ते म्हणाले, 'प्रेम अमुचा विषय नाही!'
मी म्हणालो, 'का? तुम्हाला ह्रदय नाही??'

एकदा तूही भिडव डोळे जगाशी
रोज झुकणे पाप आहे, विनय नाही

ध्वस्तले कित्येक आडोसे मनाचे
थांबला पण आसवांचा प्रलय नाही

आजही आहे अबाधित व्यसन माझे
राहिली तुजलाच माझी सवय नाही

गारद्यांचा काय मी द्यावा भरवसा
शब्द त्यांचा शब्द आहे, अभय नाही

माणसांनी निवड केली श्वापदांची
लोकशाहीचा मुळी हा विजय नाही

स्वाभिमानाचेच केवळ तेज आहे
भोवती माझ्या निराळे वलय नाही

सोडली मैफ़िल अता मी काजव्यांची
यापुढे गावात त्यांच्या उदय नाही..



कवी - वैभव जोशी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा