कुस्करूं नका हीं सुमने !

जरि वास नसे तिळ यांस तरी तुम्हांस अर्पिलीं सु-मनें.

मधु जरी नसे तिळभरी अंतरीं तरी करीं हीं धरणें.

यां वर्ण नसे सौवर्ण; जों न हीं शीर्ण तोंवरी धरणें.

घ्या करीं, क्षणाभीतरी वाळतिल तरी तयांना जपणें.

ही वन्य फुलें मधुशून्य, मानितिल धन्य तुम्हां करि सजणें.

घरिं मुलें तशीं हीं फुलें, हूड वत्सले लोचनें बघणें.

अंगुली कठिण लागली तरी संपलीं ! हळुच या शिवणें.

ह्रद्वनीं फुलें कोठुनी जशीं उपवनीं उमलतीं नयनें ?

मालती, बकुल, जुइ जाति हीं जरी हातिं, हींहि असुं देणें.

अंजली धरुनि अर्पिलीं, भक्तिनें दिली म्हणुनि तरि घेणें !


कवी - भा. रा. तांबे
जाति - भवानी
रतलाम - उज्जैन, आगगाडींत,१९००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा