बाहुल्यांचा विलाप

दीन बाहुल्या तुम्ही पाहिल्या असतिल जितुक्या आजवरी,
तयांत अमुची हीनावस्था पुरी खरी,
असौख्यसदने अमुचीं वदनें मषी फांसुनी विरुपली,
हाय दुर्दशा कोठुनि आम्हां ही आली !
दिनरजनीभर अति आर्तस्वर काढुनि रडतों दु:खभरें-
“नसतों आलों जन्मा होतें तेंचि बरें !”
पाय बांधुनी वरते करुनी अशा प्रकारें उफराटें,
दारावरतीं लोंबविलेसें आम्हांते;
सरीवर सरी पडतां भारी पर्जन्याच्या जोमानें
अस्वस्थ अशीं असती जेव्हां सर्वजणें.
येता जातां. उचलूनि हाता, त्रस्त माणसें तेव्हां ती
मुखांत अमुच्या अहह चापट्या लगाविती;
हिंदुस्थानी बाया यवनी यापरि आम्हां वागविती;
बरसातीच्या अम्ही बाहुल्या, दीन किती!
मुसळधार तो पाउस पडतो, रविदर्शन होउं नेदी,
मास दोन तिन एकसारखा उच्छादी,
तेव्हां त्याचा अतिशय साचा कंटाळा जो त्यां येई,
तो आम्हाला यापरि भोवतसे पाही!
अहह! अम्हांला पडते, बदला पर्जन्याच्या भोगाया
विपदा, जी आणिती आम्हावरी त्या बाया!
खात चपाट्या, या उपराट्या स्थितींत लोंबत राहुनिया,
त्यांच्या सगळ्या उपमर्दाला साहुनियां
घेणें तोंवर लागे, जोवर हवा स्वच्छ नाही झाली,
शारदीय ती शोभा जों नाही आली !


कवी - केशवसुत
जाति - फटका
- बालबोधमेवा; १ सप्टेंबर १८९८, पृ. १४३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा