोमाळी । लाखो लाख तरवारी झळाळी ।

होळकराची फिरती पाळी ॥ जिवबांची मदुमकी निराळी ।

मोंगलाची केली टवाळी । सबळ पुण्य श्रीमंत प्रभूंचे ॥चाल॥

अठरा घटका लाही फुटली । तोफ हजारो हजार सुटली ।

मिरजकरांची मंडळी झटली । भाउबरोबर निःसंग तुटली ।

मोंगल सेना मागे हटली । त्या समयी कैकांची उपटली ।

पेंढार्‍यांनी दौलत लुटली । गबर झाले एका दिसात ॥चाल॥

शके सत्राशे सोळा भरता । आनंद संवत्सरही सरता ।

दहा दिवस शिमग्याचे उरता । वद्य पंचमी सुवेळ ठरता ।

ती प्रहरांचा अंमल फिरता । मोंगलाशी प्रसंग करिता ।

पळाले मोंगल धीर न धरता । चंद्रउदयी खर्ड्यात कोंडिले ॥चाल पहिली॥

गढीत खासे शिरले ।

मराठे मोंगल पठाण पुर्भे इतर घरोभर भरले ॥ दैन्य दिवस हे आज सरले ॥५॥

बहुत खराबी जहाली ।

मोहोर्‍यावरची फौज सैनिका सहित नाहली ॥

त्यात उन्हाची काहाली ।

रुपयाचे दिड शेर पाणी अशा कठीण वेळा वाहाली ॥

ती सर्व जनांनी पाहिली ।

जिवबादादा परशुरामपंतांची दिसंदिस बहाली ॥चाल॥

निजाम अल्लीखान नव्हे सामान्य । बाच्छाई सुलतानात मान्य ।

जुनाट पुरुषात राजमान्य । अपार पदरीमण धनधान्य ।

कोण बरोबरी करील अन्य । दैव धन्याचे मुळी प्राधान्य ।

तशात झाले अनुकुळ दैन्य । नाही तर घेते खबर पुण्याची ॥चाल॥

जेव्हा मारिती यवन मुसंडी । तेव्हाच होईती फौज दुखंडी ।

साठ सहस्त्र पठाण बुडी । तिनशे तोफा खंडी ।

असे असुनिया दबली लंडी । धरून मश्रुल्मुलूख आणिला ॥चाल॥

झाला जन्म त्या कुळात माझ्या बाई राजेंद्राचा ।

केवळ माघव मूर्ति म्हसोबा नव्हेच शेंदराची ॥

अणीक मंत्री मर्द मराठा बंद्रोबंद्रांचा ।

ऐरावत बांधून आणतिल प्रसंगी इंद्राचा ॥

येथे न चाले यत्‍न ब्रहस्पती भार्गव चंद्राचा ।

उपाय असता तरी न मरता बापू रामचंद्राचा ॥

चा० हरहर जगन्निवासा, अता काय करू ॥

पोटी जरी एक झाले असते राजबीज लेकरू ॥

राज्य न बुडते मी मात्र मरत्ये शोक सदा कर शकू ॥

चा० पुढे काळ सख्यांनो कसा मी घालवू ॥

हिरकणी कुटुन जाऊ पाण्यामधे कालवू ॥

ती पिउन पौढत्ये नका ग मज हालवू ॥

चा० जा समया मालवून आपल्या घरास न्हायाला ।

जिवंत मी असल्यास उद्या मी नेत्र पुसायाला ॥ कमि नव्हते० ॥१५॥

धन्य वंश एकेक पुरुष कल्पवृक्ष पिकले ।

शत वर्षे द्विज पक्षी आनंदे त्या तरुवर टिकले ।

जलचर हैदर नबाब सन्मुख रण करिता थकले ।

ज्यांनी पुण्याकडे विलोकिले ते संपतिला मुकले ।

असे प्रभु कसे अमर कराया ब्रह्मदेव चुकले ।

गहन गती कर्माची सर्वजण पूर्वी फळ विकले ॥चाल॥

संपविला अवतार धन्यांनी म्हणे गंगुहैबती ।

ध्वज पडले उलथुनी थडकल्या सुरु साहेब नौबती ।

कोण करिल प्रतिपाळ तुर्त मुलुखास लागली बती ॥चाल॥

महादेव गुणीराज श्रुती गादिचे ।

नवे नुतन नव्हती शाईर जदिप वादिचे ।

पीळ पेच अर्थ अक्षरात वस्तादिए ॥चालपहिले॥

प्रभाकराचे कवन प्रतिष्ठित सभेत गायाला ।

अशा कवीची बुज नाही कोणि करायाला ॥

कमि नव्हते० ॥१६॥


कवी - अनंत फंदी

रावबाजीवर पोवाडा

उटया केशरी टिळा कस्तुरी कमालखानी हार गजरे । गहेनाजी बहेनाजी अक्षयीं जवळ पालखिच्या हुजरे ।

जुनी माणसें तीं कणसाला महाग गैर त्याची बुजरे । चार चटारी भटारी हलके जाणुनिगे अलबत हुजरे ।

सुंदर स्त्री दुसर्‍याची तिसरा दे बैल गुतुन अवता । शाल्योदन मिष्‍टान्न भोगता सवा शेर ज्याचा सवता ।

चोवीस वर्षें चैन भोगिली राज्यकांति जाणुन नवता ॥धृ०॥१॥

जो नीचकर्मी लइशी गुर्मीं कुटुंब दाखल नजराणा । प्रभु फार संतोष न किमपी दोष निजा इजजवळ जाणा ।

असें अवश्य घडवी अडवी तिडवी चार प्रहर दम द्या ताणा । दौलतीस बाजीराय करिल अपाय म्हणत होते नाना ।

खेळ करुनि उफराटा वरंटा पाटा रयतेच्या भवता ॥शाल्यो०॥२॥

कुलकल्ला त्रिंबकजी डेंगुळ अगदिं राहिले दिडबोट । पंढरपुरीं महाद्वारी शास्त्री ठार केले कर्मच खोटे ।

चौकुन मग इचकोबा तोबा हाय सुकुन गेले ओठ । आळ येतांच चंडाळ गडावर पदरीं काय पडला धोट ।

सर्वांची रग जिरली ह्मणुनी तळि भरली आला दीप मालवता । फंदी मूल ह्मणे असती विरस !

कां गादि पुण्याची घालवता । शाल्योदन मिष्‍टान्न०॥धृ०॥३॥


कवी - अनंत फंदी

शेवटले बाजीरावाचा पोवाडा

वडिलांचे हातचे चाकर । त्यांस न मिळे भाकर ।

अजागळ ते तूपसाखर । चारुनि व्यर्थ पोशिले ॥१॥

सत्पात्राचा त्रास मनीं । उपजे प्रभूचे मनांतूनि ।

ज्या पुरुषास न कोणी । अधीं त्याला भजावें ॥२॥

तट्टू ज्यास न मिळे कधीं । पालखी द्यावी तयास आधिं ।


मडकें टाकुनि भांडयांत रांधी । ताटवाटया भोजना ॥३॥

द्रव्य देऊन आणिक आणिक । नवे तितके केले धनिक ।

जुन्याची तिंबुनि कणीक । राज्य आपुलें हरविलें ॥४॥

जो पायलीची खाईल क्षिप्रा । पालखी द्यावी तया विप्रा ।

निरक्षर एकाद्या विप्रा । त्याला क्षिप्रा चारावी ॥५॥

एके दिवशीं व्हावी खुशाली । स्वारी पुढें शंभर मशाली ।

एके दिवशीं जैशी निशा आली । मशाल एकही नसावी ॥६॥

मेण्यांत बसावें जाउनि । कपाटें ध्यावीं लाउनि ।

स्वरुप कोणा न दावूनी । जागें किंवा निजले कळेना ॥७॥

हुताशनीच्या सुंदर गांठया । शेर शेर साकरेच्या पेटया ।

विंप्र कंठीं जैशा घंटया । उगाच कंठया घालाव्या ॥८॥

तशाच राख्या जबरदस्त । सांभाळितां जड होती हस्त ॥

दौलत लुटुनि केली फस्त । हस्त चहूंकडे फिरविला ॥९॥

तुरा शिरीं केवढा तरी । बहुताची मोठा चक्राकारी ॥

हार गजरे नखरेदारी । सोंगापरी दिसावें ॥१०॥

हात हात रेशमी धोतर जोडे । चालतां ओझें चहूंकडे

आंगवस्त्र दाहदां पडे । चरणीं खडे रुतताती ॥११॥

पोषाग दिधले बाजिरायें । मोच्यास पैकां कोठें आहे ? ॥

तैसेच अनवाणी चालताहे । शास्त्री अथवा अशास्त्री ॥१२॥

घढींत व्हावें क्रोधयुक्त । घडींत व्हावें आनंदभरित ॥

धडींत व्हावें कृपण बहुत । घडींत उदार कर्णापरी ॥१३॥

घडींत व्हावी सौम्य मुद्रा । घडींत यावा कोप रुद्रा ॥

घडींत घ्यावी क्षणैक निद्रा । स्वेच्छाचारी प्रभू हा ॥१४॥


कवी - अनंत फंदी

श्रीसवाई माधवराव पेशवे रंग खेळले त्याचे वर्णनपर पोवाडा

जसा रंग श्रीरंग खेळले वृंदावनि द्वापारात ।

तसा रंग श्रीमंत खेळले कलियुगात अति आदरात ॥ध्रु०॥

धन्य धन्य धनि सवाई माधवराव प्रतापी अवतरले ।

किर्त दिगंतरी करुन कुळातिल सर्व पुरुष पहा उद्धरले ॥

एकापरिस एक मंत्रि धुरंधर बुद्धिबळे शहाणे ठरले ।

दौलतिचा उत्कर्ष दिसंदिस नाही दरिद्री कुणी उरले ।

शालिवाहन शक नर्मदेपावत जाऊन जळी घोडे विरले ।

श्रीमंतास करभार देउन आले शरण रिपु पृथ्वीवरले ॥

चा० महावीर महादजीबाबा हुजरातीचे॥

आणुनि मरातब बाच्छाई वजिरातीचे ॥

केले महोच्छाव खुब मोथ्या गजरातीचे ॥चा०॥

तर्‍हे तर्‍हेचे ख्याल तमाशे बहुत होती दळभारात ।

श्रीमंतांचा संकल्प हाच की रंग करावा शहरात ॥१॥

कल पाहुन मर्जिचा बरोबर रुकार पडला सार्‍यांचा ।

सिद्ध झाले संपूर्ण पुण्यामधे बेत अधिक कारभार्‍यांचा ॥

मधे मुख्य अंबारि झळाळित मागे थाट अंबार्‍यांचा ।

चंद्रबिंब श्रीमंत सभोवता प्रकाश पडला तार्‍यांचा ॥

हौद हांडे पुढे पायदळांतरी पाउस पडे पिचकार्‍यांचा ।

धुमाधार अनिवार मार भर बंबांच्या फटकार्‍यांचा ।

चा० नरवीर श्रेष्ठ कुणी केवळ कृष्णार्जुन ॥

वर्णिती भाट यश कीर्ति सकल गर्जुन ॥

चालली स्वारी शनवार पेठ वर्जुन ॥

चा० घरोघरी नारी झुरझरुक्यांतुन सजुन उभ्या श्रृंगारत ।

गुलाल गर्दा पेल दुतर्फा रंग रिचविती बहारांत ॥२॥

सलाम मुजरे सर्व राहिले राव रंगाच्या छेदात ।

हास्यवदन मन सदय सोबले शूर शिपाईवृंदात ॥

दोहो दाहो हाती भरमुठी दिल्हे चत लाल दिसे खुब बुंदात ।

तक्तराव जिलेवंत नाचती सभांगना आनंदात ॥

सुदिन दिवस तो प्रथम दिसाहुन शके सत्राशे चवदात ।

परिधावि संवत्सरात फाल्गुन वद्य चतुर्दशी धादांत ॥

चा० बाळाजि जनार्दन रंगामधे रंगले ॥

रंगाचे पाट रस्त्यात वाहु लागले ॥

किती भरले गुलाले चौक ओटे बंगले ॥

चा० कुलदीपक जन्मले सगुणी गुणी महादजीबाबा सुगरात ।

पराक्रमी तलवारबहाद्दर मुगुटमणी सरदारात ॥३॥

भोतगाडे रणगाडे गुलाले भरून चालती स्वारीत ।

गुलाल गोटे शिवाय ठिवले निरनिराळे अंबारीत ॥

आपाबळवंतराव खवाशित चौरि मिजाजित वारीत ।

लाल कुसुंबि रुमाल उडती घडोघडी मैरफगारीत ॥

कोतल नर कोतवाल वारण मगनमस्त किल करित ।

बल्लम बाण बोथाट्या इटे लगी वाद्यघोष डिमदारीत ।

चा० भले भले एकांडे मधे घोए घालती ।

बारगीर बिनीवर ध्वज रक्षित चालती ॥

संपूर्ण भिजिवले जन रंगाखालती ॥चा०॥

वत्रपाणिवारिती तरी झालि गर्दी मोठि बुधवारात ।

झुकत झुकत समुदाय सहित निट स्वारि आली रविवारात ॥४॥

आधिच पुणे गुलजार तशामधे अपूर्व वसला आदितवार ।

त्यात कृष्ण श्रीमंत आवंतर समस्त यादव परिवार ॥

हरिपंत तात्यांनी उडविला रंग केशरी अनिवार ।

हर्ष होउन राजेंद्र झांकिती शरिरानन वारंवार ॥

पाटिल बावानी नेउन शिबीरा रंग केला जोरावार ।

वस्त्रे देउन किनखाब वाटिले ठाण कुणाला गजवार ॥चा०॥

उलटली स्वारी मग महिताबा लाउनी ॥ कुरनिसा करित जन वाड्यामधे जाउनी ॥

दाखवी पवाडा गंगु हैबती गाउनी ॥चा० महादेव गुणिराज फेकिती तान तननन दरबारात ।

प्रभाकराचे कवन पसरले सहज सहज शतावधि नगरात ॥५॥


कवी - अनंत फंदी

पोवाडा फत्तेसिंग गायकवाडाचा

पुण्यांत बाजीराय बडोद्यांत फत्तेसिंग महाराज । उदार स्वामी सेवक त्यांना कर्णाची उपमा साज ॥ध्रु०॥

इकडे अमृतराय वडील । तिकडेही आनंदराय दादा । इकडे प्रभु बाजीराय । तिकडे फत्तेसिंग साहेब जादा ।

इकडे आप्पासाहेब तिकडे महाराज सयाजी उमदा । इकडे पांच चार वाडे । तिकडेही तसाच महाल जुदा ।

इळुडे स्वामी चाकरीस पलटणें । तिकडे सेवक इंग्रज । उदार स्वामी सेवक त्यांना ० ॥१॥

इकडे स्वार शिपाई । तिकडेहि तसेंच थोडे बहुत । इकडे श्रावणमासीं दक्षिणा । तिकडेही धर्म होत ।

इकडे आल्या गेल्याचा आदर करितात यथास्थित श्रीमंत । तिकडेही जो आला गुणिजन तो नाहीं गेला रिक्तहस्त ।

इकडे पेशवे । तिकडे गायकवाड उभयतां शिरताज । उदार स्वामी सेवक त्यांना ० ॥२॥

इकडे भरगच्ची पांघरुणें । तिकडेही याहुन चढी । इकडे अन्नशांतीचा तडाखा तिकडेही चालू खिचडी ।

इकडे आदितवार बुधवार । तिकडेही मांडवीत घडमोडी । इकडे मुळामुळा । तिकडे विश्वामित्र जोडी जोडी ।

इकडे तलात पर्वतीचा । तिकडे सुरसागर नांव गाज । उदार स्वामी सेवक त्यांना ० ॥३॥

इकडे भूमीवर अंथरुण । तिकडे रेतीमुळें घरोघर खाटा । इकडे पैका पुष्कळ । तिकडेही सुवर्णाच्या लाटा ।

इकडे जुना वाडा । तिकडे लहरीपुर्‍याचा बोभाटा । इकडे पुरण वरण । तिकडे चुरमा क्वचित्‌ वरंटा पाटा ।

इकडे पैठणी लफ्‍फे । तिकडे उशा जवळ अमदाबाज । उदार स्वामी० ॥४॥

इकडे हत्ती घोडे पालख्या । तिकडेही कमती नाहीं । इकडे रावबाजी तिकडे फत्तेसिंगाजी दाहीदुराई । इकडे जोगेश्वरी ।

तिकडेही दैवत बेचराई । इकडे देवस्थान । तिकडेही तशीच सांगूं काई । इकडे लोक दक्षणी ।

तिकडे गुजराथी न्यारी मिजाज । उदार स्वामी सेवक त्यांना० ॥५॥

इकडे उत्साह गणपतिचा । तिकडे तशीच चंपाषष्‍टी । इकडे हरदासाच्या बिदाग्या । तिकडे तशाच भरमुष्‍टी ।

इकडे मेघडंबरी । तिकडे तशीच पहा जा दृष्‍टी । इकडे ओंकारेश्वर । तिकडे मुक्तेश्वर नवीच सृष्‍टी ।

इकडे दिग्गज पहिलमान । तिकडे जेठी कुस्ती रोज । उदार स्वामी सेवक त्याना कर्णाची उपमा साज ॥६॥

इकडे नाना फडणीस । तिकडे शिताराम दिवाण गाजी । इकडे पंत सदाशिवा । तिकडे शास्त्री गंगाधर दाजी ।

इकडे बागमळे । तिकडे हर जिन्नस शाखभाजी । इकडे माती । तिकडे रेती हारफेर जमिनी माजी ।

इकडे हौद पाण्याचे तिकडे कुव्यावर मोठी मौज । उदार स्वामी सेवक त्यांना० ॥७॥

इकडे रावबाजी पंढरीस । आषाढी यात्रेस जातात । तिकडे विसा कोसांवर डाकुरजी पंढरीनाथ ।

इकडे गंगा जवळ, तिकडेही तसेंच, रेवातीर्थ । इकडे तसेच, तिकडे घटाव दोन्ही कडला यथार्थ ।

इकडे कडेतोडेवाले तिकडेही तशीच लहज । इकडे अनंदफंदी, तिवडेही जाऊनि आला सहज ।

उदारस्वामी सेवक त्यांना कर्णाची उपमा ॥साज॥८॥


कवी - अनंत फंदी

खर्ड्याच्या लढाईवर पोवाडा

श्रीमंत सवाई नांव पावले । दिव्य तनू जणुं चित्र बाहुलें । विचित्र पुण्योदरीं समावले । नानातें राज्याचे अवले ।

विधात्यानें नेमून ठेविले । बसल्या जागा कैक छपविले । उन्मत्त झाले तेच खपविले । अति रतिकुल दोरींत ओविले ।

जगावयाचे तेच जगविले । तमाम शत्रू मग नागविले । तपसामर्थ्यें येश लपविलें । दिल्ली अग्र्‍या झेंडे रोविले ।

अटक कर्नाटकांत भोंवले, जिकडे पहावें तिकडे उगवले, माधवराय पुण्याचीं पावले, टिपूसारखे मुठींत घावले, मेणापरिस मृदु वांकविले ।

सवाई तेजापुढें झांकले । पुण्य सबळ उत्कृष्‍ट फांकले । नानापुढें बुद्धिवान चकले । कैक त्यांची तालीम शिकले ।

तरि ते अपक्व नाहीं पिकले, दहा विस वर्षें स्वराज्य हांकिले, श्रीमंताचें तक्त राखिलें , अक्कलवंत कोठेंहि न थकले ।

श्रीमंत गर्भीं असतां एकले, नानांनीं राज्य ठोकुनि हाकिले, माझे करुनि महाभाव केलें, जहाज बुद्धीबळ जवकले,

यावत्काळ पावेतों टिकले, श्रीमंत पाहून धनुवर छकले, छोटेखानी कैक दबकले, जे स्वमींचरणास लुबकले, ते तरले वरकड अंतरले,

जे मीपणांत गर्वें भरले, ते नानांनीं हातिं न धरलें, ते साहेबसेवेंत घसरले, मग त्यांचें पुण्योदय सरलें, न (?) जन्मले माते उदरीं,

घाशिराम कोतवाल त्यावर उलथून पडली ब्रम्हपुरी । सवाई माधवराव सवार भाग्योदय ज्यांचे पदरीं, यशवंत श्रीमंत पेशवे अपेश तेथें पाणी भरा ॥१॥
श्रीमंताचें पुण्य सबळ कीं, न्यून पडेना पदार्थ एकहि, महान्न झाले भिन्न मनोदय खिन्न करुनी, शत्रूचीं शकलें मध्यें एक चिन्ह उद्बवलें,

नबाब झाला सिद्ध करु म्हणे, राज्य आपण पृथ्वीचें सारे, गलीमाचे मोडूनि पसारे, वकील धाडुनिया परभारे, हळुच लाविले सारे दोरे,

म्हणे युद्ध करा धरा हत्यारें, त्यामुळें वीरश्रीच्या मारे, शहर पुण्याच्या बाहेर डेरे, गारपिरावर दिधले डेरे, श्रीमंतांना जयजयकारें,

होळकरास धाडिलें बलाउन, छोटे मोठे समग्र येऊन, वडिलपणानें जय संपदा, पाटिल गेले ते विष्णुपदा, जबर त्यांची सबसे ज्यादा,

गादीवर दवलतराव शिंदा, बहुत शिपायांचा पोशिंदा, त्याच्या नांवें करुनि सनदा, लष्करि एकहि नाहिं अजुरदा, त्याचे पदरचे जिवबादादा,

सुद्धां आणविलें, परशरामभाऊ मिरजवाले, नागपुरांकडुन आले भोसले, बाबा फडके, आप्पा बळवंत, बजाबा बापू, शिलोरकर माधवराव रास्ते,

राजे बहादर, गोविंदराव पिंगळे, विठ्‌ठलसिंग आणिक देव रंगराव वढेकर, गोडबोले, राघोपंत जयवंत पानशे, मालोजी राजे, घोरपडे,

दाजीबा पाटणकर, अष्‍ट प्रधानांतील प्रतिनिधि फाकडे मानाजी मागुन आले, चक्रदेव नारोपंत भले दाभाडे, निंबाळकर हे उभेच ठेले,

रामराव दरेकर चमकले, वकील रामाजी पाटिल सुकले, मग याशिवाय चुकले मुकले । कोण पाह्यला गेले आपले ।

तमाम पागे पतके बेरोजगारी घेउनि कुतुके । अचाट फौजा मिळूनि आले, वळून गेले । जुळून संगम झाला, तीलक्षाचा एकच ठेला,

त्यामधिं नाना ते कुलकल्ला, होणारी शंकर नानाला, बंदुखानी तोफा गरनाळा, वाद्यें रणभेरी कर्णाला, गणित नाहीं शामकर्णाला,

मरणाला नच भीती घोडे, पुढें धकाउनि नानासहवर्तमान पुण्यांत आले, राउत तमाम दुनिया आली, पाह्याला, कन्हया माधवराव फुलाचा झेला,

पेशव्यांनीं कुच केला, सवेंचि मोंगल सावध झाला, याचा त्याचा पाण्यत्वरुनी तंटा झाला, तो तंटा त्यानिंच वाढविला, श्रीमंतांनीं करुनि हल्ला,

घ्या घ्या म्हणून कैक धुडाउन, दिले लुढाउन मोगल गोगलगाय करुनिया, पृथ्वी देईना ठाय, मोकली धाय करित हायहय,

तेव्हां लेंकरा विसरली माय, प्रतापी सवाई माधवराय, मोंगल त्राहे त्राहे करितील माय, करुनि सोडविला गनिमाचा वरपाय,

कैक दरपानें खालीं पाहे, किं सर्पासंनिध उंदिर जाय, असा मृदु मोंगल केला, शरण आला मग मरण कसें चिंतावें त्याला,

उभयतापक्षीं सल्ला झाला, पुढें मग महाल मुलुख कांहीं देतो घेतो श्रीमंताला, ते आपल्याला, कोण सांगतो आतां पुढें जे उडेल

मातु तेव्हां कळेल कीं अमके महाल, अमकी धातु अमकी पांतु, नबाबावर रहस्य राखुनि रंग मारला, पुढें ठेविली अस्ता, रस्ता

धरुनि पुण्याचा थाट दुरस्ता, नबाबावर कंबरबस्ता फिरुत आले वळून एक एक नानापरिच्या वस्ता, स्वतां दाणा पाणी

वाद्यांसहवर्तमान मश्रु मुलुख कैद करुनियां, श्रीमंतानीं कारागृहीं ठेविला, येथुनि पवाडा समाप्त झाला, सब्‌ शहरीं संगमनेरी

फंदी अनंत कटिबंद छंद ललकारी, श्रीमंता दरबारी । सवाई माधवराव सवाई भाग्योदय ज्याचे पदरीं । यशवंत श्रीमंत पेशवे अपेश तेथें पाणी भरी ॥२॥


कवी - अनंत फंदी

पोवाडा - पटवर्धन सांगलीकर

वसविली सांगली । चिंतामणरायें चांगली ॥ध्रु०॥

सर्वांचा मुकुटमणी । मुख्य पटवर्धन चिंतामणि । कर्ममार्गामाजी सुलक्षणी । सर्व यजमानची मनास आणी ।

वचन जें निघेल तोंडातुनि । करावें मान्य सर्वत्रांनीं । दालतीचा खांब मुख्य स्थानी । आज्ञा त्याची कोण न मानी ।

किल्ला सांगली राजधानी । प्रज्ञा उभी जोडून द्वयपाणी । ज्याला जितुकें पाजतील पाणी । त्याला पिणें प्राप्त मुक्यानी ।

लौकिक त्याचा जगत्र वानी । शिपाई मूळचे पुण्यप्राणी । गजानन ज्याचा पक्ष धरोनि । करीत संरक्षण संतोष मानी ।

कानीं नित्य पडावें गानीं । गायन करिती महा महा गुणी । विणे पखवाज कितीक कोण गणी ।

कुशल ज्या त्या ममतेशील धनी । न लागे जेथें किंचित पाणी । तेथें प्रभु यत्किंचित खणी ।

पाणीच पाणी रानोरानीं । किल्ल्याची कीर्ति जग वाखाणी । चुंबित गगन मनोरे गगनीं । कोटांत कोट बाहेरुनि ।

सभोंता खंदक मग रेवणी । वेष्‍टिला वरुनि चिल्हारीनीं । चहुंकडे कीर्ति फाकली । वसविली सांगली ॥१॥

भक्ति गजाननाची भारी । तो मोरेश्वर देतो उभारी । चिंतामणी सर्वांला तारी । जेथें बिघडेल तेथें सवारी ।

चिंतामणीची चिंता वारी । धार्मिक अधर्मास धिःकारी । पटवर्धन जाणती संसारी । घालिती उडयाच जैशा घारी ।

फते केल्याविण माघारी । उलटोनयेची मारी मारी । म्हणावे हेंज मनांत खुमारी । ऐसे थोडे पुरुष अवतारी ।

वडिला वडिलीं नामधारी । सप्त पिढया लौकिक उद्धारी । वृत्ति धर्मा जागली । वसविली ॥२॥

खेरीज बाहेर पुरे । वसविले एकाहुन एक सरे । बंदोबस्ती गस्ती पाहरे । लोक खुखवस्ती बांधूनि घरें ।

एक राहती स्वस्थ नांदती बरे । कौल सर्वांला ताकीद फिरे । धन्याची आज्ञा नांदा कींरे । शिवालय देवालय सुंदरे ।

घाट बांधुनिया कृष्णातिरे । आंत भरचक्का चुनारचिरे । कृपा केली श्रीमोरेश्वरें । प्यसामुग्री भागली । वसविली सांगली० ॥३॥

शेंकडो चारी दुकानदार । जोहोरी बोहोरी शेटे सावकार । रुमाली रस्ते बांधून चार । बनविला बाग चांगला फार ।

आंत मांडव द्राक्षांचे गार । सुरुची झाडें मनोहर । फुलें हरजिनशी अपरंपार । पाचदवणा मरवा कचनार ।

गुलाब चमेली गुले अनार । मोतिया मोगर्‍यांचे हार । सोनचाफे मकरंद बहार । गणित करतांना वाटेल फार ।

म्हणुनि सांगितले सारासार । आंत उमराव जुने सरदार । अश्वरथ गाडया कुंजर बहार । पालख्या शिवाय घोडेस्वार ।

तलावे देती चक्राकार । दुपेटे शेले भरीजरतार । एकापरीस एक दवलतदार । भले लोक संग्रही धनदार ।

पुण्य त्या चिंतामणीचें सारें । मुख्य सवाला तोच आधार । दानधर्माला बहुत उदार । आल्या गेल्याचा आधीं सत्कार ।

कल्पनाबुद्धीचे भांडार । न लागे ज्याचा अंतनापार । पाहिले हें पक राजद्वार । विवेकी बिचार सारासार ।

कविता अनंतफंदी करी । ताल सुर नमुदा लागली । बसविली सांगली० ॥४॥


कवी - अनंत फंदी

महेश्वर शहरावर

नाहीं पाहिलें पारखें महेश्वर क्षेत्रपुर ॥धृ०॥

नर्मदा निकट तट घाट । बहुत अफाट । पायर्‍या दाट । चिरे वाट । मुक्तीचीं शिवालयें ।

कैलास साम्यता नानापरिची रचना रचिली । रामकृष्ण मंदिर । बहुत सुंदरें । बांधिलीं घरें ।

रमे रमणूक हवेल्या । नयनीं पाहिल्या । नूतन थाट । प्रताप अहिल्या । किल्यावर तळवटी ।

शहर गुलजार । बहुत बाजार हारज । दुकानें लक्षापति सावकार ।

भारी भारी माल खजीना रस्ता खस्ता सुकाळ नाहीं दुष्काळ बाल वृद्ध प्रतिपाल करीती ।

गरिब गुरिब कंगाल गांजले । अडले भिडले । त्या देखुनियां अन्नछत्र सरी सारखे ।

नाहिं पाहिलें नयानें पारखे । महेश्वर क्षेत्र पूर ॥१॥

दानधर्म करी नित्य शिवार्चन । सत्वशील ऐकुनी धांवती । देशोदेशींचे कर्नाटक । तैलंग द्रावीड ।

वर्‍हाड कर्‍हाड । कोल्हापूर, कृष्णातीर, गंगातीर । कोंकण काशीकर ।

गयावळ, माळवे बिरांगडे येती कावडे, वेडे बागडे । गुजराथी मैथुलीपुरी । भारती दिगंबर जटाधारी ।

बैरागी योगी कानफाडे दर्शना येती । हरिदासाचे प्रेमळ भक्त सांप्रदाय पुष्कळ पाहिले नयनीं । सर्व महेश्वर क्षेत्रपूर ॥२॥


कवी - अनंत फंदी

बाळासाहेब पटवर्धन मिरजकर

प्रतापी बाळासाहेब पुण्यश्लोक मुखी सर्वत्रांच्या । हेचि ऐकण्यांत आले बहुधा कानीं प्राणिमात्रांच्या ॥ध्रृ०॥

मोठया परि मोठयाशीं भाषणें लहान्याशीं बोलून बरें । जिंकून बसविले तिकून साजिरे अष्‍टपैलू चौकून चिरे ।

दयावंत बुद्धिवंत चतुर साधारण वचनाचे खरे । रयतेचे कनवाळु सभोंवती गजाननाचें चक्र फिरे ।

आल्याचा सत्कार करिती भेटी घेती सत्‍पात्राच्या ॥प्रतापी० ॥१॥

सभोंताला खंदक किल्ल्यामध्येंच उंट घोडे हत्ती । झडत असे चवघडा पदरचे भले लोग त्यांतच राहती ।

बागबगीचे नानापरीचे हवा लहान मोठे पाहती । शिवाय आणखी घाट बांधिला दक्षिणेस कृष्णा वाहती ।

लोकवस्तीची कीर्ति वाखाणती गोविंदपुत्राच्या ॥प्रतापी० ॥२॥

मुख्य दैवत समनामिर दैवत जागृत बस्तीचा वाली । तेथ उपद्रव होऊं न शके पीर मिरजेचा रखवाली ।

तशांत शूर पटवर्धन बाके कीर्ति जघन्यांत झाली । भयाभीत जो होऊनि आला त्याला पाठीशी घाली ।

तृणप्राय परशत्रु जैसा उभ्या बाहुल्या चित्राच्या ॥प्रतापी० ॥३॥

बस्ती अतिगुलजार फार बाजार भरे बृहस्पतवारी । शनवारामध्यें चौक तेथें जोहारी बोहारी ।

व्यापारी राफाचारी तमाम इमाम रस्त्याशेजारी । उदमाची घडामोड होतसे बजान पट्टेकझारी ।

अनंतफंदीचे छंद जखमा जशा जिव्हारी शस्त्राच्या
॥प्रतापी० ॥४॥


कवी - अनंत फंदी

राघोजीराव आंग्रे सरखेल

धन्य सवाई सरखेल राघोजीराव मुख्य अधिपती । कीतीक त्या तेजापुढे लोपती ॥ध्रु०॥

पूर्वी कोण्या पूर्वजाने समयी शत्रु सैन्य पळवुनी । सर्व साकल्य हुजुर कळवुना ॥

महाराजांचे प्रसन्न मन ते आपल्याकडे वळवुना । आले संकट सारे टळवुनी ।

श्रम साध्य सरखेलपणाचे अक्षय पद मिळवुनी । टाकिले दरिद्र दुर खिळवुनी ॥

चा० त्या वंशामध्ये जन्मले ॥ राघोजीराव चांगले ॥ भले मर्दुमिने शोभले ॥ चा०

जळात आणि प्रांतात ज्याला रिपु थर थर कापती । येउन अपराधी पाई लागती ॥१॥

नूतन विसा बाविसात उंबर स्वरूप शाम सुंदर । चढाइत घोड्यावर बहादर ॥

स्वता करवली करून मागे मारितात चादर ।

शूर कर जोडिता एकंदर ॥ कलगि तुरा शिरपेच झळाळित कडी कंठी नादर ।

हजारो जन करिती आदर ॥चा० गर गर भाला फिरविती ॥

राव पहिलवान हरविता ॥ गवयांचे गर्व निरविती ॥ चा० प्रवीण गाण्यामधे टाकिती साजावर थाप ती ।

सूर स्गीन विणे वाजती ॥२॥

स्वारी निघे कडकडीत भयंकर आरब किंकाळती । वारुमधे कोतल चौताळती ।

स्वार पिच्छाडिस मांड बरोबर दाटित संभाळती ।

हात हलतंच हुकूम पाळती ॥ दोहो बाजूस मोरचले मिजाजित रायावर ढाळती ।

पाहून मुखचंद स्त्रिया भाळती ॥चा० पुढे बल्ल बाण चालती ॥ भालदार मधुर बोलती ॥

खावंद मोठे मसलती ॥चा० धनि दिवाण साहेबास शंकरे दिली संतत संपती । ठेंगणी भुय आटीव आकृती ॥३॥

उदार गजराबाई सदोदित हास्यानन मावली । असले पुत्र सती प्रसवली ॥ उभय लौकिक रक्षुन जगात ध्वज लावली ।

हीच महायात्रा घरी पावली ॥ अशा कल्प वृक्षाची पडावी किंचित तरी सावली । जडो हे मन त्यांचे पावली ॥ चा०

मर्जिनरूप जे वागती ॥ झाले वर्तमान सांगती ॥ नंतर निरोप मागती ॥चा०

जलदी किती कामाची हुशारित चक्रापरि तळपती । जेव्हा तेव्हा हत्यार चमके हाती ॥४॥

ताईसाहेब भाग्याची पुत्र आणि पौत्रादिक साजती । श्रीमंतिणी स्त्रियात सुविराजती ॥ अनेक राजद्वारी अखंडित जय वाद्ये वाजती ।

विप्र मंगल घोष गर्जती ॥ राज्य असुन तर लहान मुल्खो मुलुखी कीर्त गाजती । नाव ऐकुन धनाढ्य लाजती । चा०

किती छत्रामधे जेवती ॥ किती घरीच अन्न सेविती ॥ किती कामावर ठेविती ॥ चा०

किती कारकुन लिहिणार किती कर जोडितात दंपती । दया येई मग मातुश्री प्रती ॥५॥

नित्य दान काही पुराण समई गान होतसे । सदा सत्काळ यात जातसे ॥ काय कोठे कमी जास्त सती ते सर्व स्वता पहातसे ।

खबर पर राज्यातिल येतसे ॥ चा० नाही राज्यामधे तस्कर ॥ हे जनास श्रेयस्कर ॥ भोगिती सुख सोयस्कर ॥ चा०

घरोघर गाती गीत जास्त नाही रयतेवर बाबती । शिरस्ते कदीम तेच चालती ॥६॥

सदैव मुक्तद्वार कुलाबा गरिबांचे माहेर । जसे तप साधनास बेहर ॥ श्रीमंत गेल्या पसुन मिळेना अन्न कोठे बाहेर ।

म्हणुन झड घालितात लाहेर ॥ वस्त्र पात्र येई शिधा हेच ह्या सरखेलांचे हेर । उचीच नव्हे शब्दांचा आहेर ॥ चा०

पहा पहा राजांचे मुख ॥ उभे रहा क्षणभर सन्मुख ॥ होइल दरिद्र विन्मुख ॥ चा०

प्रपंच कल्याणार्थ कराया प्रभूस विज्ञापती । सौख्य पावाल सर्व निश्चिती ॥७॥

मंत्री विनायक परशराम ते बुद्धिचे सागर । सर्व गुणी विद्येचे आगर । भुजंग राजे भुलती सुवासिक दिवाण मैलागर ।

राजकारणी एक नट नागर ॥ येती किती दर्शनास ब्राह्मण आणि सौदागर । रात्री हरहमेश होई जागर ॥ चा०

मुळी पुण्यवान ते धनी ॥ कारभारी तसे साधनी ॥ गंगु हैबती कवी शोधनी ॥ चा०

महादेव गुणी म्हणे प्रभाकर क्षेम असो भूपती । न्यहाल कधी करतिल सहजोगती ॥८॥


कवी - अनंत फंदी

नाना शंकर शेट

दैववान नाना शंकर शेट विजाति । केली केवढी उभय वंशात उभयता ख्याती ॥ध्रु०॥

ना कळे कोणाला विचित्र हरिची माया । क्षणमात्रे दीनावर लावील छत्र धराया ॥ बाबुल शेटिवर पडली कृपेची छाया ।

ते पुण्यवान ती धन्य पवित्र जाया ॥ शंकर शेट आले पोती किर्त कराया । झाली प्राप्त अचल लक्ष्मी आरोग्य काया ॥चाल॥

वाढली मान-मान्यता जगामध्ये मोठी ॥ पाहिल्या पडे श्रम केवळ धनाची कोटी ॥

नावडे गोष्ट कल्पांती कोणाची ओती ॥चाल॥

कडकडीत कठीण मर्जी । जसा फर्जी निर्भय गर्जुन बोले ॥ संतत संपत अनुकुळ । नाही प्रतिकुल । या भरपणांत डोले ॥

बाच्छाय आपल्या घरचे । लाल हरीचे । त्या योग्य तसे तोले ॥चाल॥

बहु बळे संपदा मिळवली ॥ मुळापासून औदसा पळवली ॥ विष्णु सहित लक्ष्मी वळवली ॥चाल॥

अहा रे ! शंकर शेट धनाज ॥ भाग्यवान भोळे महाराज ॥ कुटुंबसंरक्षणाचे जहाज ॥

डामडौल नाही काही मिजाज ॥ दीन दुबळ्याचे गरीब नवाज ॥ शरण आल्याची राखुन लाज ॥ आगोदर त्याचे करावे काज ॥

मोठ्या मोठ्याचा जिरवुन माज ॥ हरीस आणिले शेट बजाज ॥ पैलापूर मुंबईत आज ॥चाल॥

जेव्हा टिपूवर इंग्रज गेले ॥ तेव्हा शेट सवे नव्हत नेले ॥ परंतु भर्णै येथुन केले ॥ समय रक्षिले ज्यांनी अशेले ॥चाल॥

म्हणून साहेब बहुत चाहाती ॥ करून गौरव धरावे हाती ॥ काढुन टोपी उभे की राहती ॥चाल॥

देशावर चालता हुंड्या ॥ इतर गाई तर गरीब भुंड्या ॥ अपराधावर धरून पुंड्या ॥ घरी चढवाव्या ॥चाल॥

भलत्याचे पडेना तेज फिटेना भ्रांती । यासाठी लोक भरदिसास हिसके खाती ॥१॥


कवी - अनंत फंदी

लंडे गुंडे हिरसे तट्टु

लंडे गुंडे हिरसे तट्टु ह्यांचीं संगत धरु नको । नरदेहासी येऊन प्राण्या दुष्‍ट वासना धरुं नको ॥ध्रु० ॥

भंगी चंगी बटकी सठकी ह्यांच्या मेळ्यांत बसुं नको । बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मागी सोडुं नको ॥

संसारामधिं ऐस आपला उगाच भटकत फिरुं नको । चल सालसपण धरुनि निखालस बोला खोटया बोलुं नको ॥

पर धन पर नार पाहुनि चित्त भ्रमुं हें देऊं नको । अंगीं नम्रता सदां असावी राग कुणावर धरुं नको ॥

नास्तिकपणांत शिरुनि जनाचा बोल आपणा घेऊं नको । भली भलाई कर कांहीं पण अधर्म मार्गीं शिरुं नको ॥चाल॥

मायबापावर रुसूं नको । दूर एकला बसूं नको । व्यवहारामधिं फसूं नको ॥चा० प० ॥

परी उलाढाली भलभलत्या पोटासाठीं करुं नको ॥ लंडे गुंडे० ॥१॥

बर्म काढुनि शरमायाला उणें कुणाला बोलुं नको । बुडवाया दुसर्‍याचा ठेवा करुनिया हेवा झटुं नको ।

मी मोठा शाहाणा धनाढयही गर्व भार हा वाहुं नको । एकाहुन एक चढी जगामधिं थोरपणाला मिरवुं नको ॥

हिमायतीच्या बळें गरिबागुरिबाला तूं गुरकावुं नको । दो दिवसांची जाइल सत्ता अपेश माथां घेऊं नको ।

बहुत कर्जबाजारी होऊनि बोज आपला दवडुं नको । स्नेह्यासाठीं पदरमोड कर परंतु जामिन होऊं नको ॥चाल॥

विडा पैजेचा उचलुं नको । उणी तराजू तोलुं नको ॥ गहाण कुणाचें डूलवुं नको ॥ असल्यावर भीक मागूं नको ॥ चा० प० ॥

नसल्यावर सांगणें कशाला गांव तुझा भिड धरुं नको ॥ लंडे गुंडे० ॥२॥

उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठीं करुं नको ॥ बरी खुशामत शहाण्याची ही मूर्खाची ती मैत्रि नको ॥

कष्‍टाची बरी भाजि भाकरी तूप साखरेची चोरि नको ॥ आल्या अतिथा मुठभर द्याया मागें पुढती पाहूं नको ॥

दिली स्थिती देवानें तींतच मानीं सुख कधिं विटूं नको ॥


कवी - अनंत फंदी

सत्कर्माचा तोटा । समय खोटारे खोटा ॥

सत्कर्माचा तोटा । समय खोटारे खोटा ॥ध्रु०॥

ब्राम्‍हणाशीं बिगारी धरतात । अविचार मनस्वी करतात । अशा आधारें कसे तरतात । मुलेंमाणसें घेऊन मरतात ।

वाणी बकाल घाबरतात । लोक गाईसारखे हुंबरतात । पंढरीनाथ स्मरतात । महार पोरगे घरांत शिरतात ।

घरधनीच होऊन बसतात । वस्तभाव अवधी भरतात । माल बापाचा बांधिती मोटारे मोटा । सत्कर्माचा । सम० ॥१॥

धामधूम चहुंकडे गर्दी । पठाण कंपु आरब गार्दी । ज्याला न मिळे भाकर अर्धी ।

त्याला बसाया घोडे जर्दी । लागून वारा नका घेऊं होईल सदीं ।

त्याची बडेजाव आठचारदी । दिवाण दरबारांत गर्दी । दिवस लागू नये फारदी । जेव्हां तिजवर व्हावी गर्दीं ।

तशामधीं होते वरदी । ते पार पडले मरदा मरदी । आवताराच्या दैवी उपद्रव मोठारे मोठा ।

सत्कर्माचा तोटा । समय खोटारे खोटा ॥२॥

जो येतो तो हातीं भाला । म्हणे आपणाला जेऊं घाला । कोणी कोणाचा गुरु ना चेला । भलताच धमकावी भलत्याला ।

चोरदंड तो कोतवालाला । जसा रावणाचा साला तो हलकाला एकची झाला । पतिव्रता मुकली प्राथाला । शिंदळ चढली लौकिकाला ।

सांगत फिरती ज्याला त्याला । एक जातबाई टोपीवाला । मी नाहीं दमलें पंचविसाला ।

फंदी अनंताची कविता सवाई सोटारे सोटा । सत्कर्माचा तोटा ॥ समय० ॥३॥


कवी - अनंत फंदी

उपदेशपर फटका

शोध करीरे मना हरि भजनाविण अवघें वृथा ॥धृ० ॥

हरीभजनीं ठरला । तो यमाजीकडे न घरला । भवसिंधु त्यालाच वसरला । विठाईचीच मिठाई चाला ।

ह्रदयांतरी हरी संचरला । त्याच्या मग तो सेवेंचि तरला । यमदुतापासून विसरला । जो पंढरिनाथापायिं न विसरला ।

उत्तम जन्म जरा न घसरला । यमाजीचजा प्रयत्‍न हरला । ज्यांनीं विष्णु ह्रदयीं धरिला ।

तो नभीई अजका सर्वथा । शोध करीरे मना हरि भजानाविण अवघें वृथा ॥शो० ॥१॥

शाश्वत नाहीं करुं आजकाल । हरिभजनाविरहित जें शिकाल । तें कामी सर्वस्वें टिकाल । मोक्षाधिकारी व्हालच मुकाल ।

जितके हरीभजनाला चुकाल । तितके यमाजीकडे धकाल । ते समयीं मग अवघे थकाल । बळकट काढील यमाजी खाल ।

मग त्यापुढें तुम्ही काय बकाल । हरीच्या भजनीं मन हें विकाल । अनंत जन्म सुजन्य पिकाल । यापरता कैचा निकाल ।

तुम्ही जाणा गबाजी हाकाल । सांगितलें नाहीं मग चकाल । मग यमाजी बुकाल । कुंदी करील तेव्हां कसें टिकाल ।

केलें पातक तितकें वकाल । नामामृत घ्या धनवल छकाल । द्या सोडून या भाकडकथा ॥ शोध० ॥२॥

नामस्मरणीं होई चाटुकार । कर भगवज्जनाचा देकार । या कामास न व्हावें चुकार । परंतु सत्य याचा स्विकार ।

दुर होतील हे नाम विकाल । या गोष्‍टीचा नसावा नकार । कांहीं नलगे चकारपकार । फुकटामध्यें नामामृत स्विकार ।

सांपडल्यास न कीजे धिःकार । हातीं आला येवढा अधिकार । हरिहरी फोडित जा तूं वर । भगवान करील अंगीकार ।

सांगितलें तर याचा अंतर । नाहीं तरी माझे जाईल यकार । सत्कर्माची हुंडी स्विकार ।

फंदी अनंत करि हे प्रकार । तुज अर्पण दुर करि भवव्यथा ॥ शोध० ॥३॥


कवी - अनंत फंदी

उपदेशपर फटका

नरदेहामधिं येऊन नर हो साधन ऐसें करा जेणें भवसगर तरुनि सुखें व्हावें पैलतिरा ॥ध्रु०॥

संतारार्णवीं भिजा गडयांनो संसारार्णवीं भिजा । परंतु परमार्थ साधनातें साधा यांतच मजा ।

परनारीधन त्यजा गडयांनो परनारी० ।

मदमत्सर मीपणा सहित द्या तमोगुणाला रजा । भाव न ठेवुनि दुजा । गडयांनो० ॥

अकपट होऊनि थोर लहाना समदृष्‍टीनें पूजा । अन्यायपथें न जा ॥ गडयांनो० ॥

सदसद्विचार करुनी लोकीं सत्कीर्तींनें सजा । कोणा नच द्या इजा ॥ गडयांनो० ॥

परि आश्रय दुःखितांस द्याया तन मन धनें झिजा । संकटसमयीं धजा ॥ गडयांनो० ॥

सत्यवचन राखण्यास न ढळा कथितो ह्या हितगुजा । व्हा सावध नचि निजा ॥ गडयांनो० ॥

पळ घटका प्रहर दिवस, यांहीं होतें आयुष्य होतें वजा । जगदिशाला भजा ॥ गडयांनो० ॥

अनंतफंदी म्हणे तोचि मग तारिल देऊनी करा ॥१॥नरदेहामधि० ॥


कवी - अनंत फंदी

उपदेशपर फटका

येउंदे वाचें नाम देवाचें अष्टौ प्रहरा शिव हर हर हर ॥धृ०॥

दे टाकुनि हे छंद वावुगे फंद विषयाची काय मजा ॥ हरिनामाची लावी ध्वजा ॥

असार हा संसार त्यजा ॥ तमोगुणाला देच रजा ॥ रजसत्वाची करी पुजा ॥

क्षमा शांति मनिं धरीत जा । भगवीं वस्त्रें करी पोटभर भिक्षा मागें घर घर घर ॥येउंदे० ॥१॥

परोपकारा शरीर झिजवावें जैसा मैलागिरी चंदन ॥ कर सज्जन चरणीं वंदन ॥

सा शत्रूंचें करि कंदन ॥ गृहवैभव वाजी स्यंदन ॥ अशाश्वती ह्या हो धुंदन ॥

आठवी मनीं दशरथनंदन ॥ अनंतफंदी ह्मणे घालीं विठ्‌ठला गरके गर गर गर ॥ येउंदे० ॥२॥


कवी - अनंत फंदी

उपदेशपर फटका

देसोडुन तरी फंद वाऊगे-विषयाची तरी काय मजा । हरिनामाची लाव ध्वजा ।

पंढरीस कार्तिकी आषाढी दुवक्ता-येत जातजा । असार हा संसार त्यजा ।

तमोगुणाते द्यावी रजा । रजसत्वाची करी पुजा । क्षमाशांती मनीं धरीतजा ।

भगवीं वस्त्रें करुनि पोटभर भिक्षा मागे घर घर घर । येऊंदे वाचे अष्‍टौप्रहर कीं हर हर हर ॥१॥

वाहते गंगेंत हात धु आलबेली भली भलाई कर मग मर । ईश्वर भजनीं निमग्न राहावे विषयांतरीं वासना नको ।

नामामृत महामुर पिको । सहाणेवर मैलागिरी चंदन देह झिजो यमयातना चुको न चुको । भवपाशाशी मुको न मुको ।

सांगितले हे शिको न शिको । भजनाकडे झुको न झुको । धन ज्याला मृत्तिका तोची साधु, यम कापे थर थर थर ॥२॥

सोदे शिकविती चढी लावितील त्यांच्या नादी न लागावें । ईश्वरभजनीं जागावें ।

कामक्रोध मद मत्सर मोहो लाभ या साजणांशीं सांगावें कीं तुम्ही मार्गीं वागावें ।

असार तितके नागावे । सार असेल तें घ्यावें । जाणे मोक्षपदाशीं झर झर झर ॥३॥

भाव धरुनि मनीं हरीहर । म्हणशील तरी चुकेल चौर्‍यांशीचें चकर । ईश्वरपाई हा नीटकर ।

नरदेह धुतला पवित्र शेला उडून जाईल जसा सकर । दुसरा धंदा काहीं नकर । धर बळकट देवाचें शिखर ।

त्यामध्यें राहील तुझा वकर । अनंतफंदी म्हणे घाल विठ्‌ठलाशी घिरटया गर गर गर ॥४॥


कवी - अनंत फंदी

संध्येंतील चोवीस नामांवर

अनंत भगवंताचीं नामें त्यांतूनि हीं उत्तम । गाइल्या उद्धरती अधम ॥धृ०॥

केशवकरणी अघटित लीला नारायण तो कसा । जयाचा सकल जनावर ठसा ।

माधवमहिमा अगाध गोडी गोविंदाचे रसा । पीत जा देह होइल थंडसा ।

विष्णु स्मरतां विकल्प जाती मधुसुदनानें कसा । काढिला मंथन समयीं जसा ।

वेष घरुनि कापटय मोहिनी भाग करि निमेनिम । गाइल्या उद्धरती अधम ॥

अनंत भगबंताचीं नामें त्यांतूनि हीं उत्तम । गाइल्या उद्धरती अधम ॥१॥


त्रिविक्रमान त्रिताप हरिले भक्तीचे सर्वही । वामनें दान घेतली मही ।

श्रीधरसत्ता असंख्य हरिती दुष्‍टांचे गर्वही । वंदिल्या ह्रुषिकेशाच्या रही ।

पद्मनाभ धरियेले तेथुनि देव झाले ब्रम्हही । दामोदरें चोरिलें दहीं ।

गाती मुनिजन नारद तुंबर वसिष्‍ठादि गौतम । गाइल्या उद्धरती अधम ॥

अनंत भगवंतांची नामें ॥२॥

संकर्षण स्मरतांना षड्रिपु नाशातें पावती । स्मरारे वासुदेवाप्रती ।

प्रद्युम्नाचा करितां धावा गजेंद्र मोक्षागती अनिरुद्ध न वर्णवे स्तुती ।

क्षीरसारगरिंचें निधान पुरुषोत्तम हा लक्ष्मीपती । स्मरारे अधोक्षजातें प्रती ।

अपार पापें स्मरतां जाती वाचे पुरुषोत्तम । गाइल्या उद्धरती अधम । अनंत भगवंताचीं ० ॥३॥

प्रल्हादाचे साठीं नरहरि स्तंभी जो प्रगटला । अच्युतें कालनाथ मर्दिंला ।

जनार्दनाची अघटित लीला कीर्तनीं ऐकूं चला । उपेंद्रा शरण जाई तो भला ।

हरिहर स्मरता त्रिबार वाचादोष सर्व हरियला । गोकुळीं कृष्णनाथ देखिला ।

रामलक्ष्मण म्हणे तयाच्या नामें गेला भवभ्रम । गाइल्या उद्धरती अधम ॥

अनंत भगवंताचीं नामें त्यांतुनि हीं उत्तम । गाइल्या उद्धरती अधम ॥अ० ॥४॥


कवी - अनंत फंदी

बाजीराव कारकीर्द

दुनयेला तिळमात्र उपद्रव काडी नसावा । उलटा सुलटा आया जमाना आतां कधीं चक बसावा ॥ध्रु०॥

दुनयेमध्यें लोक बांडे अनर्थ मोठा करतात । शेत कापुनि त्या कुणब्याचें त्याला बिगारी धरतात ।

वड पिंपळ तोडुनि मोकळे केवढे धर्म आचरतात । घरांत कडबा असला म्हणजे महार पोर आंत शिरतात ।

हत्ती घोडे उंट बैल खुप सलिदा कसावा । मालधन्यानें उगाच आपला पाहत तमाशा बसावा ।

घ्या घर तुमचें दुनयेला तिळमात्र उपद्रव काडीमात्र नसावा । उलटा सुलटा आया जमाना आतां कधीं चक बसावा ॥

नल पिंगल दो सवत्सर हुमजुसकु दुख पैदा । दोदिन घरमे चुप बैठो हाय हुवाजी तुमकु बैदा ।

आपने दिलकी क्या खबर हये तुम कहते बैदा बैदा । सचे आदमी भुके मरते झुटा खावत हय मैदा ।

देऊन दस्ता खांद्या वरता फिरुन सोटा धरावा । देख आगाऊ चलना यारो घेऊन द्याना विसावा ।

लई शीण झाला । दुनयेला तिळमात्र० ॥२॥

खेडीं पाडीं भलताच लुटितो कुणब्याचा जीव उदासला । सुपें टोपलीं बिगार वाहतां बाहतां बिट्टा वासला ।

ज्याच्या घरावर हल्ला तो कुणबी ओझ्यानें त्रासला । चल तेरे जोरुकु चोदु देऊं धक्का पाडूं पासला ।

शरिराची अवघी अवस्था भगवंताला पुसावी । मारी सोटे घेतो झोले बैल भाडयाचा कसावा । चल पळ मोहरं ॥३॥

मागें जाणे जोशी सांगत होते राजीक होईल । रक्ताचे पूर वाहतील नवी मुद्रा उभी राहील ।

कुणी कुणाचें नोहे अति एकंकार होईल । येतील टोपीवाले अशी कांहीं दिवस झुळुक वाहील ।

झाले बाजीराव धणी आतां पृथ्वीला आनंद असावा । जुने मुत्सदी घरीं बसविले दोन दिवस घ्या विसावा ।

लई शिण झाला ॥दुन० ॥४॥

शिपाई थेसो फर्जी हो गये आपने आपने जगा मगन । लाल अखिया कहर कहर उसे रह्मा दो बोटं गगन ।

चल पाटील थोडा जलदी लाव देऊ धका पाडूं सदन । चल तेरे जोरुक चोदु खडा रहे व क्या होवे अलग ।

करो खुदाकी बंदगी यारो उचे मालसे बिकावोंमे । फंदी अनंद कहे उलटी दुनया । किदरसे शिकशिकावोंगे ।

मै चुप बैठ० ॥५॥


कवी - अनंत फंदी

नको जाऊ बाहेरी

नको जाऊ बाहेरी गोर्‍या आंगाशीं लागेल ऊन वारा । बिसणीच्या पलटणी उभे पाहावयास जग सारा ॥धृ०॥

पाई बिचेव पोल्हारे जोडवीं नाद अवघे एकवटले ॥ मांडयांचें गोरेपण पाहून सपेटित मागें हाटले ॥

नाषुक गोरे गाल घडीग परटाची जरा नाहीं मळकटले ॥ इतर स्त्रियांचे मुखडे मज भासती तुझ्या पुढें कळकटले ॥

बहु नाजुक पुतळी झराझर चालण्याचा झटकारा ॥ जशी तोफेवर बत्ती हत्तीच्या पावसाचा फटकारा ॥ नको० ॥१॥

हातीं हिर्‍यांच्या मुद्या चमाचम जसें चांदणें फटफटलें ॥ ऐसी वस्तु कधीं लाधल मनामधी कैक विलासी लठपटले ॥

लज्जीत मृग जाहले पाहतां मनामध्यें चटपटले ॥ इतर स्त्रियांचे मुखडे मज भासती तुझ्यापुढें कळकटले ॥

होट पवळीचे वेल वोट चवळीच्या सेंगा बहुतशिरा ॥ दंत शुभ्र शोभिवंत काळ्या दातवणांच्या मधीं चिरा ॥ नको० ॥२॥

मस्तकी मुदराखडी झोंक वेणीचा थरारी भुजंग जसा ॥ वदनचंद्र न्याहाळी हातीं घेऊन अरसा ।

बालोबाल ग मोती गुंफुनी रेखून भांग करिती सरसा । अटकर छाती सुंदुक त्यावर कुच कंदुक भरला तरसा ॥

सरळ नाक तरतरीत नित्य भरजरीत डुब आलबेली तर्‍हा । तुलाच पाहून भुललों नारी कलम करिना धरी चिरा ॥ नको० ॥३॥

चंद्र तुझा पहा मुखचंद्रावर येउनिया बैसला कसा । प्रत्यक्ष मज भासतो फणीवर त्या नागाचा मणी जसा ।

शब्द तुझा ऐकूनि कोकिळा पांगल्या त्या दाही दिशा । न दाखवी गडे सिंहकटी पाहून झाला हिंपुष्‍टा ।

फंदी मुलाचे छंदबंध कुठवर गेला तर्ख धरा । दिल्लीच्या ह्या पलिकडे बोभाटे झाले हे पोबारा ॥ नको जाऊं० ॥४॥


कवी -अनंत फंदी

जमाना आला उफराटा

जमाना आला उफराटा । सुन सासूला लावी बट्टा ॥धृ०॥

लेक बापाशीं लावी आवभाषी । शिष्य गांजितो गुरुशीं । जावई सासूला म्हणतो तूं काशी ।

लवंडून देतो मातेशीं ॥चाल॥ मेहुणीचा चालवी लाड । बहिणीला म्हणे तूं रांड । चाल निघ घरांतुन द्वाड ।

तुझी नाहींग मजला चाड । माझी बायकोच मजला गोड । नाहीं सासर्‍याची ठेवली भीड ।

बेटा लबाड पाहून बापाला लटका धरी ताठा । जमाना आला आला उफराटा ॥सून० ॥१॥

धन्यावर चाकर झाले फिखान । उलटून पडले बेइमान । सावकाराशीं कुळ गेलें बदलून ।

करीती मुदत लबाडीनें ॥चाल॥ अशी कलियुगाची रीत । सोय नाहीं दरबारांत । खर्‍याचें खोटें होत ।

पाटील हकिमाचें मत । कीं बुडवावी रयत । खासदार झाले राऊत । शिपाई हाकिती आऊत ।

झाले भवानीचे भूत । जोशी झाले पंडीत । भट करी वटकिशीं मोहोबत । दप्तर पडलें सांदींत ।

आतां तरी पाहे अक्कल धरी भटा । जमाना आला आला उफराटा ॥सुन० ॥२॥

मारवाडयानें दुनया नाडली फार । करिती भलताच व्यापार । साळी कोष्‍टी शिंपी सोनार ।

हे तो झाले सरदार ॥चाल॥ असा कलीचा वारा । गरती जाती परदारां । दोहीं कुळीं पाडिती आंधारा ।

तेलाचा उणा पावशेरां । तुटपुंज्या करितो तोरा । फुगून बसला पीसारा । ताथावर हाणीतील वारा ।

तो या काळा मधें बरा । फंदी म्हणे अक्‍कल धरा । मज गव्हरा । दे कलगीवर सोटा । जमाना आला० ॥३॥


कवी - अनंत फंदी

चंद्रावळ

नट धीट अचाट राही नटला सारंगपाणी । पतिव्रता चंद्रावळ भोगिली त्या भगवंतांनीं ॥ध्रु०॥

अप्रतीम चंद्रावळ पाहून भुलले वनमाळी । तिचा नेम असा कीं सूर्य टळेल एक वेळीं ।

परि ती सत्कर्माशीं न टळे, कुकर्मा वेगळी। राहीची धाकुटी बहिण ऐका चंद्रावळी ॥चाल॥

फुल सव्वाशेर भार वजन चंद्रावळ । मृगनयना एक एक डोळा दिसे चंचळ । कुच उरीं हालती दोन्ही मुक्ताफळ ।

अंगीं वीर्य जसें कुपींतील जल निर्मळ । ह्रदयावर जोबन दोन्ही हालती कमळ । वेणींत केवडा सुगंध परिमळ ।

गोरी भुरकी गाला वरता हिरवा तीळ । मंजूल शब्द जशि टाहो करिति कोयाळ । कंठांतुन पिक दिसे अशी वेल्हाळ ।

नार कळसूत्र दिसे बाहुली । नाशीक चोंच राव्याची देह कोमळ । भर सव्वाशेर वजन चंद्रावळ ।

नार फारच हलकी जसें तुंबिनीफळ । हा तिचा नेम कीं राहावें निर्मळ । काय सूर्य टळेल नेमाशीं एक वेळ ।

परि ती न टळे ऐशी चंद्रावळ । त्या चंद्रावळीचा नेम असा असेल । त्या नगरामधीं स्वतां हरी शिन्नळ ।

चंद्रावळ पाहतां न पडे त्याशीं कळ । तेव्हां भगवंतानीं तिथें मांडिला खेळ । राहीचें रुप मग नटले तमाळनिळ ।

अलंकार अंगावर घालुनि तेव्हां भगवंतांनीं । राही झाले भगवान अलंकाराची मांडणी । नट धीट अचाट० ॥१॥

तेव्हां राहीचें रुप नटले ऐका ह्रषिकेशी । अलंकार अंगावर घालुनि तेव्हां त्या समयाशीं ।

जडिताचा शृंगार कोंदणे हिरे जिनसा जिनसी । राही काय त्या पुढें किं नटला श्रीरंगा ऐशी ॥चाल॥

राहीचे रुप मग नटला मुरलीधर । घालुनि मूद राखडी राव माथ्याबर । तिपेड गंगावन वेणी गुंफी पदर ।

मस्तकीं बिजवरा माथ्यावर मासा बोर । नाकामधीं नथ सरज्याची वर बिल्लोर । मोत्यांनीं भरला भांग बहुत सुंदर ।

कर्णफूल शिसफूल तानवडा वर चौफेर । वेल्या, बुगडया, काप पडे प्रकाश गालावर । कानीं धेंडया आणिक वेलबाळया मोत्याचे सर ।

पानबाळ्या तिथे मासबाळ्या मारी लहर । नालबाळ्या अबदागीरबाळ्या तर्कधर । खुंटबाळ्या साध्या बाळ्या त्याजवर ।

मोतीबाळ्या दाळिंबीबाळ्या त्या गंभीर । बोंडबाळ्या कोथिंबिरीबाळ्या बहुत सुंदर । चंद्रबाळ्या आणिक चिंचबाळ्या त्याजवर ।

घोसबाळ्या पर्डीच्या बाळ्या ल्याली सुंदर । झुबुकबाळ्या मखमालीबाळ्या तानोडयावर । खिरणीबाळ्या पोवळ्याच्या बाळ्या तर्कधर ।

हिरी बाळ्या कंगणीबाळ्या मनोहर । नागबाळ्या फणिंद्रबाळ्या हातीं हातसर । मुदबाळ्या पठाडी बाळ्या नथेवर मोर ।

हौदीबाळ्या पतंगीबाळ्या तुटती तार । कुर्डुबाळ्या मंडवीबाळ्या चाले छ्बीदार । फुलवाळ्या बतिसा बाळ्यांचा प्रकार ।

कानीं कुडुक ते बहू सुंदर दिसती । ताईतपेटी दुल्लडी सात पदर । पुतळ्यांची बोरांची जवाची माळ नवसर हार ।

दंडी बाजुबंद गजरानें भरला कर । गुजराथी कांकणें अंगुस्तान न जांहगिर । रत्‍नजडित पाटल्या पवच्या मनोहर ।

दंडी वेळा वाकडया गुजर्‍याचा झणत्कार । बसविले नागिना मंगलसूत्रावर । एकदाण्याची खरबुजी तर्‍हा सादर ।

चितांग चिंचपेटया मारी लहर सुंदर । अणवट बिजवे विरोद्या वरति स्थापिले मोर । हातिं मोतीसर वाक्या साकळ्या घालुनिया चरणीं ।

राही झाले भगवंत श्रृंगार झाला येथुनी । नट धीट अचाट० ॥२॥

चंद्रवळीघरीं गेले श्रीहरी राहीरुप धरुन । परिचारिका सांगती आली बाई तुमची बहिण । दिला बसाया पाट ऐका त्या चंद्रावळिनं ।

चंद्रावळ म्हणे बाई आज तुझें कोणीकडे येणें । चाल । राही म्हणे आजग बाई उदासलें मन । म्यां म्हटलें आज यावें बहिणीला भेटून ।

तेव्हां चंद्रावळ पाहे जरा तिजकडे न्याहाळून । बाई तुझ्या उरावर कांगे दिसेना स्तन । तुझी पुरुषाची आकृति दिसती जाण ।

तेव्हां उराकडे पाहे अवचित नारायण । तेवढीच कळा विसरला मधुसूदन । ह्मणे आतां हें सोंग न्यावें संपादुन ।

पुसूं नको ग सखये माझें दुःख मी जाणें । भाल्याची जखम काय होतें तुला सांगून । एके दिवशीं सत्यभामा मनमोहन ।

दोघे निजलेग मजला खोलिमध्यें कोंडून । त्या काळजीनें हा जीव गेला कर्पुन । पुसूं नको गवळ्या घरिं कष्‍टाची धन ।

चंद्रावळ ह्मणे बाई आतां तुला न्हाणिन । मी न्हाइना बाई खुण केली वेणिला त्यानं । श्रीकृष्णाची कदर फार दारुण ।

आतां तुलाच न्हाणिन मग घरां जाइन । आतां भ्रतार येईल तुझा बाहेरुन । तो थट्टा करील माझी मेव्हणीच्या नात्यानं ।

तेव्हां ठेवी चुलीवर गुंड पाण्याचा राही तत्क्षणीं । असे हरीचे खेळ देव मग चंद्रावळ न्हाणी । नट धीट अचाट राही० ॥३॥

राही ह्मणे चंद्रावळी उठ बाई मग करी स्नान । पितांबर परिधान चंद्रावळ ठेवी फेडून । चौरंगावर उभी ठाकली चंद्रावळ नग्न ।

राही गंगालयांत पाणी घाली त्या हंडयांतून । चाल । राही घाली ऊन पाणी चंद्रावळीवर दाटून । चंद्रावळ म्हणे बाई पाणी फारच ऊन ।

ऊन पाणी बरें त्यानें जाइल तुझा शीण । ऐसें चंद्रावळीशीं न्हाणिलें राहीनं । त्या चंद्रावळिचा पति आला बाहेरुन ।

त्यानें राही पाहिली करि मग हास्यवदन । आज कोणिकडेग मेहुणी केलें येणं । म्हणे उगीच आलें इला भेटाया कारणं ।

तेव्हां चंद्रावळिनें स्वयंपाक करुन । ह्या पुर्‍या पोळ्या घावण्या तेथें काय उणें । तेलच्या आणिक फेण्या गुरोळ्या जाण ।

आणिक बुंदीचे लाडू वाढी युक्तीनं । केशरी भात वर केळाचें शिखरण । लोणकढें तूप आणविलें मागून तिनें ।

भोजन करितां पति चंद्रावळिचा म्हणे । तुम्ही दोघी बहिणी निजा महालिं जाउन । आज आम्ही एकटे निजूं बाहेर जाऊन ।

तेव्हां पतिला तोशक दिला दारिं अंथरुन । राही आणि चंद्रावळी दोघी गेल्या निजभुवनीं । नट धीट अचाट राही नटला ॥४॥

बंगल्यामधिं अरास केली त्या चंद्रावळिनं । अबिर बुक्का सुवास आणिला राही कारणं । पलंग तिवाशा लोड जंबुखा टाकून ।

बहुता दिवशीं राही बहिण आली म्हणुन । चौफुला ठेवुन मधीं पानपुडा आणविला । चहूंभोतीं समया मधिं कंदिल लाविला ।

राही म्हणे दिव्यानें झोंप येईना मला । त्या चंद्रावळीनें दिप विझवुन अंधार केला । तेव्हां निद्रा आली त्या चंद्रावळिला ।

अंगाशीं अंग लागतां देव चंचळ झाला । धरि हळू स्तनाला मुखचुंबन रगडिला । जागी झाली चंद्रावळ हरि ऐसा भासला ।

अरे पाप्या दुष्‍टा भंग तपाचा केला । एक वेळ मीं हांसत होतें चंद्राला । मी पतिव्रता त्वां कसा डाग लाविला ।

जर अशी गोष्‍ट ही सांगावी भ्रताराला । तो म्हणेल स्त्रीचा पुरुष कैसा झाला । दोहिंकडून आड ना विहीर झाली मला ।

तेव्हां हरी म्हणे इला नवल काय दाखवावें नयनीं । अकस्मात दिवे लाविले तिच्या निजभुवनीं । नट धीट अचाट राही नटला सारंगपाणी ॥५॥

विष्णुदुताला आज्ञा केली पहा भगवंतानं । स्वर्गाहुन विमान आणिलें तत्क्षणीं जाण ।

देवानें चंद्रावळ विमानांत बसवून एकवीस स्वर्गें चंद्रावळिला दाखविलीं जाण । श्रीहरीनें चंद्रावळ नेली मोक्षपदाशीं ।

सृष्‍टीची घडमोड यमपुरी दाखवी तिशीं । सदाशिव दाखविला कैलासासी । खालीं उतरुनिया आणिली समुद्रापाशीं ।

खांबाची द्वारका दाखवी चंद्रावळीसीं । तेव्हां देव ठसला चंद्रावळिसीं । घाली लोटांगण तेव्हां हरिचरणाशीं ।

नाहिं झाला भोग तुम्ही फेडून घ्या असोशी । देवानें आड धरिलें सुदर्शनासि ।

केलि सहा महिन्यांची रात्र त्या समयासी प्रीतिनें भोगिलें दिलें अलिंगन तिशीं । चंद्रावळ म्हणे देवा नको अंतर देऊं मशीं ।

तेव्हां देव बोलले त्या चंद्रावळीशीं । जेव्हां स्मरशिल तेव्हां आहें तुजपाशीं । फंदिमलिकचा ठिकाण पोखरिशी ।

करि अभंग लावण्या धाक पडे वैर्‍याशीं । फंदि अनंतची लपेट झपेट ही विकट बिकट धरणी ।

रतिरती समजुन कसली पहा ब्राह्मण राणी । नट धीट अचाट राही नटला सारंगपाणी ॥६॥


कवी - अनंत फंदी

दुष्काळ

उलटा जमाना आलारे । सेवक स्वामींचें मानीना ॥ध्रु०॥

जिकडे तिकडे टोळ माजले । दुनियाचें केलें वाटोळें । मुलुख कूल उजाड हलकल्लोळ ।

आंगावरते चमक्याचे ओळ । कुठवर घालतील हळदी बोळ । जी सांपडली तिलाच घोळ ।

घरें दारें जाळुनिया कोळ । गरिबा भोंवते माजलेत पोळ । एकामागें एक जैसे लोळ ।

ईश्वरें पैदा केले ओढाळ । नराहे खोंडया मका कडोळ । कारलीं भेंडया वांगीं पडोळ ।

किती दिवस राहील पाणी गढूळ । ओस परगणा जालारे । उलटा जमाना आलारे । सेवक स्वामी० ॥१॥

कलीमहात्म आलें उफराटें । होऊं लागलें खर्‍याचें खोटें । खाटमार ऐकलांत कोठें ? ।

ज्याला न भरवे आपलें पोटं । ते जैसे मोंगलाचें बेटे । ठेवितात फिरवून पागोटें ।

महार पोरग्याचे गळ्यांत गेठे । हुरडा खाऊन बनले लोठे । गव्हार जगली जट लंगोटे ।

त्यांना आभाळ दोनची बोटें । दे उगेच भलत्याला सोटे । वाटसरु बागेना वाटे ।

उगेच माजले गाटेगोटे । दुनयेचा फुटाणा केलारे । उलटा जमाना आलारे । सेवक० ॥२॥

धर बिगारी भलताच धरावा । ब्राम्हण शूद्र न ओळखवा । जेथील मुक्काम तेथची न्यावा ।

वस्त्रें घेऊन नागवावा । माघारें बोडकाची लावावा । तिकडून शिपाई दुसरा यावा ।

हा त्याला वाटेस भेटावा । परंतु त्याणें तोच दामटावा । परतुनि न्यावा मागल्या गांवां ।

असा कितीवेळ यावा जावा । ज्याचा गहूं हरबरा लुटावा । तोच बिगारी पुढें पिटावा ।

गांवकर्‍यांचा प्राण आटावा । कारभारी तो निघून जावा । गरीब एखादा हातीं लागावा ।

त्याच्या मतें पाटीलबावा । मारा खालीं भोत भरावा । आंगठे धरवाया लावावा ।

कळेल येवढा धोडा द्यावा । कोठें पुरलें ? ठिकाण दावा । खंडणीचा ठैराव ठरवावा ।

महाप्रळय यांना आलारे। फंदी अनंद सांगे जमाना । उलटा जमाना आलारे । सेवक० ॥३॥


कवी - अनंत फंदी

दुष्काळ २

उलटादमान आयाजी आया । सेवक खामींचें मानिना ॥ध्रु०॥

जिकडे तिकडे माजले टोळ । दुनियेचें वाटोळें झालें । मुलूख कुल उजाड हलकल्होळ ।

आंगावरती चमक्यांची ओळ । घालतील कुठवर हळदी बोळ । राहिना कोठें मकाला (?) डोळा ।

कार्लीं भेंडया वांगिं पडवळें । जसा माल बापाचा बापाचा । बांधिति मोटारे मोटा ।

सत्कर्माचा तोटा । समय खोटारे खोटा ॥उलटा०॥१॥

कलिमहात्म्य उफराटें । होऊं लागलें खर्‍याचें खोटें । खाटमार ऐकिलांत कोठें ? ।

ज्याला न भरवतीं आपुलीं पोटें । ते जसे मोंगलाचें बेटे । फिरवुनि ठेवितात पागोटें ।

महार पोरग्याच्या गळ्यांत गाठये । हुर्डा खाउनि बनले बेटे । फार माजले गांटे गोटे ।

उलटा दमाना आयाजी आया । सेवक स्वामींचें मानिना ॥२॥

धामधूम चोहोंकडेच गर्दी । पठाण कंपु आरब गारदी । जिकडे तिकडे फांसे पारधि ।

लोक मिळाले महा बेदर्दी । ज्याला मिळेना भाकर अर्धी । त्याला बसाया घोडी जर्दी ।

त्यासी बडेजाव आठ चांरदिं । सवेंचि झाली भाऊ गर्दी । तशामधें जे होते दर्दी ।

पार पडले मर्दामर्दी । दुनियेचा फुटाणा झालारे झाला । सेवक स्वामींचें मानीना ॥३॥

घर बिगारी भलताच धरावा । ब्राह्मण शूद्र शोध न करावा । जेथिल मुक्काम तेथेंच न्यावा ।

वस्त्रें घेऊन नागवावा । त्याला माघारा बोडका लावावा । त्याला दुसरा शिपाई भेटावा ।

त्याणेंच पुढें दामटत्वा । असा अवघि वेळ यावा जावा । ज्याचा गहूं हरबरा लुटावा ।

तोच बिगारी पुढें पिटावा । गांवकर्‍यांचा प्राण अटावा । पाटिलबाबा पळोनि जावा ।

गरिब एखादा हातिं लागावा । त्याचे मतें पाटिल बाबा । माराखालीं भोत भरावा ।

खंडणीचा ठराव ठरवावा । त्याचे जिवाला हा प्रळय झालारे झाला ॥सेवक स्वा० ॥४॥

हातांत भाला जेवूं घाला । कोण कुणाचा गुरु ना चेला । भलताच धमकावी भलत्याला ।

चोर दंडितो कोतवालाला । हा एक दाखला मिळाला पतिव्रता मुकली प्राणाला ।

शिनळ चढली लौकिकाला । सांगत फिरते ज्याला त्याला । एक जात टोपीवाला ।

मीं नाहिं भ्यालें पन्नासांला । अनंतफंदी सांगे जनाला । उलटा दमाना आयाजी आया । सेवक स्वा० ॥५॥


कवी - अनंत फंदी

जोरु कसमका कज्या

जोरु कसमका कज्या मुनो हाजा लढते फिरतेते ॥ बडा हजांबा खडा एकपर एक धबाधब गिरथेते ॥ध्रु०॥

खानोपिनेके तंगशाई येतोनाका दिननिकला ॥ माबापनो भलान किया मजपर रुटा हागतारा ।

साराघर दिनभुला खडू किबन हिकरता मुकाला । मयचरखेकेकमाई काहा लाग तुझे खिलाऊ नगदुल्ला ॥

पुढायतानें धरलिया सोसो येरझार करतिथे ॥बडा० ॥१॥

तुक्या कमाती फत्तर चुडयेल क्यो करती हाय हाय ॥ ऐसे लगकार जुया मारु एक बाल नहिरहने पाया ।

क्यापशम चरखेके कमाई हाम शिपाई हारगिसना खाया । दररकिब मारे तलबारा लोहखना खन तुटता जाय ॥

ये दुःख काल ककालेमे तेरे माबाप जगावे मरयेते ॥बडा० ॥२॥

सच कहुप्यारे सचकहु तुझे खुदाकी सौंगन कहा नौकरी रोताया ऐसा उलटा समया आया तिन दीन भुका मरथाता ।

तुझे तो रोटिका सपना औरतकुक्या खिलताया । मुये तुझेमे चाटु का हांडया धुके पिताया ।

तेरे सरीखे मेरे बापकु घरमे पानी भरतेथे ॥बडा० ॥३॥

रांडभांड बिछडीतो प्यारे फिर अबरु रहती कैसी । मरद आदमी झुटा होयतो नेक पतिव्रता जैसी ।

अनंतफंदीके छंद जैसे तलावमे कमल तिरथेते ॥४॥


कवी - अनंत फंदी

क्षीरसागरीचा हरी

क्षीरसागरीचा हरी पाहूं आल्या गोपी । अष्‍टनायका सोळा सहस्त्र तितक्या आटोपी ॥ध्रु०॥

जशी जिची भावना तसाच त्या रंगा । कोठें वेणी फणी न्हाणी धुणी नीत उठून हाच दंगा ।

तीचा योग जणुं भागिरथी गंगा । कोठें विलास अथवा कोणाघरीं मुनीं ब्रह्मचारी नंगा ।

एकांत लक्ष्मीकांत गेला झोपी । अष्‍टनायका सोळा सहास्त्र तितक्या आटोपी ॥१॥

करी थट्टा घटाला धक्का फोडी सुगडें । तरतरा पदर फरफरा फेडी लुगडें ।

गोपाळ मित्र नको मनांत लाजूं गडे । हें तुझेंच कवतुक वस्त्राआड उघडें ।

धर सुद दाट दहीं दूध लोणी ओपी । अष्‍टनायका सोळा सहस्त्र तितक्या आटोपी ॥२॥

वनीं धेनु चारितां कामळ हातीं काठी । माधवा थवा भोताला पशुदाटी ।

न्याहारीच्या बाहारी मग दहीकाला वाटी । खर्कटी बोटें आवडीनें देव चाटी ।

फंदी मूल म्हणे तुझी कळा तुला सोपी । नसे अंत कृतांता क्षणामधें चोपी ।

अष्‍टनायका सोळा सहस्त्र तितक्या आटोपी । क्षीरसागरीचा हरी पाहूं आल्या गोपी ॥३॥


कवी- सवाईफंदी

अक्रुर

अक्रुरा गोपी आक्रंदती हरीप्रति ठेवा । मथुरेशीं नको नेऊं पहारे मथुरेशीं नको नेऊं आमचा प्राणविसांवा ॥ध्रृ०॥

येऊन गोकुळी अवतरला दीनबंधु । तेपासुनि अवघे आनंदले गोपबंधू त्रैलोक्यामाजी दुमदुमिला आनंदु ।

हें क्षीर सागरिचें निधान ब्रह्मानंदु । हा भक्तांना कनवाळू गोकुळाबाई । अक्रुरा याविना गोपी धृतराष्‍ट्र न दिसे कांहीं ।

मथुरेशीं कसा नेतां समुद्रजावाई । या हरिवांचुनि आम्ही मृत्यु पावलों लवलाही । हा पुतनारी घननीळ हत्तीचा छावा । आमचा प्राणविसांवा ॥१॥

मथुरेशीं कंस कसा रिपु निर्मिला हरिचे साठीं । धाडिलें तुम्हातें आणावया जगजेठी । अक्रूर पण तुम्ही क्रूर भासतां पोटीं ।

निष्‍ठुर हा तुमच्या ह्रदयीं विषाच्या गोटी । आधीं समस्त गोपींचें प्राण वधावे । मग स्वस्तिक्षेम मथुरेशीं हरीला न्यावें ।

हरि गेल्यावर राहुन आम्ही काय करावें । म्हणुनि स्वहस्तें आम्हाशीं मारुनि जावें । या मुरारीचा दचका प्राणाशीं नसावा । आमुचा प्राण० ॥२॥

अक्रूर म्हणे पुरुषोत्तम सर्वां ठायीं । भरुनि उरलासे तुम्हाशीं ठावा नाहीं । हा जळिं काष्‍ठीं पाषाणीं शेषशायी ।

कंसालागी हरी हा वधील एके धाई । ही तुम्हास भासती याची लहान पराई । परि हा प्रळयाग्नि कैक बांधिल पायीं ।

हा सर्वांचा देह असुनि विदेही । गोपीहो तुम्हाला भ्रांत पडली एव्हां । आमचा प्राण० ॥३॥

अक्रुरा तुम्हि इतुकें बोललां असत्य । कळलें ये समयीं तूं कंसाचा भृत्य । वचनें ऐकुनी गोपी चित्तीं वनवास जाला ।

अक्रुरा काननीं कसें मोकलिलें गोपिकांला । जननी मृत्तिका फाकिती प्रयळ झाला । मालणी कैक प्राशिती विषाचा प्याला ।

फंदि अनंत म्हणे ह्रदयीं हरि बसवा । आमचा प्राणविसांवा । मथुरेशी नको नेऊं अक्रुरा पहारे । मथुरेशीं नको नेऊं आमुचा प्राणविसावा ॥४॥


कवी - अनंत फंदी

पति तर केवळ शुद्ध दांडगे

पति तर केवळ शुद्ध दांडगे घागरगडचे हंस जसे । पाणी वाहतां खटी पडल्या खांदी कावड डुल्लतसे ॥ध्रु०॥

चवला पुरती करी मजूरी कंबर बांधुनि हजीर जसे । अक्षरशत्रू 'ओनामासी' हें तव ठाउक स्वप्निं नसे ।

तंबाखूचा मोठा चाळा नाहिं मुखावर तेजकळा । दोटक्यांनीं भले दांडगे पाझर येइना खडकाला ।

परि निवळ फतर । पति तर केवळ० ॥१॥

तूं तर केवळ देवाघरची मुखरणी मध्यें श्रेष्‍ठपणीं । नाजुक साजुक कळी प्रफुल्लित पातळ पुतळी ठेंगणी ।

राजस गोंडस स्वहस्तकमळीं गौरवर्ण तनु देखणी । विशाळ डोळे बुबुळ कुळकुळित नाहिं कुठे तिळतुल्य उणी ।

शांत प्रकृती हास्यमुखी सुंदराकृती हो सदा सुखी । रंभा पाहुनि लज्जित होउनि तव गुणश्रवणीं पडति गळां ।

पति तर केवळ ॥२॥


कवी - अनंत फंदी

पंडित शाहणा आला

पंडित शाहणा आला मनामधीं उलटा सुलटा आला जमाना । पाऊस म्हणतो कर्मेना । धरत्रीनें पीक टाकिलें अंतपारी दिसेना ॥ध्रु०॥

दुनयामधिं बंड मातलें जो बळी तो कानपिळी । सुलतानी अस्मानी राव ऐका एकच धुमाळी ।

मोमणानें माग टाकले शिपाई झाले साळी माळी । ज्या योनीला जन्म घेतला त्याची उद्धरली नाहीं कुळी ।

आपलें सांडी देवदंडी त्याला पुर्वेला येईना । आप आपल्यामधीं मर्जी ठेविती मोक्षपदाशीं मिळेना । पंडित० ॥१॥

कळावांतणीची झाली राळ बटकी झाल्या शिरोमणी । दे साळू वाण्याची घाण केली या मारवाडयांनीं ।

गुरुवांचें संधान बुडविलें महार या वाजंत्र्यांनीं । पाटीलपांडे घरीं राहिले पट्‍टी केली कुणब्यांनीं ।

पहा पासरी कितीक ध्यावी सवा हात खचली धरणी । पाऊस अंतरीं शाहाणा मग तो जाऊन बैसला कोकणीं ।

बाबन हकांचा महारधनी याला पुरविल्या येईना । भोपळ्यामधीं सत्व राहिलें तो पाण्यांमध्यें बुडेना । पंडित० ॥२॥

लेक म्हणे बापाला म्हातारा झाला याची शुद्ध गेली । सुन सासुची मर्जी ठेविना फिरुन बोलू ती लागली ।

शिष्य झाले मस्त गुरुची विद्या गुरुवर फिरली । गोरसाला कोणी पुसेना दारु महाग विकू लागली ।

पतिव्रता ही उपाशी मरती तिला मिळेना सावली । चंचल नार बांधीत असे नवें घर एक दरसालीं ।

ब्राह्मण जोशी लटके यांचा ठोका येईना । अनंतफंदी म्हणे गडयांनों ऐकुनि घ्यावे सुज्ञाना ॥३॥


कवी - अनंत फंदी

घर नको मला मी फार त्रासलें

घर नको मला मी फार त्रासलें । नवती जान पतीची वाण खरें प्रमाण शपत आण मनीं उदासलें ॥ध्रु०॥

कोण भेटली मोहून फासले । वर्ष चार चुकुर नार नसे थार लाऊनि तार पहातो मासले । संगतीमुळें बेताल नासले ।

समजतात जरी येतात प्यादेमात कुच उरांत रसालले । सुबक ठेंगणी मुसमुसासले । नवती जान पतीची वाण खरें प्रमाण० ॥१॥

भुलनिशा करी जसें द्रव्य हरवतं । टाकितें उसास जातो भास खास नाहीं सुखास विषय करवत । रात्र वैरिणी दिवस पर्वत ।

ठेवितें शीर बंधु दीर व्हा वजीर पैलतीर न धीर धरवत । साक्षी देतील आसपासले । नवती जान पतीची वाण खरें प्रमाण० ॥२॥

अरुचि अन्न हें लागनें कडूं । हिंपुटींत जीब मुठींत हुटहुटीत कळवटींत पालथी पडूं । कधीं सखा सखी एकांतीं सांपडूं ।

सपन पडत उलट घडत कडकडत डाग पडत मळत का पडूं । गत कशी करुं मिळाले असले । नवती जान प० ॥३॥

निश्चय तिचा हिशोब गरतिचा । पावले दयाळ चंद्रमाळ रुंडमाळ व्याळ वेळ भरतीचा । मेघ वर्षतां उदय धरत्रीचा ।

धरुनि हात हांसत जात महालांत बेतबात पंचआरतीचा । चित्तवृत्तीनें सावकासलें ।

फंदी मूल करी कटाव नित घटाव सूर्यबिंब आज प्रकाशलें ।

नवती जान पतीची० ॥४॥


कवी - अनंत फंदी

हार तुरे तुला धीरा मी गुंफितें

हार तुरे तुला धीरा मी गुंफिते । नकोरे होऊं घाबरा तूं दिलभरा धिरा धिरा तुझ्यावरी आधीं रंग शिंपितें ॥ध्रु०॥

होळिला तुम्ही घरीं असतां कधीं ? ॥ मी आपुल्या स्वहस्तें का निजमस्तकीं गुलाल फेकीन दयानिघी ।

रंग खेळणें होऊं द्या आधीं । मग हो सारे रात्र घेऊनि बसा मला तुम्ही रंगमहालामधीं ।

शरीर हें तुला आज वोपिंतें । नकोरे होऊं घाबरा तूं दिल भरा धिरा० ॥१॥

दध्धराजभरा लई दिसा आला । होऊनि स्थीर धीर धरी, अधीर नका वस्त्र तरी नेसूं द्या मला ।

क्षणभरी उशीर लागला । ठीक ठाक चाकपाक झाक साबना उद्यां दिदार चांगला ।

वेणी मोकळी चापचोपिनें । नकोरे होऊं घाबरा तूं दिलभरा० ॥२॥

चाहते तुझ्यावर रंग टाकीन । त्या हातें फुलले तेल रेलचेल करुन आंग मर्दीन ।

भरभरु मुठी गुलाल फेंकीन । गोकुळीं जसा श्रीकृष्ण फाग खेळतो तसें तुम्हा मी लेखीन ।

तो हरी जसा त्या प्रीय गोपीतें । नकोरे होऊं घाबरा तूं दिलभरा०॥३॥

बनून फाकडी राहिली उभी । रंग राग पाग खेळूनि तुफंग मार करितसे खुबी । खुप देखणी लहानशी छबी ।

चोळी तंग घे पचंग आंग संग करीं निसंग मग कोणा न भी । तुज मी आपल्या ह्रदयीं स्थापितें ।

छंद फंदी आनंदाचे कटिबंध ते प्रबंध यामुखें अलाफितें । नकोरे होऊं घाबरा तूं दिलभरा० ॥४॥


कवी- अनंत फंदी

तुज नाहींरे माझी काळजी

तुज नाहींरे माझी काळजी ॥ध्रु०॥

आपण तरि जीव द्यावा । नाहिं तरि शुद्ध हातामधिं घ्यावा विणा टाळ जी । तुज नाहींरे० ॥१॥

कोण मिळाली ठकणी । माझा रांवा उडविला गगनीं ।
केली राळ जी । झाली राळ जी । तुज नाहींरे० ॥२॥

कोण मिळाली विवशी । कोणीकडे नेला राजबनसी ।
पिटी भाळ जी । आपटी भाळ जी । तुज । नाहींरे ॥३॥

घरास आले फंदी । तेव्हां सुंदर चरणा वंदी ।
घाली माळ जी । सख्याला माळ जी । तुज नाहींरे० ॥४॥


कवी - अनंत फंदी

एका राजाला कन्या झाली

एका राजाला कन्या झाली तिच्या उरावर तीन थान । जाईल आंधळ्याची तिथें लाग लाविला कुबडयानं ॥ध्रु०॥

तेथोनाची वाईट झाली कोणी करिना मग तिजला । तिला एका आंधळ्याला देऊन आपल्याच गांवामधिं ठिवला ।

तिला एका कुबडयानं फितवलं रोज घरामधिं आणि त्याला । कवाड वाजतां आंधळा म्हणे घरामधि कोण आला ।

ती म्हणे कुत्रें आले घरामधिं बाहेर घालितें पिटून । अशी कुबडयाला रोज आणिती पुढें ऐका त्याचें कथन । एका० ॥१॥

एके दिवशीं कुबडा बोले तिथानिशीं ऐकतां । कोण येतो म्हून उगाच आंधळा । सारा वेळ लावितो कथा ।

हा मरतां म्हणजे बरें गडे होत । तुझा आपला संग बरा होता । कुबडयानें एक सर्प मारुन बाहेरुन आणला ताथा ।

तिथानीचे केला हवाला घाल याला रांधुनशेन । दे आंधळ्याला खाया म्हणजे जवळ आल याचें मरण । एका० ॥२॥

तेव्हां तो सर्प चिरुनशेन तवली ठेविली चुलीवर । आंधळ्याला शिजवाया बसविले कुबडा होई तिजवर स्वार ।

गतका आला तवलिला तेव्हां तो पाहे कानाच्या सुमार । जहराचा कडका जो बसला आंधळ्याचा नेत्रावर ।

जहराच्या कडक्यान डोळ्यांच्या टिकाच गेल्या उडून । पहा उलटयाच सुलटें झालें त्याला रक्षिता भगवान । एका० ॥३॥

डोळे उघडून पाहे आंधळा कुबढा आणि तीनथानी । कुबडा वरती खालीं दोहींच्या आंगाचें पाणी पाणी ।

जळत लांकूड घेऊन झणी आंधळा उठला तत्क्षणीं । कुबडयाला माराया चालला आंधळा आहे त्याचे मनीं ।

जळत लांकूड उचलून झणी त्यान घातलं कुडवण ।


कवी - अनंत फंदी

आषाढबन

इथलेच पाणी,
इथलाच घडा,
मातीमध्ये -
तुट्ला चुडा.

इथलीच कमळण,
इथलीच  टिंबे
पाण्यामध्ये -
फुटली बिंबे.

इथलेच उ:शाप,
इथलेच शाप,
माझ्यापशी -
वितळे पाप.

इथलीच उल्का,
आषाढ-बनात,
मावलतीची -
राधा उन्हांत.

दि. २३.१.५८, 

पाऊस

देवळाजवळचा ;
पाराजवळचा
पाऊस.
... देवळापलीकडचा
परापलीकडचा
पाऊस
सर्व ................................
......................................
........................................

पाऊस
रस्तोरस्ती
रस्त्याच्या पलीकडचा
पाऊस
रस्त्यात
सर्व काळोखात
वस्त्यात ....................................
...........................................
...........................................
आयुष्यात
गल्लीबोळात
जुनेरात
आठवणींच्या
पातळात
समईत ................................
........................................
पाऊस
डोळ्यांत
सर्व.


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश

भूपाळी

ती खिन्न भुपाळी
फिकट धुक्याचा घाट
वर संथ निळाइत
नारिंगाची वाट

ती कातर काळी
तमगर्भाची नगरी
तेजात वितळली ,
स्तंभ उभे जरतारी

अन सावट मंथर
कृष्ण घनांची छाया
ओवीत मिसळली
हंबरणारी माया

हा पिवळा शेला
आज तुझ्या अभिसारा
घे गंध फुलांचा
जशी उन्हाची मधुरा


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश

दु:ख

घन जमतिल तेव्हा जमतिल
मोकळे केस तू सोड ;
परसात तुझ्या तरि काय .
निष्पर्ण सुरूचे खोड

पाऊसपाखरे जेव्हा
देशांतर करुनी येतिल ;
मग असे सुखाचे सजणे
मेंदूहुन रंगीत खोल…

आटल्या नदीच्या पात्री
हा उभा एकटा बगळा ;
घन करुणाघन होताना
वाळूचा भांग कपाळा …

मृगजळी ऊन स्वप्नांचे
हे कलते कलते पसरे ;
पेशीचे तोवर माझ्या
तू माळ वाळले गजरे …

घन जमतिल तेव्हा जमतिल
वार्‍याचे अलगुज खोटे ;
हे दु:ख मिठीचे तोवर
हाडांना घेऊन पेटे.


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश

प्रार्थना

उठा दयाघना लावा निरांजने
देहातले सोने काळे झाले
झोपेतले जीव झोपेतच मेले
आभाळचि गेले पंखापाशी
इथे नागव्याने शोधावा आचार
जैसा व्यभिचार जोगिणीचा
उष्टावली पोर हिंडे दारोदारी
तैसे माझे घरी नारायणा
पंढरीचे पेठे रात्र मोठी वाटे
दगडाला काटे फुटलेले
गोंजारून घे ना ! माझे हे लांछन
रक्ताला दूषण देण्यासाठी


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश

वारा

जेह्वा अंधारून येतो
सारा अतृप्त पसारा ;
कुण्या अबंध जन्मांचा
पक्षी साठविती चारा ?

जागोजागी पडलेली
गंध नसलेली फुले ;
जसा विश्वात नसावा
तुझ्या दिठीला निवारा !

माझ्या मनापाशी भिंती
मागे ओढती कवाडे ;
जरा उचलता पाय
पुन्हा उसळतो वारा !


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश

घोडे

धावती किती वेगाने
हे घोडे माझे वैरी
आवाज धरून लपलेले
आकाश जसे अंधारी
अंधार मुका असतो का?
हे कधीच कळले नाही
घोडयांच्या डोळ्यांमधुनी
रडणारे कोणी नाही …
तू सजुन धरावी हृदये
घोडयांचे कौतुक करता
की जळे पिपासा अवघी
ही घागर भरता भरता ?
वादळी अनावर राने
धावले जिथुन हे घोडे
तो प्रदेश टापांखाली
पसरुन वितळली हाडे …
धावती किती वेगाने
देहाची रचना प्याया
रचनेच्या खोल तळाशी
यांच्याच उतरल्या छाया


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश

हिमगंध

नको मोजू माझ्या
मुक्तीची अंतरे ;
ब्रह्मांडांची दारे
               बंद झाली.
माझ्या आसवांना
फुटे हिमगंध,
मागे-पुढे बंध
              पापण्यांचे.


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

बहार

पान पान सोडती सहिष्णु वृक्ष येथले
चक्र ओंजळीतले वर्तुळांत नादलें
ऐकतो कुठेतरी तमांत झांकली घरें
दिशादिशांत गात हा फकीर एकटा फिरे !
पहाड शब्द वेढती तसा सतंद्र गारवा
नि रक्तवाहिन्यांतुनी उडे सुसाट पारवा …

तुझी बहार मंदशी तृषार्त जाग ये जरी...
वेदनेतली फुले नि चांदण्यातल्या सरी…
तुझेच अंग चंदनात अंतराळ ओढते
पुरात आणखी असे सजून ओल मागते…
दुक्ख लागता मला सभोवती जसेंजसें
दयार्द्र होउनी तसें क्षितीज दृष्टिला दिसे …


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

लाटांचे देऊळ

लाटांचे देऊळ असावे
जिथे नसाव्या लाटा
समुद्र सोडुन दूर निघाल्या
जळवंतीच्या वाटा

माडांनाही वाट नसावी
फक्त असावे डोळे
या देहाच्या दिप्तीमधला
चंद्र जिथे मावळे …

सागरतंद्रीतून नसावे
कुठे चुळाभर पाणी
तुझ्या कृपेच्या दुक्खामागे
येइन मी अनवाणी …


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

हळवी

जळात भिजले
वळण उन्हाचे ,
मावळतीच्या सरणावरती
निजून आले
उरलेसुरले दुक्ख मनाचे.

धुक्यात गढल्या
भित्र्या अगतिक कौलारांच्या तांबूस ओळी ,
मी फिरले
दारावर झोकून शिणली मोळी

झाले हलके
तमांत पैंजण.
तंग जरासा उसवून वारा ,
भावूक हळवी
धावत सुटले मृदबंधातून.


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

प्रारंभ

इंद्रियांच्या प्रारंभात क्षितिज,
संवादीपणाने.
नाद माझे हळुवार, पैंजणी रात्रींना
दुःख अभिजात, स्पर्शमय वर्तुळांत
क्षणाक्षणानें.
अवकाश- रेषा निसरड्या, सप्तरंगी
आकाशगामी डोळियांच्या गुंफात .......
जाऊ नकोस, हांकेवर थांब, ते अमृताचे
भयाण डोह आहेत
अमर होशील......


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

उखाणा

शुभ्र अस्थींच्या धुक्यात
खोल दिठीतली वेणा
निळ्या आकाशरेषेत
जळे भगवी वासना.

पुढे मिटला काळोख
झाली देऊळ पापणी;
आता हळूच टाकीन
मऊ सशाचा उखाणा.


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

निर्मळा

प्रतिबिंब गळे कीं पाणी
अपुल्याच दिठीशी हंसले
ओसाड प्राण देवांचे
सनईत धुक्याच्या भिजले .

स्वररेघ निर्मळा पसरे
रडतात तमाशी झाडे
की श्रावण घेउनी हृदयी
ओवीत उतरले खेडे …

हिमभारी अपुले डोळे
पृथ्वीच्या थोर मुळाशी
पायांवर येउन पडती
मरणाच्या हिरव्या राशी ….

वासांत विराणी कसली ?
पाण्याचे तंतू तुटती
लोचने जशी स्पर्शाने
खाचेतुन गळुनी पडती ….

ही अशी निर्मळे रात
अज्ञात आठवे चेहरा …
अन हात तुझा क्षितिजाशी
ती वाट उभी धरणारा ….


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

पहांट

आज केशरी थेंबांनी
जाग आणिली कोवळी.
हांका - हांकांच्या लेण्यांत
सूर घुमले पोवळी .

निळया ओलाव्याच्या कांठी
आज नारिंगाचे बन,
झाली तरंग … तरंग
स्निग्ध मेघांची पोकळी .

रित्या मुठीत झांकला
शुक्र प्रभेचा अनंत ,
स्पर्शास्पर्शांत गोंदले
स्वप्न राधेचे हिवाळी


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

देखणा कबीर

दिशावेगळ्या नभांची
गेली तुटून कमान ;
तुझ्या व्रतस्थ दुखाचे
तरी सरे ना ईमान !

जन्म संपले तळाशी
आणि पुसल्या मी खुणा ;
तरी वाटांच्या नशीबी
तुझ्या पायांच्या यातना

भोळ्या प्रतिज्ञा शब्दांच्या
गेली अर्थालाही चीर ;
कांचा वेगळ्या पार्‍यात
तरी देखणा कबीर !!


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता