प्रभात पोवाडा

शूर मर्द महशूर देश दख्खनचे सरदार,

मानकरी बारगीर बाणेदार शिलेदार.

गावगावचे मिळोनि भरली मजलस भरदार,

कवन कोणते गावे करितो फिकीर शाहीर.

रूप भयंकर, सुंदर, वाग्बळ थोर जोरदार,

पुराणकाळाचे अंगावर झगे चमकदार.

पूर्वकवीश्वर तेही सादर सदरेला झाले,

सिद्धरसाची गिरा तयांची नागर वच बोले-

"विचार करणे कशास" म्हणती "कवन म्हणायाचा?

काय शिरस्ता तुम्हा न ठावा शाहिरपेशाचा?"

चिरंजीव गत शाहीरांनो ! हीच धरून शिस्त

विद्यमान शाहीरमंडळी जाते नेमस्त.

यशःप्रशस्त्या, विजयकथा, ते समरचमत्कार

वीरपुरुष पुरुषार्थ निर्मिले आपण साचार.

अजब, मातबर, अगाध याहुनि भारदस्त काही

फिरोनि ऐसे, मान्य अम्हाला की होणे नाही.

गतास वंदुनि, गफलत सोडुनि, निजमार्गे चालू

वर्तमानकाळाची बाजू आम्ही सांभाळू.

चौशतकांची दीर्घ झटापट ही चालू आहे,

महाराष्ट्रजनसागर सगळा खळबळला आहे.

हिंदूयवनशीलातिल जो जो भिन्न भाव आहे

त्या दोहोतिल उत्तमतेचा हा झगडा आहे.

भरतखंड रणाअखाडा, झुंजार मल्ल दोन्ही,

निर्वाणीची दारुण त्यांची चाले झोंबी ही.

स्वदेशजनधर्माचा जीर्णोद्धार करायाते

झुंज मातबर सभोवार ही घनचक्कर होते.

हुल्लड हल्ला दौड गराडा घाला अवचीत,

शिकस्त खाणे, दुष्मन करणे चौमुंडी चीत,

मोड पळापळ झोड, जयाची आशा हिरमोड,

फसली मसलत, अंगा आली बाजू बिनतोड,

वीर यशस्वी, वीर अपेशी, वीर रणी पडला,

सामाज नावाजितो कडाकुन या सकळीकाला.

सर योद्धे करितात लढाई कमाल शर्थीने.

पतन सोशिती त्याहुन जास्ती जबर्‍या हिमतीने.

यास्तव आम्ही हार मानितो जीतीसम थोर

रणखंदाळी कडेविकट ही गातो घनघोर.

जीव कुडीसम शाहीराची मर्दाची जोडी

एकामागे दुजा तगेना लगे प्राण सोडी.

सभाजनांनो ! असे प्रार्थना तुम्हा शाहिराची

खबरदार होऊन खबर ऐकावी दुनियेची.

नुरो पैरवी पृथ्वीवरती हिंदूंची काही

जणू मनसुबा असा करी की सालिम दुनिया ही.

चौकिपहारे उत्कर्षाच्या ठेवुन हमरस्ती

हिंदुस्थानी बंदी केली हिंदूला पुरती.

कहीकवाडा वाढुन किंवा वेठबिगारींनी

पोट भरावे दुनिया म्हणते हरदम हिंदूंनी.

विसर विसर मस्तानी दुनिये ! तुझी बात पहिली

नजरबंद हिंदूंची आता नजर खुली झाली.

हिम्मत हिकमत धमक जोम निर्धार तडफ नेट,

धाडस धोरण हुरूप अक्कल पोच अटोकाट.

स्फूर्ति कल्पना प्रताप अघटित घटनासामर्थ्ये

पूर्वी होती, आता असती बघता सत्यार्थ्ये.

समुळ बुडावा हिंदू मर्जि असेल देवाची,

राजी आम्ही. करून जाऊ करणी मर्दाची.

जनचित्ताचे समुद्रमंथन दिशा दक्षिणेने

चालविले बहु काळापासुन हिरशी चुरशीने.

’स्वतंत्रता’ शिरताजरत्‍न वर उदरांतुनि येई

चतुर मराठ्याकरी प्रबल अभिमाने ती देई.

काळ मागला शोधुन बघता दृष्टीला दिसतेः

एके वेळी एक राष्ट्रची इतरांचे नेते;

पुढिल पिढ्यांना मानवतेच्या आस-भरोशाला

एका वेळी जामिन एकच देश होत आला.

देश मराठा लोक मराठा कुल वरकड देशा

नेता जामिन आज एक हा, नाही अंदेशा.

जय अपजय या स्वातंत्र्याचे युद्धी येतो की,

म्हणाला नकळे याचा शेवट कैसा होतो की.

कोण यशस्वी युद्धे झाली मागे सर्वस्वी ?

काय जगी निर्भेळ यशस्वी सांगा आम्हासी ?

आर्यराष्ट्र कृतकार्य कधी का ते होते झाले ?

कार्य निसर्गाचे का सांगा पूर्णतेस आले ?

विजयाचेही पोटी मोठी कार्ये उद्भवती

अधिक झटापट करणे लागे ज्यांच्या सिद्ध्यर्थी.

जनचित्ताला खळबळणारे एक ध्येय काही

जगदन्तापर्यंत टिकेसे कायमचे नाही.

ग्रहगोलांच्या निर्मळ ज्योती खुल्या हवेवरती

अंतराळागर्भांतुन पोहत पृथ्वीसह जाती.

काय तयांचे रहस्यमय ते साध्य न हे कळते

अचाट सुखमय आहे ’काही ते’ निष्ठा म्हणते.

जीवितगंगा त्याच एक आनंदसमुद्राते

प्रचंड वेगे गाठायाते धूमधडक जाते.

दैव मानवा साध्य सहज ते मिळवुनिया देते,

विपरित होता हिसकुन नेते असे असेना ते.

देशकार्य मागल्या पिढ्यांचे थांबुन का पडले?

धडे मागले गडी मराठे विसरुन का गेले ?

वृद्ध शुद्ध हतबुद्ध आपले कोणी का झाले ?

रस्ते भुलले, चळू लागले मागे रेंगळले ?

सरा पुढे पिळदार मराठे गति दुसरी नाही

तरुणाविण तो कार्यभार मग कोण शिरी वाही ?

उठा उठा नरनारी ! आता रात्र होय सरती

सूर्योदयकाळाचे शाहिर ललकारी देती.

नाथोदय चिन्हिता कंचुकी गात्री तटतटली

कणोकणी वसुधाङ्गी चंचल विद्युत्‌ संचरली.

सौंदर्याचा चढतो जणु की सत्यावर उजळा

लोकनाथ तो उदया येतो, वंदू या त्याला.

महाराष्ट्रपार्वती उग्रतप आजवरी तपली

परम कृपेची पाखर तिजवर परमेश्वर घाली.

दुःस्वप्नाची निशा चेटकी ओसरून गेली

उत्कट उत्कंठेने जनता उत्साहित झाली.

महाराष्ट्रभाग्याची आता पहाट ही फुटली

दैन्यकाळिमा मराठमंडळवदनाची फिटली.

वैगुण्याच्या हिडिस ढगांनी दिग्बंधन होता

अवनति वाहुन चहोकडोनी शिगेवरुन जाता,

किरण पूर्ण तेजाचा कोणी कडकुन निकडीने

करित चुराडा त्यांचा येतो भूवर धडक्याने.

महाराष्ट्रभाग्याची आता पहाट ही फुटली

दैन्यकाळिमा मराठमंडळवदनाची फिटली.

वैगुण्याच्या हिडिस ढगांनी दिग्बंधन होता

अवनति वाहुन चहोकडोनी शिगेवरुन जाता,

किरण पूर्ण तेजाचा कोणी कडकुन निकडीने

करित चुराडा त्यांचा येतो भूवर धडाक्याने.

महाराष्ट्रभूमंडन कंकण बांधुन विजयाचे

राय शिवाजी आला; वंदू चला चरण त्याचे !

स्थापायाला स्वराज्य दंडायाला मत्ताला

मदत करी तुळजा; हा राजा अवतारी झाला.

डाव मांडिला पांची प्राणा लावुन पैजेला

कोण जिवाचे साथी ? या ते साहस कर्माला.

स्थैर्याचे धैर्याचे क्षत्रिय वृत्तीचे असती

वाण सतीच त्यांनी घ्यावे हे उचलुन हाती.

पुरुषार्थाची एक सिद्धि की सर्वस्वी घात

साहसात या शिवरायाची तुमच्यावर भिस्त.

अमर्याद सत्ताबळ अगणित दळबळ शत्रूला

रणोन्माद उद्दाम जिद्द बेहोष करी त्याला.
विक्रमसागर त्याचा बुडवी उत्तर देशाला

लोट तयाचे धडका देती दक्षिण दाराला.

थोप थांबवायाला ती सह्याद्रि पुढे सरला

प्रचंड तो गिरिराज खरा पण आला टेकीला.

करुन चढाई फौजा आल्या भिडल्या दाराला

गड किल्ले कापती साहता त्यांच्या मार्‍याला.

महाराष्ट्रधर्माचे आहे क्षात्रकर्म बीज

'आब आज जाताहे' राखा भाई हो ! लाज.

शत्रुसंघ पाहता दाट बेछूट शूर होती

शिरा शिरा ताठती, अचाट स्फुरणे संचरती.

समरशूर गर्दीत एक बेधडक भिडुन मिसळे

शत्रुभार संहारकर्म विक्राळ परम चाले.

तुच्छ तनुब्रह्माण्ड चंड संग्रामकैफ चढतो

प्रशंसिता तुंबळ त्वेष लंगडा शब्द पडतो.

डंक्यावरती टिपरी पडली; हुकुम जमायाचा.

चला मराठे चला ! वख्त हा आणीबाणीचा.

हेटकरी मावळे, देशमु, पांडे रणबहिरी,

दरकदार, रामोशि, धारकरि सराईत भारी;

एक एक हंबीर वीर हा वर्णवे न काही

जय करण्याची चिंता अंबा जगदंबा वाही.

स्वधर्मकाव्यज्योति अखंडित तुम्हामुळे जळती,

राख तयांची होती सुरता तुमच्या जर नसती.

प्रबळ शत्रु खेटता तेज ये मुळचे प्रगटोनी

चला दाखवा तया मराठी भाल्याचे पाणी.

धर्मशिळेवर पाय ठेविला तो मागे घेणे

पूर्वजास ते उणे, आपुले हसु होइल तेणे.

पहा पहा ते पितर आपले काय बरे म्हणती-

"आभाळातुन पडला का हो ! तुम्ही धरेवरती ?

"भरीव छात वळीव भुज हे दिले तुम्हा आम्ही

"स्वोदपूर्तीकरिता केवळ आणु नका कामी.

"डोळे वाणी अमुची बघते वदते त्यात तुम्ही

"जीवलतेची नवती अमुची फुलली, तेच तुम्ही.

"स्वप्नाजागरी पडछायेसम आम्ही सांगाते

"करित मोकळे आहो तुमचे विजयाचे रस्ते."

काल बदलला, ध्येय बदलले, पूर्वपुण्य फळले;

अभिनवभारत जन हो ! आता जन्माला आले.

चित्र मागले तुम्हापुढे मी एक उभे केले

ओळख तुमची पटते का हो वदा त्यात पहिले.

चढती दौलत, बढता होवो वेल मराठ्यांचा

जय मराठे ! जय मराठे ! जय बोलो त्यांचा !

नव्या उमेदी, नवे जिव्हाळे, नव्या मराठ्यांचे

नवे भरोसे, नवे कवन हे नव्या उमाळ्याचे


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

क्षणभर

काटेरी वेलीचे जाळे

रठ्ठ चर्म, गाठांनी भरले;

अग्रावर पण निर्मळ ढवळे

होते एकच कुसुम विकसले !

कृष्ण निशा; अंबोधर घोर

ग्रसित करी गगनश्री सुंदर;

परंतु होती एक शिरावर

प्रसन्न तारा नयनमनोहर !

ते-ती असता एकएकटी

सुसह होय ती भयाण सृष्टि;

स्वर्गतिनिरयगतिप्रत्यय दे

जी एका समयावच्छेदे.

नित्य निराशेचे अवडंबर

जीर्णाशेचे जाल निरंतर,

करूनि तुज मन्मनी पुरःसर

व्यथित जिवा सुख देती क्षणभर !काटेरी वेलीचे जाळे

रठ्ठ चर्म, गाठांनी भरले;

अग्रावर पण निर्मळ ढवळे

होते एकच कुसुम विकसले !

कृष्ण निशा; अंबोधर घोर

ग्रसित करी गगनश्री सुंदर;

परंतु होती एक शिरावर

प्रसन्न तारा नयनमनोहर !

ते-ती असता एकएकटी

सुसह होय ती भयाण सृष्टि;

स्वर्गतिनिरयगतिप्रत्यय दे

जी एका समयावच्छेदे.

नित्य निराशेचे अवडंबर

जीर्णाशेचे जाल निरंतर,

करूनि तुज मन्मनी पुरःसर

व्यथित जिवा सुख देती क्षणभर !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

काव्यानंद

दैत्यांनो ! न समुद्रमंथन, वृथा येथे बाळाची कथा

येथे वायुसुता ! हतप्रभ तुझी उड्डाणदर्पप्रथा.

होते अक्षमवेग यद्यपि जगच्चक्षो ! तुझे दर्शन

वाया केवळ वादपाटव न हे वाचस्पते ! वाग्रण.

येथे अद्‌भुतरम्य नित्य पडले स्फूर्तिप्रभेचे कडे,

अम्लान प्रतिभा-कळ्या उमलल्या आहेत चोहीकडे.

वोसंडे दुथडी भरूनि सरिता संकल्पना पावन

वृत्तींची रसलीन चंचळ खराश्रेणी करी क्रीडन.

सारीही जड इंद्रिये न शकती येथे प्रवेशावया

बुद्धिग्राह्य न वाव त्यास, न कळे ठाव प्रमाणत्रया.

वृत्त्यन्तर्गत टाकणे कठिणता, तद्रूपता पावणे,

काव्यानंदरसप्रसंग मग निस्संग संभोगणे !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

बंडवाला

"शोभिवंत भीवरातीर गंभीर नीर वाहते

अफाटचि हिरवट वन भोवते !

"फुले भरुनि ओचले गुंफुनी स्वकरे त्यांचे सर

पुजावा वाटे गौरीहर."

आलापित घाला हे होती मंजुल गीतस्वर

गडाच्या बसोनि टोकावर.

"प्रफुल्ल ते भीवरातीर गंभीर नीर वाहते

अफाटचि हिरवट वन भोवते !

"राज्ञीपद सुखभोग सोहळे नको; डोहळे मनी-

सख्याच्या संगे वसणे वनी"

नगर गोपुरे सोडुनि सारे म्हणसी येइन वनी

अगोदर विचार कर साजणी

दर्‍या आणि दरकुटीत आम्ही क्रमितो दिनयामिनी

यातले मर्म समज कामिनी.

वनविहरण मग मनोहारिणी ! करणे वदलो तरी

गातसे तेच गीत सुंदरी.

"प्रफुल्ल ते भीवरातीर गंभीर नीर वाहते

अफाटचि हिरवट वन भोवते !

"राज्ञीपद सुखभोग सोहळे नको; डोहळे मनी-

सख्याच्या संगे वसणे वनी."

"वारु पंचकल्याणी अबलख, करी शिंग ह्या खुणा

दाविती उघड करुनि आपणा.

"नृपमृगयावनरक्षक आपण स्वामिभक्त 'बनकरी'

दिसोनी ये हे वरच्यावरी !"

बाले ! बनकर शिंग मजेने वाजे आरुणागमी

आमुचे घोर निशेच्या तमी.

तरिहि सखी गातसे. "तीर गंभीर नीर वाहते

अफाटचि हिरवट वन भोवते !

"राज्ञीपद सुखभोग सोहळे नको; डोहळे मनी-

सख्याच्या संगे बसणे वनी"

"फुले भरुनि ओचले गुंफुनी स्वकरे त्यांचे सर

पुजावा वाटे गौरीहर."

"अंगि ऐट; चमकती हत्यारे; रक्त करी रंवरंव

भेरिचे झडता भैरव रव.

"नित्य असे पाहते; वाटते शिलेदार फाकडे

असावे खास हुजुरचे गडे."

रणभेरी कर्ण्याचा आता नाद न कर्णी पडे

किर्रती रात्रींचे वनकिडे;

संकेतध्वनि तो परिसुनि सरसावुनि भाले करी

सज्ज मन्मित्र होति झडकरी.

खरे, रम्य भीवरातीर ते ! खळखळ जळ वाहते !

खरे ते प्रमोदवन भोवते !

मम स्वामिनी होउनि अपुले जीवित मज अर्पिणे

कर्म हे अति साहस साजणे !

मत्त यवनकिंकरत्व-चिन्ही रति तव, मज संप्रती

शहाचा गुन्हेगार बोलती.

नाव गाव ठाव न मुळि आम्हा, घडीचा न भरवसा

कळेना अंतहि होइल कसा;

यास्तव अमुचा सुभगसुन्दरी ! संग न श्रेयस्कर

आम्हाहुनि पिशाच बरवा वर !

विकटविपिनवाटिकेनिकट विस्तृतविटपांच्या तळी

मंडळी मिळते टोळीतली;

होतो मागे कोण तदा ते आता आहो कसे

फिकीर न याची आम्हा असे !

"प्रफुल्ल भिवरातीर, तरीहि, गंभीर नीर वाहते

अफाटचि हिरवट-वन भोवते !

"राज्ञीपद सुखभोग सोहळे नको; डोहळे मनी

सख्याच्या संगे बसणे वनी."


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

बकुल

जीवाचे पहिलेच फूल फुलले दे, मीहि ते घेतले.

स्वच्छंदे दिन दोनचार मग ती तत्संगमी रंगले.

रूपोन्मादभरागमे मज गमे सौम्दर्यलोकेश्वरी-

मी, माझा सहजाधिकार सुमनस्व्कार हा यापरी !

येताहो करभार घेउनि पुढे अन्य द्रुमांचा थवा.

चाकाटे मम चित्तवृत्ति बघुनि तो थाट त्यांचा नवा !

प्रारंभीच निशा वनात अपुला अंधार पाडीतसे,

हातीचे बकुलप्रसून गळले, केव्हा कळेना कसे !

सूर्याच्या प्रखर प्रभेत न मुळी नक्षत्र नेत्रा दिसे.

जाणे चित्त परंतु नित्य गगनी अस्तित्व त्याचे असे.

चेतोगर्भनभात नित्य तळपे नक्षत्र माझे तसे;

ते माते अथवा तयास विसरे मी- हे घडावे कसे ?

श्वासे देह करी प्रफुल्लित जरी संसर्ग याचा घडे,

चित्ता छंद जडे, अनावर मिठी प्राणास याची पडे,

स्फूर्तीच्या उठती अखंड लहरी याच्याच जीवातुन;

ठावे काय मला स्वभावचि असे याचा असा दारुण

पाहू वाट किती? 'क्षमस्व' म्हणते ! लाचार माझी स्थिति !

नेत्री प्राण उरे, कसूनि बघणे आता परीक्षा किती ?

नारीधर्मरहस्यभाग नव्हता ठाऊक माते जसा

नारीचा ह्रदयस्थभाव कळला नाही तुलाही तसा !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

बुलबुल

निबिड तिमिर वर नभी संचरे

तळी उष्ण निश्वसती वारे,

सरणांचे भोवती निखारे,

स्थली या देख- एकटाच पिंपळ एक

चिरव्यथित तरुजीवज्योति

खिन्न तेज वितरिते सभोती,

जीर्ण विरल तत्‌पर्णावरती

दुःख निर्वाण-उमटवी ठसा निज पूर्ण !

उपेक्षिलेली पहिली प्रीति

रम्योदास तसे एकान्ती

एकस्थल या रौद्र प्रान्ती

तरीहि आहे-दरवळूनि परिमळ वाहे.

पांडुर मृदु लावण्यद्युतिजल

स्थलपरिसर करि ढाळुनि निर्मळ

जातिलता कुणि एकच केवळ

अदय नियतीने-लाविली तिथे स्वकराने

देह तिचा कृश फिकट पांढरा

पाहुनि होई जीव घाबरा,

वाटे सुटता उडविल वारा

पर्णसंभारा-वर भिरभिर सैरावैरा.

लागो वारा पाउस पाणी,

कुणी धृष्टकर टाको चुरडुनि,

तरि वरि भर ये वोसंडोनी

विकासश्रीला-ती अखंड मंडित बाला.

करुणामय स्वर्ललना कोणी

दिव्याश्रूंचे शिंपुनि पाणी

खचित करी संगोपन जपुनी

असे चित्ताला-वाटते बघुन वेलीला.

मृदुल धवल नव कुसुमशालिनी

व्रतस्थेस जरि बघतिल नयनी

सहजोद्‌गारे वदतिल रमणी-

"अगाइग, नवल- ही जाई नच येथील !

"वसंत न करी चैत्रशिंपणे,

"डोलत रविकर न करी येणे,

"झुरे न अंतरि तरिही तेणे

"अगाइग, नवल- ही जाई न या महिवरिल !

"साहुनि राहे कडक हिवाळा

"कुंजाचा आधार न इजला

"तरी भोगकल्लोळ सोहळा

"फुलांचा भोगी- ही जाई नवल जोगी !"

आश्चर्य एक की कुणि अलबेला

पक्षी पडता नच दृष्टीला

येई तत्सन्निध रात्र्ला

प्रेमघायाळ-भटकोनि रानोमाळ !

चाले त्याचा दीर्घ निशेभर

गूढ भावमय मृदु गीतस्वर

जणु निर्जर वीणाझंकार

की बुलबुल बोले-वनराई मोहुनि डोले !

ह्रदयि खवळला शोकसागर

कंठातुनि तरि निघती सुस्वर

येती ऐकुनि होती ते नर

स्वच्छंदी फंदी - नादाच्या ब्रह्मानंदी !

पक्षी आपण, प्रीती केली

भासे त्यांना वाया गेली

नयनाश्रू ओघळती खाली

चाखिती धुंद-दुःखाचा परमानंद !

उदास रजनी नच संपावी,

जागर दुःखे ही सोसावी,

चित्त तयांचे असेचि भावी

विलक्षण भारी-विरुताची जादूगारी

दिशा फाकती, तेज उगवते,

प्रभात होते, गीत थांबते;

त्यासरसे ते दृश्य वितळते

तेजबंबाळी-रम्याची होते होळी !

उत्कटतेने ह्रदय फोडिती

ते स्वैर स्वर रूपा येती;

कोणी म्हणती त्यात उमटती

स्पष्ट साचार-रमणीचे नामोच्चार !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

एक संवाद

चिमुकल्याच चांदण्या चमकती स्फूर्तिकणाच्या परी-

'होती लुप्त अनन्तोदरी !'

वर्षाकाली जलमय भूतल निर्झरगण तो करी-

'राहे धूळ निदाघी खरी !'

बालतृणांकुर वेलबुटीची शाल महीची करी-

'विटते निमिषाच्या अवसरी !'

नाजुक फुल जाईचे भारी वासे भुवना भरी-

'एका श्वासे सुकते परी !'

सौंदर्याची मूस ओतली नार अशी साजरी-

'होतो रंग फिका लौकरी !'

नवकाव्ये कवि करिती, असती मोत्यांच्या जणु सरी-

'पाणी क्षणिकचि त्यांचे परी !'

सख्या खोडिसी मला असे का? सान चांदण्याविना

निशेची काही कर कल्पना.

बालासम हे स्वैर नाचरे ओढे नसते तरी

होती रुक्ष मही मग पुरी !

कोमल मधुरोज्ज्वल भावांची खाण न जरि सुंदरा

जिणे मग दुःसह होते नरा !

नभाएवढा भानु एकटा पृथ्वीभर की तळे

कल्पिता कल्पनाच मावळे !

चंद्र एकटा रम्य; वेष्टिता असंख्य तारांगणी,

शोभा होते का रे उणी ?

स्तुतिनिंदेची अभ्रे येती सामान्याच्या वर,

सत्कवि दोहींच्याही पर.

क्षणभर अमुचे जीवित म्हणशी, असोचि ते क्षणभरी

चमकुनि जाऊ 'कोठे तरी.'

भाग पाडुनि तोल जाता काळाचे एकदा,

गोंधळ संपेना मग कदा !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

यमदूतास

अखिल जगतात- आनंद नांदतो मूर्त ॥ध्रु॥

स्वर्णरसांकित गिरिशिखरात,

अरुणरागरंजित मेघात,

स्निग्ध शांत की शशिप्रभेत,

शब्द होतात- 'उठ भाग्य लूट जगतांत ।'

प्राप्तस्थिति असता विपरीत

भग्न जीर्ण निर्जल विहिरीत

उगवुनि पिंपळ वर येतात

ते म्हणतात- 'चल जाऊ उंच नभात !'

कंदुक आपटता ईर्षेने

उसळुनि वर येतो वेगाने;

वाढे बल संप्रतिरोधाने,

जिव्हाळा भेटे- मग जीवन कैसे आटे ?

'दासोऽहं' हा जपता मंत्र

लोटुनि गेला काळ अनन्त,

तृप्तता न झाली संप्राप्त,

दोष कोणाचा ?- हा दासो‍हंवृत्तीचा.

परिस्थितीचे कल्पुनि भूत

कंपित होते दुर्बल चित्त,

निष्क्रियतेच्या मसणवटीत-

शून्य ह्रदयात-संचार करी ते भूत !

अशेष भुवनांतिल जीवन ते

वेचुनि घेउनि जावे वरते,

आत्मभूत मन करुनी त्याते

द्यावे सकला-अनुसरुनि जलद-रीतीला !

थेंबे थेंबे बनला सागर,

भूगोलाला कण आधार,

कार्य करावे लहान थोर,

निश्चित मिळते-फळ योग्य काळ येता ते ?

तप्तान्तःकरणा निववावे,

पतितांचे उद्धार करावे,

जानपदभ्युदयार्थ झटावे,

साधक व्हावे- प्रगतीच्या आड न यावे !

आत्मा स्वामी तू निभ्रान्त

शाश्वत तू अस्तोदयरहित

उठता विवेक हा ह्रदयात

दूर पळतात-ते भ्याड यमाचे दूत !

प्रेमाची प्रभु निर्मळ ज्योत.

जीवदशेची तिजवर वात

पेटवुनी विचरे जगतात,

विश्व हे सारे- शुचि, मंगलमय मुळचे रे !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

फुलांची ओंजळ

ऐशी प्रेमाची ती जाती, लाभाविणे करी प्रीती - तुकाराम

सृष्टीचा लडिवाळ बाळ वेल्हाळ कवी धाकटा

अफाट जगहाटात पाहिला हिरमुसला एकटा.

कळवळली कनवाळु मनी असमाय मायमावली

बाजारातुन काढून मायापाखर वर घातली.

चंद्रसूर्य खेळनी दिली खेळाया तेजागळी,

कुरवाळी हळुवारपणे पण फुले कविमनकळी.

नक्षत्रांची, चटक फुलांची, माळ टपोरी नवी

जरतारी तारात गुंफुनी लेकरास लेववी.

आकाशाचे अंगण झाडुनि अवीट रंगे वरी

विचित्र रेखा लिही लिही ती कळाचतुर सुंदरी.

'बाळ उदासी वणवण भटकुन अपार निष्टुर जगी.

असेल थकला, -विचारात या क्षणभर झाली उगी.

प्रेमासम निज अमर्याद, अक्षय्य, विनिर्मित करी

शुद्ध दुधाची नदी; पाहती अझुनी जन अंबरी.

एकाहुनि आगळी एक, रुचिरत्वे निस्तुळ खरी,

दृश्याची ती असंख्य लेणी पुढे मुलाच्या करी.

शिशुमन रमावायास करी आयास माय ती असे,

अगाध माया मोठ्यांनाही नाचवितसे भलतसे !

अळुमाळ परंतु न तो रिझला, काळोख दाट दाटला,

अजाणपण-जाणिव उपजता दृश्यलोभ आटला.

दृश्याचा अवडंबर अंबर पदर दूर सारुन

विशाळ वक्षी घट्ट धरी मग कवीस कवटाळुन.

सान्त अनन्ताची मिळनी ती, अगम्य अद्‌भुत स्वारी !

मायलेकरे अभिन्न झाली निजानंदसागरी.

सृष्टीशी कवि समरस झाला, प्राण तिचा आतला;

ह्रत्कमळाची तिच्या कळाली फुलती-मिटती कळा.

बोजड बाह्यालंकाराची झण्‌काराची रति

नुरली, अर्थाकार तयाची झाली प्रेमळ मति.

कवीच झाला सृष्टी, सारी सृष्टी झाली कवि,

दिसण्याचे-लपण्याचे गारुड अपूर्ण हा भासवी.

आकाशाचा अणू घेउनी त्यात विश्व दाखवी,

फुंकर घालुनि अजस्त्र विश्वा क्षणार्धात लोपवी,

हा हासता हसते ती, अथवा हा रडता ती रडे.

पहाट फुटते हा उठता हा निजता झापड पडे.

पूर्णापासुनि ढळलेले जग जाते पूर्णाकडे,

लांबण मोठी, वाट बिकट ती उतार चढ वाकडे.

सृष्टीचक्र हे तोल जाउनी कलते भलतीकडे,

खडतर मार्गी दीर्घकाळ ते केव्हा केव्हा अडे.

चक्र सचेतन, सतेज, पण कीटाच्या काळ्या पुढे

चक्र काळ, हा काळवंडुनी करी कधी हिंपुटे

उंचवट्यावर केव्हा जाता प्रकाशकण पाहते

पूर्णत्वाच्या भ्रांतीने तेथेच स्वैर नाचते.

पाणथळीचा खोता तेजोभास पाहता कधी

सैराटपणे भडकुनि तिकडे फसते चिखलामधी.

स्नेहाभावे एक्या जागी फिरूनि घरघर करी

तेव्हा वाटे मार्ग कंठिला आपण हा किति तरी !

जाणिव आणि नेणीव मिळोनी स्वभाव याचा घडे;

तेजोन्मुखता परी न मोडे सदा ते पडे;

सुखाभिलाषे अंग चोरणे, थंडपणे थांबणे,

लाभालाभा तोलुनि मोजुनि रूढीने चिकटणे,

या अधमेहुनि त्या अविचारी बुद्धीचे थोरले,

पात निपात अनन्त बरे तेजोभिमुखत्वामुळे.

आनंदाला म्लानपणा नच सौंदर्याला क्षय

स्थलाकडे त्या जाताहे हे विश्वचक्र निर्भय.

मार्गाची रुक्षता न याला यत्किंचित जाणवो,

परिश्रमाची प्रचंडता नच अनुत्साह उपजवो.

काव्यरसामृत यास्तव कारुण्याने निर्मुनि कवि

मृदुमधुरोज्ज्वल गीते गाउनि तेजोबल वाढवी.

भूतकाळचे वैभव किंवा सांप्रतची हीनता

प्रकर्ष भावी समोर दावी कवी समय जाणता.

हित केव्हा कटु बोल बोलुनी, हातभार लावुनी

सृष्टिचक्र हे नीट चालवी वाट उजू दाउनी.

भुताधारे समजुनि चालू काळ नीट, निर्मितो

सोज्ज्वल भविष्यकाळाला, कवि धन्य नव्हे काय तो ?

काव्य अगोदर झाले, नंतर झाले जग सुंदर,

रामायण आधी, मग झाला राम जानकीवर.

झाले कवि होतील पुढे, ह्या विशाल कालोदरी

अघटित घटना घडुन राहिली, कोण कल्पना करी ?

भारतराष्ट्रनभोमुकुरावर, सार्‍या पूर्वेभर,

चिन्हे दिसती महाकवीच्या आगमनोत्सवपर.

'राजनिष्ठ' कवि सांप्रतचे ते सर्व चला या मिळा,

या रायाचा मार्ग झाडुनी रचा चारुतर फुला.

तुमच्या परंपरेतचि याचा व्हायाचा संभव

जनकत्वाचे पद ते तुमचे, तुमचे ते वैभव !

सृष्टीचे लाडके तुम्ही संलाप तुम्हांशी करी

प्रलाप किंवा विलाप त्याला म्हणोत कोणी तरी.

"अद्वितीय उत्तम न सर्व ते अधम" म्हणुनि लेखिती

दूषक तुमचे अपूर्व त्यांची तर्काची पद्धति !

विजय असो तुमचा, तुमचे जे दूषक त्यांचा तसा

रानफुले ही तुम्हा वाहिली, नंदनवनसारसा !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

पिकले पान

पद्य मजला येईल करू जाता,
त्यात ओतू मी काव्य कसे आता ?

अंगि नुरता निर्माणशक्ति लेश
कसा यावा भर काव्यकौमुदीस ?

स्फूर्तिशक्तीचा होय लुप्त 'मंत्र'
तिथे झाले विकलांग वहन 'यंत्र'

'तंत्र' विस्मरलो, होय मी उदास !
कसा यावा भर काव्यकौमुदीस ?

एक नैसर्गिम जन्म सर्वमान्य,
अन्य होतो संस्कारकर्मजन्य

छटा यांच्या होता न एकजीव
काव्यसौंदर्यी भासते उणीव !

काव्यदेवी देउळी गर्भभागी
शिरू शकलो मी ना कधी अभागी !

मुखश्रीचे, एकान्त-दर्शनाचे
सुख स्वप्नांतहि ते न मिळायाचे

भाग्य नसता मज रसिकरंजनाचे
कसे काढू उद्‌गार धन्यतेचे ?

कुणा सांगू या कर्मकहाणील ?
मला वाटे हा जन्म फुकट गेला !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

गाविलगड

सातपुडा जवळीच बोडखे वर डोंगर घाट,

खालते जंगल मोकाट.

इतस्तता पसरुनी भरारा उंचविती माथे

आक्रमशील सकळ येथे.

पहा वृक्ष-वेली की, खग-पशु-कीटकगण सारा.

सदा संनद्ध प्रतिकारा,

मुक्तछंदलीलेचे निष्टुर शासनविधिलेख

निसर्गी जीवनीहि एक.

मंगलोग्र शक्तींचा गिरिवर सदा सिद्ध मेळा

जीवनमरणाच्या खेळा.

विरुद्धेहि एकत्र नांदवी सत्तेचा व्याप

भयानक तिचे आद्यरूप.

जीवसृष्टि जीवनात तेची रूपबिंब नाचे

जणू ते चलत्‌चित्र तीचे.

द्वितीय पुरुष न जाणिव येथे प्रथमाचा थाट

जिवाचा तो पहिला पाठ.

द्वितीयतेची जाणिव मुकुरित होता ते ज्ञान

सृष्टिचे पहिले बलिदान.

समष्टीत तद्विकास व्हावा विस्तारित अझुनी

युगे किति जातिल की निघुनी !

साध्य न हे तोवरी अवश्यचि जीवितरणकर्म

घोर तरि तो मानवधर्म

विश्वपुरुष हा विश्वाहितास्तव त्रिगुणात्मक कुंडी

पाशवी-अंश-हवन मांडी.

त्याग आणि उत्सर्ग समुत्कट उद्दीपित करिती

महत्तम अंतर्हित शक्ति.

ती आत्मोन्नति, संस्कृति ती, ती मानवता विहित

अल्पतर तामसपण जीत.

संस्कारशील संस्कृति वदशी तू सर्व भ्रममूल

मना ! मग तूहि एक भूल.

तर्कवितर्कात्मक बुद्धीचे अति अस्थिर तेज

बुद्धिची श्रद्धा ही शेज.

जाणु शके ती शक्ति वाळल्या मात्र लाकडाची.

न जाणे शाद्वल हरळीची.

प्रचंड चाले स्थूलान्तरि तो व्यापार न विदित

मनुजमतिगति परिमित अमित.

ज्ञान सरुनि संस्कार उरे ते तेवढेच तूझे

बाकी भारभूत ओझे.

समवाय संस्कृति संस्कारांचा तदनुसार शील

जिणे तिजविण बाष्कळ खूळ.

क्षितिजाच्या कंकणी ललित लघु तारा जणु विमल

वेलिच्या पालवीत फूल.

तसे गाव एक हे नदीच्या वाकणात्राहे

पाणी बारमास वाहे.

विभुत्व गिरिचे अखंड पुरवी नवजीवन तीस

खळाळे म्हणुनि समुल्हास

कडेवर टेकडी सतीचे रम्य स्थळ परम

साभिमुख भैरव बलभीम.

खडा असे सन्मुख 'गाविलगड' साहत तप करिता

आतप-हिम-वर्षा-वाता.

दिसे अस्थिपंजर केवळ तो उरे प्राण कंठी

आर्त गतवैभवार्थ पोटी.

पूर नदीचे येती पायी लोटांगण घेती

निरामय मळ टाकुनि होती.

रिघ-निघ चाले, उधळण चाले हळदकुंकवाची

गर्दी होते नवसांची.

देती नेणत सद्‌भावांचे दृढतर संस्कार

सतीचे ते जयजयकार.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

दोन 'मी'

१.

मज सर्वाज्ञा कळे न त्याला एक शिवी मी हासडतो,

'शतपाता' चा कलाभिज्ञ मी आग तयावर पाखडतो.

डोके लढवुनि पैका कमवी का मज म्हणता 'पोटभरू'?

खाल तुपाशी आणि उपाशी काय एकटा मीच मरू?

'माल गधोका अकलमंदका खुराक' हे आपण करिता,

गाल्या मजला का देता हे सत्यव्रत मी आचरिता ?

पुढे पुढे ते जाती त्यांना टांग ओढुनी पाडितसे,

पुरुषार्थाची, कृतार्थतेची सिद्धि याविना अन्य नसे !

मात्र तुम्हाला मते असावी, नकोत मज काही काय ?

'गाड मनी ती' मला सांगता, घोर होतसे अन्याय !

"हिंदुस्थाना रशिया बनवा"- महायुद्ध सांगे वर्म

'प्रथम भेद मग छेद भयंकर' हाच आमचा कुळधर्म !

२.

विशालतेतिल भिन्नत्वातिल एकसूत्रपण अव्यंग

कळोनि आहे आणायाचे वर्तनांत ते सर्वांग.

सुधारणा पाहता आजची आपणास हे स्पष्ट दिसे

पाशवता परिपूर्ण आतली उफाळुनि वर येत असे.

अणु परिमाणू रेणु आणि तिस्रेणुवर वर्चस्व दिसे

हा बुद्धीचा विकास, पण तो मानवतेचा खास नसे !

बुद्धीचा तर विकास येतो राक्षसातही आढळुन

मनुष्यत्व राक्षसास देणे आर्यधर्म हा सनातन.

उत्पत्ति, स्थिति तसाच लय हा सृष्टीचा क्रममार्ग असे

महन्मंगला चिच्छक्तीचा हा तर परमोल्हास दिसे.

३.

संस्कृति म्हणजे जीवनसरणी वेगवेगळ्या त्या असती

विशेषता तीतलि आपली दक्षपणे या रक्षू ती.

संस्कृती परकायांची करणे अकस्मात हे शक्य नसे,

अंगलगट करु नका तिच्याशी त्यात आपला घात असे.

जीवन-संजीवनी त्याग ही राष्ट्र असो संपन्न नसो

ना तरि त्याचा विनाश मनि हे अक्षयतेचे तत्त्व ठसो.

देश असो माझा मी त्याचा सर्वस्वार्पण करीन मी

निर्वाणही कधी न होइन देशाचा बेमानहरामी.

भारतास भूषण विश्वाचे करण्याचा निर्धार धरू

देशहितास्तव जगू, नाहि तर प्राणांचा उत्सर्ग करू !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

स्वैर गीत

अयि स्वैरते ! गाइं गीत तू, मतवाली तू, तू अतुला,

विषयांची निर्मात्री ती तू, विषय कोणता देउ तुला ?

"स्वैर पाखरे विचरति वरती, स्वैर फिरे वनवायु वरी;

कृष्ण मेघमंडळ प्रकाशुनि मुक्त तेज संचार करी.

स्वतंत्रतेचा अर्णव फेकी स्वतंत्र लहरीवरी लहरी

जनसंमर्दा स्नात करोनी सौभाग्याचा + सेस भरी.

पूर लोटला उत्साहाचा उसळत महितळ सकळ भरी,

ऊठ, होय जागृत बसलासी काय उगा तू स्वस्थ घरी ?

प्रतिभेच्या आरशात पडते निसर्गछाया मनोहर,

वाङ्मयतप कर; प्रसन्न होइल प्रतिभादेवी निरंतर.

भेसुरतेला सांग मराठा भ्याला केव्हा काय तरी ?

वाङ्मयगंगा खाली नेउनि सहस्त्रायुधे देइ करी.

प्रणयपंकजासवे खेळणे आता तरि तू पुरे करी

नियमांचे परिपालन सरले जाय कराया मुलुखगिरी

यशोगान-दुंदुभी नादवुनि नेई त्याला दिगंतरी

ज्योत जागती करी धरोनी दीपस्तंभ उभारि वरी !"

बाइ स्वैरते ! स्वैर धावसी धावू मागे कोठवरी ?

दमलो ! 'लेखन-कामाठी' मी आता सारी पुरे करी.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

भारतीय जीवन

१.

जीवामात्रामधे राहे एक शक्ति अपार्थिव

जड सूक्ष्मेंद्रियद्वारा हो तिचा व्यक्त संभव.

क्रियाशक्तिस्वरूपाने अनेकविध जो घडे-

व्यवहार तयालागी 'कर्म' ही अभिधा पडे.

व्यक्तिकर्मप्रवाहाचे वाहणे तेच 'जीवन'

स्थली एकीच हो त्याचे जन्म आणि विसर्जन.

'चैतन्य' म्हणती त्याते सर्व विश्वास निर्मुनी

स्वभावचि असे त्याचा रहावे त्यात व्यापुनी.

सर्वव्यापक तत्त्वा या नावे बहुत ठेविती-

'जगज्ज्योति' 'अंतरात्मा' 'जगज्जीवन' बोलती

विभूती त्यांतुनी येती; जाती आम्हास देउन

ज्ञानतेजे समायुक्त विकासमय जीवन.

भारताचा असे मोठा विस्तार तरि आपणा

महाराष्ट्रप्रतीकाने करू येतेच अर्चना.

प्रतिमापूजने होती ईश्वराप्रति अर्पण

महाराष्ट्रमिषाने हो भारताचेच पूजन.

विपन्नकाली देशाच्या अग्रभागी सदा स्थित

राहिला हा महाराष्ट्र, आज राहिल निश्चित.

२.

एकान्तात महत्कार्ये स्फूर्ति-पूर्तीस पावती

राष्ट्रोदय नवे होती सूज्ञ सर्वत्र बोलती.

एकान्तात बसू जाता अन्य संकल्प सोडुनी

विचारांचे, विकारांचे काहूर उठते मनी.

विवेकभ्रष्ट तत्त्वांचा बडिवार विवादती;

तत्त्वे ती असती कोणासाठी हे ते न पाहती !

व्यावहारिक तत्त्वे ती सापेक्ष असती सदा,

भिन्नावस्थेत कामाला तेज ते ये न सर्वदा.

देशकार्यी तत्पराते निंदिती उत्तरोत्तर

कृतीच्या शून्य नावाने शब्दगुंड घरोघर !

स्वदेशाच्या गौरवात आपला होय गौरव

यातना, हाल जे त्याचे, आपला तोच रौरव !

शक्तीचे वसतिस्थान अंतःकरण केवळ.

पवित्र जीवनाधारे कर्मे होतात सोज्वळ.

सुखाची वर्णित स्वप्ने भ्रांत चित्ते सदोदित

सत्यसृष्टीत येती का ? व्हावे कार्यास उद्यत !

स्वतंत्राची देशवाची देशवैभव गर्जते

पराधीने स्वदेशचे रचावे स्तोत्र कोणते ?

जाणत्याने सदा व्हावे यत्‍नसाहसतत्पर

सिद्धिदाता होत आला सत्यसंकल्प ईश्वर !

शक्तीच्या चालका रामा ! पुरवी मनकामना

'सत्यं-शिवं'सुंदरम्' दे आनंदवनभुवना !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

अध्यात्म

अध्यातमशास्त्र म्हणती तरि ते कशाला ?

त्याचे प्रयोजन कळे नच जाणत्याला!

हे शास्त्र काय ? न दिसे उपयोग त्याचा-

हा तो विकल्प दिसतो कविकल्पनेचा !

जे का विचार करिते जड भौतिकाचा

ते मात्र शास्त्र म्हणणे अविचार साचा !

जे दे अचेतन अणुप्रति चेतनेते

ते नित्य तत्त्व कळणे अनिवार्य होते !

ते तत्त्व निर्णय करी जड शोधनाने,

संशोधिला सकलही व्यवहार त्याने,

अध्यात्म मानस तथा व्यवहारसार

एकत्र यात मजला दिसतो विचार.

यानेच शुद्धतर हा व्यवहार केला

यानेच व्यापकपणा दिधला तुम्हाला.

पूर्वेतिहास पढता पटते मनाला

देइल वैभव पुन्हा नवभारताला !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

रगडनी ( मळणी )

केला पीकाचा रे सांठा

जपीसन सर्व्याआधीं

शेत शिवाराचं धन

आतां आलं खयामधीं

खय झालं रे तैयार

सम्दी भूई सारवली

मधी उभारलं मेढ

पात बैलाची चालली

आतां चाल चाल बैला,

पात चाले गरगर

तसे कनूसामधून

दाने येती भरभर

आतां चाल चाल बैला,

आतां चाल भिरभिरा

व्हऊं दे रे कनुसाचा

तुझ्या खुराखाले चुरा

पाय उचल रे बैला,

कर बापा आतां घाई

चालूं दे रे रगडनं

तुझ्या पायाची पुन्याई !

पाय उचलरे बैला,

कनूसाचा कर भूसा

दाने एका एकांतून

पडतील पसा पसा

आतां चाल चाल बैला,

पुढें आली उपननी

वारा चालली रे वाया,

कसा ठेवू मी धरूनी

पात सरली सरली

रगडनी सुरूं झाली

आतां करूं उपननी

झट तिव्हार मांडली

आतां सोडी देल्ही पात

बैलं गेले चार्‍यावरी

डोयापुढें उपननी

जीव माझा वार्‍यावरी

रगडनी रगडनी

देवा, तुझीरे घडनी

दैवा तुझी झगडनी

माझी डोये उघडनी !


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

आठवण

१.

ऊन उतरते होते, वारा पडला होता बंदी

दिशादिशांच्या नेत्री भरली होती मादक धुंदी.

नेती जिकडे पाय मागुनी शरीर तिकडे जाते

शून्यत्वाचा अभाव उघडे डोळे पाहत होते.

मंदावत पाउले चालली खिन्न मनाच्या भारे

तीव्र भाव हो जसा मंदतर अवास्तविक विस्तारे.

मूर्तिमंत रूक्षता वावरे अफाट त्या मैदानी

उडता जीव न दिसला एकहि ध्वनि नच पडला कानी !

रिता एकटेपणा जगी या भीषणतर भारी

साक्षात्कारी अनुभविली मी मारकता ती सारी !

२.

काळी तरुराजी क्षितिजावर दिसली त्या अवकाळी

हरिणीच्या नेत्रातिल जणु का काजळरेषा काळी !

उडती दुनिया दिसू लागली रानी गजबज झाली

स्वर्णरसाने सारवलेली शेते पिवळी पिवळी.

बंदीतुन वाराही सुटला मुक्त खगासम भिरभिरला.

झाडेझुडपे डोलु लागली उत्सव तृणपर्णी भरला.

वार्‍यावरुनी अवचित आल्या गीतसुधेच्या धारा

चित्तमोर नाचला आपला उघडुनि पूर्ण पिसारा.

स्त्रीकंठातिल होते ध्वनि ते भाव न ये निर्धारा

शेलेचा चंडोल गाय की गिरिधर नागर मीरा !

ओसरते हो गीत चालले अपूर्व त्यातिल गोडी

मिळे नृत्यगतिशीलांची त्या संगीताला जोडी.

रूपराशि उर्वशी वाटले स्वर्गातिल सुकुमारा

भरूनि हाती शुद्ध चांदणे करीत होती मारा !

होता आठव अंतःकरणी ते गीतस्वर भरती

ह्रदय नाचते नृत्यगतीच्या अविरत तालावरती.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

एक दृश्य

विदर्भात डोंगरात आहे गाव नाव बुलठाणे

वनलक्ष्मीच्या शृंगाराचे एक अमोलिक लेणे !

गावाच्या उत्तरेस आहे जवळचि डोंगर मोठा

द्वारपाळ हा कडा पहारा देउनि रक्षी वाटा !

तिकडे वस्तीपासुनि लागे उतरण काही थोडी

चढत लागते पुढे जराशी जाया उंच पहाडी.

त्या उंचावर आहे मोठा एक कडा तुटलेला

दृष्टि देखणी एकवटे ती शोभा निरखायाला

पायाखाली उंच कड्याच्या गोलाकार दरी ती

पश्चिमेस मुख करुनि दूरवर घसरत गेली होती.

सायंकाळी एके दिवशी नित्याच्या परिपाठी.

सहज निघालो व्यवसायाच्या श्रमपरिहारासाठी.

त्या रमणीय स्थळी पातलो, जाउनि वरती बसलो

सृष्टीचे ते दृश्य पाहता विसरुनि मज मी गेलो !

सूर्यबिंब सारखे धावते अस्तगिरीच्या संगा

निजैश्वर्यरंगे अभिषेकी ज्योतिर्मय महिलिंगा !

रविबिंबाचे रूप घेउनी वाटे की, अनुरागे

नील नभाची, धवल घनांची रंजित केली अंगे !

रक्तवर्ण पर्वती रंगि त्या वस्तुजात रंगे

शुचिर्भूतही तसाच होई त्यांच्या अनुषंगे.

दृष्टिपथी ये एकाएकी दरीवरिल आकाशी

ताम्रछटामिश्रित रंगाचा एक कृष्ण पक्षी.

आला कोठुनि कळले नाही निज गति कुंठित करुनी

पक्षद्वय निज पसरुनि सुस्थिर राहे निश्चल गगनी !

दृष्टि करुनि एकाग्र नेहटुनि पाहे रविबिंबासी

व्रताचरण करितसे उग्रतर काय विहग वनवासी ?

चलित स्थिति होता त्याची तो एक घेउनी गिरकी

तीव्र चिरत्कारे स्थिर होउनि बिंब पुन्हा अवलोकी.

नवलाचे ते दृश्य पाहता वेध लागला चित्ता

चाहुल नसता एकाएकी प्राप्त होय तन्मयता !

तन्मयता ती चिंत्य वस्तुच्या खोल अंतरी शिरते

बहिरंगाच्या वरते नुसते फेर घालित नसते !

मला वाटले, झेप घेउनी उंच नभाच्या भागी

पक्षी लोपुनि खरोखर स्थिर झालो त्याचे जागी !

पृथ्वीवर जड शरीर सोडुनि झालो गगनविहारी

त्या पक्षासम करू लागलो त्याची अनुकृति सारी.

व्हावे स्थिर मग गिरकी घ्यावी, रक्तबिंब लक्षावे,

असे चालले किती वेळ ते नाही मजला ठावे !

अज्ञानातुनि पक्षी आला, गेला; मीहि निघालो

पद न लागता भूमीला मी वरवर चालत आलो !

शरीरात असती तत्त्वे का जी जाणिव घेवोनी

अंतराळमार्गाने जाती त्वरित इच्छिल्या स्थानी ?

विचार करिता प्रश्न सुटेना, हुरहुर चित्ती लागे

झोपेतही तेजाळ दृश्य ते लागे माझ्या मागे !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

प्रीति

अवश्य कर प्रीति तू सहज धर्म हा वागतो

परी समज अंतरी बिकट चालता मार्ग तो !

परस्परि न राहती समसमान आकर्षणे

तरी विरस मानसी विषम चालती घर्षणे !

असे कुटिल प्रीति जी श्रुतिमनोहरा रागिणी

दिसो रुचिर ती असे गरलधारिणी नागिणी

असे द्विविध प्रीति ती - मलिन भोगकामाकुला,

तशीच दुसरी उषेसम असे महन्मंगला !

अशीच कर प्रीति जी सुपथदीपिका जीवनी

गृही सुखद होतसे तशिच श्रृंखलावंधनी !

समग्र पुरुषार्थ दे सुयश-कीर्ति, दे श्रेयसे

तसे शिकवि उज्ज्वलास्तव तुला मरावे कसे !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

रूपमुग्धा

सौंदर्याचा लीलासागर लागे हालायाला

निज लावण्योदक देखावे-इच्छा झाली त्याला.

प्रतिबिंबित आपल्या पहावी सृष्टीची व्यभिशोभा

प्रबल ओढ ही रूपसागरा त्या चढवी प्रक्षोभा.

स्वयंप्रभा अवलोकायाची जरि आवड हो त्याला

'दुजे' करुनि लागते पहावे त्याही अप्रतिमाला !

पुढे आरसा ठेवुनि बसली नवबाला एकान्ती

प्रकाश पाडित होत्या तेथे उज्ज्वल दीपज्योति.

असामान्य सौंदर्य कसे ते ज्या जग हे वाखाणी

देखायाते इच्छित होती रूपगुणाची खाणी.

स्वच्छ आरशाच्या भूमीवर प्रतिमा बिंबित झाली

लावण्याच्या कोवळिकेवर पोरचि मोहुनि गेली !

मंत्रबळे मांत्रिके करावे मंत्रबद्ध इतराला

तो संमोहनमंत्र उलटला, स्वयं बांधला गेला !

मूर्ति मनी संकल्पे होती काय उभी, अभिरामे ?

ह्रदयाचे सिंहासन बघता दिसते शुद्ध रिकामे !

वस्तूच्या निरपेक्ष असे जे भावरूप सौंदर्य

काय चालले असे तयाचे हे तव चिंतनकार्य ?

करी कल्पना सौंदर्याची सुहास्य जे अव्याज

सुरम्यतेचा तेच चढविते त्या वस्तूवरि साज.

तिरस्कार कधि प्रेम, रुष्टता कधि आकुलता, कोप

उमटुनि ते अनुरूप चालती अंगाचे विक्षेप.

ओष्ठ, भ्रू, कर कधी मोडिशी, स्थिर कधि चंचल दृष्टि

क्षणोक्षणी निर्मिशी विलक्षण नूतन अभिनयसृष्टि !

रंगविकारांचे उमटुनि हो तव सुतनूवरि मेळ

संगे त्यांच्या खेळतेस का तू हा अद्‍भुत खेळ ?

नेत्रातिल तेजाची कलिका इकडे तिकडे नाचे

जीवभाव एकत्र होउनी त्या त्या ठायी साचे.

सभोवार तेजाची निर्मळ चादर पसरत जाते

जीव उडी घे त्या मृदु शय्येवरती लोळायाते.

प्रसन्नतेचा प्रशान्त शीतल तेजोनिधि कोंदाटे

जीव सारखा पोहत डुंबत राहो त्यांतचि वाटे !

सूक्ष्म नेत्रकिरणांते घेउनि विणले वस्त्र नवीन

"मोल काय ते सांग" - पुसाया सौदागर तरि कोण ?

सौंदर्याच्या या स्फुरणाते पाहुनि प्रत्यक्षाते

साहित्यातील रसभावांचे व्यर्थ प्रदर्शन होते !

फुटे आरसा, स्वप्न उडाले स्पष्ट वाजता 'खट्ट'

मुक्तांगावर स्खलित पदर घे सावरूनि ती घट्ट !

सभोवार भयचकित लोचने पहात उठली पटकन्‌

रागात्मक भावाचे तुटले नाजुक सूत्रह तट्‌कम्‌ !

जन्मा येउनि एकवेळ हा पर्वकाळ साधावा

पूर्णोदय 'नारीतत्वाचा' भाग्ये अवलोकावा !

रसास्वादनाचित विषयांचे केवळ करिता येते-

स्वसंवेद्य आस्वादन; तेथे वाचा स्तंभित होते !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

प्रतिमाभंग

ज्यांनी भारतपुण्यभूमिवरती फोडोनिया डोंगर

लेणी निर्मुनि दाविले निज कलानैपुण्य लोकोत्तर;

वज्रप्राय कठोर भेदुनि महायत्‍ने शिलाप्रस्तर

तो कैलास अगम्य आणुनि दिला आम्हास पृथ्वीवर !

ज्यांनी मूर्ति अनेक निर्मुनि नव्या रंगावली रेखिल्या,

ज्यांच्या पाहुनि त्या कलाकृति जगे सोत्कंठ वाखाणिल्या;

हा नेत्रोत्सव पाहण्यास जमले ते तृप्त झाले जन

धीरोदात विभुत्व, ते परतले, तेथील संपादुन.

त्यांनी मूर्ति अनेक यत्‍न करूनी होत्या श्रमे निर्मिल्या

गर्वोन्माद भरात नीच यवने येवोनि त्या भंगिल्या !

हा विध्वंस समोर एक, दुसरे अद्यापिही चालता -

राष्ट्रात्मा खवळोनि जाय न कसा विच्छेद हे साहता !

प्रज्ञावंत विचारशील असती आम्हात जे संस्थित

साक्षेपे म्हणती समस्त विसरा ही दुष्टता सांप्रत.

सारे यद्यपि शान्तिपाठ पढतो सप्रेम येथे सदा

आहो मानव हे कसे विसरता आम्हास येते, वदा ?

ज्या सन्मूर्तिवरी मनोविहग हा फेरे असे घालित

ते अत्यंत सखोल वाच्य करिता येते कसे ह्रद्गत ?

कोणी निष्ठुर येउनी जरि तिला भंगोनि टाकीतसे

या निर्माल्य जगात, राहुनि अशा, त्याने जगावे कसे ?


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

पत्री समर्पण

श्रीराम

अनंत आई झगडे मनात
उसंत ना संतत चालतात
किती निराश किति थोर आशा
किती मनी चालतसे तमाशा।।

कसे तुला दावु समस्त माते
अशक्य ते या दुबळ्या मुलाते
परी कळावी तुज मन्मनाची
स्थिती, अशी आस तुझ्या मुलाची।।

म्हणून जो हा हृदयात सिंधु
उचंबळे, त्यातिल एक बिंदु
समर्पितो ठेवून नाम पत्री
तुझ्या महोदर पदी पवित्री।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, २८-२-२५

हृदय मदीय तव सिंहासन होवो

हृदय मदीय तव सिंहासन होवो।।
अभिनवतम रमणीया गुणनिधान
मूर्ति तुझी विलसत राहो।।हृदय....।।।

दंभ दर्प काम क्रोध
बहु करिती विरोध
उपजे न ज्ञानबोध
तिमिर सकल जावो।।हृदय....।।।

भक्तिभाव-गंधाची
सद्विचार-सुमनांची
मंगलमय-गानांची
पूजा तुज पावो।।हृदय....।।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२६

मजवर कृपा करावी

प्रभुवर मजवर कृपा करावी
मतिमलिनता हरावी माझी।। मजवर....।।

भरो प्रेम अंतरंगी
जडो जीव संतसंगी
मम अहंता गळावी सारी ।। मजवर....।।

नुरो तम अता समीप
जळो हृदयी ज्ञानदीप
मति तव पदी जडावी माझी।। मजवर....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३४

एक किरण

एक किरण मज देई
केवळ एक किरण मज देई।।

कोटी रवि-शशि
तू पेटविशी
विश्वमंदिरी पाही
परि मम हृदयी
तिमिर सदाही
श्रमुनी जीव मम जाई।। एक....।।

किती कृमि-कीटक
रोगोत्पादक
बुजबुजाटा जणू होई
दे सौभाग्या
दे आरोग्या
तम मम विलया नेई।। एक....।।

मी धडपडतो
मी ओरडतो
कोणि न धावो भाई
आस तुझी मम
हरि झडकारि तम
मुळी न सुचे मज काही।। एक....।।

एक किरण ना
मागे फार
एक किरण शुभ
देऊन तार
प्रणति तुझ्या शुभ पायी
तेज:सिंधो!
प्रकाशबिंदु
दे, होईन उतराई।। एक....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, सप्टेंबर १९३४

माझी बुडत आज होडी

माझी बुडत आज होडी
मज कर धरून काढी।। माझी....।।

तुफान झाला सागर सारा
मज सभोती वेढी।। माझी....।।

लोटितील मज भीषण लाटा
खचित मृत्यु-तोंडी।। माझी....।।

शांत करी रे तुफान दर्या
काळमुखी न वाढी।। माझी....।।

अपराध तुझे रचिले कोटी
परि धरी न आढी।। माझी....।।

पुनरपि माते राहीन जपूनी
करीन कधी न खोडी।। माझी....।।

रागावली जरी माय मुलावरी
संकटी न सोडी।। माझी....।।

ये करुणाकर ये मुरलीधर
हात धरुनी ओढी।। माझी....।।

किती झाले तरी मूल तुझे मी
प्रेम कधी न तोडी।। माझी....।।

इतर कुणी ते धावान येतील
आस अशी न थोडी।। माझी....।।

बाळ तुझा हा होऊन हतमद 
हाक तुजसि फोडी।। माझी....।।

आजपासुनी तव करि राया
सोपवीन होडी।। माझी....।।

मुरली वाजव सागर शांतव
वादळास मोडी।। माझी....।।

मुरली वाजव, वादळ लाजव
दाव गीतगोडी।। माझी....।।

जीवन तव पदी वाहून बालक
हात तात! जोडी।। माझी....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, ऑक्टोबर १९३४

अति आनंद हृदयी भरला

अति आनंद हृदयी भरला
प्रियकर प्रभु मम हृदयी आला
शोक पळाला
खेद गळाला
पापताप दूरी झाला।।अति....।।

मम तनमनधन
मम हे जीवन
अर्पिन पदकमला।।अति....।।

चिंता सरली
भीती नुरली
त्रास सकळ सरला।।अति....।।

प्रेमरज्जुने
प्रभुला धरणे
जाईन मग कुठला।।अति....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

मम जीवन हरिमय होऊ दे!

मम जीवन हरिमय होऊ दे
हरिमय होवो
प्रभुमय होवो
हरिशी मिळून मज जाऊ दे।। मम....।।

रुसेन हरिशी
हसेन हरिशी
हरिभजनी मज रंगू दे।। मम....।।

गाईन हरिला
ध्याइन हरिला
भवसागर मज लंघू दे।। मम....।।

हरिनामाचा
पावक साचा
अघवन घन मम जळू दे।। मम....।।

हेत हरीचे
बेत हरीचे
सकल कृतींतून दावू दे।। मम....।।

वेड सुखाचे
लागो हरिचे
हरिशी मिळून मज जाऊ दे।। मम....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, जून १९३४

मजला तुझ्यावीण जगी नाही कोणी

मजला तुझ्यावीण जगी नाही कोणी।।
अगतिक निशिदीन
मजलागि वाटे
सदा दीन या लोचनी येई पाणी।। मजला....।।

मम कार्य जगी काय
न कळे मला हाय
स्थिती तात ही होत केविलवाणी।। मजला....।।

असेल जिणे भार
वाटे मला फार
जणू देई पाठीवरी कोणी गोणी।। मजला....।।

देवा दयाळा
हतदीन बाळा
घेऊन जा ठेवि निज पूज्य चरणी।। मजला....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, ऑक्टोबर १९३४

तव अल्प हातून होई न सेवा

तव अल्प हातून होई न सेवा
मम कंठ दाटे
किती खंत वाटे
हुरहूर वाटे अहोरात्र जीवा।। तव....।।

सेवा करावी
सेवा वरावी
मानी नित्य बोले असे फक्त देवा।। तव....।।

किती दु:ख लोकी
किती लोक शोकी
परि काही ये ना करायास देवा।। तव....।।

दिसता समोर
किती सानथोर
झटती, मला वाटतो नित्य हेवा।। तव....।।

हृदयात सेवा
वदनात सेवा
उतरे न हातात करु काय देवा।। तव....।।

खाणेपिणे झोप
मज वाटते पाप
वाटे सदा तात! की जीव द्यावा।। तव....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, ऑक्टोबर १९३

सदयहृदय तू प्रभु मम माता

सदयहृदय तू प्रभु मम माता
घेई कडेवर हासव आता।।सदय....।।

अगतिक बालक
कुणी ना पालक
त्रिभुवनचालक तू दे हाता।।सदय....।।

काही कराया
येई न राया
लाजविती मज मारिती लाथा।।सदय....।।

धावत येऊन
जा घरी घेऊन
वाचव मज तू नाथ अनाथा।।सदय....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

दिसतात सुखी तात! सारेच लोक

दिसतात सुखी तात! सारेच लोक
हसतात जगी तात! सारेच लोक।।
मम अंतरंगात
परि ही निराशा
भरतात डोळे जळे, जाळि शोक।।दिसतात....।।

खाणे पिणे गान
जग सर्व बेभान
असे फक्त माझ्याच हृदयात दु:ख।।दिसतात....।।

फुलतात पुष्पे
गातात पक्षी
रडे एक मच्चित्त हे नित्य देख।।दिसतात....।।

जनमोददुग्धी
मिठाचा खडा मी
कशाला? तुझे जाई घेऊन तोक।।दिसतात....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, ऑक्टोबर १९३४

देवा! धाव धाव धाव

देवा! धाव धाव धाव
या कठिणसमयी पाव।।देवा....।।

अगणित रस्ते दिसती येथे
पंथ मजसि दाव।।देवा....।।

अपार गोंधळ बघुनी विकळ
देई चरणी ठाव।।देवा....।।

हा मज ओढी तो मज ओढी
करिती कावकाव।।देवा....।।

कुणी मज रडवी कुणी मज चढवी
म्हणू कुणास साव।।देवा....।।

घेऊनी जा मज प्रभु चरणी निज
नुरली कसली हाव।।देवा....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, ऑक्टोबर १९३४

दु:ख मला जे मला ठावे

दु:ख मला जे मला ठावे
मदश्रुचा ना
अर्थ कळे त्या
आत जळून मी सदा जावे।। दु:ख....।।

‘असे भुकेला
हा कीर्तीला’
ऐकून, भरुनी मला यावे।। दु:ख....।।

‘एकांती बसे
अभिमान असे’
वदति असे ते मला चावे।। दु:ख....।।

‘या घरच्यांची
चिंता साची’
ऐकून, खेद न मनी मावे।। दु:ख....।।

नाना तर्क
काढित लोक
नयनी सदा या झरा धावे।। दु:ख....।।

तू एक मला
आधार मुला
बसून तुझ्याशी विलापावे।। दु:ख....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, ऑक्टोबर १९३२

नयनी मुळी नीरच नाही

नयनी मुळी नीरच नाही
करपून किती मम अंतर जाई।। नयनी....।।

रडूनी रडूनी सरले पाणी
वदुनी वदुनी शिणली वाणी
आत जळत परि निशिदिन पाही।। नयनी....।।

रडता मी ना आता दिसतो
लोक सकळही परि हा फसतो
अश्रुविणे रडणे अति दाही।। नयनी....।।

खाई किडा तो आता कळीस
भ्रमर आत पोखरी काष्ठास
शोक तसा हृदयास सदाही।। नयनी....।।

अमृतधारा ये घेऊन तव
शोकानळ हा प्रभु झणि विझव
आस उरे तव केवळ आई।। नयनी....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, ऑक्टोबर १९३४

वेल

मी प्रभुराया! त्वदंगणांतील वेल
काळजी का न घेशील।।

मी एका या बाजुस पडलो आहे
वाट त्वत्कृपेची पाहे
त्वत्करुणेचे जल थोडे तरि मिळु दे
मज येथे जीव धरू दे
तू लक्ष जरा मधुनमधुन तरि देई
येईल धीर मम हृदयी
मज अंकुर मग फुटतील
मज पल्लव शुभ येतील
मम जीवन हे हासेल
ती येऊ दे मम भाग्याची वेळ
काळजी का न घेशील।। मी....।।

हे बघ किति रे! माझ्याभवती गवत
ते मजसि वाढु ना देत
मज झाकोळी गुदमरवी ते सतत
शिर वरि मुळि करू ना देत
हे खाऊनिया मारून टाकिल माते
उपटशिल जरी ना हाते
हे उपट विषारी गवत
जे मदंकुरा अडवीत
दे मला विकासा पंथ
ये सखया तू, मरण जरि न येशील
काळजी का न घेशील।। मी....।।

मज घालावे निज हातांनी पुरण
मग भरभर मी वाढेन
कधि खत घाली थोडे तरि तू राया
येईल भरारुन काया
कुणी काळजि ना आजवरी मम केली
म्हणून ही विकलता आली
परि पोशिल जरि कुणी मजला
प्रकटेल कला मम विमला
प्रकटेल दिव्यता सकला
मी त्वदंगणी म्हणूनिच झालो वेल
काळजी का न घेशील।। मी....।।

मग फुटतिल रे दिव्य धुमारे माते
मांडवी चढव निज हाते
दे छोटासा मंडप मज घालून
त्यावर प्रभुजि! पसरेन
कधि येतील ती फुले फळे मधु
मजला
लागेल ध्यान मन्मतिला
होईन अतिच उत्कंठ
कळि हळुच होइल प्रकट
तू होशिल बघुनी हृष्ट
मग सुंदरशी कितिक फुले फुलतील
काळजी का न घेशील।। मी....।।

जरि सकळ फुले सखया! ना फळतील
झडतील काहि गळतील
ती काहि तशी वांझ प्रभु! निघतील
कितिकांस किडी खातील
कितिकांस फळे धरतिल परि सडतील
वाढ ना नीट होईल
परि एक दोन तरि दिव्य
रसभरित मधुर तुज सेव्य
येतील फळे प्रभु भव्य
तव पद=-पूजा-कामी ती येतील
काळजी का न घेशील।। मी....।।

यापरि देवा! त्वदंगणी विकसू दे
बहरू दे, मुदे पसरू दे
मजमाजी जे आहे ते वाढवुन
त्वच्चरणकमळि वाहीन
परि वाढाया आहे करुणा-शरण
वाढेन सदय जरि चरण
मद्विकास त्वत्पूजार्थ
ना इतर हेतु हृदयात
हा एकच सखया हेत
फलपुष्पी हा वेल तवार्चन करिल
काळजी का न घेशील।। मी....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, सप्टेंबर १९३२

जीवनतरू

प्रभु! जन्म सफल हा व्हावा
मम जीवनतरु फुलवावा।। प्रभु....।।
सत्संगतिसलिला देई
सद्विचार रविकर देई
वैराग्य बंधना लावी
हे रोप वाढिला लावा।। मम....।।

तू विकार वादळि पाळी
मोहाचे कृमि तू जाळी
श्रद्धेचे खत तू घाली   
टवटवित हरित शोभावा।। मम....।।

धैर्याचा गाभा भरु दे
प्रेमाचे पल्लव फुटु दे
सत्कर्मसुमांनी नटु दे
सच्छील-सुरभि पसरावा।। मम....।।

गुंगोत भक्तिचे भृंग
नांदोत ज्ञान-विहंग
कूजना करुत नवरंग
शांतिच्या फळी बहरावा।। मम....।।

बंधूंस सावली देवो
बंधूंस सौख्यरस देवो
सेवेत सुकोनी जावो
हा हेतु विमल पुरवावा।। मम....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

मज माहेराला नेई

येइ ग आई
मज माहेराला नेई।।

तगमग करितो माझा जीव
तडफड करितो माझा जीव
जेवि जळाविण ते राजीव
सुकुनी जाई।। मज....।।

वृक्ष जसा तो मूळावीण
फूल जसे ते वृंतावीण
मीन जसा तो नीरावीण
तसे मज होई।। मज....।।

सदैव येते तव आठवण
भरुन येती दोन्ही नयन
तगमग करिते अंत:करण
सुचेना काही।। मज....।।

शतजन्मांचा मी उपवासी
एक कणहि ना माझ्यापाशी
तू तर औदार्याची राशी
कृपेने पाही।। मज....।।

तुझ्याजवळ मी सदा बसावे
त्वन्मुखकमला सदा बघावे
भक्तिप्रेमे उचंबळावे
हेतु हा राही।। मज....।।

वात्सल्याने मज कवटाळ
तप्त असे मम चुंबी भाळ
प्रेमसुधा सुकल्या मुखि घाल
जवळी घेई।। मज....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३४

येतो का तो दुरून

येतो का तो दुरून
बघा तरि, येतो का तो दुरून।।

येतो का मम जीवनराजा
येतो का मम अंतरराजा
कंठ येइ गहिवरून।। बघा तरि....।।

केवळ त्याच्यासाठी जगलो
केवळ त्याच्यासाठी उरलो
हृदय येतसे भरून।। बघा तरि....।।

वाट बघोनी त्याची सतत
रडुनी रडुनी निशिदिन अविरत
डोळे गेले सुजून।। बघा तरि....।।

येईल केव्हा माझा जिवलग
मम हृदयाची होई तगमग
जीव जातसे झुरून।। बघा तरि....।।

येतांची मम जीवन राणा
ओवाळून मी पंचप्राणा
टाकिन त्याचेवरून।। बघा तरि....।।

जीवनवल्लभ पडता दृष्टी
धावत जाउन घालिन दृढ मिठी
जाइन तत्पदि मरून।। बघा तरि....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, एप्रिल १९३२

पूजा मी करु रे कैशी?

पूजा मी करु रे कैशी?
येशी परि, पूजा मी करु रे कैशी?।।

पडके हे घर माझे
कैसा बोलवू? हृषिकेशी!।। पूजा....।।

अश्रूंचा माझ्या हार
घालू का तो तव कंठासी?।। पूजा....।।

सुटतात जे सुसकारे
तेची संगीत, देवा! तुजसी।। पूजा....।।

जमले अपयश माझे
त्याच्या दाविन नैवेद्यासी।। पूजा....।।

द्याया तुजलागि योग्य
नाही काहिच माझ्यापाशी।। पूजा....।।

गोळा मी केल्या चिंध्या
कैशा दावू त्या मी तुजसी!।। पूजा....।।

मोती फेकुन देवा!
जमवित बसलो मी मातीसी।। पूजा....।।

त्वत्स्पर्श परि दिव्य होता
मृत्कण होतिल माणिकराशी।। पूजा....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३

कर्ममय पूजा

पूजा करिते तव हे, प्रभुवर!
अखिल चराचर, कर्म करोनी।। पूजा....।।

रवि, शशि, तारे
सतत अंबरि तळपून
तिमिर समस्त हरोनि।। पूजा....।।

सागर उसळति
धावती द्रुतगति तटिनी
ध्येय उदात्त धरोनी।। पूजा....।।

वारे वाहति
डोलति तरुतति कितितरी
फलपुष्पानि भरोनी।। पूजा....।।

जीवन हे मम
तेवि स्वकर्मि रमोनी
जाउ झिजून झिजूनी।। पूजा....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

मजूर

आम्ही देवाचे मजूर
आम्ही देशाचे मजूर
कष्ट करू भरपूर।। आम्ही....।।

बाहेरिल ही शेती करुन
धनधान्याने तिला नटवुन
फुलाफळांनी तिला हसवुन
दुष्काळा करु दूर।। आम्ही....।।

हृदयातिलही शेती करुन
स्नेहदयेचे मळे पिकवुन
समानता स्नेहाला निर्मुन
सौख्य आण पूर।। आम्ही....।।

रोगराइला करुनी दूर
घाण सकळही करुनी दूर
स्वर्ग निर्मु तो या पृथ्वीवर
बदलू सारा नूर।। आम्ही....।।

दिवसभर असे कष्ट करून
जाउ घामाघूम होउन
रात्री भजनी जाऊ रमुन
भक्तीचा धरु सूर।। आम्ही....।।

कर्मामध्ये दिव्यानंद
सेवेमध्ये दिव्यानंद
नाही अन्य फळांचा छंद
नाही काहि जरूर।। आम्ही....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

श्रमाची महती

जरि वाटे भेटावे
प्रभुला डोळ्यांनी देखावे।। जरि....।।

श्रम निशिदिन तरि बापा!
सत्कर्मी अनलस रंगावे।। जरि....।।

प्रभु रात्रंदिन श्रमतो
विश्रांतीसुख त्या नच ठावे।। जरि....।।

प्रभुला श्रम आवडतो
जरि तू श्रमशिल तरि तो पावे।। जरि....।।

पळहि न दवडी व्यर्थ
क्षण सोन्याचा कण समजावे।। जरि....।।

सत्कर्मांची सुमने
जमवुन प्रभुपद तू पुजावे।। जरि....।।

रवि, शशि, तारे, वारे
सागर, सरिता, श्रमति बघावे।। जरि....।।

सेवेची महती जाणी
कष्टांची महती जाणी
कष्टुनिया प्रभुपद गाठावे।। जरि....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

मन माझे सुंदर होवो

मन माझे सुंदर होवो
वरी जावो
हरी गावो
प्रभुपदकमली रत राहो।। मन....।।

द्वेषमत्सरा न मिळो अवसर
कामक्रोधा न मिळो अवसर
निष्पाप होउनी जावो।। मन....।।

प्रेमपूर हृदयात भरू दे
भूतदया हृदयात भरू दे
शम, समता, सरिता वाहो।। मन....।।

पावित्र्याचे वातावरण
चित्ताभोवति राहो भरून
कुविचार-धूलि ना येवो।। मन....।।

आपपर असा न उरो भाव
रंक असो अथवा तो राव
परमात्मा सकळी पाहो।। मन....।।

धैर्य धरू दे, त्यागा वरु दे
कष्टसंकटां मिठी मारु दे
आलस्य लयाला जावो।। मन....।।

अशेचा शुभ दीप जळू दे
नैराश्याचे घन तम पळू दे
मनि श्रद्धा अविचल राहो।। मन....।।

सत्याची मज सेवा करु दे
सत्यास्तव मज केवळ जगु दे
सत्यात स्वर्ग मम राहो।। मन....।।

करुनी अहर्निश आटाआटी
ध्येयदेव गाठायासाठी
हे प्राण धावुनी जावो।। मन....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, जून १९३२

मी केवळ मरुनी जावे

काय करावे?
मी केवळ मरुनी जावे
सदैव चाले ओढाताण
हृदयावरती पडतो ताण
उरले अल्पही न मला त्राण
कुणा सांगावे।। मी....।।

क्षणभर निर्मळ गगनी उडतो
दुस-याच क्षणी दरीत पडतो
खालीवर करुनी मी रडतो
कितिक रडावे?।। मी....।।

सदभाव मनी क्षण डोकावति
धरू जावे तो अदृश्य होती
केवळ हाती येते माती।। मी....।।
मृण्मय व्हावे

कोणावरती विश्वासावे
कोणाला मी शरण रिघावे
कोणा हाती जीवन द्यावे
कुणाला ध्यावे।। मी....।।

देवाचा न मज आधार
देवाचा न मज आधार
कोण पुशिल मल्लोचन-धार
तिने वाळावे।। मी....।।

मम जीवनि मज न दिसे राम
जगुनि न आता काही काम
अविलंबे मी मदीय नाम
पुसुन टाकावे।। मी....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, जून १९३२

असो तुला देवा! माझा सदा नमस्कार

असो तुला देवा! माझा सदा नमस्कार
तुझ्या दयादातृत्वाला अंत नाहि पार।। असो....।।

तुझ्या कृपेने रे होतिल फुले फत्तराची
तुझ्या कृपेने रे होतिल मोति मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतिल सर्प रम्य हार
असो तुला देवा! माझा सदा नमस्कार।।

तुझ्या कृपेने रे होइल उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने रे होइल सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने रे होइल पंगु सिधुपार
असो तुला देवा! माझा सदा नमस्कार।।

तुझ्या कृपासिंधूमधला बिंदु जरि मिळेल
तरि प्रभो! शतजन्मांची मत्तृषा शमेल
तुझे म्हणुनि आलो राया! बघत बघत दार
असो तुला देवा! माझा सदा नमस्कार।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

प्रभो! काय सांगू तुला मी वदोनी

प्रभो! काय सांगू तुला मी वदोनी।।धृ।।

तुझी गोड येता स्मृती, आसवानी
पहा नेत्र येतात दोन्ही भरोनी।। प्रभो....।।

कृपेची तुझ्या कल्पना चित्ति येताच
पाषाण जातील रे पाझरोनी।। प्रभो....।।

अनंता! तुझ्या वैभवाला विलोकून
जाई अहंभाव सारा गळोनी।। प्रभो....।।

उदारा! दयाळा! तुझ्या देणग्यांचा
सदा दिव्य वर्षाव होई वरुनी।। प्रभो....।।

कृपेचा तुझ्या गोड मेवा मिळाया
सुखे जन्म घेईन मी फिरफिरोनी।। प्रभो....।।

जसे नीर मीनास तेवी तुझी रे
स्मृति जीवनाधार राहो बनोनी।। प्रभो....।।

जसा श्वास प्राणास तेवी तुझी रे
स्मृति जीवनाधार राहो बनोनी।। प्रभो....।।

तुझे प्रेम राया! तुझी भक्ति राया!
सदा रोमारोमांत राहो भरोनी।। प्रभो....।।

तुझे गीत ओठी तुझे प्रेम पोटी
तुला एक जोडीन जगि या जगोनी।। प्रभो....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३४

वेणु

हृदयंगम वाजत वेणू
स्वैर न विचरति इंद्रियधेनू।। हृदयं....।।

जीवन-गोकुळि ये वनमाळी
अमित सुखाची सृष्टी भरली
शिरि धरिन तदीय पदांबुज-रेणू।। हृदयं....।।

प्रेमळ गोपी या मम वृत्ती
वेडावुन प्रभुरूपी जाती
प्रभुविण वदति की काहिच नेणू।। हृदयं....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग (गोकुळाष्टमी), ऑगस्ट १९३२

मनमोहना

मनमोहना! भवमोचना!
भूक लागली
तव चरणांची
किति तरि साची
मम लोचना।। मन....।।

सकलकारी
तुजला बघु दे
तन्मय होउ दे
प्रियदर्शना।। मन....।।

शतजन्मावधि
मूर्ति न दिसली
मज अंतरली
अंतरमणा।। मन....।।

सोडि कठोरा!
निष्ठुरता तव
धीर न मज लव
मम जीवना!।। मन....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, सप्टेंबर १९३२

मनोमंदिर-राम

बाल्यापासुन
हृदयात बसुन
गोष्टी सांगे गोड
पुरवि माझे कोड
सोडुन गेला परि तो आज माझे धाम
कोठे गेला सांगा रुसुन माझा श्याम
कोठे गेला माझा मनो-मंदिर राम
हाय मी काय करू।।

सुख ओसरे
हास्य दूर सरे
खेळ संपले
बोल थांबले
माझ्या घरामधले दिवे मालवून
माझी होती नव्हती दौलत चोरून
गेला कैसा केव्हा हच्चोर पळून
हाय मी काय करू।।

आता उंदिर घुशी
येथे दिवानिशी
करितिल खडबड
करितिल गडबड
पोखरून टाकतिल माझे हृदय-राउळ
कामक्रोधा आयते मिळेल वारुळ
आत चिंतेचे शिरेल वटवाघुळ
हाय मी काय करू।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, नोव्हेंबर १९३०