जमेल तितका जुलूम

जमेल तितका जुलूम जो तो करून गेला!
मला खुबीने हरेकजण वापरून गेला!!

किती बघा काळजी तयाला असेल माझी.....
मला गलबतापरीच तो नांगरून गेला!

न थांगपत्ता, अजून त्याची न गंधवार्ता....
वसंत आला कधी? कधी तो सरून गेला?

तुझ्या दुराव्यामधे अशी जाहली अवस्था....
तुझ्या स्मृतींनीच प्राण हा मोहरून गेला!

हरेक वस्तू घरातली ओरडून सांगे....
कुणी तरी वादळापरी वावरून गेला!

कळे न केव्हा असा शिशिर जीवनात आला!
मलाच आतून पूर्ण तो पोखरून गेला!!

विनाशकारी थरार केदारनाथमधला;
दुरून पाहून जीव हा गुदमरून गेला!

पहाड तो उंच एवढा ढासळून गेला!
क्षणात पाऊस त्यास, बघ, कातरून गेला!!

अशा प्रकोपासमोर माणूस काय टिकतो?
कृमीकिड्यांसम हरेकजण चेंगरून गेला!

न राहिली एकही इमारत, सपाट सारे!
अता कुठे पूर तो जरा ओसरून गेला!!

क्षणात काही, प्रलय म्हणे तो निघून गेला....
सडा शवांचा चहूकडे अंथरून गेला!

स्वत: पुरानेच काळजी घेतली शवांची.....
शवांवरी सर्व रेत तो पांघरून गेला!

नशीब होते, तसेच ते धेर्यवान होते!
मुठीत धरूनीच जीव जो तो तरून गेला!!

दिला मला हात एकदा अन् निघून गेला....
तमाम आयुष्य मात्र तो सावरून गेला!

कुणी न डोकावले, तृषा पाहिली न माझी!
जथा  ढगांचा निमूट दारावरून गेला!!


कवी - प्रा.सतीश देवपूरकर
वृत्त: सती जलौघवेगा
लगावली: लगालगागा/लगालगागा/लगालगागा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा