जाणीव

क्षणोक्षणी असते जाणीव मनाच्या सोबतीला,
भावनांच्या संवेदना म्हणूनच जाणवतात मनाला

समुद्रकिनार्‍याला असते जाणीव फेसाळत्या थेंबांची,
भरती ओहोटीत सोबत असलेल्या पाण्याच्या गहिर्‍या प्रेमाची

रात्रीलाही जाणीव असते उगवत्या सुर्याची,
काळोखाच्या गर्भातून जन्मलेल्या प्रकाशाच्या किरणांची

गरिबांना जाणीव असते माथ्यावरच्या ओझ्याची,
श्रमासाठी भटकणार्‍या अनवाणी जड पावलांची

श्रीमंतांना असते जाणीव हरवत चाललेल्या नात्यांची,
चढाओढीत घुसमटलेल्या अतृप्त संसाराची

श्वासापासून श्वासापर्यंत जाणीवच सोबत असते,
मनाच्या कोपर्‍यांतल्या स्वप्नांना हळूच स्पर्शून जाते

ठाव मनाचा घेता घेता नकळत हरवून जाते,
कधी सुखात, कधी दुःखात मनास गोठवून जाते

गोठलेल्या मनाच्या संवेदना जाग्या होतात प्रीतीस्पर्शाने
भावनांचे अर्थ शोधाया निघालेल्या आठवणीने

जाणीवेच्या वाटेवरती अर्थ भावनांचे उमगले
आता काही तरी शोधायचे आहे, जाणीवेच्या पलीकडले...


कवियत्री - वैशाली राजवाडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा