गाणे

धरु चरणासी। वंदु या महापुरुषासी।।
फासावरि जरि कुणि चढवील
देइल त्याला प्रेम-निर्मळ
अशुभ मनी ना कधीहि चिंतिल
मंगलराशी।। वंदु....।।

दारिद्रयाशी समरस होत
कटिला पंचा एक लावित
अनाश-रोगग्रस्ता धरित
निजहृदयासी।। वंदु....।।

अगणित अनुभव नानापरिचे
मेळवुनी ते बहुमोलाचे
प्रश्न सोडवीत जीवनाचे
थोर महर्षी।। वंदु....।।

लाखो लोकांची चपल मने
घेतो वेधुन निज वचनाने
सर्वांनाही शांत ठेवणे
यत्कृति ऐशी।। वंदु....।।

घोर समयिही पुढे जो सदा
पुढे टाकिले फिरवी न पदा
लागू देई ना मदबाधा
निजचित्तासी।। वंदु....।।

स्वकीय दोषां उघडे करितो
दुस-याचे गुण सदैव बघतो
चूक पदरि घेउनी दावितो
थोर मनासी।। वंदु....।।

अविरत करणे सत्यशोधन
अविरत करणे सत्यचिंतन
अविरत करणे सत्याचरण
ध्यास हा ज्यासी।। वंदु....।।

जगा अहिंसा व्यापक शिकवी
मनानेहि जो कुणा न दुखवी
आपण करुनी इतरां करवी
कृति-शूरासी।। वंदु....।।

नि:शस्त्राचे शस्त्र निर्मुनी
पद-दलितांचे करी देउनी
प्रयोग पही सदैव करुनी
कर्मयोग्यासी।। वंदु....।।

क्षमा सहनशीलता अभयता
सत्यभक्ति तशि सत्याग्रहता
यांच्या जोरावरी मिळविता
स्वातंत्र्यासी।। वंदु....।।

जगातून या तरवारीला
जगातून पाशवी बलाला
दूर कराया उभ्या राहिल्या
धृति-मूर्तासी।। वंदु....।।

जगातून या दारिद्र्याला
जगातून या गुलामगिरिला
दूर कराया घेता झाला
संन्यासासी।। वंदु....।।

गरिबांना जो बंधू वाटे
पतितांना जो पावन वाटे
दु:खितास जो त्राता वाटे
अहा ऐशासी।। वंदु....।।

बुडत्याला जो तारक वाटे
बद्धांना जो मोचक वाटे
स्फूर्तिप्रद जडजीवा वाटे
चला हो त्यासी।। वंदु....।।

हास्य जयाचे अतीव सुंदर
संकटातही शांत मनोहर
प्रेम पिकविणे या पृथ्वीवर
ठावे ज्यासी।। वंदु....।।

लोकां कैशा मिळेल भाकर
स्वातंत्र कसे मिळेल लौकर
हृदयि कसा येइल परमेश्वर
चिंता ज्यासी।। वंदु....।।

विश्वधर्म सत्याचा पाळी
विश्वधर्म प्रेमाचा पाळी
सत्यप्रेमास्तव ती जगली
मूर्ती ज्याची।। वंदु....।।

स्वतंत्रता अर्पिणे भारता
परिहरणे ही जगत्क्रूरता
दाखवुनी प्रेमाच्या पंथा
ध्येय हे ज्यासी।। वंदु....।।

केवळ सुखलालसा नसावी
सत्यसुंदरा कृती असावी
प्रेमाने ही सृष्टि भरावी
इच्छा ज्यासी।। वंदु....।।

असे हे गांधि पुण्यात्मे करीत चिंतना सदा
भारतामधली माझ्या कशी ही हरु आपदा।।

सदैव ही मना चिंता लागली शांति ना असे
अंतर्ज्वलित ज्वालाद्रि तेवि तन्मूर्ति ती दिसे।।

हसे वरी जरी गोड आत ती आग पेटली
कशी मी हसवू माझी थोर भारत माउली।।

पस्तीस कोट हे बंधु दरिद्रदेव हे सखे
गुलाम, सुखशांतिला ज्ञानाला सर्व पारखे।।

संस्कृती मारिली जाते व्यसनेही बळावती
कशी मी थांबवू माझ्या राष्ट्राची ही अधोगती।।

उपाशी असती लोक शोकपीडित आर्तसे
अंधार भरला सारा यांना मी सुखवू कसे।।

तळमळे तडफडे जीव महात्मा गांधिंचा सदा
स्वातंत्र्य-सुख- ल्लाभ बंधुंना होइ तो कदा।।

लढला आफ्रिकेमाजी चंपारण्यामध्ये लढे
खेडाजिल्ह्यातही भांडे, भांडे बार्डोलिच्या मध्ये।।

हजारो करिती कष्ट नाम गेले दिगंतर
वंद्य स्तव्य महान गांधी वेधी सर्व जनांतर।।

लोकांच्या सुखदु:खाशी एक होईल जो नर
जिवाचे करुनी रान तन्मने तोचि जिंकिल।।

महात्मा गांधि हे थोर दु:खार्त-जन-तारक
मरतात जनांसाठी म्हणुनी होति नायक।।

त्याग प्रेम तथा सेवा विशाल मतिही तया
उलगडी जाहले गुंते म्हणून मिळवी जया।।

ध्येयवादी असोनीही व्यवहार न सोडितो
समोर संकटे देखे ध्येय ना परि टाकितो।।

निर्भय-स्वांत शांतात्मा व्यवहार-विदग्रणी
स्फूर्ति दाता भीर्ति-हर्ता तो धुरीण बने जनी।।

ठेवून दिव्यदृष्टीही व्यवहारपटुत्वही
जनांस उठवी कार्या संन्यासी दिपवी मही।।

विशाल दृष्टि ती आहे अपार त्याग तो असे
धडाडी शांतिही आहे उणे काहीहि ते नसे।।

उदार नीतिधर्माने सत्याने जगि निर्भय
सार घेती, करोनीया सर्वधर्मसमन्वय।।

अजातशत्रूसे झाले मुक्तात्मे रिपु ना जया
परि हे दास्य दारिद्र्य पाववीन, वदे, लया।।

रूढींचा दंभपापांचा अन्याय्य- राजनीतिचा
कराया नाश हा ठाके हराय भार भूमिचा।।

भारतातील हे हाल बघून उठती आता
प्रतिज्ञा करिती घोर मिळवीन स्वतंत्रता।।

माझे नि:शस्त्र हे युद्ध असे अंतिम जीवनी
आणील मजला मृत्यु न वा स्वातंत्र्य मज्जनी।।

जिथे चिंतन ते केले सोडिती स्वीय आश्रम
भारत करण्या मुक्त निघती करण्या श्रम।।

अनवाणी दंडधारी सानुली मूर्ति ती उभी
राहिली निकरे धैर्ये दिपली धरणी उभी।।

सोडी सात्त्विक शक्तींचे फवारे भारतामधी
सत्स्फूर्ति संचरे दिव्य उठती मृत तो मढी।।

चालला विश्ववंद्यात्मा निघाला हलले जग
तेजाचे झोत ते सोडी उठले बंधुही मग।।

धर्मयुद्धार्थ ती मूर्ति निघे बाहेर उज्ज्वल
असे युद्ध कधी झाले? नि:शस्त्राचे जिथे बळ।।

धर्मयुद्ध नसे झाले असे कोठे महीवर
अपूर्व घडवी गोष्ट भारती परमेश्वर।।

तात, ते चालले गांधी पायांनी जरि ऊन ते
सत्त्वाची दिव्य शक्तीची प्रभा विश्वात फाकते।।

लाखो येऊन ते लोक घेती दर्शन मर्तिचे
अंतरी स्फूर्तिचे लोट उठती देशभक्तीचे।।

‘मदीय रणविद्येत सेनानी पहिला मरे
या तुम्हां दावितो’ बोले ‘मरावे केवि ते खरे’।।



असे बोलून तो दिव्य धीर गंभीर उत्कट
निघतो मरण्यासाठी तेज:संदीप्त उद्धट।।

माते, रात्रंदिन तळमळे थोर गांधी महात्मा
भूमातेची बघुन विपदा तो जळे अंतरात्मा।।

वार्धक्यीही अनुपम तपे पेटवी राष्ट्र सर्व
कष्टे मोठ्या भरतभुवनी आणिती मोक्षपर्व।।

मोठ्या कष्टे जशि भगिरथे आणिली मर्त्यलोका
स्वर्गंगा, तत्कृतिसम महात्मा करी हे विलोका
आणयाते किति तरि महायास स्वातंत्र्यगंगा
तत्त्यागाला मिति न तुलना निश्चया ना अभंगा।।

आई पूर्वी सुखरत असे जे विलासी अमीर
देशासाठी त्यजुन सगळे आज होती फकीर
लोळावे गे पसरुनी मऊ गादिगिर्दी पलंगी
देशासाठी उठुन बनती आइ ते झाडु भंगी।।

जाते कारागृहि सकळ ते नेहरूंचे कुटुंब
देशप्रीती हृदयि भरली शुद्ध त्यांच्या तुडुंब
होते लाखोपति परि भिकारी जवाहीरलाल
देशासाठी श्रमति किति, ते जसे लाल बाल।।

टाकावे गे मजसम तुवा कोटि ओवाळुनिया
आई! ज्यांचेवरुन मरती देति ते स्वीय काया
मायामोहा तुडवुन अम्हां देशकार्यार्थ जाणे
प्राणा देणे गुणगुणत गे अंतरी दिव्य गाणे।।

जो जो आहे तरुण म्हणुनी त्यास ना राहवेल
सौख्ये त्याला विषसम, पलंगी तया आगलोळ
दीपी घाली उडिस निकरे त्या पतंगासमान
जावू धावू भडकलि चिता देउ देशार्थ प्राण।।

तारुण्याचे समयि असते वृत्ति नि:स्वार्थ माते
तेजस्वी जे झणि रुचत ते मोहिते अंतराते
भीती चित्ता तिळ न शिवते भावनाही उदार
माते, ऐशा तरुण युवकांचेवरी देशभार।।

देशोदेशी तरुण करिती क्रांती ताता सदैव
त्यांचे हाती जननि असते सर्वदा देश-दैव
तुर्कस्थानी तशिच रशियामाजि तैशी चिनात
केली क्रांती तरुण युवकी तत्त्व आणा मनात।।

होतो अग्रेसर तरुण जो, वृद्ध तो पाय ओढी
उन्मात्ताते तरुण नमवी, वृद्ध त्या हात जोडी
उत्साहाते तरुण वरितो, वृद्ध नैराश्यवादी
स्वतंत्र्याते तरुण वितरी, वृद्ध तो नित्य बांधी

भूमातेला सतत विपदी अस्मदाधार एक
आम्ही तीते सजवु करुनी आमुचा रक्तसेक
देशामाजी तरुण जन ज्या कल्पना बाळगीती
तैसी देशस्थिति बनतसे सांगती वंद्य मर्ती।।

‘माझ्यासाठी मरतिल मुदे पुत्र माझे’ जपान
बोले, तेवी वदति सगळे अन्यही देश जाण
ऐशी प्रौढी परि न वदता येइ या भारताला
आई आम्हां तरुणतरुणां लागला डाग काळा।।

भूमातेच्या बघुनि विपदा चैन ना गे पडावे
तद्दास्याला झणि चुरडण्या आइ आम्ही मरावे
आनंदाने निज तनु सुखे मातासेवेस द्यावी
काळोखी जी निजशुभयशा लागली ती पुसावी।।

तान्हाजीची कृति कशि? अम्हां काय बोलेल बाजी?
आई, सारे वरुन वदती ‘प्राण द्या मातृकाजी’
आलिंगावे निज सुत तया राखणे गे घरात
आईबाबा परम अघ ते घ्या विचारा मनात।।

आई वातावरण भरले दिव्य- विद्युत्प्रवाहे
राहे गेही कवण युव तो आज गे सौख्यमोहे
नाही तो गे तरुण, दिसतो वृद्ध नामर्द षंढ
राहे स्वस्थ स्वगृहि जरि है पेटता यज्ञकुंड।।

यावी स्फूर्ति प्रबळ-तर ती रक्त ते सळसळावे
भूमातेच्यास्तव मृति वरावयासआम्ही उठावे
राहो ना ती अशनशयनाची स्मृती अंतरंगा
वेडावोनी अम्हि जननीच्या धावणे बंधभंगा।।

नांदे गेही जननि सुत जो आजला खातपीत
आलापीत स्वनित कवने तो पशू गे खचित
नीच प्राणी परम तदध:पात गे जन्म सात
मातेच्या उद्धृतिसमयि जो लक्ष तेहि न देत।।

आई माझ्याहुन कितिक ते कोवळे सान बाळ
हालांमध्ये हसत असती नाहि का गे कमाल?
‘देशासाठी तनु झिजवु ही’ बाळ ते बोलताती!
मोठ्यांच्याही वच परिसुनी अश्रु नेत्रांत येती।।

स्वातंत्र्याची घुमघुमतसे भारती आज भेरी
व्हावे जागे झणि तरि अता, झोपलो अवेरी
माते, माते अडविशि कशी पाडिशी केवि मोह?
देशद्रोहा करु म्हणशि का? मी असे घट्ट लोह।।

मायापाशी झटदिशि झुगारुन देतात बंधू
होती सिद्ध प्रमुदित मने तो जरि क्लेश-सिंधू
गेही राहू? मरण बरवे त्याहुनी ते विशंक
लावू कैसा प्रियभरतभूमायिला मी कलंक।।

प्राणत्यागे निजयश टिको, नीति ही पूर्वजांची
रोमी रोमी भरलि अमुच्या गोष्ट ही सत्य साची
देऊ प्राणां फिकिर न करु सोडु ना स्वाभिमान
सत्त्वासाठी करित असती थोर ते देहदान।।


न करा अल्पही शोक आईबाबा मदर्थ तो
दु:खाची ही नसे गोष्ट पारतंत्र्यास मी धुतो।।

उपाशी बंधु जे कोटी त्यांना अन्न मिळावाया
करिती यत्न जे थोर त्यात गेलो मरोनिया।।

धन्य या निधना माना वदवे मज फार ना
आईबाबा सुखा माना नीर आणा न लोचना।।”

(इतक्यात एकदम एक गाणे ऐकू येते. तेव्हा मुलगा विचारतो.)

“तात, कोठून हे येते गीत ऐकावया बरे
कोण गातो दिव्य गाणे मोहितो मन्मना खरे।।”

(बाप सांगतो)

“बाळ शेजारच्या गेही कवि एक रहातसे
देशाचा ध्यास त्या नित्य पहाटे रोज गातसे।।

स्वातंत्र्याची दिव्य गाणी खिडकीत बसूनिया
गातसे होत तल्लीन वृत्ति ती पावुनी लया।।”

(मुलगा म्हणतो)

“तात ते ऐकु या गीत अपूर्व मज वाटते
अधीर मम हे कान ऐकाया गान दिव्य ते।।”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा