लोकांची मनोवृत्ती

(लोकांच्या मनोवृत्तीचे तो तरुण पुत्र वर्णन करतो.)

“न केवळाहि भावना न केवळाहि वल्गना
विचार भावना कृती तरीच होइ उन्नती।।

उदार भावना नसे विचार ना मनी वसे
कृती म्हणाल शून्य ती कशी घडेल उन्नती।।

मनास टोचणी नसे मती सखोल ती नसे
खुशालचेंडु बैसती कशी घडेल उन्नती।।

जिवंत भाव ना तिळ तुटे न चित्त तिळतिळ
न मान-कीर्ती-चाड ती कशी घडेल उन्नती।।

पशूसमान जीवन पशूंतही किती गुण
न सत्यवस्तुची रती कशी घडेल उन्नती।।

स्वदेश न स्वधर्म न स्वकर्म न स्वशर्म न
उगीच व्यर्थ जल्पती कशी घडेल उन्नती।।

स्ववस्त्र न स्ववस्तु न स्वशस्त्र व स्वशास्त्र न
उगीच नंदि डोलती कशी घडेल उन्नती।।

मत स्व न मति स्व न कुठेच काहि राम न
अजागळापरी गती कशी घडेल उन्नती।।

समस्त हे परभृत खरा न एक पंडित
करील आत्म-आरती कशी घडेल उन्नती।।

मदांध ग्रस्त मत्सरे प्रमत्त देत उत्तरे
घमेंड की अम्हा मती कशी घडेल उन्नती।।

सदैव वृत्ति उर्मट सदैव एक तर्कट
करी टवाळि दुर्मति कशी घडेल उन्नती।।

गंभीरता विशुद्धता न ठाउकीच उद्धटा
सदैव छद्म दाविती कशी घडेल उन्नती।।

स्ववर्तनात वक्रता स्वभाषणात आढ्यता
जगास तुच्छ लेखिती कशी घडेल उन्नती।।

जगात आम्हि शाहणे नसे जणू अणू उणे
पदोपदी परि च्युति कशी घडेल उन्नती।।

हुशार राजकारण अम्हिच जाणतो खुण
अशी करुन स्वस्तुती कशी घडेल उन्नती।।

अम्हीच डाव जाणतो अम्हास कोण सांगतो
अशी करुन स्वस्तुती कशी घडेल उन्नती।।

सदुक्ति ती पटेच ना सुबुद्धि ती असेच ना
वदे तशी नसे कृती कशी घडेल उन्नती।।

समीप बुद्धि ती नसे दिली तरी न घेतसे
मनी सदा अहंकृती कशी घडेल उन्नती।।

दिवाळखोर हा असे हसे जगात होतसे
मनी परी न लाज ती कशी घडेल उन्नती।।

स्वतास मार्ग ना दिसे परास नित्य जो हसे
न यत्न ना पुढे गती कशी घडेल उन्नती।।

टपे सदे बकापरी स्वरुप साजिरे वरी
मध्येच चोच मारिती कशी घडेल उन्नती।।

महान खरे जगदगुरु सदैव यत्पदा धरु
करी न त्या नमस्कृती कशी घडेल उन्नती।।

जगात काय चालले स्वभूत केय चालले
न हे कुणीही पाहती कशी घडेल उन्नती।।

पलंगपंडिता-करी घडेल केवि चाकरी
न जोवरी खरे व्रती कशी घडेल उन्नती।।

असावि एकतानता असावि भाव-तीव्रता
तरीच होतसे कृती कृतीविणे न उन्नती।।

परंतु काय ही दशा बघुन दु:ख मानसा
न देशभक्ति ती दिसे खुशाल खातपीतसे।।

बघून देशदुर्गती खुशाल खेळ खेळती
क्षुधार्त बंधु पाहुन सुचे तयांस भोजन।।

खुशाल नाच चालती अनंत द्रव्य ओतिती
विचार येइ ना मनी दरिद्रता किती जनी।।

सहानुभूति-बिंदु न सुखी समस्त निंदुन
न चिंधि एक देतिल परस्व मात्र घेतिल।।

न सत्य ते मुळी उरे कसा समाज हा तरे
असत्यदेव पूजिती असत्य नित्य वागती।।

न बंधुभाव अल्पही दया क्षमा न नावही
न ऐक्य ते कुठे दिसे सदैव भांडखोरसे।।

घरात रोज भामडती पथात नित्य भांडती
मनी सदैव भांडती जनी समस्त भांडती।।

मजेत खेळ मांडिती तिथेही भांडु लागती
गंभीर प्रश्न काढिती तिथेही भांडती किती।।

करंट लोक हे असे कशास भाग्य येतसे
विदीर्ण होइ मन्मन बघून आपुले जन।।

यदा सुबुद्धि येइल तदाच कार्य होइल
विचार भावना मनी कृती घडेल हातुनी।।

म्हणून म्हणतो बाबा विचारा पेटवू जरी
पेटवू जनचित्ताते कृति होईल ती खरी।।

तुरुंगी असताना मी होउनी भावनिर्भर
लिहिले गीत मी एक म्हणु का गोड सुंदर।।”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा