धर्मनिंदा नको

(बाबा, इतर धर्मांतील उदात्त गोष्टीच आपण बघाव्या. महान धर्मसंस्थापकांची निंदा करणे बरे नव्हे.)

“जो देवास भितो असे अधिक तो, तो उच्च, तो सत्कृती
नाही वंश कुळास मान लिहिले ऐसे कुराणी किती
झाल्या थोर विभूति या जगति ज्या हे विश्व ज्या वंदिते
त्यांना तुम्हिहि मान द्या अरब हे ऐसे कुराण सांगते।।

लोखंडाहुन अग्नि थोर, जल ते अग्नीहुनी उदबळ
वारा वारिहुनी, तयाहुन असे मोठा गिरी निश्चळ
त्या अद्रीहुन थोर जे सदय जे निष्पाप जे अंतर
ऐसे या जगतास नित्य करिते श्रीमत्-कुराण जाहिर।।

आकारी प्रभु तो नसे, विभु महान ना मूर्तिमर्यादित
तुम्ही बंधु समस्त, ईश्वर मनी भावोन जा वागत
शेजा-यास जरी नसे तुझी तू देत जा भाकर
साध्या, सुंदर गोष्टि सांगत अशा शिष्यांस पैगंबर।।

बुद्ध प्रीती कथी अनंत, न असे जी वस्तुमर्यादित
युष्मत्प्रेमजलामबुधीत सगळे राहो जगत् डुंबत
कोणाला दुखवा मुळी न, न कुणा जीवास लावा ढका
आचारा मधुरा सुरम्य असल्या बुद्धोपदेशी शिका।।

पश्चात्ताप खरा मनास तरि तो घेईल विश्वंभर
प्रेमाने जवळी, जरीहि असला दुर्वृत्त पापंकर
घाली बंध्वपराध पोटि सगळे, जैसे तुझे देव तो
तत्त्वे ऐशि उदार सुंदर जगा तो ख्रिस्त हो अर्पितो।।

जे जे सुंदर सत्य हृद्य, उचलू सर्वांहि धर्मातुनी
होऊ थोर सनातनी तरि खरे थोरांस या सेवुनी
‘अकाशामधला तुझा मज असे ठाऊक तो बाप रे’
ऐसे बोलु न पूज्यनिंदन करी तो जीव कैसा तरे।।

काही अन्य म्हणोत मी करिन मच्चित्तास मोठे खरे
जे जे सत्य दिसेल ते नमुनि मी घेईन अत्यादरे
ऐशी वृत्ति सनातनी कुठुनही येवो प्रकाशप्रभा
ओलावा कुठलाहि तो मिळवुनी सदवृक्ष राहे उभा।।

ओलावा हृदयास द्या मिळवुनी ठेवा न ते कोरडे
द्वेषाने जगतात तात उपजे तो द्वेष वाढे नडे
प्रेमाते प्रकटोनिया गुण दिसे तो मुख्य मानूनिया
दूरी दुर्गुण ते करून, झगडू तो स्वर्ग निर्मावया।।

रामोपासक गाणपत्य कुणि वा श्रीकृष्णनामी रत
जैसे एक घरात आज दिसती प्रेमे सुखे नांदत
ख्रिस्तोपासक रामभक्त अथवा पैगंबराला नत
हे एक्या घरि नांदण्यास नसती का तात हो संगत।।

बाबा थोर अपाय ह्या सकळही श्रीमद्विभूती शुभा
पूजावे मनुजे तयांस मिळते जेथून ज्याला प्रभा
सन्यत्सेन असून ख्रिस्ति, बनला तो चीनराष्ट्राग्रणी
राष्ट्राच्या जनकापरी समजती त्या लोक सारे चिनी।।

तो सेनापति नोगि ख्रिश्चन जगद्विख्यात शौर्याकर
त्याते देइ जपान मान न मनी आणीत धर्मांतर
तैसे आपणही खुशाल कुठल्या धर्मास मानो कुणी
होऊ चित्ति उदार, सत्यमय तो पूजू बनोनी गुणी।।

निष्ठा राखुन आपुली, न दुखवू जी अन्यनिष्ठा खरी
अन्याच्या हृदया जरा दुखविणे ती होय हत्या तरी
सांभाळून परस्परांस करुनी घेऊ विकासा चला
देणे हाच धडा समग्र जगता या भारताने भला।।

राहे जीव धरुन देश अपुला कंगाल दु:खी मुका
आहे ध्येय तयास काय? पडतो चित्ति प्रकाशांशु का?
आहे हा जगला कशास जगती प्राचीन हो भारत
देवोनी टकरा अनंत टिकला काळाशि हा झुंजत?।।

स्वातंत्र्या मिळवून काय जगती सांगेल हा भारत?
दास्यी लोटिल काय अन्य जनता होऊन सत्तारत?
ऐश्वर्यी मिरवेल काय जगती मत्तोन्मदांधापरी,
विश्वाला लुटुनी जगास करुनी दुर्मिळ ती भाकरी।।

व्हावा भारत शीघ्र मुक्त तरि तो व्हावा किमर्थ वदा
नाही खास जगामधील असती त्या पोसण्या आपदा
शांताचा जगतास सत्पथ भला दावावया भारत
होतो मुक्त, म्हणून ईश्वरकृपे तो जाहला ना मृत।।

युद्धाचा जगतास वीट लढुनी येईल तो अंतरी
शांतीचा मग त्या तहान हृदयी लागेल तीव्रा खरी
तेव्हा भारत हा स्वतंत्र जगता दावावया सत्पथ
अग्रे होइल, नीट चालविल हा विश्वंभराचा रथ।।

नाना धर्म विभिन्न ते असुनिही प्रेमादरे राहती
शेजारी, शिकवील सर्व जगता ही भारती संस्कृती
हिंदु ख्रिश्चन पारसीक शिखही ते जैन बौद्धादिक
इस्लामी अणखी कुणीहि सगळे नांदोनि निर्मू सुख।।

घेऊ सर्वहि तात! थोर हृदये अन्योन्य जे चांगले
होऊ उन्नत उत्तरोत्तर गळा घालून भावे गळे
शांती शांतिविहीन युद्धनिरता दावावया भारत
आहे हा जगला, न ईश्वरकृपे तो जाहला हो मृत।।

बाबा उदार शुभ उन्नत हे विचार
सर्वत्र भारतजनी करणे प्रसार
नि:शंक निर्भय बनोनी कथावयास
यावे पुढे जनहितास करावयास।।

ते आग पेटविति सर्वहि हाय बाबा
खोटीच दाखविति ऐट आणि रुबाबा
ना भांडणे मिटविती परि वर्धमान
बाबा करोनि अजि कापिति देश-मान।।

लावावया सजति लोक समस्त आग
ना शांतिचा कुणिहि दाखविण्यास मार्ग
ओतीत तेल सगळे विझवी न कोणी
प्रत्येक देशहित हेच मनात मानी।।

लागे कधी तरि जगी मनुजा शिकाया
ना भांडणे हित असे. श्रम वेळ वाया
होऊनिया स्वमनि केणि तरी उदार
लागेच शांत करणे हलके विकार।।

ना ह्यांत तो कमिपणा मच हानि यात
होण्यात उन्नत सदा सुख थोर तात
तो देव ना हृदयि मात्र समीप ओठा
पूजीतसो सकळही अभिमान खोटा।।

जो व्यापितो सकल विश्व, तदर्थ तात
भांडावया उठति, दुर्मति वाटतात
ना देवभक्ति हृदयी अभिमान-भक्त
भांडोनिया सतत सांडिति बंधुरक्त।।

बेधूवरी कर कधी न कुणी उगारी
जो लेकरे प्रभूचि मनि मनात सारी
ना बंधु-रक्त सुखवी जगदीश्वराला
देवा न पूजिति, परी अभिमानतेला।।

होऊन सर्द मनि एक, स्वतंत्र होऊ
विश्वास विक्रम अनंत सुतेज दाऊ
स्वातंत्र्यही मिळविणे न मुळी रणाने
मारू न, आम्हि मिळवू अमुच्या मृतीने।।

न तात युद्धमार्गाने स्वातंत्र्य भारता मिळे
न अत्याचार करुनी सत्य हे मन्मना कळे।।

ऐक्याचा एकजूटीचा नि:शास्त्राचा तसा नव
संदेश द्यावया लोका हजारो लागती युव।।

विचार-जागृती मोठी यदा देशात होइल
उठतील भय-त्यागे तेव्हा स्वातंत्र्य येइल।।

तात म्या काय सांगावे उठोनी मातृभूस्तव
प्रेमे त्यागे जरी शोभू वेळ मोक्षार्थ ना लव।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा