आशादेवी

झाली पश्चिम लाल लाल सगळी रक्तामधे माखुन,

गेली माजुन मानदर्पमदिरा बेहद्द ती प्राशुन;

प्रेतांनी भरले नभातिल दरेकोरे तयांच्यावर

मांसाच्या चिखलात मुक्त फिरते ही भैरवी भेसुर.

होती पूर्व ! उषासखी, गुणवती, सत्वाढ्य, तेजोवती,

जीचे नित्य मृदुत्व लज्जित करी जाईजुईशेवती;

ती हा प्राणिविनाश घोर बघुनी उद्विग्न झाली पुरी

शिंतोडे पडले अशुद्ध उडुनी तन्मंगलश्रीवरी.

रक्ते रंजित भोग काय करणे प्रीत्यर्थ त्यांच्या रणे ?

येथे सात्त्विक संपदा न मिळती का रक्तपाताविणे ?

आहे मानवजाति आक्रमित का उत्क्रान्तिपंथाप्रती ?

शंका त्रासविता अशा, दिसुनि ये तो चित्राकृति.

"होते सर्व सभोवती पसरले संदिग्ध श्यामाम्बर,

काळ्याशार ढगात थेट शिरता भूगोल हो गोचर;

तारा लोपुनि सर्व एक सरसा अंधार हो वाढता

तेथे पश्चिम पूर्व कोण कुठल्या ? सार्‍या दिशा आटता.

विश्वातील समस्त वस्तुमधले सौंदर्य जे जे असे,

नेत्रींच्या पुतळीकडून जपुनी वेचूनि घ्या ते कसे !

चित्ताची बनवून मूस, तुमच्या सत्कल्पनेच्या करे

ओता मूर्ति तुम्हीच, कारण गिरा लाजोनि येथे सरे !

भूगोलावर त्या अधिष्ठित अशी कोणी कुमारी असे,

रुपा आत नव्या छटा उफळता ’न्यारी’ खुमारी दिसे !

अंगांगे गळली, तशीच मळली खेदे मुखश्री, किती,

स्कंधिचा सरला जरी पदर तो नाही तिला शुद्ध ती.

आकांक्षा, असहायता, अबलता, चर्येवरी रेखले

होते भाव, तयास पाहुनि झणी पाणी मुखीचे पळे;

स्नेहस्निग्ध नसे तिची नजर, ती शून्याकडे लागली,

वाटे स्वप्नदशेत चूर सगळी वृत्ती तिची जाहली !

वीणा एक जवाहिरे जडविली होती, जियेच्या वरी

तारा सर्व तुटोनि एक उरली बाकी, तियेला जरी

होती छेडित ती तशीच बसली काढीत तारेतुनी

नाना सुस्वर मालिका, मृत मना चैतन्य दे तो ध्वनि !

हे चेतोहर चारुचित्र विरले त्या चारुगात्रीसह,

झाला जीव विषादजन्य ह्रदयग्लानीमुळे दुस्सह;

आहे सर्वविनाश ’आ’ करुनिया आता समीपशित,

यत्‍नाच्या परमावधीविण टळेना, तो असे निश्चित.

होते कार्य न हो, तरीहि पडल्या काळात या कष्टद

गाणे पूर्वपरंपरादि महती हे शुद्ध हास्यास्पद;

तेणे काय फसेल धूर्त जग हे वाटे असे आपणा ?

हे तो केवळ आत्मवंचन ! पुरे आता जुन्या वल्गना !

विज्ञाने निगमागमात असती किंवा पुराणातली,

ती तेथेचि असोनि द्या ! गरज ना त्यांची कुणा राहिली

शान्तिप्रेम समत्व पाठ नसते गाऊची द्या आजला,

जे का मोहनमंत्रबद्ध असती माझे कवी त्यांजला.

आहे हा व्यवहाररूप अखिल व्यापार जो जो दिसे,

हे आहे जर मान्य, कायम ठसे त्याचे घडावे कसे ?

निर्मावे जग अन्यथा, त्यजुनिया वस्तुस्थितीला सदा

राष्ट्रात्मा अति पंगु पोकळ बने तेणे; नसे फायदा.

आहे बाल्यदशा दिसंदिस जरी वाढीस हा लागला

चालू मानववंश, हे न समजा की पूर्णता पावला,

हा तो नित्य चुके, प्रसंग पडती बाके, सदा काळजी !

खात्रीचा न उपाय एक म्हणुनी योजू नये काय जी ?

आयांचेच नसानसात उसळे ते रक्त जे दुर्धर.

ना बाहेर न आत खास जगती आम्हास जे दुष्कर;

देऊ तोंड नवीन काळ जर हा होऊन आम्ही नवे,

येते पालटता अम्हांसहि पुढे आल्या स्थितीच्या सवे.

आहे जोवरि एक तंतु उरला वीणेवरी शाबुत,

आशा अद्‍भु रम्य बोल असले राहील तो काढित;

ती होऊनि निराश, उज्ज्वल तिची स्वप्ने लया पावती

रक्षो एक तदा दया भगवती आम्हा प्रभूचीच ती !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा