माझिया डोळ्यात आसवे जगाची

माझिया डोळ्यात होती आसवे साऱ्या जगाची!
शेवटी साऱ्या नद्यांना ओढ असते सागराची!!

पावसाळी या हवेला मी तरी भुलणार नाही!
मी दिले सोडून आता वाट बघणे पावसाची!!

चार दिवसंचीच असते रोषणाई उत्सवाची!!
रोज थोडी रात्र येते, पौर्णिमेच्या चांदण्याची?

गारव्याला माझिया होते विषारी साप सुद्धा!
जिंदगी माझी जणू होती सुगंधी चंदनाची!!

पाय आपोआप माघारी घरी परतायचे हे.....
केवढी गोडी मनाला रेशमी या बंधनाची!


कवी - प्रा.सतीश देवपूरकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा