मी कागद झाले

मी मुलतानमधले मुक्त, तू कैद्यांमधला कैदी,
तुझे नि माझे व्हावे ते सूर कसे संवादी?

माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी
माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी,
जड लंगर तुझीया पायी तू पीस कसा होणार
माझ्याहून आहे योग्य भूमीला प्रश्न विचार.

आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही,
विनायकाने मग त्यांची आळवणी केली नाही,
पापण्यान्त जळली लंका, लाह्यांपरी आसू झाले,
उच्चारून होण्याधीच, उच्चाटन शब्द आले,

दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली,
मी कागद झाले आहे, चल लिही; असे ती वदली!


कवि - मनमोहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा