बाप बोलतो

विचार बाळ हे खोल जनास रुचतील का
शंका चित्तांत ही माझ्या म्हणून बसतो मुका।।

धर्माच्या कल्पना रुढ स्वातंत्र्यप्राप्तिच्या तशा
तद्विरुद्ध जना गोष्टी वद तू रुचतील का।।

(हे ऐकून मुलगा एकदम आवेशाने म्हणतो.)

ध्येयाचा एक माणूस हलवील उभी वरा
तात! गंभीर चित्तांत विचार करणे जरा।।

म्हणेल जनता मूर्ख हसेल अवमानिल
ध्येयाचा नर तो थोर पद मागे न घेईल।।

नवीन कल्पना लोका रुचते नच तत्क्षणी
उपहासास्पद ठरे कल्पनाप्रसु जो जनी।।

निश्चयाने परी ठाण मांडितो वीर तो यदा
वंदाया येति तत्पाद टाकुन स्वमनोमदा।।

धैर्याने प्रथम नभात एक तारा
ठाके नंतर उडुवृंद येत सारा,
छातीचा नरच धजे जली शिराया
येती मागुन सगळेच येति बाया।।

निर्मी जो पदसगरा तयास मान
त्याला या जगि मिळते महोच्चस्थान
लागे ही पुढति कुणीतरी घुसाया
लागेच प्रथम कुणी तरी मराया।।

कोणीच प्रथम जरी पुढे न येई
सारे प्रेक्षक, जगदुन्नती न होई
ध्येयाचे नरच वरी समाज नेती
घेऊन ध्वज पुढती सदैव हो ती।।

सददृष्टी नच रममाण पार्थिवात
आकर्षी निशिदिन यन्मना उदात्त
श्रद्धेने मरति असे कितीक संत
ध्येयाते जगि करण्यास मूर्तिमंत।।

ध्येयाला चिकटुन नित्य राहतात
आघाता निजशिरि सर्व साहतात
ना घेती पदहि कधी भिऊन मागे
ज्योति प्रज्वलीत यदंतरंगि जागे।।

सत्याला धरुनि मनात सर्वदाही
तेजाने नरवर तो पुढेच जाई
सांगाती मिळति जरी तरी बरेच
थांबे ना पुढति निघेच एकलाच।।

मोहाला करुन दुरी असत्य सांडी
लोभाते करुन दुरी मदा विभांडी
श्रद्धेचा धरुन करी प्रशांत दीप
ध्येयाचे हळुहळु जातसे समीप।।

लोकांचा प्रबळ सुटे निरोध-वारा
दीपाते विझवि विनिर्मि अंधकारा
आशेने ज्वलित करी पुन:पुन्हा तो
पाऊल स्थिरमतिने पुढेच घेतो
सत्याचा धरुन मनी प्रचंड जोर
विघ्नांचा करुन समस्त चूर चूर
निद्रा न, तळमळ होत फार जीवा
अत्युत्कंठित बघण्या स्वध्येय- देवा।।

चित्ताची तगमग होइ, नाहि शांति
दृष्टीला दिसत अखंड दिव्य सृष्टी
कष्टा आमरण करीत, कार्यनिष्ठा
ही दिव्या उठविल अंति सुप्त राष्ट्रा।।

लोकांच्या कळकळ जिंकिते मनाला
विश्वास प्रगटवुनी, करी कृतीला
सौख्याचा अनुपम सोहळा पहाया
लागेल प्रथम जगात या मराया।।

निंदेने न खचत ना चढे स्तुतीने
अंधारी बिकट चढे कडे धृतीने
ज्यावेळी सकळहि बंधू झोपलेले
थोरांनी समयि तशाहि कष्ट केले।।

ज्यावेळी सकळहि बंधु घोरताती
हाकांनी मुळि न कदापि जाग घेती
खोली ना नयन जरीहि हालवीले
थोरांनी समयि अशाहि कष्ट केले।।

एकाकी झटति जगास हर्षवाया
एकाकी उठति तमास संहराया
एकाकी निघति विपत्ति दूरवाया
एकाकी मरति समस्त उद्धाराया।।

ध्येयाचे वरि अपुले सदैव डोळे
ठेवून स्थिर, करि काम तो न बोले
सत्याचा मम पथि अंश तो असेल
माते सद्यश तरि अंति ते मिळेल।।

ऐशी ती हृदयि अखंड वृत्ति शुद्ध
ठेवोनी, करित विरुद्धतेशि युद्ध
सत्याचा धृव नयनांसमोर तारा
राखोनी करित अखंड यत्न सारा।।

एकाकी शिरत पुढे, पडोहि काया
एकाकी धजति पहाड वाकवाया
एकाकी करित कमाल शर्थ यत्न
बांधाया निज पदरात सत्यरत्न।।

लावोनि तनमनवित्त ते पणाला
ध्येयार्थी झिजवित, तात, आपणाला
ओतोनी सकल सुखावरी निखारे
कष्टांना करित सदा मरे अहा रे।।

जाताती मरुन असे जगात थोर
हालांना सहन करुन घोर घोर
मेलेली मति अजिबात ना जयांची
ते तेव्हा उघडिति दृष्टि एकदाची।।

सत्याला कसुन पहाति मृत्युपाशी
सत्त्वाला बघति कसून संकटाशी
ज्वाळांच्या मधुन घुसून वीर जाई
लाटांशी प्रबळ करीत हातघाई।।

घालोनी स्वशिरि किरीट कंटकांचा
हालाचा मिरवुन कंठी हार साचा
मृत्यूला निरखुनिही करीत चाल
भेटाया मुदित अशास विश्वपाळ।।

सोसोनी छळ करुनी अहिंस युद्ध
त्यागाते तळपति दिव्य ख्रिस्त बुद्ध
आपत्ती कितिक तया महंमदाला
आल्या त्या तुडवुन विश्ववंद्य झाला।।

ब्रूनोला हरहर जाळिले जिवंत
सॉक्रेटीसहि मरणा वरीत शांत
सोसोनी सकलहि हाल ते अपायो
प्रस्थापी स्थिरमति सत्य गॅलिलीओ।।

एकाकी प्रथम महान उठे शिवाजी
होते ना प्रथम कुणी तयास राजी
निष्ठेने जनमन तो करी स्वकीय
त्यागाने मिळवित अंति दिव्य ध्येय।।

ऐसा या भुवनि सदा असे प्रकार
ध्येयार्थी बनून जिवावरी उदार
वाटेल न बघत होइ अग्रगामी
ईक्षेने विफल करी न आयु नामी।।

मागोनी मग अनुकारशील लोक
येती हो, धरुन मनात नीट रोख
यासाठी प्रथम कुणी तरी उठावे
लागे, हे खडतर तत्त्व आयकावे।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा