माझी पत्री

कुठुन आणू सुमने सुवासी
उदार माते तव पूजनासी
न बाग येईल कधी फुलून
सुपुष्प-रोपे जळती सुकून।।

जुई न जाई न गुलाब राही
न मोगरा गे निशिगंध नाही
न पारिजाते न टिके बकूल
न रोप ते एकहि गे जगेल।।

कुठून आणू बहुमोल पाने
प्रयत्न केले किति लेकराने
जगे न आई तुलसी न वेल
जळेल दूर्वींकुर ना हसेल।।

सुपुष्प नाही न पवित्र पान
सदैव खालीच मदीय मान
सदैव माझी परडी रिकामी
श्रमूनिही बाग बये निकामी।।

मदंतरांतील उदंड पाणी
अखंड देतो नयनी भरोनी
तरी न ही बाग फुलून येई
बघू किती वाट मनात आई।।

करावयाला तव पूजनाला
किती परी उत्कटता मनाला
किती तरी दाबु कितीक रोधु
किती सदा मी समजावू बोधू।।

न वाट आता बघतो कशाची
कुचंबणा ना करितो मनाची
असेल बागेत मदीय जे जे
समर्पितो ते तव पादपूजे।।

अनंत-मालिन्ययुते विशीर्णे
निरस्त-तेजे कृश हीन दीने
कशीतरी ही परडीत पाने
करून गोळा भरिली मुलाने।।

मदंतरांतील अपार पाणी
सुदीन पानांवर शिंपडोनी
करुन मी निर्मळ आणिली ही
करुन घे गोड तयांस आई।।

हसोत सारे मम पूजनाला
न तू हसावे जननी मुलाला
भिकार माझी म्हण तू न पत्री
समर्पितो जी चरणी पवित्री।।



 - साने गुरुजी
- पुणे, २७ फेब्रुवारी १९३५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा