महात्माजी व रवींद्रनाथ

(ध्येयार्थी पुरुषांचे वर्णन करुन मुलगा म्हणतो की, आज ह्या भारतात कवींद्र रवींद्रनाथ व मुनींद्र महात्मा गांधी हे दोन थोर ध्येयवादी पुरुष जगाला मार्ग दाखवीत आहेत.)

आजी या सकलहि भारतात दोन
ध्येयार्थी अचल विशालधी महान
ध्येयाच्यास्तव झटती सदैव तात
अश्रांत श्रम करिती पुढेच जात।।

टागोर प्रथित तसेच थोर गांधी
पुण्यात्मे उभय प्रसिद्ध ध्येयवादी
दोघांनी बघुन जगातले प्रकार
केला हो निशिदिन अंतरी विचार।।

युद्धे ही बघुन जगातील अघोर
स्वार्थाची निरखुन लालसा अपार
सत्तेची बघुन जगातील घमेंड
दोघांचे हृदय ते विदीर्ण ते दुखंड।।

सत्तेचा कारुन विशंक दुष्प्रयोग
लोकी या सृजन अनंत दु:खभोग
तोफांनी करुन जगास या गुलाम
गर्वाने मिरवित हे खल प्रकाम।।

लोकांना लुटुन करुन स्वीय दास
शक्तीने हरुन मुखामधील घास
दावोनी अहरह पाशवी कृतीते
गर्वाने स्तविति पुन्हा स्वसंस्कृतीते।।

कल्याणा करित असो अम्ही जगाचे
टेंभा हा मिरविति, सर्व दंभ साचे
मारोनी शर, वदतात पुष्पवृष्टि
दु:खाने भरिति नृशंस सर्व सृष्टी।।

पाहोनी सकल जगामधील दंभ
दुष्टावा बघुन जगातला अबंध
स्वार्थाचे बघुन हिडीस हे स्वरुप
दोघांच्या हृदयि विचार ये अमूप।।

जीवात्म्या करित निबद्ध यंत्रशक्ति
निर्मोमी हृदयि अदम्य स्वार्थभक्ति
देहाचे सकळ गुलाम होत दास
आळा ना मुळिहि तसेच वासनास।।

मी मोठा प्रबळ जगात श्रेष्ठ मीच
तोरा हा मिरविति उद्धतांत नीच
देहाला सुखविति पुष्ट तो करोनी
जाते हे हृदय सदा परी मरोनी।।

लाभावी निजवनलागि तूपपोळी
अन्यांची करित खुशाल राखहोळी
बांधाया निज रमणीय बंगल्यास
ठेवावे करुन जगास सर्व दास।।

होवोनी सकल जगात जेवि देव
दास्या ठेवुन इतरांस सर्वदैव
ना लज्जा तीळहि मनात, थोरवीच
वाटे ही, किति तरि लोक होत नीच।।

मोटारी उडविति तेवि ती विमाने
मोठाले अमित अजस्त्र कारखाने
याला ते वदति समस्त संस्कृती की
ठेवावे खितपत मात्र अन्य पंकी।।

‘मारावे इतर’ वदेल संस्कृती न
चित्ताची पशुसम वृत्ति ही निहीन
सर्वांचा जरि रमणीय तो विकास
जागा ती तरिच असेल संस्कृतीस।।

तुम्हाला जरि रुचते स्वतंत्रता ती
अन्या का पकडुन ठेविता स्वहाती
पृथ्वीचा जणु दिधलाच ताम्रपट्ट
राष्ट्रांना अबल करीत नित्य गट्ट।।

गर्वांध प्रबळ बनून पाश्चिमात्य
औद्धत्या प्रगट करी सदैव व्रात्य
ना त्याला हृदय जणू नसेच भाव
चोराचेपरि लुटुनी फिरुन साव।।

‘ज्याची ही प्रियकर भूमि तेथ त्याने
नांदावे, प्रगति करीत ती सुखाने
राष्ट्रे ही सकळ असोत ही स्वतंत्र
सांभाळू सकल मिळून विश्वयंत्र।।

घेऊ या करुन समस्तही विकास
दावू दे निखिल जन स्वयोग्यतेस
दावू दे अखिल जना स्व-सुंदरत्व
सर्वांना प्रकटवु दे विशिष्ट स्वत्व।।

उद्यांनी सकल फुलोत या जगाच्या
जावे ना पथि मुळिही कुणी कुणाच्या
राष्ट्रांनी करुनि अशी जगी व्यवस्था
निर्मावे मधुर अपूर्व शांतिगीता।।

घेवोनी गुणलव जो असे पराचा
साठा तो करु हृदयी अमोल त्याचा
वक्षाची पसरति दूर दूर मूळे
ओलावा मिळविति, ना म्हणून वाळे।।

तैसे या जगति करुन मानवांनी
घेवोनी किरण समीप वा दुरूनी
उत्कर्षा झटुन करीत हो रहावे
वाढोनी, जगति सुखास वाढवावे।।

सत्पुष्पे विविध फुलोत संस्कृतीची
अर्पू त्या प्रभुस मनोज्ञ माळ त्यांची
ती निर्मी मधुर जसा ध्वनी सतार
सदगंधा वितरिल हाहि दिव्य हार।।

भेटू या, ग्रहण करु परस्परांचा
आनंदे जरि दिधला सदंश साचा
ना घ्यावा ग्रह विपरीत तो करून
मोती ते मिळत बघाल जै बुडून।।

शेवाळ प्रथम वरी तुम्हां दिसेल
मोती ना वरवर खोल ते असेल
पंकाते विसरुन पंकजा विलोकी
नांदावे गुणवरणार्थ सर्वलोकी।।

लोकी या किति तरी दु:ख हो स्वभावे
भांडोनी सतत किमर्थ वाढवावे
केला या भुवनि विनाश मानवांनी
सामक्षा दिसती पहा स्वलोचनांनी।।

झाले जे विसरुन सर्व आज जाऊ
देवाला निशिदीन अंतरंगि गाऊ
निर्मू या सकल जगात बंधुभाव
वाढाया विपुल असो सदैव वाव’।।

संदेशा वितरित ह्या जगा रवींद्र
वाणीने मधुर नितांत हा कवींद्र
वाटे हा रवि म्हणजे मुकुंद-वेणु
वंदावा निजशिरि तत्पदाब्ज-रेणु।।

विश्वाला विसरविती दुराग्रहाते
सध्याची उपनिषदे यदीय गीते
आकाशी विहरत जो सदा पवित्र
मांगल्या पसरित नित्य यच्चरित्र।।

जो अंतर्बहि रमणीय निष्कलंक
मोठे यद्-हृदय गंभीर जे विशंक
जेथे ते अगणित स्वार्थ माजलेले
तेथेहि धृतिमति हे रवींद्र गेले।।

गावोनी गव हृदयंगम स्वगीते
स्थापोनी गुरुतर विश्वभारताते
एकत्र स्थिर करि पूर्व-पश्चिमेला
जो होता भ्रम विलयास आज गेला।।

गांधीही असुन असेच ध्येयवादी
स्वातंत्र्य स्वजनहितार्थ घेति आधी
होईल स्वजन यदा खरा स्वतंत्र
देता येइल जगतास शांतिमंत्र।।

गांधी हे परम पवित्र दीनबंधु
दारिद्रयी समरस होति प्रेमसिंधु
उद्धारा कथिति नवीनसा उपाय
त्यागाने तळपति तेज ते न माय।।

फुलासमान कोमळ मुलासमान निर्मळ
विशाल अंबरासम गंभीर अंबुधीसम।।

वसुंधरेसम क्षमी गिरीपरी सुनिश्चळ
पवित्र गांगतोयसा विशुद्ध सत्य यदबळ।।

अपाप कोकरापरी सतेज केसरी जसा
अथांग प्रेमसागर तमास दूर सूर्यसा।।
अनाथ-दीन-वत्सल उदार अब्द-सदृश
सहानुभूतिनिर्झर सुधेसमान यद्यश।।
विरक्त जो शुकापरी सहा रिपूंस जिंकिता
प्रबुद्ध वाक्पतीसम धुरीण सर्व जाणता।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा